ते पाखरू दिवाणे दिनरात गीत गाते
नेतील पंख तेथे घेऊन सूर जाते
ते एकटेच फिरते, ते बांधते न घरटे
ते गुंतते न कोठे, ते जोडते न नाते
दिसला कधी न त्याच्या चोचीत एक दाणा
बळ आणते कुठोनी,पोटास काय खाते?
कंजूष मेघ सारे देती न थेंब कोणा
प्राशून आसवे ते मग आसवात न्हाते
हातावरी न रेषा,त्याचे ललाट कोरे
होणार काय ह्याचे, चिंतेत ते विधाते
----------------------------------------------------
जयन्ता५२