आठवणीतल्या कविता-२

सागरा प्राण तळमळला !


ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo||


भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता ;  


मज वदलासी अन्य देशिं चल जाउं; सृष्टिची विविधता पाहू .


तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,


'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन !' 


विश्वसलों या तव वचनीं, मी,                 जगदनुभवयोगें बनुनी,मी,


तव अधिक शक्त ऊद्धरली मी,   "येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,


सागरा, प्राण तळमळला ! || १ ||


शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी !


           भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,


गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें !


           जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.


ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे,              नव कुसुमयुता त्या सुलता, रे,


तो बालगुलाबहि आतां, रे,      फुलबाग मला, हाय! पारखा झाला! 


सागरा, प्राण तळमळला ! || २ ||


 नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.


                प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आईची झोपडी प्यारी.


तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.


भुलविणें व्यर्थ हें आता, रे,                 बहु जिवलग गमते चित्ता, रे,


तुज सरित्पते, जी सरिता रे,         तद्विरहाची शपथ घालतो तुजला


सागरा, प्राण तळमळला || ३ || 


या फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा ?


             त्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवीते, भिऊनि कां आंग्लभूमीतें,


मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ? मज विवासनाते नेसी ?


जरि आग्लभूमि भयभीता, रे,               अबला न माझि ही माता, रे,


कथिल हें अगस्तिस आतां,रे,      जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,


सागरा, प्राण तळमळला || ४ ||


कवि - स्वा.वि. श्री. विनायक दामोदर सावरकर.


टिपः ही कविता संग्रहातुन लिहितांना मी संगणकावर श्री हृदयनाथ मंगेशकरांचे हे गीत लाऊन टंकांतर करित होतो.संग्रहात व गीतात शब्दांचा नगण्य फरक आहे परंतू अर्थ सारखा असल्याने मी गीतातले शब्द घेतले कारण ते ऊच्चारण्यास थोंडे अधिक सोपे आहेत.बाबूजींनी मात्र ह्या कवितेला 'निज निज गडे नीज रे तान्ह्या बाळा' ह्या अंगाई गीताची चाल लावून म्हटले आहे.


ह्या गितातले शेवटचे कडवे - खास करून मन्मातेला नंतरच्या ओळी टंकांतर करीत असतांना मनांत दुःखाचे कढ व डोळ्यांत पाणी आले व परत  जाणीव झाली की सर्व हुतात्म्यांनी काय बलिदान केले आहे ते !


माधव कुळकर्णी - माकु९६३