मामलेदार मिसळ

  • कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ ,बटाटे ४/५,लसुण १ मोठा गड्डा,
  • तेल १.५वाट्या,तिखट १वाटी,गरम मसाला ४ चमचे
  • १०० ग्राम पापडी,२५०ग्राम हिरवे वाटाणे,५००ग्राम फरसाण
  • चवीनुसार मीठ
४५ मिनिटे
४/५ जणांसाठी ( खादाडखाऊ मंडळींसाठी दुप्पट/तिप्पट प्रमाण घ्या!)

 

हिरवे वाटाणे ५/६ तास भिजत घालावेत. नंतर कुकर मधुन ३/४ शिट्ट्या देऊन शिजवावे.बटाटे उकडून घ्यावे.४/५ कांद्यातील ३ कांदे वाटून घ्यावे. लसुण सोलून वाटून घ्यावा.उरलेले २ कांदे बारीक चिरुन घ्यावे.

पापडी कुटून घ्यावी,व पाण्यात भिजत घालावी.

एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेल तापत ठेवावे. चांगले तापले की त्यात वाटलेला कांदा घालुन परतावे,मग वाटलेला लसुण घालून परतावे. १ वाटी तिखटातील १/२ वाटी त्यात घालावे व भरपुर परतावे,गरम मसाला घालुन परतावे.इतके परतावे की तेल सुटले पाहिजे.मग त्यात उकडलेले वाटाणे घालावे,पाण्यात भिजवलेली पापडी घालावी,मीठ घालावे.उकळू द्यावे.

उरलेले १/२ वाटी तेल एका कढईत तापत ठेवावे.त्यात  बारिक चिरलेले २ कांदे

घालून  परतावे,उरलेले १/२ वाटी तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हा खाट वेगळा ठेवावा.

वरुन घालायसाठी कांदे बारिक चिरावे,उकडलेले बटाटे चिरावे.

खोलगट ताटलीत आधी फरसाण,त्यावर बटाटे ,त्यावर रस्सा,आणि त्यावर कांदा घालून द्यावा.

"जादा तिखा"- ३नं हवे असेल तर वेगळा खाट वरुन घ्यावा.

दोस्त-सुह्रदां मध्ये बसून पैज लावून खावा.

१.ह्या मिसळी बरोबर पाव चांगला लागतो.पण दही ह्या मिसळी बरोबर खाऊन तिचा अपमान करू नये.

अतिशय महत्त्वाचे:

२.दुकानातून फरसाण घेताना त्यात गोडसर पदार्थ उदा.बेदाणे,मक्याचा चिवडा इ. न घालण्यास सांगावे.

ते आमचे "शिक्रेट "आहे.