मस्कतमध्ये 'गोनू' वादळ - २

जेवण झाल्यावर मी तिथेच झोपावे असा मित्राचा आग्रह होता. पण म्हंटले, 'प्रयत्न करून पाहतो. जमल्यास पोहचीन घरी. नाहीतर येईन इथेच झोपायला.' खाली जाऊन पावसात भिजत धावत-धावत गाडीजवळ पोहोचलो. गाडीत बसून किल्ली लावली. पण गाडी मख्खासारखी ढ्ढीम्म बसून राहीली. मनात धस्स झाले. दिवे तपासले तर दिव्यांची कळ तशीच सुरू होती. गाडीची बॅटरी, कोल्डरुम मध्ये ठेवलेल्या प्रेतासारखी, निश्चल झाली होती.

गाडीने असहकार पुकारल्यावर नाईलाज झाला. पुन्हा पावसात भिजत, धावत-घावत मित्राघरी पोहोचलो. घडला प्रकार त्याला सांगितला. बिचाऱ्याने लगेच माझ्यासाठी झोपण्याची व्यवस्था केली.

रात्रभर वारा, विविध आवाजात, घोंघावत होता. पहाटे केव्हातरी जाग आली तेव्हा बाहेर शांतता पसरली होती. खिडकी उघडून पाहिले. जी झाडे अजूनही उभी होती ती शांत होती. पाऊस थांबला होता. अजून बाहेर अंधार होता पण सर्वत्र साचलेल्या पाण्यांत चंद्र थरथरत उभा असलेला दिसत होता. सकाळी उठल्यावर गाडीची बॅटरी चार्ज केली पाहीजे ह्या विचारात पुन्हा आडवा झालो पण नंतर सलग झोप लागलीच नाही.

सकाळी उठल्यावर चहापाणी उरकले आणि माझ्या दुसऱ्या एका मित्राला फोन केला. तो गाडी घेऊन आला तसे त्या बरोबर निघून मी माझ्या गाडी जवळ आलो. माझ्या गाडीत जंपर केबल होतीच त्याच्या साह्याने दोन्ही गाड्यांच्या 'ब्याटऱ्या' जोडल्यावर माझ्या गाडीच्या बॅटरीला संजीवनी प्राप्त झाली आणि किल्ली फिरवताच गाडीच्या यंत्रात चेतना जागृत झाली. हटवादीपणे रस्त्यातच बंद पडल्यामुळे आणि संभाव्य खर्चाच्या धोक्यामुळे तणावग्रस्त झालेल्या माझ्या शरिरावर, गाडीचे यंत्र (इतके सहज) सुरू झाल्यावर, आनंदाच्या लहरीचे सुंदरसे मोरपिस फिरल्याचा भास झाला. कोणी पाहात नाहीसे पाहून 'शाणी गे बाय माजी' असे म्हणून दोन्ही कानशिलावर बोटे कडाकडा मोडली.

घरी तर मी व्यवस्थित पोहोचलो. मला घरी व्यवस्थित पोहोचविण्याची 'नैतिक' जबाबदारी पार पाडल्यावर मात्र गाडीने पुन्हा एकदा मान टाकली. चावी फिरवून पाहिल्यावर आंत यंत्र गुरगुरत होते पण गाडी सुरू होईना. जणू बॅटरी सांगत होती, 'पाहा बाबा, आता माझा काही दोष नाही हं!' वादळाच्या धोक्यामुळे आधीच ४ दिवस सरकारी सुट्टी जाहिर झाली होती. त्यामुळे गॅरेज, मॅकॅनिक, यंत्राचे सुटे भाग विकणारी दुकाने सर्वच 'कवी-कल्पना' होत्या. नाईलाज झाला. बंद पडली तरी गाडी दारात आणि नजरे समोर होती एवढेच समाधान.

आता पाऊस-वारा थांबला होता. तुरळक झाडे पडली होती. पण इमारतींवरचे जाहिरातींचे फलक, निऑन साईन्स, दुकानांचे फलक एकतर पूर्णतः कोसळले होते किंवा अर्धवट लटकत होते. काही ठीकाणी दुकानदार असहाय्य नजरेने लटकत्या फलकांकडे पाहात होते त्यांची 'शान' लोंबकळत होती. माझ्यासारख्याच दुसऱ्या एका अतिउत्साही मित्राने शहर परीक्षणासाठी प्रभातफेरी काढली होती. त्याच्याच गाडीतून मी वादळाची 'मजा' लुटायला बाहेर पडलो.

आदल्या रात्री आमच्या भागात अनुभवलेले वादळ आणि धुवांधार पाऊस म्हणजे काहीच नाही असा प्रलयंकारी विध्वंस माझ्या घरापासून १५ कि.मी. अंतरापासून पुढे पाहावयास मिळाला. कित्येक ठीकाणी रस्त्यांवर अजून पाणी साठलेले होते अजूनही त्यात गाड्या डोके वर ठेवण्याच्या प्रयत्नात दिसत होत्या.

कित्येक ठिकाणी रस्ते वाहून गेले होते, रस्ते मधून तुटून एखाद्या विहिरी इतके खोल खड्डे पडले होते. रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने अशा वादळनिर्मित विहिरींमध्ये गाड्या कोसळल्या होत्या. त्यांच्या चालकांचे काय झाले असेल समजण्यास मार्ग नव्हता.

काही ठीकाणी ४ फुट तर काही ठीकाणी १२ फुटापर्यंत पाणी चढल्याचे दिसत होते/ जाणवत होते. सर्वत्र वाहून आलेले तुटके फलक, फ्रिज, सोफा सारखे फर्निचर दिसत होते. पोलीसांनी अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. कित्येक ठीकाणी वाहतुक तास अन् तास खोळंबली होती. गाड्या कुठेही कशाही उभ्या करून हौशी छायाचित्रकार छायाचित्रे काढीत होते. आम्हा हौशी कलाकारांमुळे सरकारी वाहने, ऍंब्युलन्स, पोलिसांच्या गाड्या ह्याच्या वाहतुकीत विनाकारण व्यत्यय येत आहे हे जाणवून आम्ही घरात बसण्याचा निर्णय घेतला.

घरी आल्यावर दूरचित्रवाणी संच चालू करायचा म्हंटले तर तोही बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्यामुळे बापुडवाणा चेहरा करून कोपऱ्यात उभा होता. चहा पीता-पीता गप्पा मारीत बसलो होतो आणि वहिनींनी माहिती पुरविली, 'घरातल्या नळाला पाण्याचा थेंबही नाहिए.'

क्रमशः