भटकंती (ठाणे ते शेगाव)

मागील वर्षी ऑगस्टमध्ये आमचे शेगावला जायचे ठरले होते. पण भरपूर पाऊस असल्याने जायचे टाळले होते. नंतर मला कामातून वेळ मिळत नसल्याने ह्याबाबत जास्त विचार करता आला नाही. आता १० एप्रिलला गुडफ्रायडे, शनिवार व रविवार असे ३ दिवस सुट्टी मिळत होती. त्यामुळे मग ह्यावेळी जायचे ठरविले. एक दोघांच्या सांगण्यावरून रेल्वेने जाणे सोयिस्कर पडेल असा सल्ला मिळाला. एखादी कार भाड्याने घेउन जावे असे माझे मत होते. एकच आठवडा असल्याने रेल्वेचे तिकिट मिळण्याची शक्यता नव्हतीच. तरीही रेल्वेच्या संकेतस्थळावर पाहिले तर सर्व वर्गाची तिकिटे वेटिंग लिस्ट मध्ये. तसेच प्रवास हा थेट शेगाव व येता येता शिर्डीवरून येणे असा विचार होता. त्यामुळे मग कारनेच जाणे पक्के केले. पण निघायच्या २ दिवस आधी. तोपर्यंतही काही नक्की होत नव्हते म्हणून मग जास्त कोणाशी विचारणाही करता आली नाही. उन्हाळ्यात जात असल्याने उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही गुरूवारी रात्री निघण्याचे ठरविले. कार ज्यांच्याकडून घ्यायची त्यांना रात्रीचा प्रवास करायचा आहे ह्याची कल्पना देऊन ठेवली.

गुरूवारपर्यंत गूगल मॅप वर जायचा रस्ता पाहून ठेवला होता. गूगल मॅपची सुविधा बरी वाटली, की किती अंतरानंतर कुठे वळायचे व पुढे कसे जायचे हे वाक्यांमध्ये लिहून तसेच नकाशातही दर्शविते. (अमेरिका, इंग्लंड मध्ये राहणाऱ्यांना ह्याची सवय झाली असेल, पण इथे अजून ते तितकेसे वापरले जात नाही असे वाटते. असो) ऑफिसमधून त्याचे एक प्रिंटही काढून ठेवले. (ते घ्यायला विसरलो निघताना  ) पाहता पाहताच लक्षात आले की मोबाईलमधूनही मी गूगल मॅप वापरू शकतो. अशा गोष्टी मी सोडत नाही. लगेच ते माझ्या मोबाईलमध्ये कार्यान्वित करून घेतले. GPRS ची सुविधा आधीपासून आहेच. २ दिवस आधीच मोबाईल कंपनीला संपर्क करून रोमिंग चालू आहे व जात आहे तिकडे चालू असेल ह्या गोष्टींची खात्री करून घेतली होती, त्यात GPRS ची विचारणा होतीच.

रात्री १०:३० वाजता आम्ही प्रवासाला सुरूवात केली. ड्रायव्हरने पहिली गुगली टाकली, "शिर्डी जायचे आहे ना? " म्हटले नाही, "शेगाव". पण त्याला एवढा अंदाज होता की आम्हाला रविवार रात्रीपर्यंत परत यायचे आहे. त्यामुळे ३ दिवस आम्ही शिर्डीला काय करणार असा प्रश्न त्याला पडला होता का हा प्रश्न मी मनात येऊन सोडून दिला. त्याला सांगितले की 'शेगावला जायचे आहे'. सोबत हे ही सांगितले की '५५० किमी आहे'. उगाच त्याने नंतर अडचण नको सांगायला. पण तो काही म्हणाला नाही. आई म्हणाली, 'आधी शिर्डीला जाऊ'. मी म्हटले, 'आधी निघूया. नाशिकला पोहोचेपर्यंत आपल्याकडे ३ तास आहेत, त्या वेळेत विचार करू. ' थोडक्यात, आम्ही नाशिकला प्रयाण केले. नाशिकचा महामार्ग नेहमीपेक्षा मला कमी गर्दीचा वाटला. थोडे बरे वाटले. वाटले, पुणे महामार्गाप्रमाणे हा ही सुधारला आहे. अर्धा तासातच आम्ही पहिल्याच मतावर कायम राहिलो. आधी शेगावला जायच्या.

वास्तविक रेल्वेने जाताना मार्ग असतो, "ठाणे-नाशिक-मनमाड-चाळीसगाव-पाचोरा-जळगाव-भुसावळ-अकोला" (मधली स्थानके जाऊ द्यात  ) पण मला गूगलने रस्ता सांगितला तो "ठाणे-नाशिक-मालेगाव-धुळे-जळगाव-भुसावळ-अकोला". वाटले, आपण उगाच फिरून तर जाणार नाही ना? नंतर विचार केला, नाशिकमध्ये विचारता येईल. (रात्री २-३ वाजता किती लोक असू शकतात रस्ता सांगायला, ही शंका तेव्हा नव्हती आली पण आता आली). नाशिकला द्वारका पार केल्यानंतर एका चौकात खरोखरच २/३ रिक्षाचालक व इतर माणसे उभी होती. त्यांच्याकडून खात्री करून घेतली की मालेगाव-धुळ्याचाच रस्ता बरोबर आहे. पुढे एका हॉटेल मध्ये चहा घेताना ड्रायव्हर म्हणाला की आपण ८/८:३० पर्यंत पोहोचून जाऊ. पण आता मला साडे दहा तासांची खात्री नव्हती. म्हटले १० तरी वाजतील. नाशिकहून पुढे निघालो मालेगावच्या रस्त्यावर. रस्ता आतापर्यंत चांगला होता, पण मालेगाव येईपर्यंत तेवढा चांगला राहिला नाही. खड्डे खड्डे नाही, पण एकाच वेगात गाडी न नेण्यासारखा. मालेगावला केव्हा पोहोचलो आठवत नाही. ४-४:३० झाले असतील. नंतर पुढे धुळे यायच्या आधी पुन्हा मोबाईल बाहेर काढला व नेमके कुठे वळायचे आहे ते पाहून घेतले. ड्रायव्हरला म्हटले, 'ऍग्रीकल्चर कॉलेजच्या पुढे उजवीकडे वळायचे आहे. ' तोपर्यंत ६ वाजत आले होते. चहा प्यायचेही ठरविले. तसा मनात विचार आला, 'आता NH3 आणि NH6 असे दोन महामार्ग भेटत आहेत तो चौक मोठा असेलच व त्याच्या आसपास धाब्यावर चहा घेता येईल. ड्रायव्हरला ही आराम करता येईल थोडा वेळ. ' पण पाहतो तो काय, जंक्शन चांगले होते, जळगावला वळायचे लगेच कळले. पण चहाकरीता एकच टपरी होती. ती लक्षात येईपर्यंत पुढे निघून गेलो. म्हटले, पुढे कुठेतरी घेऊ चहा.

 

साधारण अर्ध्या तासानंतर ड्रायव्हर स्वतःहूनच म्हणाला आता झोप येतेय. त्याला म्हटले, थांबव गाडी जिथे जमेल तिथे. वाटल्यास मी चालवतो. तो म्हणाला, 'तुम्ही बोलत राहा. बोलता बोलता झोप येणार नाही'. पण मला रिस्क वाटत होती. गाडीच्या टेपच्या स्पीकरची वायर निघाली होती. तो म्हणाला, 'गाणी लावूया. ' त्याकरीता एका ठिकाणी गाडी थांबविली. मी पाहिले तर एका पडिक वाटणाऱ्या जागेत बहुधा हॉटेलचा बोर्ड आहे. अर्थात हॉटेल नव्हते. पण तिकडे असलेल्या माणसांना विचारले तर ते म्हणाले, 'चहा मिळेल येथे. ' चला, चहाची तर सोय झाली. जसा असेल तसा. तिकडेच थोडेफार पाय मोकळे केले, चहा घेतला, बैलांचे (आणि बैलांसोबत) फोटो काढले. .

   

मला वाटले की शेगाव असेल ९०-१०० किमी. पण माझी नकाशातून अंतर मोजण्यात चूक झाली होती. नकाशावरून तर दिसत होते की फार लांब आहे पण लिखाणातील अंतराची बेरीज होती १०० किमी. पुढे एका फलकावर पाहिले, भुसावळच १०० किमी च्या वर आहे. तेव्हा लक्षात आले, शेगाव अजून २०० किमीच्या वर आहे. ४/५ तासांची निश्चिंती. :( भुसावळ येईपर्यंत एकही हॉटेल नाही जिथे नाश्ता करता येईल. भुसावळमध्ये ही पुढे पुढे करत बाहेरच आलो. १० वाजेपर्यंत कुठेच काही नाही. मला मध्ये आलेली शंका बरोबर होती ते एका तेव्हाच उघडत असलेल्या हॉटेलमध्ये कळले. त्या भागात हॉटेल ११/११:३० च्या नंतरच उघडतात, तेही थेट जेवणाकरीता. मग एका ठि़काणी कचोरी, भजे व चहा घेउन नाश्ता केल्यासारखे खाल्ले. रात्रीचे जागरण आणि आता जाणवणारे ऊन ह्यामुळे मी खामगावला पोहोचेपर्यंत थोडी झोप काढली. गूगलने सांगितल्याप्रमाणे खामगाव मध्ये तीव्र डावे वळण घ्यायचे होते. त्यानुसार मग मी एखादा चौक पाहत होतो. पण प्रत्यक्षात लोकांनी सांगितले त्याप्रमाणे खामगाव बस स्टँडपासून सरळ जायचे होते. तिथे जाऊन पाहिले तर शेगावकरीता हलकेसे डावे वळण होते व तीव्र उजवीकडचा रस्ता अकोल्याकडे जात होता. असो, पूर्ण तर चुकले नाही ना.

आता शेगाव संस्थानाचे फलक दिसू लागले होते. "सर्वात प्रथम भक्त निवास क्र. ५ मध्ये जागेची चौकशी करणे" हे फलक सर्वात जास्त दिसले. वाटले, थांबण्याची सोय झाली. असे करत अंदाजे दुपारी १२ वाजता आम्ही शेगावला पोहोचलो.

(क्रमशः)