मनाची एकाग्रता व गीता

हाती घेतलेल्या कामावर मन एकाग्र करता आले नाही की आपण बाह्य जगांत गडबड, गोंधळ, गोंगाट असल्याची सबब सांगतो. काम आवडीचे असले तर भोवताली गडबड असल्याचे जाणवतही नाही. त्याचबरोबर मनाची एकाग्रता झाल्यास एरवी कंटाळवाणे वाटणारे कामही आवडू लागते. म्हणजे मन एकाग्र होत नाही म्हणून काम आवडत नाही व काम आवडत नाही म्हणून मन एकाग्र होत नाही असे हे दुष्ट चक्र आहे.


हे दुष्ट चक्र भेदावयाचे असेल तर मन विचलित होण्याची प्रक्रिया समजून घ्यायला हवी. यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले व्यक्तिमत्त्व एकसंध नसते. त्याचे अनेक भाग झालेले असतात. त्यांची वेगवेगळी उद्दिष्टे असतात. त्या सर्व भागांना आपणच कार्यशक्ति पुरवीत असतो. प्रत्येक भाग आपापले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यरत असतो. बहुतेक वेळा ही उद्दिष्टे एकमेकांना पूरक नसून परस्परविरोधी असतात. त्यामुळे कार्यशक्ति वेगवेगळ्या दिशांत विभागली जाते.


सोयीसाठी आपण एखाद्या परिस्थितींत माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे दोनच भाग झाले आहेत असे समजू. एक भाग जाणीवपूर्वक ठरविलेल्या उद्दिष्टासाठी कार्यरत आहे व दुसरा त्याच्या विरुद्ध उद्दिष्टासाठी कार्यरत आहे. (या भागाकडे विरुद्ध उद्दिष्टाचे समर्थन असते). पण बहुतेक वेळा माणसाला आपल्या अंतरंगांत असलेल्या या विरोधी भागाची जाणीव नसते. कारण त्यामुळे निर्माण होणारी मनाची द्विधा अवस्था असह्य होते म्हणून माणूस विरोधी भागाची जाणीव "यशस्वीपणे" दडपून टाकतो. (पण त्यामुळे विरोधी भाग नष्ट होत नाही). या परिस्थितींत माणसाची कार्यशक्ति तीन भागांत वाटली जाते. एक जाणीवपूर्वक उद्दिष्टासाठी, एक विरोधी उद्दिष्टासाठी व एक विरोधी भागाची जाणीव दडपून टाकण्यासाठी. हे सर्व भाग एकाच वेळी कार्यरत असल्यामुळे जाणीवपूर्वक ठरविलेल्या उद्दिष्टासाठी माणसाला एकूण कार्यशक्तीचा फारच थोडा भाग उपलब्ध होतो. बाकीचा भाग हाती घेतलेले कार्य तडीस जाऊ न देण्याच्या (आपल्या नकळत आपणच करीत असलेल्या) घातपाती कृत्यांत खर्च होतो.


यावरून असे दिसून येईल की मन एकाग्र करायचे असेल तर पूर्ण कार्यशक्ति अंगीकृत कार्याकडे वळवता यायला हवी. त्यासाठी वैचारिक पातळीवर पुढीलप्रमाणे प्रयत्न करता येईल. सर्वप्रथम अंतःस्थ विरोधी भागाचे अस्तित्व मान्य करावे. थोडावेळ आपले जाणीवपूर्वक ठरविलेले उद्दिष्ट बाजूला ठेवून विरोधी भागाचे उद्दिष्ट हेच आपले उद्दिष्ट समजून त्याचे समर्थन करायचा प्रयत्न करावा. ज्यावेळी प्राप्त परिस्थितींत त्याचा फोलपणा लक्षांत येईल त्यावेळी कार्यशक्तीचा विरोधी भागाकडे जाणारा ओघ (आपणाकडून) आपोआपच थांबविला जाईल. अशावेळी पुन्हा आपले लक्ष अंगीकृत उद्दिष्टाकडे वळविल्यास त्याला अधिक कार्यशक्ति उपलब्ध होईल. पुन्हा लक्ष विचलित झाल्यास पुन्हा तसाच प्रयत्न करावा. काही प्रयत्नांनंतर हाती घेतलेले कार्य पूर्ण शक्तिनिशी होऊ लागेल.


भारतीय युद्धांत अर्जुनाच्या व्यक्तिमत्वाचे असेच दोन भाग झाले होते. सुदैवाने अर्जुनाला आपला अंत:स्थ विरोध दडपून टाकण्याची दुर्बुद्धि झाली नाही. तसे झाले असते तर अर्जुन "शौर्याने" लढून लढाई हरला असता, जे कर्णाच्या बाबतींत झाले. अर्जुनाने आपला अंतर्विरोध श्रीकृष्णापुढे उघड केला व योगेश्वर कृष्णाने (गीता सांगून) अर्जुनाला आपल्या अंत:स्थ विरोधाकडे जाणारी कार्यशक्ति अंगीकृत कार्याकडे वळविण्यास मदत केली. याउलट, कौरवांच्या बाजूने लढणारे अंतस्थ विरोध दडपून टाकून अंशत: उपलब्ध असलेल्या कार्यशक्तीने लढत होते. योग म्हणजे बेरीज. अर्जुनाच्या बाबतींत श्रीकृष्णाने कार्यशक्तीच्या वजाबाकीचे बेरजेंत रुपांतर केले. तो खरोखरच योगेश्वर (बेरीज करण्यांत पटाईत) होता.     


वरील विवेचनाविषयी आपणांस काय वाटते?