नीलांगणातला कूटप्रश्न

नीलांगण राज्यात दोनच प्रकारचे लोक राहत असत. सदैव खरे बोलणारे बेडर, नि सदैव खोटे बोलणारे बेरड. त्यांच्या बाह्य शरीर-लक्षणांत काहीही फरक नव्हता.

एकदा हे बेडर-बेरड प्रकरण माहीत असलेला अजय त्यांच्या राज्यातून प्रवास करताना रस्ता चुकला. फिरत फिरत एका तिकटीवर तो पोचला तेव्हा त्याला तिथे दोन व्यक्ती दिसल्या.

त्या कोण आहेत (बेडर की बेरड) हे कळायचा मार्ग अर्थातच नव्हता.

अजयला पाहताच त्या दोघांनीही एकत्र जाहीर केले, "तू वाट चुकलेला दिसतोस. आमच्यापैकी कुणा एकालाच तू एकच प्रश्न विचारू शकशील. तुझ्या पुढ्यातल्या या दोन वाटांपैकी एक वाट नक्की मृत्यूकडे जाते नि दुसरी जीवनाकडे. तुला आल्या वाटेने परतण्याची मुभा नाही. प्रश्न आमच्यापैकी कुणाला विचारायचा आणि काय विचारायचा ते तू ठरव. आमच्या स्वभावधर्माला जागून आम्ही त्याचे उत्तर देऊ याची खात्री देतो".

अजयने काय प्रश्न विचारावा, आणि कुणाला?