पाय मातीचे! -१

"मी, बबनराव तुकाराम अडसूळ,ईश्वराला साक्षी ठेऊन अशी शपथ घेतो की...." राज्यपालांच्या मागोमाग बबनराव मंत्रीपदाच्या शपथीचे शब्द म्हणत होते. मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेल्या विश्वासरावांनी आजूबाजूला एक समाधानाची नजर टाकली. बहुतेक नेहमीचे, अपेक्षित चेहरे. नामदेवराव, सोपानआबा, गजाननतात्या, सुभानराव, जगन्नाथबापू...  काही नवीन चेहरे. काही अगदी अनपेक्षितही! आता येती पाच वर्षं यांच्याच भरवशावर गाडा हाकायचा आहे. आता पाच वर्षे हे आपले सहकारी, मित्र आणि कार्यकर्तेही! आता यातले किती बरोबर टिकतात ते बघायचं! राजकारणात कुणी कायमचा मित्र नाही की कुणी कायमचा शत्रू नाही!

शेजारच्या खुर्चीत बसलेल्या आनंदरावांनी झब्ब्याच्या खिशातून रुमाल बाहेर काढला तसा कुठलासा इंपोर्टेड परफ्यूम हवेत दरवळला. जरासा उग्र, किंचित मादक. आनंदराव! विश्वासराव गालात हसले. आजपासून राज्याचे उपमुख्यमंत्री! त्यांचे भडक कपडे, रेबॅनचे  चकचकीत गॉगल, करकरत्या वहाणा! पण सत्ता पाहिजे तर अशा कालपर्यंतच्या विरोधकांना बरोबर घेऊनच चालावं लागणार! निवडणुकीपूर्वी नांदेडच्या सभेत याच आनंदरावांनी त्यांच्यावर केलेली जहरी टीका विश्वासराव विसरले नव्हते. "हा कसला विश्वासराव? हा तर विश्वासघातराव!..."  आणि आता? विश्वासरावांचं हास्य रुंदावलं. राजकारणात हे चालायचंच! 'बेरजेचं राजकारण' मिडीयावाल्यांनी त्यांच्या बाबतीत लोकप्रिय केलेला शब्दप्रयोग त्यांना आठवला."विश्वास, लोकशाहीत डोक्यांच्या संख्येला महत्त्व असतं" दादा त्यांना सांगत असत. " डोक्याच्या आत मग काही नसलं तरी चालेल!"...तडजोड! तडजोड!  पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेडफेलोज...

क्षणभर विश्वासरावांनी डोळे मिटले. निवडणुकीचा ताण अद्यापि शरीरात आणि मनात ठसठसत होता. साठी आली विश्वासराव! ते मनाशीच म्हणाले. राजकारणात माणसाला दमून चालत नाही. आणि इथं तर आपण स्वतः उभं केलेलं हे विश्व. इतक्या वर्षांनंतर हातात आलेली सत्ता! ज्याची आजवर कामना केली ते मुख्यमंत्रीपद! आपल्या सगळ्याच राजकीय प्रवासाचा पट विश्वासरावांच्या मनात उलगडून गेला. किती झगडा! किती संघर्ष! मनात असो वा नसो, शेवटी हवं ते मिळवण्यासाठी केलेलं राजकारण! विरोधकांना कधी गोंजारुन समजावणं तर कधी चलाखीनं त्यांची राजकीय कारकीर्दच संपवणं. आणि केवळ विरोधकांचाच बळी का? शेवटी तर नाईलाजानं आपल्या राजकीय गुरुचाच... विश्वासराव थोडेसे अस्वस्थ झाले. राजभवनातील दादांच्या छायाचित्रातला  हसरा चेहरा आपल्याकडं उपहासानं बघतोय असं त्यांना वाटलं. पण ते क्षणभरच. सराईत राजकारण्याच्या चपळाईनं त्यांनी स्वतःला सावरलं. त्यांचं ते सुप्रसिद्ध स्मितहास्य परत त्यांच्या चेहऱ्यावर आलं. कॅमेरे लखलखत होते. टाळ्यांचा कडकडाट झाला. बबनराव मंत्रीपदाची शपथ संपवून खाली उतरत होते.

पुढचे काही दिवस तर अधिकच धावपळीचे गेले. 'प्रशासकीय खर्चात काटछाट' हे निवडणूकपूर्व जाहिरनाम्यातलं आश्वासन पाळण्यासाठी मंत्रीमंडळानं सत्काराची मोजकीच निमंत्रणं स्वीकारावीत अशी सूचना त्यांनी शपथविधीच्या आधीच देऊन ठेवली होती. पण आपल्या मतदार संघातला सत्कार टाळणं त्यांनाही शक्य झालं नाही. कार्यकर्त्यांचा सळसळता जोष, बैलगाडीतून निघालेली खास जंगी मिरवणूक, कासरा हातात घेऊन बसलेले स्वतः उपमुख्यमंत्री आनंदराव टोळपे - पाटील, औक्षण करताना पत्नीच्या कौतुकभरल्या डोळ्यात डोकावून गेलेलं पस्तीस वर्षांचं सहजीवन, अलाबला घेऊन आपल्या कानशिलावर कडाकडा बोटं मोडताना म्हाताऱ्या आईच्या डोळ्यात आलेलं पाणी, जुन्या घरातला आबांचा कृतार्थ फोटो आणि मग महात्मा गांधी मैदानावर झालेली सत्काराची ती जंगी सभा.... भावनांचं जाहीर प्रदर्शन न करण्याबाबत प्रसिद्ध असलेले विश्वासरावही आतून जरासे हलले. आता लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा, आपण दिलेल्या वचनांची आता करायची पूर्ती, रेंगाळलेली विकासकामे, सुस्त शासकीय यंत्रणा प्रभावी करण्याचं आपलं कित्येक वर्षांचं स्वप्न.. 

मुंबईत परतल्यावर विश्वासराव झपाटल्यासारखे कामाला लागले. निवडणुकींच्या दोनेक महिन्यांच्या काळात एकूणच विकासकामांकडे दुर्लक्ष झालं होतं. ती सगळीच कामं मार्गी लावायची होती. त्यातून आधीच्या सत्ताधारी पक्षानं घेतलेल्या काही संशयास्पद निर्णयांवर पुनर्विचार करायला लागणार होता. विजेचा आणि पाण्याचा प्रश्न तर ऐरणीवर होताच. मेळघाटातलं कुपोषण, विदर्भातल्या आत्महत्त्या, जादा उसाचा प्रश्न, तोंडावर आलेला पावसाळा, मुंबईत पुन्हा डोकं वर काढू लागलेली गुन्हेगारी, पुण्यात नव्यानंच पसरत चाललेलं ड्रग्जचं जाळं, परप्रांतियांचा विरोधकांनी लावून धरलेला मुद्दा... विश्वासरावांना चोवीस तास पुरेनासे झाले....

(क्रमशः)