कचऱ्याची करामत

महाराष्ट्र टाईम्स मधला लेख : तात्कालिक फायद्यासाठी किंवा ठार अज्ञानातून पर्यावरणीय प्रदूषणाकडे काणाडोळा करणे किती महागात पडू शकते,याचा अनुभव मालाडच्या चिंचोलीबंदर भागात उभारलेल्या 'माईंडस्पेस संकुला' तील व्यावसायिक आणि रहिवासी घेत आहेत. मालाडच्या डंपिग ग्राउंडवरील कचऱ्याची भर दलदलिच्या जमनिवर घालून त्यावर हे संकुल उभे राहिले आहे.या संकुलात नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच बिपीओ त्यांच्याबरोबर निवासी वसाहती हि आहेत. मात्र गेल्या पाच वर्षात या संकुलात संगणक, वातानुकूलन यंत्रणा बंद पडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे प्रमाण एवढे आहे की अनेक कपन्यांनी या संकुलातील संगणक वा अन्य यंत्रणांच्या नियमित देखभालीची कंत्राटे घेणे बंद केले आहे. महागड्या यंत्रणा अकाली निकालात निघत असल्यामुळे प्रचंड नुकसान येथील कंपन्यांना सोसावे लागत आहे. बिगरसरकारी तज्ज्ञ संस्थेने केलेल्या अभ्यासातून असे आढळले की कोणती ही रासायनिक प्रक्रिया न करता दलदलिच्या जमिनीवर टाकलेला कचऱ्याचा भराव हे या समस्येचे मूळ कारण आहे. हा कचरा जमिनीखाली सडत असून त्या प्रक्रियेत सल्फर डायॉक्साईड , नायट्रोजन ऑक्साइड , हायड्रोजन सल्फ़ाईड , मिथेन , कार्बन मोनॉक्साईड यासारखे रासायनिक वायू तयार होतात. जमिनीला असलेल्या भेगांतून ते हवेत मिसळतात.त्यांच्या संपर्कात येणाऱ्या धातूवर रासायनिक प्रक्रिया होते. याचाच परिणाम संगणक , वातानुकूल यंत्रणा तसेच अन्य उपकरणे यांतील धातूचे भाग निकामी होण्यात होतो. कोट्यवधी रुपयांची गुंतुवणुक या संकुलात आहे. बांधकाम चालू असताना , कचऱ्याच्या भरावर रासायनिक प्रक्रिया करायला हवी होती.याची जाणीव कोणालाही होऊ नये , हे अज्ञान की गुन्हेगारी स्वरूपाची बेपर्वाई ? ज्यांनी ही संकुले बांधली ते पैसे घेऊन नामानिराळी झाले आहेत आणि कोट्यवधी ज्यांनी गुंतवले, त्यांची प्रदूषणामुळे कोंडी झाली आहे. या जागीचे प्रदूषण रोखण्याचा मार्ग आहे की नाही ते अजून स्पष्ट झाले नाही आणि असला तरी प्रचंड खर्चीक असणार हे उघड आहे. धातूवर जे रासायनिक प्रक्रिया करतात ते मानवी शरीरासाठी सुरक्षित असणे शक्यच नाही. मानवी आरोग्याचे रूपाने येथील कर्मचारी आणि रहिवासी किती किंमत मोजत आहेत , याचेही हिशोब मांडले गेले पाहिजेत.

मला वाटत या आणि अश्या कितीतरी बाबतीत सामान्य माणूसच किंमत मोजतो. अशा बेपर्वा आणि स्वार्थी माणसांमुळे सध्या कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत. मग ते अनअधीकृत झोपड्या, बिल्डिंग, रस्ता असे अनेक प्रश्न असोत या सगळ्याला जवाबदार असणारी माणसं आणि ते अनधिकृतरीत्या चालू देणारी लाच खाणारी भ्रष्टाचारी माणस यांच्या स्वार्थासाठी सामान्य माणूस आणि निसर्ग किती वर्ष किंमत मोजणार आहे. आणि अशा माणसांविरुध काही केलं नाही म्हणून निसर्ग ह्यांच्यासाठी आपल्यालाही किंमत मोजायला लावणार याची तयारी ठेवा. (२६ जुलैच्या पावसामुळे आणि ग्लोबल वॉर्मिंग मुळे अस लिहावास वाटलं.) या बाबतीत आणि अशा कितीतरी बाबतीत तुम्हाला काय वाटते. यावर उपाय काय ?