भविष्य

पृथ्वीय हवामान आणि चंद्र ह्या लेखमालेचा हा शेवटचा भाग. सर्व वाचकांना आणि प्रतिसाद व व्य. नि. लेखकांना पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. आपणा सर्वांच्या प्रोत्साहनामुळे अशाप्रकारचे लेखन करत रहाण्याची स्फूर्ती मला मिळाली आहे.


भाग ९ - भविष्य


भविष्यात होणाऱ्या हवामानबदलाचा विचार करताना आपण केवळ आणखी काहीशे वर्षांपर्यंतच्या हवामानाबद्दल बोलतो. एकतर खूप पुढचा हवामानअंदाज वर्तविणे अवघड, आणि जरी वर्तवलाच तरी त्याचा फारसा उपयोग नाही. मात्र काहीशे वर्षांमधे हवामानात होणाऱ्या बदलाची मुळे सध्याच्या हवामानात, हवामानाच्या नैसर्गिक चक्रामधे तर असतीलच, पण शिवाय ती असतील मानवानिर्मित गोष्टींमधे. ह्या काहीशे वर्षामधे चंद्र-पृथ्वीच्या परस्पर संबंधामधे लक्षणीय फरक पडणार नाही. त्यामुळे चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याने शक्य अश्या हवामानीय परिणामांची आपल्याला काळजी करण्याची मुळीच गरज नाही. मात्र गरज नसली तरीही कुतुहल शमविण्यासाठी दूर भविष्यकाळाचा थोडा वेध घेऊ या.


पृथ्वीसापेक्ष सूर्य आणि चंद्राची स्थिती बदलल्याने भरती-ओहोटीच्या जोरावर होणाऱ्या परिणामाबद्दल आपण आधीच्या भागात वाचलेत. मात्र आपण केवळ समुद्राच्या पाण्याला येणाऱ्या भरती-ओहोटीचाच केवळ विचार केला. समुद्राची भरती-ओहोटी सहजदृश्य आणि मोठ्याप्रमाणात असते. चंद्राकर्षणाने वातावरणाला आणि जमिनीला येणारी भरती-ओहोटी मात्र अगदीच अल्प आणि जाणवण्याएवढी नसते, पण ती अस्तित्वात असते हे खरेच. वातावरण हाही एक द्राव (fluid) असल्याने चंद्राकर्षणाने ते चन्द्राच्या दिशेने खेचले जाते. त्यामुळे वातावरणामधे जमिनीपासून आकाशाकडे अशा लहरी निर्माण होतात. मात्र हवा तापल्यामुळेही अशा प्रकारच्या लहरी वातावरणामधे निर्माण होतात आणि ह्या लहरींची वारंवारिता (frequency) आणि परिमाण (magnitude) हे वातावरणीय भरती-ओहोटीमुळे निर्माण होणाऱ्या लहरींच्या तुलनेत खूपच मोठे असते.


चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यामुळे त्याची पृथ्वी व सूर्यसापेक्ष स्थिती सतत बदलत रहाते. चंद्राकर्षण व सूर्याकर्षण अशी दोन भिन्न बले भिन्न दिशांनी (torque) पृथ्वीवर कार्य करतात. ह्या बलांमुळे आणि भरती-ओहोटीच्या लाटा आणि पृथ्वीभोवतीचे वातावरण ह्यामुळे निर्माण होणाऱ्या घर्षणाचा (tidal breaking) परिणाम होऊन पृथ्वीचा वेग मंदावत आहे. वेग मंदावण्याचा दर शतकाला १.५ ते २ मिलिसेकंद असा फारच मंद आहे. संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार (consevation of momentum) पृथ्वी व चंद्र मिळून तयार होणाऱ्या संयुक्त संस्थेचा कोनीय संवेग (angular momentum) कायम रहावा म्हणून पृथ्वीचा वेग मंदावल्याने होणारा संवेगबदल हा चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या कक्षेच्या त्रिज्येत वाढ होऊन भरून काढला जातो. चंद्राच्या कक्षेची त्रिज्या दरवर्षी ३ सेंटीमीटर एवढी वाढत आहे.


चंद्र पृथ्वीपासून दूर जात असला तरी तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर मात करू शकणार नाही आणि पृथ्वीला सोडून जाणार नाही. सध्या चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा वेग सारखाच आहे. त्यामुळे पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू कायम दिसते. मात्र चंद्राच्या पृथ्वीच्या दिशेने तोंड असलेल्या भागावरून पृथ्वीच्या सर्व बाजू दिसतात. पृथ्वीचा वेग मंदावत जाऊन आणि चंद्राच्या कक्षेची त्रिज्या वाढत जाऊन एक स्थिती (tidal locking, synchronous prbit) अशी येईल की त्यावेळी पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू तर दिसेलच, पण चंद्रावरूनही पृथ्वीची एकच बाजू सतत दिसेल. ह्याचा अर्थ पृथ्वीच्या अर्ध्या भागाला सतत चंद्रदर्शन घडेल तर अर्ध्या भागाला कधीच चंद्रदर्शन घडणार नाही. म्हणजेच चंद्राचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग आणि पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग सारखाच असेल. त्यावेळी पृथ्वीवरचा महिन ५० दिवसांचा असेल आणि चंद्राच्या कक्षेची त्रिज्या ५० टक्के वाढली असेल. त्यावेळच्या हवामानाची कल्पना करणे केवळ अशक्य.


ह्या सर्व गोष्टी घडण्यासाठी अब्जावधी वर्षांचा कालावधी जावा लागेल आणि म्हणूनच आज आपल्याला त्यावेळच्या पृथ्वीय हवामानाची काळजी करण्याचे कारण नाही. मात्र चंद्रावरची पृथ्वीय हवामानातील दीर्घकालीन बदलांची जबाबदारी कायम राहील.


समाप्त.