'चंगू-मंगू'ची कमाल

अमेरिकेच्या रॉजर स्पेरी या शास्त्रद्नयाने 'चंगु-मंगु ची कमाल' अर्थात 'उजवा मेंदू-डावा मेंदू ही संकल्पना मांडली.
रॉजर स्पेरी साहेबानं दुसर्‍यांच्या मेंदूचा अभ्यास करीत ही संकल्पना कागदावर उतरविली. खरंच गंमत आहे ना? आपल्या इतिहासामध्ये र्‍हूषी मुनींनी स्वानुभवातून आत्मा-परमात्म्याचं मिलन,  कुंडलिनी जागृत होणं असं बरंच काही सांगून ठेवलं होतं. हा 'आत्मा-परमात्मा' स्पेरीसाहेबाचा 'चंगु-मंगु' तर नाही ना?  त्या काळात र्‍हूषी मुनी जसजसे आपले मनोबल आत्मज्ञानाने वाढवत न्यायचे तसतसे त्यांना महर्षी, देवर्षी अशा उपाध्या मिळायच्या. गंमत म्हणजे आजच्या काळात, स्पेरीसाहेब ही 'नोबेल पारितोषिकाने सन्मानित झालेला आहे. ह्या स्पेरीसाहेबाला १९८१ च्या दरम्यान त्यानं केलेले संशोधन कागदावर लिहून काढून ते पद्धतशीरपणे ठराविक संस्थेच्या माध्यमातून जगासमोर आणल्याबद्दल 'नोबेल पारितोषिक' मिळालं होतं.
आता ह्या 'चंगु-मंगुं' च्या स्वभावाचे विश्लेषण पाहूया.
उजवा मेंदू-
1. नियमांची चौकट न मानणारा
2. उपजत शहाणपण किंवा प्रतिभासंपन्न असणारा
3. सगळ्या गोष्टीचं एकत्रीकरण करून, संयोग करून पहाणारा
4. आत्मकेंद्रीत
5. कल्पनाविश्वात रमणारा
डावा मेंदू
1. नियमांची चौकट मानणारा, सहज-सुलभ तर्क करणारा
2. परंपरावादी
3. पृथक्करण करणारा असल्यामुळे 'दोष काढणारा', आरोप-प्रत्यारोप करणारा
4. बाह्यगोष्टीत रस घेणारा
5. वास्तववादी
वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की,बदलत्या काळानुसार लिखाणाला व ते पद्धतशीरपणे मांडण्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. पण आपलं घोडं अडतं ते लिहिण्यावरच. एका हाताने मनातले विचार धडाधड लिहून-लिहून लिहिणार तरी किती? पाश्च्यात्यांनी 'टंकलेखन यंत्र' व त्या पाठोपाठ काही काळानंतर संगणकावर 'लिखाण' करण्याचा शोध लावला. (खरंतर संगणकावर 'लिखाणाचा शोध लागण्यामागे नियतीचीच इच्छा होती. कारण वॉन नॉमनच्या मनाविरोधात ते घडले होते) आणि त्या बरोबरच पाश्च्यात्यांनी मनातले विचार दोन हातांनी धडा-धडा प्रवाहीत करण्याचा सपाटा लावला व जे लिहिलं ते वास्तवात अणूनं संपूर्ण जगाला हरवलेच. रोमन लिपीही या यंत्रांना चांगलीच सोयीची ठरली. पण आपण मात्र आपल्या भाषेतच, आपल्या लिपीतच लिहायचं म्हटलं तरी अडखळतोय. इथं 'लिहिणं' म्हणजे फक्त कागदावर वा पडद्यावर अक्शर उमटविणं नाही, तर दोनही मेंदूंची -'चंगु-मंगुं' ची साथसंगत घेवून स्वतःच, काहीतरी दर्जेदार, जे लोकांच्या उपयोगी पडेल असं काहीतरी लिहिणं असा आहे.
शेवटी, देवबाप्पानं तोंड दिलंय ते गुळाचा गोडवा जपून बोलण्यासाठीच नां?  दोन हात दिलेत ते स्वजनांसाठी ज्ञानाचा अमृत कुंभ  रिता करून देण्यासाठीच नां?
सध्याची 'बाळबोध लिपी' ही एका हाताने लिहिण्यासाठी सोयीची होती. परंतू हे जग स्पर्धेचे असल्यामुळे वेगानं लिहायचं म्हटलं, तर 'टंकले़खन यंत्र' वा 'संगणकाचा' वापर हा करावाच लागणार. नाही का?  आता संगणकाचा वापर म्हणजे दोन हातांचा, नऊ बोटांचा वापर ही आलाच. स्पेरी साहेबानं आपल्या 'चंगु-मंगु' च्या संकल्पनेतून सांगितलंच आहे की, उजव्या मेंदूचे शरीराच्या डाव्या भागावर नियंत्रण असते. व डाव्या मेंदूचे शरीराच्या उजव्या भागावर नियंत्रण असते. आणि म्हणूनच 'बाळबोध लिपी' च्या वापराने आपण एका मेंदूचाच वापर करतो.
तुम्ही म्हणाल याला पुरावा काय?
उजव्या मेंदूचे व डाव्या मेंदूचे गुण आपण वर पाहिलेच. ते परस्परभिन्न म्हणजेच अगदी 'उलट-सुलट' आहेत. होय नां?
आरशात पाहिल्यावर आपल्याला आपलं 'प्रतिबिंब' कसे दिसते?  'उलट-सुलट'. होय नां?
मग तसंच, ऱ्हस्व 'इकारांत' (पि) आपण ज्या पद्धतीने लिहितो त्याच्या अगदी सुलट दीर्घ 'ईकारांत' (पी) लिहितो. होय नां?
तसंच, ऱ्हस्व 'उकारांत' (पु) आपण ज्या पद्धतीने लिहितो त्याच्या अगदी उलट दीर्घ 'ऊकारांत' (पू) लिहितो. होय नां?
'असं कसं?' म्हणून तुम्ही विचारताय. अहो 'उत्तर' हेच आहे की आपण आतापर्यंत आपण 'बाळबोध लिपी' मुळे  एकाच मेंदूचा वापर करतोय.  या जगात जी प्रगती दिसतेय ती तंत्राची कमाल नसून प्रगत होत जाणार्‍या 'चंगू-मंगू'ची कमाल आहे. घ्यायचंच झालं तर पाश्च्यात्यांकडून त्यांचा 'गूळ' घ्यावा, व तो 'लपलाय' त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमद्ध्ये, आपले विचार दुसर्‍यापर्यंत पोहचविण्याच्या तंत्रामध्ये.

--------------------------------------------------------------------------------------------------
हेतू:- या लेखाचा हेतू 'लिहिण्याचा पद्धतीचे'.......'लिपीचे'.........'सुबोध लिपी' चे महत्व विशद करणे हा होय.