ओदिशा - ६ : पिपली आणि कोणार्क

२१-११-२०१२.
सकाळी पाचच्या आधीच फटफटले होते. मी घरून येतांना विजेवरची चहाची किटली सोबत घेतली होती. एक चहा करून प्यालो. हवामान मुंबईसारखेच. त्यामुळे गार पाण्याने अंघोळ केली. पण माझ्या बरोबरच्या तिघांनाही अशा हवेतही गरम पाणी हवे असते असा मागील अनुभव होता. बाळू आणि जखीण उठायची वेळ झाली नव्हती त्यामुळे त्यांचे दार ठोठावले नाही. मग गरम पाण्यासाठी वाट पाहाणे आले. ते थोडे उशिराच आले. म्हणून मग सर्वांसाठी किटलीतच चहा बनवला. ओरिसातला आम्ही घेतलेला सर्वोत्कृष्ट चहा माझ्या किटलीतलाच. बाळ्याने तर तिथे असेपर्यंत किटलीतलाच चहा घेणार म्हणून जाहीर केले. आता न्याहारीसाठी वेळ कमी उरला. मग रेलवेजवळच्या टपरीवरच खायचे ठरले. एका टेंपोला खिडक्या पाडून एक टपरी केली होती. ती कमी गलिच्छ वाटली. म्हटले गरमागरम पुर्‍या खाऊयात म्हणजे कमीत कमी संसर्ग होईल. पुरी पाहाण्यापूर्वी पुरी खायला नको? दुसरे काही खाऊ नका. पण त्या अगत्यशील विक्रेत्याने बरोबर पांढर्‍या वाटाण्याची उसळ देखील दिली. आमच्या चमूच्या इतर सदस्यांनी उसळीचा अवमान केला नाही. मी आपल्या चहात बुडवून पुर्‍या खाल्ल्या. आम्ही खाता खाता एक निकामी पाय असलेला पाच पायांचा बैल तिथे आला. पाचवा पाय पाठीवर, वशिंडाच्या जरासा मागे बैलाच्या शरीरातून उगवलेला.  तो प्रत्येक फेरीवाल्यासमोर थांबे. मग फेरीवाले त्याला नमस्कार करून खाऊ देत. कोणी गंधफुले वाहून तर कोणी असेच. खाऊ मिळाल्यावर मग तो बैल पुढच्या फेरीवाल्याकडे. शिकवल्यासारखा. बैलाच्या निमित्ताने खाऊच्या टपर्‍यांचा बराच धंदा झाला. खास बैलाला खाऊ देण्यासाठी. भूतदया म्हणून ठीक आहे. पण गंधफुलांचे काय? असो. प्रत्येक व्यक्तीला विचारस्वातंत्र्य आहे. आपल्या धार्मिक जखिणीने पण बैलाला नमस्कार करून खाऊ दिला बरे का. टेंपो रोज सकाळी बरोब्बर ५.२० ला येतो आणि ५.३० ला उघडतो असे त्या विक्रेत्याने सांगितले. पूर्व किनार्‍यावर मुंबईपेक्षा एकदीड तास अगोदरच उजाडते.

सतत दोन दिवस भुवनेश्वर स्थानकाच्या त्या परिसरातला गलिच्छ बकालपणा सतत पाहूनही माझी नजर मेली नव्हती. भूकदेखील किळस मारू शकत नाही. पण दर वेळी स्वच्छ हॉटेल शोधत खायलाप्यायला दूरवर कसे जाणार. ओरिसात जातांना गलिच्छ बकालपणा पाहावा लागणारच याची मानसिक तयारी केली होती. त्या तयारीच्या जिवावरच तगून होतो. खायला स्वच्छ हॉटेल हवे असेल तर थोडे दूरच्या हॉटेलात खायला जावे लागेल. उष्ण दमट हवेत रोज एखादा किमी. घामाघूम होऊन चालावे लागेल. तिथेच जाऊन राहायचे म्हटले तर त्या परिसरात राहायचे हॉटेल हवे. दूरवरच्या ठिकाणची टॅक्सीरिक्शाची उपलब्धता पण ठाऊक नव्हती. माझा चालण्याचा वेग तसा सर्वसाधारण आहे. ४ ते ५ किमी. प्रति तास. आणि माझे तिन्ही सोबती माझ्या निम्म्या वेगाने देखील चालू शकत नाहीत. हा वैताग टाळायला बकालपणा पत्करला होता. सहकुटुंब गेल्यावर अशा तडजोडी कराव्या लागतात. टॅक्सीवाले पण मग अडवून दाखवून पैसे उकळण्याची शक्यता असते. फक्त पुरुषपुरुष असतो तर कितीही दूर राहिलो असतो. असो. परिसर बकाल असला तरी रेलवे स्थानक हॉटेलपासून जेमतेम शंभरदोनशे पावलावर होते आणि सज्जातून दिसतही होते हे किती सोयीचे होते! रेलवे फलाटावर तिकीट न घेता गेलो. पर्यटन खात्याचे त्याच दिवसाचे तिकीट फलाटावर वाट पाहायला चालते. कृष्णा हजर होता. आमच्यासारखेच आणखी आठदहा प्रवासी आमच्याच बसची वाट पाहात होते. पावणेनऊला त्याने बस आल्याची वर्दी दिली आणि बस क्रमांक दिला.

वातानुकूलित बस एकदम चकाचक होती.

 चकाचक बस

मार्गदर्शक वाटाड्या - गाईडही नीटनेटका, प्रसन्न व्यक्तिमत्वाचा, बरे इंग्रजी बोलणारा.
गाईड

पहिले ठिकाण होते भुवनेश्वर पुरी मार्गावरचे पिपली. भुवनेश्वरपासून १५- २० किमी. वर आहे. वाटाड्या माहिती देत होता. वाटेत धौलीची कलिंग युद्धाची रणभूमी लागली. वाटाड्याने इंग्रजी आणि हिंदीतून व्यवस्थित माहिती दिली. पिपली हे अगदी छोटेसे गाव. रस्त्याच्या दुतर्फा दुकानेच दुकाने. ओदिशी कलावस्तूंची. सर्वजण उतरले. इथली आठवण म्हणून बहुतेकांनी ओदिशी वस्तूंची खरेदी केली. हे गरीब राज्य असल्यामुळे तशी स्वस्ताई होती. त्यामुळे खरेदीनंतर बसमधला समस्त महिलावर्ग खूष होता. श्रीकृष्ण-बलराम-सुभद्रा या तिघांची एकत्र चित्रे, मूर्त्या बहुतेक वस्तूत. शैली वैशिष्ट्यपूर्ण ओदिशी शैली. उभ्या लंबगोलाकार चेहर्‍यावर वटारलेले टप्पोरे डोळे. एक खास वस्तू म्हणजे अख्ख्या नारळाच्या गुळगुळीत केलेल्या छतात टांगायच्या गोट्यावरील या त्रिमूर्तीची चित्रे. नारलाला प्रथम तैलरंगाचा एक थर देऊन त्यावर तैलरंगातच आकर्षक छटांमध्ये रंगविलेली. तीनधारी नारळाच्या १२० अंशाच्या तीन पृष्ठभागावर प्रत्येकी एक चित्र अशी एकूण तीन चित्रे. नारळ भोवर्‍यासारखा गोल फिरून थांबला तरी एक चित्र आपल्याकडे पाहतेच. नारळ आणि कापडी चित्रे घेतली. काही घरात लावायला तर काही भेट म्हणून द्यायला. ज्यांना ज्यांना दिली त्यांना आवडली. कापडाच्या पॅचवर्कची उभी चित्रे साडॅचार फूट उंच आणि सहा इंच रुंद पण दोन घेतली. पण वेगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण शैलीतली.

कापडी चित्रे

बस थेट कोणार्कच्या मंदिराकडे गेली. आमच्या बसमधील वाटाड्याने इथे आम्हाला कोणार्क मंदीर दाखवायला पांडे नावाच्या सदगृहस्थाची सरकारमान्य मार्गदर्शक म्हणून पाहून दिले. सेवानिवृत्त शिक्षक आहेत ते.
पांडेजी

त्यांनी इतिहासातले तसेच पुराणातले दाखले देत अधूनमधून संस्कृत वचने, सुभाषिते देत मंदिराचे दर्शन घडवले आणि नंतर आमची आमचा प्रग्रा वापरून कोणार्क मंदिराच्या पार्श्वभूमीवर छान प्रकाशचित्रे देखील काढून दिली. कोणार्क हे ओदिशातील पुरी जिल्ह्यातले एक लहानसे शहर. कोन्यातील म्हणजे कोपर्‍यातील सूर्य (अर्क = सूर्य) असा कोणार्क याचा अर्थ आहे. १३व्या शतकात इथले सूर्यमंदीर बांधलेले आहे. यालाच ब्लॅक पॅगोडा असेही म्हणतात. पूर्व किनार्‍यावरील अनंतवर्मन चोडगंगदेव याने आपल्या गंग वंशाची सत्ता भारताच्या या पूर्व किनार्‍यावर स्थापन केली. या गंग वंशाच्या नरसिंहदेव (इ.स. १२३६ ते १२६४) या राजाने हे वालुकाश्मातले मंदीर बांधले. जालावर काही ठिकाणी याला लंगूल नरसिंह देव असे देखील म्हटलेले आहे. असो. जगातील सर्वांत आश्चर्यकारक अशा धार्मिक पुराणवास्तूंपैकी एक असलेले हे मंदीर हा ओदिशामधील मंदीरस्थापत्यातील शिरपेच आहे.

ऋग्वेदकालापासून सूर्य ही भारतीयांची लोकप्रिय देवता आहे. कोणार्क इथे धर्म आणि विज्ञान यांची अप्रतिम सांगड शिल्पकलेशी घातलेली आहे आणि त्यामुळे ही एक अजोड अशी शिल्पवास्तू ठरली आहे. किंवा असं देखील म्हणता येईल की विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी हिंदु धर्मातील अप्रतिम अशी लोकप्रिय प्रतीके इथे शिल्पाकृतीतून वापरलेली आहेत. सूर्याची ही प्रतिमा आर्यांबरोबर भारतात आली. प्राचीन बाबिलोनियन आणि इराणी संस्कृतीतून ही सूर्यप्रतिमा भारतीय संस्कृतीत रुजली असे बहुतेक इतिहासकारांचे मत आहे. परंतु रथाच्या आकाराचे मंदीर बांधण्याची विलक्षण कल्पना मात्र पूर्णपणे अभिनव आणि अलौकिक सृजनाचा स्पर्श असलेली अशी आहे. आणि म्हणूनच हा जागतिक सांस्कृतिक ठेवा आहे असे युनेस्कोने जाहीर केलेले आहे. त्याचबरोबर मंदीरस्थापत्य हा देखील एक मनोरंजक आणि आनंददायी विषय आहे. त्याबद्दल लेख बोजड न करतां जमेल तशी वेळोवेळी जास्तीत जास्त सोप्या भाषेत माहिती येईलच. प्रथम रचनेची कल्पना यायला मंदिराचे एक जोडचित्र देतो. फारसे चांगले नाही तरी देतो.

कोणार्क मंदीर जोडचित्र

प्रवेशद्वारापाशीच एक नटमंदीर आहे. वर म्हटलेले पहारा देणारे, हत्तीवरचे सिंह नटमंदिराच्या दरवाजाबाहेर आहेत. सूर्याच्या उपासनेचा एक भाग म्हणून नर्तक इथे नृत्य करीत असत. त्याच रेषेत मुख्य मंदिराला जोडून ३० फूट चौरस आणि ३० फूट उंच असे जगमोहन म्हणतात ते सभागृह आहे. ओदिशात तशी इतरही अनेक मंदिरे आहेत. परंतु हे मंदीर ओदिशातील इतर मंदिरांच्या तुलनेत जास्त स्थापत्यसंतुलित वाटते असे स्थापत्यकारांचे मत महाजालावर नोंदलेले आढळले.

कोणार्कचे नटमंदीर

कोणार्कचे नटमंदीर

नटमंदिरामागे मंदिराची रथाकार वास्तू आहे. ओदिशाचा विजयी राजा नरसिंह देव याने युद्धरथाच्या स्वरूपात विजयाचे प्रतीक उभारले. मंदिरांचे नगर असलेल्या पुरीपासून जवळच्या ठिकाणी बांधलेले हे एक सूर्यमंदीर आहे. या स्थानाला त्याने कोणार्क असे नाव दिले. वास्तू जरी त्याच्या मुस्लीमांवरील विजयाचे प्रतीक असले तरी मंदिराचे नाव मात्र खगोलशास्त्राचेच प्रतीक आहे. खगोलशास्त्राची त्या राजाला अतीव ओढ होती. मंदिराचा प्रचंड आकार सूर्यदेवाच्या रथाचा आहे. रथ सात स्वर्गीय घोड्यांनी ओढलेला आहे आणि रथाला चाकांच्या बारा जोड्या आहेत. यापैकी आता सहाच घोडे शिल्लक आहेत. मोजून पाहायला सुचले नाही.
सूर्यदेवाच्या रथाचे घोडे आणि एक चाक.

रथाचे घोडे आणि चाक

गाभार्‍यावरचे आणि नटमंदिरावरचे छत पडलेले आहे.

"गाभार्‍याला तीन बाजूंनी पुढे आलेल्या सूर्यदेवाच्या तीन सुंदर मूर्तींमुळे शोभा आली आहे. पूर्वाभिमुख मंदिरात सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरणे थेट या मूर्तीपर्यंत पोहोचतात. दररोज या तीन सूर्यमूर्तींपैकी किमान एका तरी सूर्यमूर्तीवर सकाळची कोवळी सूर्यकिरणे पडावीत अशी योजना स्थापत्यकारांनी केलेली आहे." असे वर्णन महाजालावर मिळते. परंतु या सूर्यमूर्ती आता गायब आहेत असे वाचले होते. पण सर्वात शेवटी पाहायचे ठरवले. दुर्दैवाने शेवटी पाहायला विसरूनच गेलो. गाभारा आणि जगमोहन एकाच चौथर्‍यावर आहेत. मुख्य मंदिरावर सर्व बाजूंनी नक्षीदार वेलबुट्ट्या आणि भौमितिक आकृत्या कोरलेल्या आहेत तसेच नर्तकांच्या, यक्षांच्या तसेच देवदेवतांचा भावविभोर नृत्याकृती आहेत.
वेलबुट्ट्या आणि नृत्याकृती

काही नृत्याकृतीत कामसूत्रातून घेतलेली कामुक हावभाव करणारी जोडपी आहेत. कालौघात वातावरणामुळे शिल्पे झिजली आहेत परंतु मूळ शिल्पातल्या कोरीवकामाचे सौंदर्य लपत नाही.
कामुक शिल्पाकृती

इतिहासात मानवाने मह्त्वाच्या विविध घटनांची नोंद करणे, भविष्यातील लोकांसाठी संदेश देणे, आपल्या भावना, आपले तत्वज्ञान याची नोंद करणे यासाठी वाङ्मयातून, दस्तावेजामधून आणि चित्रे, शिल्पे आदि कलाकृतीमधून जागोजाग प्रतीकांचा वापर केलेला आहे. रामायण, महाभारत, ओडिसी इलियड इ. प्राचीन महाकाव्यापासून आधुनिक काळातील साहित्यिकांपर्यंत कित्येकांनी नी आपापल्या साहित्यात विविध प्रतीकांचा अप्रतिम असा सौंदर्यपूर्ण वापर केलेला आहे तर काही अभिनव प्रतीके स्वतःच निर्मिलेली आहेत. विविध वास्तूत, शिल्पात देखील अशाच विविध प्रतीकांचा वापर केलेला आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वाराशी दोन सिंह पहारा देतात. दोन्ही सिंह युद्धातील एकेका हत्तीचा संहार करतांना दाखवले आहेत. सिंह हे हिंदु धर्माचे तर हत्ती हे बौद्ध धर्माचे प्रतीक आहे. म्हणजे हिंदु धर्माने बौद्ध धर्मावर विजय मिळवला. हे दोन्ही हत्ती योद्ध्यांच्या एकेका शरीरावर उभे आहेत. सिंह हे शौर्याचे तर हत्ती हे संपत्तीचे देखील प्रतीक आहे. गजांत लक्ष्मी हा शब्दप्रयोग आपण ऐकलेला, वाचलेला आहे. म्हणजे संपत्तीने अगोदर मानवता धुळीला मिळवली नंतर शौर्याने संपत्तीवर विजय मिळवला असा देखील यातून अर्थ काढता येतो.

राजा नरसिंह देव याला खगोलशास्त्रावर अतीव स्वारस्य होते. सात घोडे हे आठवड्याच्या सात दिवसांचे प्रतीक आणि बारा चाके हे बारा महिन्यांचे प्रतीक समजले जाते. चाके अप्रतिम कोरीव कामाने नटलेली आहेत. प्रत्येक चाकाला आठ अर्‍या आहेत. दिवसाला आठ प्रहर असतात म्हणजे आठ अर्‍या हे आठ प्रहरांचे प्रतीक आहे.
रथाचे आठ अऱ्यांचे चाक

मला धर्म, तत्वज्ञान यात अजिबात गती नाही. यातील प्रतीकांचे काही अर्थ महाजालावरून उचलले आहेत तर कोणार्कला भेटलेले ‘सरकारमान्य मार्गदर्शक’  श्री. पांडे यांनी काही अर्थ सांगितले आहेत. सूर्यमंदीर दाखवतांना पांडेजी जागोजाग वेदातली, गीतेतली संस्कृत वचने देत होते. संस्कृत ढोबळमानाने मला कळते पण त्यांनी दिलेल्या संदर्भातली अचूकता जाणण्याचे ज्ञान मात्र माझ्याकडे नाही. रविंद्रनाथ टागोर म्हणतात, "इथे पाषाणांच्या भाषेने मानवी भाषांना मागे टाकले आहे." सूर्यमंदीर पाहतांना संवेदनाशील मनाला आलेला विस्मित करणारा अनुभव शब्दांकित करणे माझ्यासारख्या सर्वसामान्यांना तरी कठीणच आहे.

विज्ञानाच्या दृष्टीतून मात्र हे मंदीर हे सूर्याच्या सार्वभौम अशा वैश्विक साम्राज्याचे पर्यायाने सूर्यकेंद्री विश्वाचेच प्रतीक आहे तसेच हे आठ प्रहर, बारा महिने वगैरे कालमापनाचे देखील प्रतीक आहे. म्हणजे गॅलीलिओच्याही पूर्वी तेराव्या शतकात पाश्चिमात्य जगतात जेव्हा चर्चच्या प्रभावाखाली पृथ्वीकेंद्री खगोलशास्त्राचा पगडा होता तेव्हा भारतात मात्र आर्यभट, भास्कराचार्य यांच्यासारख्या प्रतिभावंत वैज्ञानिकांनी, गणितज्ञांनी मांडलेली सूर्यकेंद्री विश्वाची संकल्पना प्रागतिक विचारांच्या हिंदू राजांनी स्वीकारली होती. कोणार्कखेरीज जयपूरमधील आणि दिल्लीतील जंतरमंतर हे याचे आणखी पुरावे आहेत. जयपूरमधील जंतरमंतर हे प्रथम रजपूत राजे जयसिंह-२ यांनी नमुना म्हणून जयपूरला बांधले आणि त्यानंतर त्याचीच प्रतिकृती असलेले दिल्लीतील हे जंतरमंतर त्यांनीच नंतर मोहम्मद शाह यांच्या कालात इ.स. १७२७ ते १७३४ या काळात उभारले. प्रतिगामी धर्ममार्तंडानी विज्ञानात ढवळाढवळ केली नाही तर अशा अद्वितीय कलाकृती उभ्या राहतात. नाहीतर मागे राहाते वैज्ञानिकांच्या छळाच्या इतिहासाची भुतावळ.

असो. कोणार्कचा समुद्रकिनारा लोकप्रिय आहे असे महाजालावर म्हटलेले आहे. आज हा किनारा मंदिरापासून २ किमी. दूरवर गेला आहे. परंतु त्या काळी समुद्र मंदिराच्या पायापाशी होता. समुद्रकिनार्‍यावर जाणार्‍या रस्त्याच्या दुतर्फा दमट वाळूत उगवलेली तिवरसदृश झाडे आहेत. मुंबईच्या किनार्‍यावर दलदलीत वाढणारी झाडे आहेत तशी. यावरून अंदाज बांधता येतो की कधीकाळी इथे नक्कीच समुद्रकिनारा होता असणार. खार पाणथळीत झाडामध्ये वाळू आणि गाळ साचून इथे जमीन तयार झाली असावी आणि त्यामुळे समुद्र मागे हटला असावा. इथल्या समुद्राची शांतता मात्र फसवी आहे. तरी मुख्य आकर्षण मात्र कोणार्क मंदीरच आहे. प्रखर राष्ट्राभिमानाचे हे भव्य असे प्रतीक आहे. गोलाकार कळसांनी युक्त अशा कलिंग स्थापत्यशैलीतले हे मंदीर आहे. मुख्य कळस, रेखा देऊळ वगैरे आता जरी नाहीसे झाले असले तरी ते लिंगराज आणि जगन्नाथ मंदिरांच्या कळसांशी, रेखा देवळांसारखेच होते. कळसाची जमिनीपासूनची उंची मात्र या दोन्ही मंदिरांवर मात करणारी अशी २२९ फुटांची होती. अस्तित्वात नसलेल्या कळसाची उंची जालावर कशी आली कळत नाही. गणिताने काढली असावी आणि क्लिष्टता टाळण्यासाठी दिली नसावी. पण विश्वास न ठेवण्यासारखे त्यात मला तरी काही दिसत नाही. तुलनेसाठी देतो, पुरीचे जगन्नाथमंदीर आहे २१४ फूट तर भुवनेश्वरचे लिंगराजमंदीर १८० फूट. गाभार्‍यातील मूळ देवतेची मूर्ती नाहीशी झालेली आहे. सभागृह मात्र सुरक्षित आहे. आवार ८५७ फूट X ६१३ फूट आहे. सभागृह १२८ फूट उंच आहे. पूर्वमुखी मंदीर पूर्वपश्चिम आहे. सुरू आणि वालुकामय जमिनीत वाढणार्‍या इतर अनेक वृक्षांच्या छायेने इथला नैसर्गिक परिसर व्यापलेला आहे. बहुतांशी निसर्ग अजून तरी अबाधित आहे. मदिराचे दगड सांधायला कोणताही चुना किंवा सिमेंट वापरलेले नाही. या मंदिराचे दगड स्वतःच्या वजनानेच एकमेकांना नुसतेच घट्ट चिकटून आहेत. हे इथले प्रमुख वैशिष्ट्य मानावे लागेल. आवश्यक तिथे दगडांना छिद्रे पाडून लोखंडी पिनांनी सांधे पक्के केलेले आहेत. काही ठिकाणी पाषाणाची उन्हावार्‍याने झीज झाल्यामुळे उघड्या पडून दमट हवेमुळे गंजलेल्या लोखंडी पिना आजही स्पष्ट दिसतात. 

दरवर्षी डिसेंबरमध्ये इथे अभिजात भारतीय शास्त्रीय नृत्याचा समारोह होतो. यात ओडिसी शैलीचीही नृत्ये असतात. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे एका खग्रास सूर्यग्रहणाचा मार्ग कोणार्कवरून गेला होता.

काळाच्या ओघात कोणार्क, तिथली मंदिरे आणि पवित्र स्थाने यांभोवती असलेले कीर्ती आणि समृद्धीचे वलय लोपले. या वास्तूची समृद्धी आणि हे वलय किती काळ होते आणि नक्की केव्हा ते लयाला गेले याबद्दल नक्की काहीही सांगता येत नाही. मंदिराची अशी दुर्दशा कशी काय झाली याला १०० टक्के विश्वासार्ह असा कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. याबाबत इतिहास मूक आहे. काळाच्या गडद धुक्यात हे गूढ दडलेले आहे. परतु या अप्रतिम मंदिराच्या पतनाबद्दल इतिहासकारांनी विविध तर्काधिष्ठित मते मांडलेली आहेत. सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह वाटेल अशी दंतकथा आहे धर्मपादाची.

गंग वंशाचा राजा नरसिंह देव - १ याने आपल्या राजवंशाच्या राजकीय सर्वश्रेष्ठतेचे प्रतीक म्हणून हे मंदीर बांधायला आदेश दिला. बाराशे स्थापत्यशास्त्रज्ञ आणि कुशल कारागीर यांनी आपल्या आयुष्यभराची प्रतिभा, आपले अविश्रांत श्रम आणि पूर्ण कसब तब्बल बारा वर्षे पणाला लावले. तेवढाच काल राजाने जमा झालेली करसंपत्ती खर्च केली. तरीही पूर्णत्वाचे चिन्हही कुठे दिसेना. मग ठरलेल्या दिवशी काम पूर्ण झालेच पाहिजे, अन्यथा सर्व शिल्पकारांना देहदंड होईल असा अंतिम आदेश त्याने काढला. सिबेई सामंतराय या प्रमुख सूत्रधाराने म्हणजे स्थापत्यकाराने असमर्थता दर्शवली. तेव्हां बिशू महाराणा या स्थापत्यशास्त्रज्ञाने ते पूर्ण केले. परंतु मर्मशिला आणि कळस बसवायचे काम मात्र अजून जमले नव्हते. सगळ्या स्थापत्यचमूने आता हात टेकले होते. ही मर्मशिला योग्य रीतीने बसवली की वास्तूच्या वरील भागाचा भार पेलणार्‍या खांब, तुळया वगैरे घटकांवर पडणारा भार योग्य दिशेने, भारपेलक घटकांना पेलता येईल अशा योग्य प्रमाणात विभागला जातो आणि मगच वास्तू दीर्घकाल टिकू शकते. नाहीतर ती कोसळण्याचा धोका वाढतो असा माझा अंदाज. मर्मशिला म्हणजे काय याचा अचूक तांत्रिक, शास्त्रीय तपशील ठाऊक नाही. असो. 

प्रथम एका आकर्षक आणि लोकप्रिय दंतकथेचा आस्वाद घेऊ. बिशू महाराणाचा बारा वर्षांचा मुलगा धर्मपाद हा तिथे सहज मंदीर बांधायचे काम कसे काय चालते ते बघायला आला. स्थापत्यशास्त्रज्ञांना भेडसावणारी चिंता त्याला जाणवली. मंदीर बांधण्याचा तसा त्याला अनुभव नव्हता. तरीही मंदीर बांधण्याच्या स्थापत्यशास्त्राचे सखोल ज्ञान मात्र त्याला होते. मंदिराच्या शिरोभागी स्थापन करायची मर्मशिला बसवायचे कठीण असे गणिती सूत्र सोडवायचे आव्हान त्याने स्वीकारले आणि ते काम स्वतःच करून त्याने सर्वांना चकित केले. परंतु ही कामगिरी केल्यानंतर थोड्या दिवसातच त्या बालबृहस्पतीचे कलेवर समुद्रकिनारी मंदिरापाशीच आढळून आले. (तेव्हा समुद्रकिनारा मंदिराला लागूनच होता. आता तो २ किमी दूरवर गेला आहे.) आत्महत्त्या किंवा खून! बारा वर्षाच्या धर्मपादाने आपल्या वास्तु रचनाकार समाजासाठी स्वतःचे प्राण वेचले असेच ही दंतकथा सांगते. एकापेक्षा एक असे श्रेष्ठ स्थापत्यशास्त्रज्ञ असतांना एक बारा वशांचा मुलगा हे काम करून दाखवतो हे त्या ढुढ्ढाचार्‍यांना सहन झाले नसावे. त्यामुळे त्यांनी कामात त्रुटी ठेवली असावी आणि नंतर धर्मपादाचाही काटा काढला. याच त्रुटीमुळे नंतर मंदीर पडले. हे सत्य जर मानले तरी याला स्वीकारार्ह असा ऐतिहासिक पुरावा मात्र नाही. सत्य आणि कल्पिताची एकजिनसी सरमिसळ, दुसरे काय?

दुसर्‍या एका मतानुसार धर्मांध मुस्लिम सेनापती काळापहाड याने इतर अनेक मंदिरांबरोबरच हे कोणार्कचे मंदीर देखील पाडले. भुवनेश्वरमध्ये त्याने पाडलेल्या अनेक मंदिरांचे भग्नावशेष अजूनही आहेत. मागील लेखांक क्र. ५ मधील वैतल मंदिराच्या प्रकाशचित्रात असे एक शिखराचा काही भाग उडवलेले मंदीर दिसते आहे. हिंदु इतिहासात बाटवले जाणे हा एक प्रकार आहे. मंदीर बाटल्यामुळे अपवित्र झाले म्हणून देखील सोडून दिले असू शकते. आणि सोडून दिल्यामुळे नंतर ओसाड होऊन पडझड झाली असावी. ऐतिहासिक पुरावा नसला तरी यात मात्र विश्वास न ठेवण्यासारखे काही दिसत नाही.

ही सर्व मीमांसा पं. सदाशिव राथशर्मा यांच्या ‘सन टेंपल ऑफ कोणार्क’ या ग्रंथात केलेली आहे. त्यामुळे त्यांना पद्मश्री - बहुधा ओदिशामधील पहिलीच - तर मिळालीच परंतु कोणार्कवरील संशोधनाला पुढे चालना मिळाली. यानंतरचे कोणार्क मंदिरावरील सर्व ग्रंथ या ग्रंथातील विवेचनावरच आधारित आहेत आणि त्यानंतर (कोणार्कच्या र्‍हासाची) कोणतीही नवीन कारणमीमांसा पुढे आलेली नाही. तरीही पुरीच्या मदाल पानजीचा लिखित इतिहास विश्वासार्ह आहे किंवा नाही, नसल्यास का नाही याबद्दलचे एखाद्या इतिहासकाराचे ठोस मत मला कोठे आढळले नाही. इतिहासकार बहुधा एकाच पुराव्यावर अवलंबून राहात नसावेत. या निष्कर्षाप्रत नेणार्‍या अशाच आणखी एका ठोस पुराव्याची त्यांना गरज वाटत असावी.

असो. पांडेजींनी वरची दंतकथाच सांगितल्याने माझ्या डोळ्यासमोरून बिशू महाराणाच्या त्या कथानकाचा एक चित्रपटच सरकला आणि माझा कोणार्क पाहायचा आनंद द्विगुणित झाला.  पण बाळ्याने मूर्खाने पुराणात जरा जास्तच स्वारस्य दाखवले आणि पांडेजी त्या उभयतांना असे चिकटले की सुटता सुटेना. आम्ही दोघे मात्र कंटाळून संधी साधून हळूच सटकलो. काही पर्यटनस्थळे अतिशय आकर्षक आणि चकाचक राखलेली असतात.  आजूबाजूच्या सर्वसाधारण परिसरात एखादे दिव्य बेट उगवावे अशी वाटतात. काळाचा एक तुकडा चुकून मागे राहिल्यासारखी. पर्यटकांच्या उत्साहाने तिथले वातावरणच भारले जाते आणि तो परिसर उत्फुल्ल, जादुई होऊन जातो. काळ थबकून ते दिव्य, आनंददायी क्षण संपूच नयेत असे वाटते. तस्सेच हे ठिकाण आहे. विजापूरसारख्या बकाल शहरातला गोलघुमट पाहातांना देखील मला असाच अनुभव आला होता. पांडेजींच्या पिळण्यामुळे मुख्य तीन सूर्यमूर्ती आहेत की नाही हे पाहायचे राहून गेले. नसाव्यातच बहुधा. नीच धर्मवेड्यांच्या आक्रमणाच्या भीतीने तत्कालीन पुजार्‍यांनी त्या पळवून नेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवल्या असे कुठेतरी वाचले होते. त्यापैकी एक बहुधा दिल्लीच्या वस्तुसंग्रहालयात आहे असेही त्यात म्हटले होते.

नवग्रहदेवता कोरलेल्या एका प्रचंड आडव्या तुळईसारख्या शिळेला नवग्रहशिळा म्हणतात. ही नवग्रहशिळा मंदिराचे रक्षण करते असे मध्ययुगीन स्थापत्यात मानले जात होते ओदिशातील बहुतेक मंदिरात प्रवेशद्वारापाशीच अशी नवग्रहशिळा दिसून येते. मुख्यशाळेच्या म्हणजेच जगमोहनच्या समोरील दरवाज्यावर सुमारे १८ फुटांवर एक सजलेली नवग्रहशिळा बसवलेली होती. क्लोराईटची ही शिळा १९ फूट १० इंच लांब, ४ फूट ९ इंच रुंद आणि ३ फूट ९ इंच उंच आहे आणि हिचे मूळ वजन २६.२७ टन होते. इ. स. १६२८ मध्ये खुर्दाच्या तत्कालीन मांडलिक राजाने (याचे नाव देखील नरसिंह देव असे होते) ती दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला होता.

"नवग्रहशिळेवरील प्रतिमा कोरण्याचे काम मात्र नीट केलेलं नाही. बर्‍याच प्रतिमा समूहाने एकाच आकारात बनवलेल्या वाटतात. बहुतेक मूर्तींच्या हातात जपमाळ आणि कमंडलू असून उंच टोकदार मुकुट घालून कमळावर बसलेल्या दिसतात. पुराणात याचे स्पष्टीकरण सापडते.

असो. कठोर काळाच्या फेर्‍यातून मात्र नवग्रहशिळा देखील काही सुटली नाही आणि फार काळ ती आपल्या जागी स्थिर राहू शकली नाही. १९व्या शतकाच्या शेवटी बंगाल एशियाटिक सोसायटीच्या सभेच्या वेळी समुद्रतीरापर्यंत ट्रामगाडीची सेवा सुरू करताना बंगाल सरकारने शिळा कलकत्त्याला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु जेमतेम २०० फूट ती वाहून नेल्यावर त्यांच्याकडील निधी संपून गेला. नंतर पुन्हा काही वर्षांनी तसाच प्रयत्न झाला. वाहून नेणे सोपे जावे म्हणून शिळेचे दोन भाग करण्यात आले. तरीही प्रचंड वजनामुळे आणि वालुकामय मार्गामुळे ती काही हालवता आली नाही. शेवटी दोन फर्लांगावर ती सोडावी लागली. इथे ती साठ वर्षांपेक्षा जास्त काळ पडून होती. अगदी अलीकडे भारत सरकारने कोणार्क मंदिराच्या आवाराजवळच  एका मंडपात तिची स्थापना केली. सध्या शिळेचा मोठा भाग आवाराबाहेर आग्नेय दिशेला आहे. आतां दर शनिवारी तसेच मकरसंक्रातीला अनेक लोक या शिळेची म्हणजे नवग्रहांची होमहवनादी पूजा करून नैवेद्य अर्पण करायला कोणार्कला जमतात. " अशी माहिती मिळाली.  मंदिराच्या मागच्या बाजूला रचून मांडून ठेवलेल्या ढीगात काही ती दिसली नाही.

नंतर समुद्रकिनारा पाहून जेवणाची सुटी. समुद्रकिनारा खास रम्य वगैरे मला तरी वाटला नव्हता. गोवा कोकणच्या मानाने वैराणच वाटला. झाडेही नाहीत, माणसेही नाहीत. मुख्य म्हणजे सर्वसाधारणपणे समुद्रकिनारी असणारा वारा देखील पडला होता.

कोणार्क सागरतीर

कोणार्क सागरतीर

परंतु आता लेखांकासाठी नव्याने जालावर काही प्रकाशचित्रे चढवतांना प्रकाशचित्रात तरी बरा वाटतो आहे. बाळ्याच्या प्रतिमाग्राहकातली जास्त मोठी जवळजवळ ४ मेगाबाईट्सची चित्रे जास्त बरी वाटताहेत.
 कोणार्क सागरतीर

भर दुपारी उन्हाचे चटके खात आम्हा पर्यटकांशिवाय कोण मरायला जाणार म्हणा समुद्रकिनार्‍यावर! त्यापेक्षा बसमधली वातानुकूलित हवाच बरी होती म्हणायची पाळी आली. किनारा पाहून झाल्यावर बस ओरिसा पर्यटन महामंडळाच्या सुरेख खाद्यगृहात गेली. ओरिसात आल्यावर पहिल्यांदा उत्कृष्ट भोजन मिळाले. संबळपूरच्या न्याहारीला तोडीस तोड असे. मी असे उद्गार काढताच बाजूच्या टेबलावरील मराठी कुटुंबाने तात्काळ दुजोरा दिला. बसमधील सर्व मराठी पर्यटकांचे याबाबतीत एकमत झाले. मिठाई सोडली तर नऊ दिवसात एकही ओदिशी शाकाहारी पदार्थ नाव घेण्यासारखा वाटला नाही. तळलेले पापड देखील सपक आणि अळणी. चारआठ मराठी पर्यटक बसमध्ये मौजूद होते. एक वयस्कर जोडपे तिथून कलकत्त्याला जाणार होते. भोजनानंतर बसने जगन्नाथपुरीसाठी प्रस्थान ठेवले.

क्रमशः