कधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही
कधी आषाढ-ओल्या आठवांनी नाहले नाही
तसे लक्षात येण्यासारखे नव्हतेच हे फुलणे
कुणी अंजारले नाही, कुणी गोंजारले नाही
कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?
जगाया चारचौघींच्या प्रमाणे ना नसे माझी
जगाच्या चारचौघांनीच पण स्वीकारले नाही
जशी ओच्यात घेते मी फुलांना पारिजाताच्या
तसे हळुवार का मजला कुणीही वेचले नाही ?
वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे ओठांवरी गाणे
कधी हे वाहिले नाही, कधी ते थांबले नाही