ह्यासोबत
हा प्रवास मात्र फारफार रंजक आहे. आचार्य अत्र्यांच्या 'ब्रह्मचारी' चित्रपटात गदिमांनी एक्स्ट्रॉ म्हणून इतक्या भूमिका केल्या आहेत हे वाचल्यावर तो चित्रपट पुन्हा एकदा नीट बघायची इच्छा निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या एका वाण्याच्या दुकानात रात्रीपुरती अंग टाकायची सोय आणि एक अंगावर एक दोरीवर अशी एकच कपड्यांची जोडी एवढ्या भांडवलावर 'ब्रह्मचारी' चित्रपटापासून गदिमांनी आपल्या कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. कुठल्याही उमेदवाराला करावी लागते तशी गर्दीतला एक ते ग दि माडगूळकर इथपर्यंतची वाटचाल खडतरच होती. चित्रपटसृष्टीत शिरकाव करून घेतला खरा पण जिचं श्रेय मिळू शकेल अशी एकही भूमिका त्यांना मिळाली नाही. बाबूराव पेंढारकरांसारख्या लोकांचा कृपाप्रसाद मात्र मिळाला. अत्र्यांचा सहवास मिळाला. अत्रे किती सहज आणि सोपी गाणी लिहीत ते जवळून बघायला मिळाले. चालीत बांधायला सोपी आणि सहज गुणगुणता येतील असे शब्द असलेली गाणी लिहिण्यासाठी गदिमांनी प्रयत्न केले. आपली शैली बदलली. अत्रे पटकथा कशा लिहितात, संवाद कसे लिहावेत, त्यांचं प्रत्यक्ष सादरीकरण परिणामकारक कसं करावं याचबरोबर कॅमेरा म्हणजे काय, तो कसा वापरला जातो, कागदावरील प्रसंगातून पडद्यावरील प्रसंग कसा जन्म घेतो इ. तांत्रिक गोष्टींचीही चांगली माहिती या काळात त्यांनी करून घेतली. पडेल ते काम केल्यामुळे चित्रपटक्षेत्राचा अगदी जवळून अभ्यास करता आला. गदिमांचं अक्षर अतिशय सुरेख होतं. त्याचा फायदा म्हणून चित्रपटाच्या पटकथेची कॉपी करायचं काम मिळालं. हळूहळू वर्तमानपत्रांत चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी द्यायचे लेख लिहायची संधी मिळू लागली. सुरुवातीला हा सगळा उद्योग हौशी नट या सदरात असल्यामुळे मोबदल्याच्या नावाने 'पूज्य' असा प्रकार होता. पुढे बाबूराव पेंढारकरांनी चित्रपट कंपनीला ( बहुधा हंस पिक्चर्स ) सांगून गदिमांना पगार मिळण्याची व्यवस्था करवली. तोवर शिकवण्या करून पैसे मिळवावे लागले. लेखनाचं काम वाढल्यावर गदिमांनी 'आपल्याला एक लेखणी मिळावी ' अशी बाबूरावांकडे विनंती केली. बाबूरावांनी तत्काळ आपल्या खिशाला लावलेले सोन्याचा मुलामा दिलेले पेन काढून दिले. हा प्रसंग वाचताना अंगावर एकदम रोमांच उभे राहतात. कोल्हापूर भागातल्या पावसाचा काही नेम नसल्यामुळे सकाळी भिजत दोन तीन मैल चालत स्टुडिओत जायचे आणि रात्री तसेच भिजत परतायचे असा दिनक्रम चाललेला पाहून बाबूरावांनीच कंपनीच्या नोकराला सांगून एक नवी छत्री गदिमांना देववली.
सुंदर हस्ताक्षरामुळे साक्षात वि. स. खांडेकरांकडे लेखनिक म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यांची पटकथा लिहायची पद्धत मुळातून समजून घेता आली. याच सुमारास राम फडके नावाच्या एका तरुण गायकाशी गदिमांची घट्ट मैत्री जमली. पुलंचीही ओळख साधारण याच सुमारास झाली असावी. पुलं तेंव्हा कॉलेजात असल्याचा उल्लेख आहे. भावी पिढ्यांना आदर्श ठरणारा एक कथा-पटकथा-संवादकार आणि सिद्धहस्त कवी जन्माला घालण्यासाठी जणू काही द होल युनिव्हर्स कॉन्स्पायर्ड टुगेदर! अर्थात हे दिवस सुंदर असले तरी सोपे मात्र नव्हते. दामाजीपंतांची फारशी कृपा अजूनही झाली नव्हती. त्यात चित्रपट व्यवसाय म्हणजे कमालीचा बेभरवशाचा. अशा गरिबीतही कविता सुरूच होत्या. रात्र रात्र जागून लिहिलेल्या कविता जगायला बळ देत होत्या. कधीकधी पोटात अन्न नसल्याने कवितेवरच रहायची वेळ येत असे. लेखणीची 'नेट प्रॅक्टिस' मात्र चांगलीच जोरात सुरू असल्यामुळे हळूहळू ती सिद्धहस्त होत होती. अशाच एका चित्रपटासाठी लिहून दिलेला एक पोवाडा ऐकून एच एम व्ही या मातब्बर कंपनीकडून गाणं लिहून देण्याबद्दलची विचारणा झाली. गदिमा- एचएमव्ही प्रवास सुरू झाला. पुढे गदिमा आणि राम उर्फ सुधीर फडके यांनी एच एम व्ही साठी केलेली गाणी ही मराठी रसिकांच्या मर्मबंधातली ठेव आहे. त्यांची सुरुवात ही अशी झाली. अत्र्यांच्याच एका चित्रपटात ( बहुतेक पहिला पाळणा, चूभूदेघे) विश्राम बेडेकरांबरोबर दिग्दर्शन सहाय्यक म्हणून काम करताना त्याच चित्रपटासाठी गाणीही लिहायला मिळाली. चालीवर गाणे लिहिण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्याची हकीगत मुळातून वाचावी अशीच आहे. याच सुमाराला गदिमांचं पहिलं नाटक रंगभूमीवर आलं.
हा सगळा प्रवास खडतर खराच पण तो आश्वासक वाटतो आणि म्हणूनच स्वप्नवत सुद्धा. कोल्हापूर ही खरं म्हणजे कलानगरी. त्या वेळी तर मराठी चित्रपटसृष्टीतली कित्येक मातब्बर मंडळी कोल्हापुरात होती. बाबूराव पेंटरांचा शेजार गदिमांना लाभला. तेंव्हा रामजोशी हे नाटक त्यांचं नुकतंच लिहून झालं होतं. रामजोशी नाटक वाचल्यावर ( खरं म्हणजे ऐकल्यावर ) बाबूराव म्हणाले, "यावर उत्तम चित्रपट होईल. आपण काढू". पुढे अनेक दिवस ही गोष्ट तशीच राहिली. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते असं म्हणतात, तशी 'रामजोशी' चीही वेळ आली आणि आली तीही वाजतगाजतच. कथा, पटकथा, संवाद आणि गाणी अशा चारही अंगांनी फुलून आलेला हा चित्रपट तुफान गाजला. व्ही शांतारामांसारख्या माणसाबरोबर 'रामजोशी' करायला मिळाला आणि गदिमांच्या व्यावसायिक कारकीर्दीच्या गाडीने पहिला गियर बदलून दुसरा गियर टाकला. वंगण घालून ओव्हरॉयलिंग केलेल्या गाडीसारखी तिने जोमाने जी वाटचाल सुरू केली ती नंतर कधीच न थांबण्यासाठी. हे सगळं वाचताना आपण जादूच्या गालिच्यावरून वेगाने चाललो आहोत आणि खाली घडणाऱ्या घटना थक्क होऊन पाहतो आहोत असंच वाटत राहतं.
हे लेखन एकोणीसशे पन्नास पंचावन्नच्या सुमारासचं असावं असा माझा अंदाज आहे. 'वेदमंत्राहून आम्हा ' पाशी येऊन हा प्रवास संपतो. तो कदाचित आयुष्याच्या रंगमंचावर पुढचे प्रसंग घडायचे होते म्हणून संपला असेल. पण एका अर्थाने गदिमांची मेकिंग इयर्स जिथे संपली आणि हातखंडा प्रयोग सुरू झाले तिथे हा प्रवास संपला आहे. 'द इयर्स ऑफ सफरिंग वेअर द बेस्ट डेज ऑफ माय लाईफ बिकॉझ दे मेड मी हू आय ऍम टुडे' असं लिटिल मिस सनशाईन सिनेमातलं एक वाक्य आहे. ते किती खरं आहे हे अनुभवाने पटतंच. त्या मापाने गदिमांच्या 'बेस्ट डेज' चा हा आलेख फारच छान उतरला आहे. अत्यंत साधेपणाने, कुठल्याही प्रसंगाचं उदात्तीकरण न करता, एक सामान्य माणूस म्हणून त्या क्षणी आपल्या मनात काय विचार आले हे त्यांनी ज्या सहजपणे आणि तरीही समर्थपणे लिहिलंय त्याला तोड नाही. त्या अर्थाने स्वतःचा उदोउदो करणाऱ्या इतर आत्मचरित्रांपेक्षा हे पुस्तक एकदम वेगळं आणि जास्त खरं वाटायला लागतं.
माझ्या मस्ट रीड यादीत याचा क्रमांक वरचा आहे.
--अदिती
( २९ एप्रिल २००९,
वैशाख शुद्ध ५, शके १९३१)