रुपेरी बाण

सुरंगपुरात आज बरीच धामाधुम होती. महाराजांनी तिरंदाजीचा सामना ठेवला होता. असा सामना वर्षातून एकदा दिवाळी नंतर होत असे. जो पहिला येई तो बहुमोल बक्षीस घेऊन जाई. या वेळचे बक्षीस एक सुंदर रुपेरी बाण होता. दर वेळी तोच बक्षीस घेऊन जाई. पण यंदा सुंदरपुरातील नागरिकांचे नजरेसमोर शेखर डाकूची छबी तरळत होती.

शेखरचे मूळचे नाव शंकर. गत वर्षी झालेला समना शंकरने बघितला होता. तो खेळलाही होता. पण पदरी अपयश आले होते. कपटी धूरंधराने पराभव केला होता भाग घेणारांचा. या पराभवांने शंकरच्या मनात आग भडकविली. बारा महिने झ्टला तो अन तिरंदाजीचे भरपुर शिक्षण घेतले. याच काळात तो धनिकांना लुटून गरीबांचे पोट भरू लागला. शंकरचा शेखर झाला. राजाने खूप प्रयत्न केले. पण शेखरला कोणीही पकडू शकले नाही. शेखर तिरंदाजीचा सामना चुकविणार नाही. तो तेथे येईलच अशी कुणकुण  राजाच्या कानावर गेली होती. तो अति आतुरतेने या दिनाची वाट पहात होता.

राज महालासमोर एक मोठे पटांगण होते. तेथेच सामना भरणार होता. सकाळ पासूनच भाग घेणारे तसेच बघे लोक पटांग़णावर जमू लागले. महालानजीक राजाचे उंच आसन होते. या आसनासमोरच दूर एका झाडाला, अंगावर एकच लाल टिपका असलेला. एक मोठा फिरता गोळा टांग़लेला होता. नेमका लाल ठिपकाच शरसंधानाने जो वेधेल तो जिंकेल.

वेळ झाली. राजा आसनावर विराजमान झाले. सगळीकडे शांती पसरली. राजाजवळ एका सोनेरी ताटात तो रुपेरी बाण ठेवला होता. तुतारी वाजली. एकेके वीर पुढे येऊन आपली कला दाखवू लागला. नशीब आजमावू लागला पण.......

अनेकानेक वीर आले नि गेले पण लाल खूण कोणीही वेधु शकला नाही. एका वीराने तीन बाण सोडावेत असा नियम होता. अखेर राजाने सेनापती धुरंधराला आज्ञा केली. सेनापतीने पहिला बाण सोडला. तो हुकला, दुसराही हुकला. आता शेवटची संधी होती आणि तिसरा बाण सोडला. तो नेमका लाल टिपका वेधून गेला. लोक आनंदले. धुरंधर आनंदला. लोकांनी जयघोष केला. पण हे काय? हा कोण ? हा कोणाचा आवाज ?

"थांबा ! अजून सामना संपला नाही. मी करणार आहे तिरंदाजी !"

लोकांनी बघितले, रुपेरी केसांचा, कंबर वाकलेला एक माणूस पुढे येत होता. हे आजोबा काय दिवे लावणार आहेत. असे बोलून लोक टवाळी करू लागले. पण राजाने आजोबांना संधी दिली. धुरंधराचीच तीर कमान घेऊन आजोबांनी पहिला बाण सोडला. तो सरळ लाल खुणेत जाऊन रुतला. दुसरा सोडला. तो अगोदर खुणेत रुतलेला धुरंधराचा बाण मोडला. तिसरा सोडणार तोच आजोबांचे लक्ष गेले - धुंरधर आजोबाकडे नेम धरून तीर सोडत होता. सूंऽऽ दोन तीरांची भेट झाली. धुरंधराचा तीर दोन तुकडे होऊन खाली पडला. इकडे आजोबांनी डोकीवरचा टोप काढून फेकला. राजासहित सारे ओरडले. "शेखर डाकू ! पकडा .... पकडा.... "

पण तोवर शेखर कुठे होता? ताटातला रुपेरी बाण घेऊन तो कधीच पसार झाला होता. दुरवर उडणारी धुळ तेवढी लोकांना दिसत होती.