माहुली

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले जे काही किल्ले आहेत, त्यात माहुलीची बाल शिवाजीच्या काळापासून वर्णी लागेल. शिवरायांच्या जन्माच्या वेळी शहाजीराजांच्या ताब्यात असलेल्या या किल्ल्यावर बालपणी महाराज अनेकदा येउन गेले.

शनिवार २४ मार्चला मनोज, किर्ती, केशव, कूल असे पाच जण इंद्रायणी एक्सप्रेसने पुण्याहून कल्याणकडे निघालो, लोणावळ्याला फदि सामील झाला. कल्याणला उतरून ९.५० च्या कसारा लोकलने आसनगावकडे निघालो.

गडाजवळचे माहुली गाव आसनगावपासून आठ किमी अंतरावर आहे. शहापूर हे मुंबई आग्रा महामार्गावरचे गावही माहुलीपासून अकरा किमी आहे. एवढ्या रात्री रिक्षा मिळाली तर ठीक नाही तर पायी चालत जायची तयारी ठेवा असे सगळ्यांना सांगितले होते, आणि तशीच वेळ येणार होती. पण सुदैवाने प्रवासात शहापूरच्या जोशी गुरुजींशी ओळख झाली आणि त्यांनी शहापूरला फोन करून श्री. आपटे आणि खरे असे दोन रिक्षावाले आमच्यासाठी आसनगावला येतील अशी व्यवस्था करून दिली, एवढेच नाही तर रिक्षाने आमच्याबरोबर माहुलीला येउन दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचीही व्यवस्था करून दिली. अशा वेळेला सध्याच्या धकाधकीच्या दिनक्रमात अगदी जवळचे नातेवाईक आले तरी त्यांना आपण एवढाही वेळ देउ शकत नाही याची आठवण होते.

मुंबईहून येणाऱ्या साधना आणि पंकजची कसारा लोकल चुकली होती, पण ते ठाण्याहून बसने बरोबर वेळेत हजर झाले आणि आम्ही हायवे ओलांडून माहुली गावाकडे निघालो. वाटेत एक आशिया खंडातले सर्वात मोठे देउळ होत आहे अशी माहिती मिळाली.

माहूली गावापुढे सरळ गेले की दीड एक किमीवर महादेवाचे अतिशय प्रशस्त असे मंदिर आहे, समोर विहिर आहे, बाजूल असलेल्या एकमेव घरासमोर हातपंपही आहे. माहुलीची डोंगररांग समोर पश्चिमेला कललेल्या चंद्राच्या मंद प्रकाशात उजळून निघाली होती, दोन तीन आडवे उत्तुंग पहाड, चार पाच भेदक सुळके असा सगळा उठुन दिसणारा ऐवज होता. देवळात लाईट आहेत, गडाचा नकाशाही लावला आहे. देवळात मुक्काम ठोकला, जेवण आटोपली आणि या वेळेला लवकर उठायचेच असे एकमेकांना बजावत पथाऱ्या पसरल्या.

पहाटे उठुन, सर्व आवरून सहा चाळीसला गडाकडे कूच केले. वाट प्रशस्त आहे, ठिकठिकाणी गिरीमित्रांनी दगडावर बाण काढले आहेत, त्याआधारे गेलो तर वाट चुकण्याचा धोका नाही. एक कोरडा पडलेला मोठा ओढा ओलांडला आणि चढ सुरू झाला, अर्ध्या तासातच एका पठारावर आलो, तिथुन मधला माहुली, उजव्या बाजूचा पळसदुर्ग आणि डाव्या बाजूचा भंडारदुर्ग, चंदेरी सुळका, नवरा नवरी आणि वऱ्हाडी सुळके यांचे अगदी स्पष्ट दर्शन घडते. हे दोन्ही दुर्ग खरे तर माहुली किल्ल्याचाच भाग, पण शिवाजी महाराजांनी तहाप्रमाणे औरंगजेबाला देतांना चतुराईने हे तीन मोजले, तसेच पुरंदर-वज्रगड पण दोन धरले, सिंहगड-खांदकडा दोन धरले.

बरेच चालायचे आहे हे प्रथमदर्शनीच लआत आले होते. हा सगळा परिसर संरक्षित अरण्यात येत असल्याने अर्ध्या उंचीपर्यंत थोडीफार झाडी आहे, करवंदाच्या तर भरपूर जाळ्या आहेत, पण अजून हिरवी होती सगळी करवंद.  वाटेत पावसाळ्यात तुडुंब आनंद देतील आणि थोडी भीतीही वाटेल अशा काही जागा आहेत. दोन अडीच तासाच्या दमदार चालीनंतर तटाच्या खाली आलो.  इकडे आता शिडी लावली आहे, चढुन वर आलो आणि गडाचा विस्तार किती मोठा असावा हे लक्षात येईना. समोर काहीच बांधकाम नाही, खुणा नाहीत वर आल्यावरही समोर माथ्यावर छोट्यामोठ्या टेकड्याच. सुदैवाने दिशादर्शक बाण गडावरही आहेत, पुढे एक पाण्याचे टाके लागले, पाणी हिरवे असले तरी जास्त चविष्ट आहे असे दुसऱ्या एका ग्रुपने आम्हाला नंतर उतरतांना सांगितले. त्या टाक्याजवळच आमच्या आघाडीच्या तुकडीला एका सापाने बराच वेळ आपल्या लीला दाखवल्या आणि त्या त्यांनी व्हिडिओ चित्रितही केल्या. किर्तीला साळिंदराचे काटेही सापडले होते. थोडे पुढेच एका झाडाच्या चतकोर सावलीत चूल मांडली गेली होती, आणि केशवसुमार पोहे करण्यात गुंतले होते.

तो कार्यक्रम आटोपून गडाचा फेरफटका मारायला निघालो. महाद्वार, तिकडच्या तीन देवड्या , दारात माजलेले केतकीचे बन, शरभ शिल्प, भिरभिरणारे विविधरंगी चतुर आणि फुलपाखरे हे सारे बघण्यासारखे. अजुन एक विशेष म्हणजे झुळूझुळू वाहाणारा निर्मळ पाण्याचा झरा. टाकी तर बऱ्याच गडांवर असतात, पण झऱ्यांचे भाग्य एवढ्या उंचीवर फार थोड्यांच्या माथी. 

मागे येउन दक्षिणेकडे वळलो, भंडारदुर्गावरही जायचा बेत होता, वाटेत वाड्याचे अवशेष, एका देवळाचे अवशेष दिसले. एक चांगले मोठे तळेही आहे, पण कोरडे पडले होते. माहूलीच्या टोकाला येईपर्यंत साडेबारा वाजून गेले होते आणि उन फारच तापले होते. भंडारदुर्गावर जाण्यासाठी बरेच उतरून पुन्हा चढावे लागणार होते, त्यामुळे तिथुनच परत फिरलो. भंडार्दुर्गावरही गुहा आहेत आणि पाणीही आहे. गडावर आल्यानंतर उजवीकडून पळसदुर्गालाही वाट जाते तिथे बांबूचे वन आहे.

शिडीपाशी आल्यावर डोळे ताणून पुर्वेला, ईशान्येला पाहिले पण कळसूबाई, कुलंग काहीच दिसले नाही. वणव्यातून उठलेल्या धुरांच्या लोटांनी एका अंतरापलिकडचे सगळेच धूसर होउन गेले होते. उन्हात तापत खाली उतरलो. मधे मधे रान जळून गेले होते. गावात वनखात्यातल्या श्री. कृष्णा यांच्याकडे मनसोक्त जेवलो आणि मजल दर मजल करत रात्री अकराला पुण्याला पोहोचलो. खंडाळ्याच्या घाटात खाली पाहिले तर राजमाचीखालचे उल्हास नदीचे खोरे प्रकाशाने लख्ख उजळून निघाले होते. दुर्दैवाने तो प्रकाश एक फार मोठ्या वणव्याचा होता. त्या दिवशीच गोनिदांच्या लाडक्या राजमाचीवर त्यांच्या आठवणींचा कार्यक्रम होता. तिथल्या माणसांवर, मातीवर, पाना फुला प्राण्यांवर गोनिदांचा फार जीव, वणवा लागू नये, रान पेटु नये म्हणून त्यांची तळमळ असे, आणि नेमके त्याच दिवशी असे झाले.

माहूली जवळचे टिटवाळ्याचे गणेशमंदिर, शहाडचे विठ्ठल मंदिर हे सारे बघायचे राहूनच गेले. माहुली किल्लाही आजूबाजूच्या परिसरासह नीट बघायचा, अनुभवायचा तर दोन दिवस यायला पाहिजे, तंबू घेउन- कारण वर निवारा नाही. तेंव्हा पुनरागमनायच असे म्हणतच माहुलीचा निरोप घेतला.