एका मराठी चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव

मराठी चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असल्याची बातमी काल सकाळात वाचून फार आनंद झाला. तुम्ही पण वाचा.



"काय द्याचं बोला'ला सुवर्णझळाळी! पुणे, ता. ९ - एक्कावन्न दिवस, शंभर दिवस, रौप्यमहोत्सव अशी वाटचाल करत गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला "काय द्याचं बोला' हा चित्रपट उद्या (ता. १०) पुण्यात पन्नासाव्या आठवड्यात पदार्पण करीत आहे. "सुवर्णमहोत्सव' साजरे करण्याचे भाग्य मराठी चित्रपटाच्या वाट्याला अनेक वर्षांनी येत आहे. .......
गेल्या वर्षी सर्वप्रथम मराठवाड्यात "काय द्याचं बोला' प्रदर्शित झाला होता. तेथे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर पुण्यामध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित झाला. निखळ विनोदी कथा, त्याला मिळालेला अस्सल ग्रामीण भाषेचा साज आणि मकरंद अनासपुरेचा सहज अभिनय, यामुळे अल्पावधीतच चित्ररसिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.

अनेक वर्षांनी सुवर्णमहोत्सवी टप्पा पार करण्यात यश आल्याचे समाधान आहेच, असे सांगून या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, ""मराठीत एखाद्या चित्रपटाची संकल्पना आवडली, तर त्याला नेहमीच प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद लाभतो, यावर "काय द्याचं बोला'मुळे शिक्कामोर्तबच झाले आहे. चकचकीतपणा किंवा उच्च तांत्रिक मूल्ये, या सर्वांपेक्षाही चांगला आशय चित्रपटात असल्याने प्रेक्षकांनी त्याला उचलून धरले. कोणत्याही एका भागासाठी चित्रपट न बनविता शहर, तालुका आणि खेडे येथील प्रेक्षकांचा "लसावि'काढून बनविला, तर तो यशस्वी होतो, हेच यातून अधोरेखित होते.''

मराठी चित्रपटांना अलीकडे जे काही आर्थिक यश लाभते आहे, त्यामध्ये पुणेकर चित्ररसिकांचाही मोठा वाटा आहे, असेही श्री. कुलकर्णी यांनी नमूद केले.

सुरवातीला चित्रपट शंभर दिवस चालेल का, अशी भीती वाटत होती; पण आजवर मिळालेले यश अपेक्षेपलीकडील आहे, असे निर्माते डॉ. उदय ताम्हनकर यांनी सांगितले. ते म्हणाले, ""सर्व कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल, अशी निखळ करमणूक असल्याने या चित्रपटाला "रिपीट' प्रेक्षकही मिळाला. पुणेकर प्रेक्षकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चित्रपटाचे आर्थिक गणितही अडचणीचे ठरले नाही.''

""नायक म्हणून मिळालेल्या पहिल्याच चित्रपटाला सुवर्णमहोत्सवी यश लाभले ही सर्वांत आनंदाची गोष्ट आहे. मुंबईमध्ये बारा वर्षे केलेली तपश्‍चर्या फळाला आली,'' असे या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या मकरंद अनासपुरे याने सांगितले.

तपश्‍चर्या फळाला आली - मकरंद अनासपुरे
चांगल्या आशयामुळे प्रतिसाद - चंद्रकांत कुलकर्णी
पुणेकरांमुळे आर्थिक गणित जमले - उदय ताम्हनकर







  • हा चित्रपट तुम्ही पाहिला आहे का?

  • ह्यापूर्वी सुवर्णमहोत्सव, रौप्यमहोत्सवापर्यंत पोहोचणारे सर्वात अलीकडचे मराठी चित्रपट कोणते?

  • आतापर्यंत सर्वात जास्त सलगपणे चाललेला मराठी चित्रपट कोणता.

  • सुवर्णमहोत्सव किंवा त्याहीपुढे जाणारे मराठी चित्रपट सांगाल का?

  • त्यातले तुम्ही (स्वतः चित्रपटगृहात जाऊन) कोठले पाहिलेत?

  • शहर, तालुका आणि खेडे येथील प्रेक्षकांचा "लसावि'काढून बनविला, तर तो यशस्वी होतो ...  हे तुम्हाला पटते का?

  • मराठी चित्रपटांना अलीकडे जे काही आर्थिक यश लाभते आहे, त्यामध्ये पुणेकर चित्ररसिकांचाही मोठा वाटा आहे ... ह्याचा अर्थ काय?