खारोळ्या (अर्थात खाद्य चारोळ्या)

चवीनं खाणारं कुणी असेल,
तर बनवण्याला अर्थ आहे..
कुणाचंच पोट तृप्त करणार नसेल,
तर पुरणपोळी सुद्धा व्यर्थ आहे..


               इथे प्रत्येकजण महिला मंडळात,
               व फ्रोझनफूडने फ्रिझ पॅकबंद आहे,
               तरीही पाककृतींवर बोलणं
               हा प्रत्येकीचा आवडता छंद आहे..


तू समोर असलास कि
नुसतंच तुला जेवू घालणं होतं,
आणि तू जवळ नसताना 
कसंबसं घास गिळणं होतं..


               स्वयंपाकघर दोघांचं असतं,
               ते दोघांनी सावरायचं..
               एकानं खाणं बनवलं,
               तर दुसर्‍यानं भांडं धुवायचं..


चमचमीत खाणं वजा केल्यावर
बाकी काही उरत नाही..
चटपटीत खाण्याशिवाय मी किचन
किचनच धरत नाही..


               रिसेप्शनला जाऊन माणसं
               हॉटेलात गेल्यासारखी वागतात,
               छोटासा आहेर देऊन,
               लगेच बुफेला रांगा लावतात..


'रसमलाई' या शब्दात 
केवढी मिठास आहे
नुसता उच्चारला तरी 
जिभेवर घोळल्याचा भास आहे..


               कुणीतरी लागतं 
               आपल्याला 'खादाड' म्हणणारं..
               खादाड म्हणताना
               आपल्या आवडीनिवडी जपणारं.. 


आपली(खाद्यप्रेमी)अनु


(मनोगतीनो, सहज गंमत म्हणून केलेल्या या चारोळ्या बरं का..या चारोळ्यात व्यक्त केलेल्या विचारांशी/तत्वज्ञानाशी मी सहमत आहे अथवा ती माझी जीवनपद्धती आहे असे अजिबात नाही.)