दिनांक २६.०७.२००५ (न विसरता येण्याजोगी आठवण - १)

मागच्या २६ जुलैला मुंबईला पडलेल्या अभूतपूर्व पावसाचा प्रत्यक्ष अनुभव २६ तारखेच्या पूर्वसंध्येवर येथे देत आहे. दुसरा भाग उद्या.


बुडत्याला गाडीचा आधार


गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच मी आणि माझी मुलगी मुंबईला गेलो होतो. चांगले दोन महिने राहण्याचा बेत होता. घरात भावाच्या बाळाचा जन्म झाल्याने काही कार्यक्रम होते. माझी सात वर्षांची मुलगी यापूर्वी न कळत्या वयात मुंबईला येऊन गेल्याने निदान या वर्षीतरी तिला मुंबई दाखवावी असा बेत होता. काही ठिकाणी जाण झालं, पण मुंबई शहराच्या बाजूस फारसं जाण झालं नाही. शेवटचे १०-१५ दिवस राहिले तसे मी ठरवले काही झाले तरी गेट वे ऑफ इंडिया व नेहरू तारांगणाला भेट द्यायची, काय बुद्धी झाली कुणास ठाऊक पण जायचा दिवस ठरवला तो, २६ जुलै २००५ चा.

सकाळीच उठून घराबाहेर पडायचे, टॅक्सीने सगळीकडे फिरायचे, बाहेरचे जेवायचे असा झक्कास बेत होता. दोघींनीच काय जायचं म्हणून मी माझ्या आई बाबांनाही तयार केले. बाबा यायला तयार नव्हते पण बऱ्याच आग्रहानंतर ते तयार झाले. दिवस थोडा फार ढगाळ होता(partly cloudy). आकाशात थोडेफार ढग होते पण पाऊस पडत नव्हता, वाराही नव्हता. घरातून निघता निघता फोन वाजला. फोनवर मावसबहीण होती. तिच घर दादर चौपाटीला लागूनच आहे. जुजबी बोलण्यानंतर तिला आमचा बेत कळवला तशी ती म्हणाली, "कशाला बाहेर पडता आज? बाहेर समुद्रावरचं आकाश अगदी भरून आलंय, एकंदरीत रंग अगदीच वेगळा दिसतोय. उद्या जा पाहिजेतर."

"काहीतरीच काय? इथे तर आकाश बऱ्यापैकी स्वच्छ आहे आणि आमची तयारी सुद्धा झाली आहे. घरातून बाहेर पडायच्याच बेतात होतो, आता बदल कशाला? असं करतो की परत येताना वेळ मिळाला तर तुझ्याकडेही चक्कर मारतो," असं सांगून मी फोन बंद केला आणि घराबाहेर पडले.

सुमारे साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास आम्ही गोरेगाव ते गेट वे प्रवास करून मुंबईच्या एका टोकाला पोहोचलो. आकाश इथे जरा जास्तच ढगाळलेलं होतं पण पाऊस पडत नव्हता. माझ्या मुलीने आजी आजोबांबरोबर फोटो काढून घेतले. मनसोक्त हुंदडूनही घेतले. हळू हळू थेंब थेंब पावसाला सुरुवात झाली. अंगाला लागेल न लागेल असा पाऊस. आम्हाला छत्री उघडण्याचीही गरज वाटली नाही. साडे बाराच्या सुमारास दुसरी टॅक्सी करून आम्ही चर्चगेटला पोहोचलो. स्टेशनजवळच एका रेस्टॉरंट मधे जेवून सुमारे तासाभराने बाहेर पडलो तर पावसाची मध्यम सर आली होती. आता नेहरू तारांगण गाठायचं होत.

तारांगणाला पोहोचलो तसा तिथे काही शाळांच्या सहली आल्याने गर्दी होती
म्हणून तारांगणाला नंतर येऊ आधी महालक्ष्मी जवळ असलेल्या नेहरू सायन्स सेंटरला जाऊ असं ठरवून पुन्हा टॅक्सीत बसलो आणि सायन्स सेंटरला पोहोचलो.

तो पर्यंत पावसाने जोर धरला होता. बरंच झालं आपलं पाहून होईपर्यंत पाऊस ओसरेल असा विचार करून आम्ही आत शिरलो आणि बाहेरच्या जगाशी आमचा संबंध तुटला. सुमारे चारच्या दरम्यान आम्ही बाहेर आलो. बघतो तर काय? पाऊस वेडा वाकडा कोसळत होता. विजांचा चकचकाट, कानठळ्या बसवणारा गडगडाट, झाडं वाकवणारा सोसाट्याचा वारा  भितीत भर घालत होता. नेहरू सेंटरच्या प्रवेशद्वारातून पाण्याचे लोटच्या लोट आत शिरत होते.

"पाऊस थोडा कमी झाला ना की आता सरळ घरीच जाऊया," आईने सुचवलं.
वीस पंचवीस मिनिटे आम्ही थांबून वाट पाहिली पण पाऊस ओसरण्याच चिन्ह दिसत नव्हतं. आता अजून किती वेळ एका जागी थांबून राहायचे त्यापेक्षा बाहेर टॅक्सी मिळते का पाहावं म्हणून छत्र्या सावरत आम्ही बाहेर पडलो आणि त्याच क्षणी भिजून ओलेचिंब झालो. बाहेर एकही रिकामी टॅक्सी दिसत नव्हती. रस्त्यावर घोट्यापर्यंत पाणी साचलं होत. काही वेळाने एक रिकामी टॅक्सी तशी मी धावत जाऊन त्याला विचारलं, "गोरेगाव चलोगे?" माझ्याकडे मख्ख चेहऱ्याने पाहत त्याने मान वळवली आणि आपली टॅक्सी पुढे दामटली. मग दुसरा, तिसरा अशा अनेक टॅक्सीवाल्यांनी या ना त्या प्रकारे नकार दिला. शेवटी गोरेगावचा हट्ट सोडून निदान प्रभादेवीला मावस बहिणीकडे जायचं ठरवलं. तरीही सर्वांकडून नकारच. आता पुढे काय? असा विचार करत आम्ही भर पावसात कुडकुडत उभे होतो आणि तितक्यात एक टॅक्सीवाला समोर येऊन उभा राहिला.

"कहॉं जाना है?", "प्रभादेवी, चलोगे?"

"लेकिन आगे सब रस्ते बंद है। पानी भर गया है। चाहो तो टॅक्सीमें बैठ जाना, जब बारीश कम होगी तब छोड दूंगा।... वैसे भी छोटी बच्ची के साथ कहां भिगते रहोगे?"

चला बुडत्याला गाडीचा आधार असं म्हणून आम्ही टॅक्सीत बसलो. निदान जितकं होईल तितकं तरी पुढे जाऊया असा विचार करून ड्रायव्हरने टॅक्सी पुढे दामटली. थोडं फार पुढे जातो तोच पाण्याची पातळी अचानक वाढायला लागली. टॅक्सी ड्रायव्हर आता पुढे जायला नाही म्हणू लागला, "अभी पानी में तो टॅक्सी नहीं ना डाल सकता, नुकसान होगा, एलफिस्टन में मेरा सेठ रहता हैं वहां जायेंगे। टॅक्सी बंद पड गयी तो लेने के देने पडेंगे।" आमच्याकडे त्याचं ऐकण्याशिवाय काही पर्यायही नव्हता. पाऊस धो धो कोसळतच होता. कुठल्यातरी गल्ली बोळांतून रस्ता काढत त्याच्या मालकाची इमारत थोडी उंचवट्यावर होती त्या आवारात त्याने टॅक्सी स्थानापन्न केली आणि तो आत निघून गेला.

रस्त्यावर तोपर्यंत गुडघाभर पाणी साचले होते, वाहनांची वर्दळ थांबली होती. सगळीकडे शुकशुकाट होता. संध्याकाळचे साडे पाच वाजायला आले होते. मधे एक दोन वेळा ड्रायव्हर आणि त्याचा मालक येऊन चौकशी करून गेले. आम्ही मुकाटपणे टॅक्सीत बसून होतो. हात पाय आखडून गेले होते. ओल्या कपड्यात थंडी वाजत होती. टॅक्सीच्या काचा खाली करण्याचीही सोय नव्हती. करणार काय? वाट पाहत राहण्याखेरीज दुसरा पर्यायही नव्हता. साडे सहाच्या सुमारास वारा थांबला, हळू हळू विजा, गडगडाट, पाऊसही थांबला. टॅक्सी ड्रायव्हर पुन्हा एकदा चक्कर टाकून गेला, "बैठे रहो, जब भाटा आयेगा तब पानी उतर जायेगा, फिर प्रभादेवी पहुंचा दूंगा। आपको चाय पीनी हो तो बाजू में ही दुकान है।"


HPIM0845
दुपारी बाराच्या सुमारास अगदी हलका पाऊस.. बहुतेक लोक छत्रीशिवाय.


 


HPIM0849
ढगाळलेल्या अरबी महासागराचे एक प्रकाश चित्र.




(क्रमशः)

खराब हवामानामुळे चित्रे तितकीशी चांगली आलेली नाहीत. क्षमस्व.