टीव्ही वाहिन्यांतील पाहिलेले बदल

नुकत्याच सुरू झालेल्या ’कलर्स’ वाहिनीवर नवीन चित्रपट दाखविण्याची जाहिरात बघितली (त्यावर एक-दोन चित्रपटही पाहिले), तेव्हा खूप दिवसांपासून मनात असलेले विचार पुन्हा समोर आले. हिंदी चित्रपट दाखविल्याशिवाय कोणतीही वाहिनी बहुधा तग धरू शकत नाही. जसे आम्ही वसतीगृहात राहत असताना एक मित्र खानावळीबद्दल बोलला होता की, बटाटे नसते तर ह्या मेस वाल्यांचे काय झाले असते? आपल्याला ही सवय दूरदर्शनवर (वाहिनी बरं का, आधी ती एकच वाहिनी होती)
हिंदी सिनेमे दाखवत होते तेव्हापासूनची. बहुधा त्यांना काही एवढी गरज
नव्हती, पण लोकांची आवड म्हणून ते दाखवायचे.

त्याच आठवणीप्रमाणे, ह्या पुढच्या लिखाणात वाहिन्यांची फक्त हिंदी चित्रपटांची गरज नाही तर वाहिन्यांनी गरजेप्रमाणे काय काय बदल केलेले मला दिसले त्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. ह्यात कार्यक्रमांच्या दर्जाबद्दल काही विचार नाहीत. फक्त त्यांची सुरूवात काय होती व आता कसे आहेत त्याबद्दल जाणवलेले थोडेसे.

सर्वात आधी मला आठवते ते ’सब टीव्ही’. SAB अर्थात श्री अधिकारी ब्रदर्स. अधिकारी बंधूंनी आपली नवीन वाहिनी सुरू केली तेव्हा त्यावर वेगवेगळे कार्यक्रम दाखवायला सुरूवात केली होती. विनोदी, गंभीर, भावनाप्रधान. त्यांच्या स्वत:च्या एवढ्या मालिका होत्या की त्यांना वास्तविक नवीन मालिका बनवायचीच गरज नव्हती. जुन्या हिंदी मालिका पुन्हा दाखवून, मराठी मालिका हिंदीमधे अनुवाद करून आणि नवीन कार्यक्रम ही बनवून, त्यांनी ती वाहिनी सुरू ठेवली होती. नंतर त्याचा साचा बदलून सांगितले की, आम्ही फक्त विनोदी कार्यक्रमच दाखवू. ह्या एवढ्या प्रकारात चित्रपटांना त्यांनी पूर्ण वगळले होते असे नाही. हिंदी चित्रपटांतील गाणी दाखवत होते पण कधी हिंदी सिनेमा दाखविला नाही. पुढे काय झाले माहित नाही, ती वाहिनी 'सोनी'ने विकत घेतली आणि त्याचा साचा पूर्णत: बदलला. आता ती ही इतर वाहिन्यांप्रमाणेच वाटते. काही सोडून बाकी सारखेच कार्यक्रम आणि सिनेमा.

'झी स्माईल' ह्या वाहिनीच्या नावाप्रमाणेच त्यावर विनोदी कार्यक्रम असण्याची अपेक्षा होती. जेव्हा सुरू झाली तेव्हा नेमके आमच्याकडे दिसत नव्हती. मध्ये मध्ये इतर ठिकाणी पाहिली तर सुरू होते त्यावर विनोदी चित्रपट व कार्यक्रम. पण आता त्यावरही झी टीव्ही वरील आधीच दाखविलेले गैरविनोदी कार्यक्रमही दाखवतात. माझ्या माहितीप्रमाणे 'झी स्माईल' ही भारतातील पहिली २४ तास विनोदी कार्यक्रम दाखविणारी वाहिनी होती आणि बहुधा त्याच स्पर्धेत सोनीने नवीन वाहिनी न आणता आधीच चांगली चालू असलेली 'सब टीव्ही' वाहिनी आपल्याकडे वळवून घेतली.

'स्टार' ने आधी इंग्रजी वाहिन्याच आणल्या होत्या. पण त्यांनी जेव्हा 'स्टार प्लस' हिंदी मध्ये बदलविले तेव्हा दूरदर्शनवरील काही मालिका तिकडे वळत्या केल्या. नंतर दूरदर्शनने कांगावा केला की एकच मालिका दोन वाहिन्यांवर दाखवायची नाही. आणि म्हणून त्यांनी काही मालिका दाखविणे बंद केले. पण ते स्वत: ’सर्फ व्हील ऑफ फोर्च्य़ून ’ सोनीवर चालू असतानाही दूरदर्शनवरही दाखवत होते. ती बहुधा त्यांची गरज होती.

२००३ की २००४ मध्ये एका वृत्तपत्रात बातमी आली होती की ई टीव्ही चे मालक (मालकच आहेत ना ते?) श्री. रामोजी राव ह्यांनी घोषणा केली होती की ई टीव्हीच्या वाहिन्यांकरीता आम्ही कधीच शुल्क आकारणार नाही. पण फायदा दिसला म्हणून की खरंच गरज पडली म्हणून, त्यांनीही त्यांच्या वाहिन्या सशुल्क केल्या.
मी ऐकल्या/वाचल्याप्रमाणे भारतातील वाहिन्यांच्या शुल्क आकारण्याचे नियम आणि इतर काही देशांतील नियम ह्यांच्यात फरक आहे. सशुल्क वाहिनी असेल तर त्या वाहिनीवर जाहिराती दाखवता येत नाहीत. हे जर खरे असेल तर आपल्या देशात तो नियम लागू होऊ शकतो का? शकल्यास लागू व्हायला किती वर्षे वाट पहावी लागेल?  झाला तर खरोखरच सर्व वाहिन्यांचा चेहरामोहराच बदलून जाईल

अरे हो, एक वाहिनी तर राहिलीच. ’स्टार गोल्ड’. ही चित्रपट वाहिनी सुरू केली तेव्हा त्यांची टॅगलाईन होती, "लौट आये बीते दिन". अर्थात ते जुने सिनेमे दाखविणार होते, जे त्यांनी काही काळ दाखविलेही. पण त्यांनीही शेवटी स्वत:चा साचा बदलून नवनवीन हिंदी सिनेमे दाखविणे सुरू केले.

वृत्तवाहिन्यांबद्दल काय लिहावे? बहुधा १९९७/९८ मध्ये झी टीव्ही च्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमात एकाने विचारले होते की, ’तुम्ही तुमच्या वाहिनीवर बातम्या का नाही दाखवत?’ तेव्हा त्याला उत्तर देण्यात आले होते की हे शक्य नाही आहे. पण दोन वर्षांतच त्यांनी नुसते काही वेळ बातम्या दाखविणेच सुरू नाही केले तर २४ तासाची वाहिनीच सुरू केली. आणि आज आपण तर पाहतच आहोत की किती वाहिन्या आल्या आहेत. ह्या सर्व वृत्तवाहिन्यांनीही आपला साचा नेहमी बदलवत आणला आहे. कुठवर नेतील कोणास ठाऊक

'सोनी' वर आधी क्रिकेट सामने दाखवित होते. पण मग त्यांनी 'मॅक्स' ही वाहिनी सुरू केली तीच क्रिकेट व हिंदी सिनेमांकरीता. त्यात तरी त्यांनी अजून बदल केला नाही. हो, पण त्यांना ती वाहिनी अपुरी पडते बहुधा. म्हणूनच 'सब टीव्ही' वरही सामने दाखविले जातात.

ह्या सर्व वाहिन्यांत काहीच वाहिन्या अजूनही जशा होत्या तशाच राहिल्यात. उदा. 'दूरदर्शन', 'डिस्कवरी'. त्यांच्या कार्यक्रम दाखविण्याच्या प्रकारात जास्त काही बदल झालेला नाही. डिस्कवरीवाल्यांना मी म्हणेन, तुम्ही बदलू नका, आणि दूरदर्शनवाल्यांना सांगेन, थोडे बदला.

गेल्या महिन्यापासून पाहत आहे की HBO वरही इंग्रजी सिनेमे हिंदीत अनुवाद करून दाखवत आहेत, सोबत खाली इंग्रजी सब-टायटल्स. म्हणजे, HBO ही बदलत आहे की काय?

(हाच लेख माझ्या अनुदिनीवरही आहे)