१२ वी झाली आणि पुढे काय करायचं ह्याचा विचार चालू झाला. बी. ई. ला प्रचंड कष्ट करावे लागतात अस ऐकलं होत. त्यामुळे बी . ई . चा विचारच सोडून दिला. मग अगदीच बी एस्स सी केमिस्ट्री नको म्हणून संगणक शास्त्रात बी एस्स सी करायचा निर्णय घेतला आणि तिथेच माझं ह्या "आय टी" च्या क्षेत्रात प्रवेश झाला.
इथे पण अभ्यासाची पुस्तके बघून थक्क पडलो, तो अभ्यास बघून "इथे तरी कशाला आलो?" अशी एक भावना मनात येऊन गेली. पण पहिल्या वर्षी १२ विषयांमधला फक्त एकच विषय राहिला. तेव्हा "आपण हे करू शकतो" अशी एक जाणीव झाली आणि जोरदार अभ्यासाला सुरुवात झाली.
बी एस्स सी पूर्ण केल्यावर एम एस्ससी करायचा निर्णय घेतला. बऱ्यापैकी गुण मिळवून पास होत गेलो. आणि बघता बघता तिसरी सेमिस्टर झाली ...
आणि काळजी चालू झाली ती कंपनी मध्ये नोकरी मिळवण्याची .. २-३ इंटरव्यू मध्ये काम झाले नाही.. त्यामुळे चिंतेत भर पडली.
शेवटी नशिबानं साथ दिली आणि एका प्रतिष्ठित आय टी कंपनी मध्ये नोकरी मिळाली, त्यासाठी ३ इंटरव्यू पास व्हावे लागले.
पहिले ३ दिवस तर कंपनी ची ओळख वगैरे मध्ये निघून गेले. आणि मग मात्र सगळे नवीन लागलेले आपापल्या सेक्शन मध्ये रुजू झाले. मला माझ्या नावडत्या विभागात काम मिळाले (कदाचित मला त्या विषयातले काही येत नसेल म्हणून तो नावडता झाला असावा). त्यामुळे जरा नाराज झालो. पण अनेक गोष्टी शिकायला मात्र मिळाल्या.
तुम्ही नवीन आहात म्हणून कोणाकडून दया-मायेची अपेक्षा ठेवू नका. इथे सगळेच जण आपापल्या कामात व्यस्त आहेत. कोणालाही दुसऱ्याला मदत करायला वेळच नाही. त्यामुळे सुरुवातीला तर अपार त्रास सहन करावा लागला.
लोक म्हणतात "तुम्ही काय 'आय टी ' मधले लोक , भरपूर पगार घेता; आठवड्यातून २ सुट्ट्या... "..
पण आय टी वाला खरंच तितके कष्ट करत असतो. कामाचा ताण असेल तेव्हा जगाला विसरून काम करावे लागते. Logical Error आली, तर ती कधी सुटेल कि नाही हे समजणार नाही. आणि जोपर्यंत ती सुटत नाही तोपर्यंत डोक्याला ताण; अशा वेळेस ती मशीन वरची कॉफी पण काही करू शकत नाही. क्षणभर ऑर्कुट वर बसायचे, मेल पूर्ण उघडून वाचायला वेळ मिळत नाही, फक्त कोणी सेंड केले ? हे बघायचे आणि मग परत 'Back To Work'.
क्लायंट म्हणजे देव, तो पैसे देत असल्यामुळे तो जे सांगेल तसंच काम करावे लागते. त्यात पन्नास वेळा requirement मध्ये बदल.
आणि मग शनिवार - रविवार ची सुट्टी पण समाधानकारक राहत नाही. सकाळी निघण्याची वेळ नक्की असते, पण वेळेत घरी येता येईल का? हे नक्की नसते. नोकरी सोडून दुसरे सामाजिक काम तर सोडाच, लोकांना घरच्यांना पण वेळ देता येत नाही अस मी ऐकले आहे. इथे एखादे काम वेळेत किंवा वेळेच्या आधी पूर्ण केल्याचे बक्षीस असते "नवीन काम"..
पण एखाद्या आय टी वाल्या नि जर नीट वेळ manage केला, तर मात्र त्याच्यासारखी "ऐटी" मधली जिंदगी कोणी दुसरा क्वचितच जगू शकतो.
चेतन भगत यांच एक वाक्य आठवतंय - "तुमचे आयुष्य हे व्यवस्थित संतुलित हवे, आणि ते संतुलित करायला कामाखेरीज इतर गोष्टींना पण वेळ देता यायला पाहिजे."..
असले आयुष्य जगताना आनंद मधलं वाक्य आठवतंय "जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये"..
म्हणूनच मिळेल त्या वेळात आयुष्यातील सुंदर क्षणांचा आस्वाद घेतला पाहिजे..
सध्या त्याचाच प्रयत्न करतोय !!!