समुद्री सफर

नव्वदीच्या दशकाची सुरुवात होती. दुसऱ्या सहस्त्रकाच्या शेवटच्या शतकाच्या शेवटच्या दशकाची सुरुवात होती असेही म्हणता येईल. काय हवे ते म्हणा.

माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या लोकांना 'वलय' प्राप्त व्हायचे होते. 'वलय' सोडाच, त्यांना 'मध्यमवर्गीय' हा त्या काळातला सर्वोच्च किताब प्राप्त होणेही जेमतेम जमत होते. लोकांना ही 'कांपुटर' म्हणजे काय भानगड आहे हे उमगतच नसे.

फारसे आर्थिक पाठबळ नसताना स्वत:चे असे काही सुरू करण्याची उद्योजकता दाखवणाऱ्या कंप्यूटरवाल्या लोकांना मध्यमवर्गात प्रवेश दुष्प्राप्य होता. संगणकशास्त्रातील पदवी घेतल्यावर नावापुरती दोन वर्षे नोकरी करून मित्रवर्यांनी व्यवसाय सुरू केला होता. अभ्यासक्रमात मित्रवर्यांचा सहाध्यायी असूनही मी त्यात मोडत नव्हतो, कारण नोकरी वा स्वतःचा व्यवसाय दोन्ही व्यवहार्य गोष्टी ऑप्शनला टाकून बेभरवशी अशा क्षेत्रात उडी घातली होती. त्याबद्दल सविस्तर नंतर केव्हातरी.

मित्रवर्य चतुर, धोरणी वा चाणाक्ष नसतील, पण अभ्यासू आणि मेहनती उद्योजक होते. व्यवसायाला लागणारे कर्ज मागायचे असेल तर प्रॉजेक्ट रिपोर्ट नामक किचकट प्रकरण अदबशीरपणे बँक मॅनेजरला सादर करायला लागण्याचे ते दिवस. फोनवर 'कुणी लोन घेता का लोन' अशी याचना दिवसातून चार वेळा कानी पडणे ही तेव्हा भरपेट दारू पिऊन मग गांजा ठासलेल्या व्यक्तीच्याही कल्पनेबाहेरची गोष्ट होती.  या मित्रवर्यांनी तो प्रॉजेक्ट रिपोर्ट इतक्या तपशीलात जाऊन सादर केला होता, की सिंडिकेट बँकेच्या रास्ता पेठ ब्रँचच्या मॅनेजरने "हा प्रॉजेक्ट रिपोर्ट समजावून सांगणार नसशील तर नक्की कर्ज देईन" अशी खुल्ली ऑफर दिली (आणि ती प्रत्यक्षात आणली).

एव्हाना मी मित्रवर्यांबरोबर उमेदीची आणि जडणघडणीची अशी साताठ वर्षे काढलेली असल्याने व्यवसाय बदलूनही मी त्यांच्या आंतरवर्तुळात होतो. किंबहुना, मी त्या वर्तुळात एकटाच होतो. कर्ज मंजूर झाले याचा आनंद आम्ही 'ब्ल्यू नाईल' मध्ये जाऊन साजरा केला (त्याआधी तीर्थ मिळाले नाही. मित्रवर्य चहा-गणक होते).

त्यालाही दोन-तीन वर्षे लोटली. व्यवसाय म्हणावा तसा वेग घेईना. कर्ज फिटत होते खरे, पण ते केवळ मित्रवर्य एका महाविद्यालयात ज्ञानदानाचे पवित्र कार्य पार पाडत होते त्याच्या मजुरीतून. बँकेच्या कर्जातून घेतलेली चार मशीन्स घरी (घर आणि ऑफिस एकच होते; बेडरूम म्हणजे घर, हॉल म्हणजे ऑफिस. किचन आणि बाथरूम म्हणजे सामायिक मालमत्ता) कर्जाची आठवण करून द्यायला तत्पर होती.

ही मशीन्स तरी कशी?  आजच्या पिढीला अजिबात कल्पनाही करता येणार नाही. 80386/80486 नामक DOS based ऑपरेटिंग सिस्टीम हाकलत मित्रवर्यांचा कारभार चाले. पेंटियम हे नाव अजून कळायचे होते. डीबेस, फॉक्सप्रो, कोबोल, फोरट्रान अशा (आता जवळपास विस्मृतीत गेलेल्या) नावांची चलती होती.

'व्यवसायाची गाडी रुळावर आणण्यासाठी काय करावे?' या प्रश्नावर एक शिखर परिषद कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी आयोजित करावी असे मित्रवर्यांचे मत पडले. दिवाळीच्या जरा आधीचे ते दिवस होते. शिखर परिषदेत सहभागी होणार कोण तर आम्ही दोघेच.

निसर्गरम्य ठिकाण कुठले याबद्दल खल सुरू झाला. वेळ (आणि मुख्य म्हणजे पैसा) वाचवण्याच्या दृष्टीने मी हनुमान टेकडी, वेताळ टेकडी, तळजाई अशी ठिकाणे सुचवायला घेतली. यातले एखादे ठिकाण आणि मग नेहरू स्टेडियममध्ये असलेल्या 'सारस' रेस्टॉरंट (आणि बार!) मध्ये श्रमपरिहार असा माझा बेत होता. 'सारस'चे व्यवस्थापन तेव्हा 'गोवा पोर्तुगीजा'वाल्या अवचट दांपत्याकडे होते.  बाहेर ऑक्टोबर हीट अधिराज्य गाजवीत असताना तिथे बसून नेहरू स्टेडियमचे भव्य पटांगण पाहत थंडगार बियर पिण्याचे सुख काही औरच होते. पटांगणावर मॅच चालू नसेल तर अर्थात. मॅच चालू असली तर मात्र जन्ता तिथे झुंबड उडवी.

पण मित्रवर्यांनी दोन हरकती घेतल्या. ते स्वतः चहा-गणक असल्याने (बियरवाले) 'सारस' उडाले. आणि मुख्य म्हणजे मी कोंकणस्थी कद्रूपणाने पैसा वाचवण्याचा केलेला प्रयत्न सातारकर देशमुख असलेल्या मित्रवर्यांना अजिबात पसंत पडला नाही. "कुटंतरी नीट भाएर जायचं बगा की" असे ते दरडावले. त्यांना माल्टा, कँप डेव्हिड, ताष्कंद, किंवा गेलाबाजार उटी, सिमला असे काहीतरी अपेक्षित होते बहुधा. पण असल्या ठिकाणी स्वतःहून जाण्याइतके पैसे असते तर मग शिखर परिषदेचे प्रयोजनच उरले नसते.

मग मी कोंकणात जाण्याचा विचार मांडला. त्याआधी सुमारे सहा-सात वर्षं मी दर उन्हाळ्या-दिवाळीत कोंकणात स्कूटरने जाण्याचा प्रघात ठेवला होता. पण ते जाणे बहुधा घरी, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात असे. वरच्या बाजूला रायगड जिल्ह्यात मी फारसा फिरलो नव्हतो. पेण, अलिबाग, कर्नाळा, माणगाव असे केले होते चारदोन वेळेस, पण तेवढेच. त्यामुळे मी वरती श्रीवर्धनला जाण्याचा बेत धरला. मित्रवर्य खूष झाले. स्कूटरने इतक्या लांबचा प्रवास करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. त्याआधी मी एकदा त्यांना सांगली-मिरज दौऱ्यावर घेऊन गेलो होतो तेवढाच.

तेव्हा ताम्हिणीचा घाट व्हायला बरीच वर्षे बाकी होती. त्यामुळे भोर (वरंधा) मार्गे जाण्याला पर्याय नव्हता. स्कूटरवरून गावोगाव भटकण्याचा चांगलाच अनुभव तोवर गाठीशी जमला होता, त्यामुळे डिकीत कुठले आणि किती सामान मावते, पेट्रोल कधी आणि किती भरावे, स्कूटरच्या डागडुजीसाठी कोणकोणती हत्यारे जवळ असावीत हे आडाखे पक्के बसले होते. त्यानुसार सामानाची बांधाबांध केली आणि सकाळी प्रस्थान ठेवले. भोरचा रस्ता तसा एकेरीच. त्यामुळे निवांतपणे डकांव डकांव करीत चाललो होतो. घाटमाथ्यावर लाल धुळीने माखलेल्या एका बसक्या घरात कँटीन होते. तिथे 'कट-वडा' नामक ज्वलज्जहाल पदार्थ मिळत असे.

इथे मित्रवर्यांबद्दल थोडेसे - जरी ते साताऱ्याचे देशमुख असले तरी त्यांची वर्तणूक अगदीच मिळमिळीत होती. खुद्द त्यांच्या पिताजींचे लाडके मत होते की मी आणि मित्रवर्य जन्मतःच आमची अदलाबदल झाली. माझा जन्मही साताऱ्याचाच असल्याने 'असे घडले असू शकेल' असे म्हणायला आम्हांला (मी अन देशमुख सीनीयर) आवडले असते, पण माझ्या आणि मित्रवर्यांच्या वयात दीड वर्षाचे अंतर होते (मी बारावीला 'ड्रॉप' घेतला होता) ही अडचण होती. थोडक्यात म्हणजे मित्रवर्य खानदानी मराठा कुटुंबाला, आणि मी पारंपारिक कोंकणस्थ ब्राह्मण कुटुंबाला, केवळ कुलकलंक होतो. मित्रवर्य मद्यपान-धूम्रपान करणे सोडाच, मांसाहार तेवढा कसाबसा, नाईलाजाने सटीसहामाशी करीत. आणि त्यातही 'तेलकट, तिखट, मसालेदार नको' असा त्यांचा कुळबुडवा हेका असे. दहीभात, दूधभात, ताकभात, लिंबाचे लोणचे असल्या भटी पदार्थांवर त्यांचा (तोळामासा) पिंड पोसला होता.

तर 'कट-वडा' या मिश्रणाचा रंग पाहूनच सूर्यकांतने शरणागती पत्करली आणि पार्ले बिस्किटांचा एक पुडा चहात बुडवून न्याहारी उरकली. मी मात्र कट-वडा, त्यावर लालेलाल चहा आणि एक विल्स किंग अशी सुरेख मैफल जमवली. परत स्कूटरला लाथ घालून निघालो.

घाट उतरल्यावर शिवथरघळीचा फाटा गेला. गोवा-मुंबई हमरस्त्याला लागलो. पाचाड फाट्याचा मोह टाळून माणगावच्या दिशेने कूच केले. वाटेत एक खाणावळसदृश इमारत दिसली. तिथे जेवायला थांबलो.  बांगडा अगदी फडफडीत होता.

माणगावच्या आधीच गोरेगावमधून डावीकडे म्हसळा फाट्यावर वळलो. म्हसळा बाजारातला रस्ता चांगलाच अरुंद नि चढणीचा होता. त्या परिसरात गेल्यावर आंबेतची आठवण न येणे अवघड होते. अंतुले, आंबेत, वडखळ नाका या विषयांवरचे माझे सामान्य-ज्ञान दाखवून सूर्यकांतला गार केले.

श्रीवर्धनला पोचल्यावर आधी डाकबंगल्याची चौकशी केली, पण कुणीतरी साहेबलोक आलेले होते. मग गावात जाऊन लॉज शोधले. त्यातला एक सूर्यकांतला पसंत पडला. त्याच्या तळमजल्यावरच देशी (का होईना) दारूचे दुकान होते त्यामुळे मलाही पसंत पडला.

त्या अंधाऱ्या खोलीतल्या खाटांवर जरा पडल्यासारखे केले नि परत बाहेर पडलो. श्रीवर्धन बंदराकडे स्कूटर वळवली. संध्याकाळ होऊ घातली होती. मच्छीमारी करून परतणाऱ्या बोटींतला माल होडक्यांमधून (बंदर उथळ आहे; बोटी दूर उभ्या राहतात, माल होडक्यांतून येतो) धक्क्याला पोहोचत होता. त्या सुवासाने माझी भूक परत खवळली. सूर्यकांतशेठ 'चिंता करितो धंद्याची' असा मग्न चेहरा करून हिंडत होते.

अचानक त्याला काहीतरी सुचले. "समुद्रात मासेमारी करायला जाणाऱ्या बोटीतून आत जाऊया. भर समुद्रात आपण मग आपली चर्चा करू".

उत्साहावर पाणी ओतायला मला खरे तर आवडत नाही, पण इथे नाईलाज होता. "अरे राजा, पुण्याहून साताऱ्याला जाताना कात्रज आणि खंबाटकी ओलांडताना तुला बस लागते. भर समुद्रात तुझं काय होईल? "

आता सूर्यकांतचा शाण्णवकुळी आडमुठेपणा उफाळून आला. "मी avomin घेईन, मी digene घेईन, त्याची काळजी नको. तू आपल्या जाण्याची व्यवस्था कर".

मुकाट्याने मी एक विल्स किंग पेटवली (चौकशी करताना हातात सिगरेट असेल तर कसा रुबाब येतो) आणि धक्क्यावर माल उतरवून घेणाऱ्यांत कुठे पुरुष दिसतो का (जिकडेतिकडे कोळणी) हे पाहत हिंडू लागलो. लाल त्रिकोनी रुमाल कमरेला गुंडाळलेल्या एका पन्नाशीच्या माणसाला मी प्राथमिक चौकशीसाठी जाळ्यात घेतला. त्याने माझ्या सिगरेटच्या धुराकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत माझ्या डाव्या हातापासून फूटभर अंतरावर बाणासारखी एक लालभडक पिचकारी सोडली आणि "उस्कू पूछो" असा द्विशब्दी आदेश दिला.

हा 'उस्कू' म्हणजे कोण हे बघायला गेलो, तर एका होडक्यातून उतरणारा एक अठ्ठावीस-तीस वयाचा तरुण दिसला. त्याच्या चेहऱ्यावर बेफिकीरी, दमणूक आणि आत्मविश्वास यांचे मजेदार मिश्रण थापले होते. होडक्यातून उतरल्या उतरल्या मी त्याला सामोरा गेलो तोच त्याने "अरे उस्मान, सुलेमान, महेबूब, इस्को बांधो रस्सीसे जल्दी" अशी आरोळी ठोकली. मी टरकलो. पण लगेच खुलासा झाला, की 'इस्को' म्हणजे मला नव्हे, तर त्या होडक्याला.

मग त्याने माझ्या प्रस्तावावर क्षणभर विचार केला आणि होकार देऊन टाकला. "रातको इदरिच आव. होरक्यात बसून जावा लागंन आत". माझे भाषिक घ्राणेंद्रिय जागृत झाले. त्याच्या बोलण्याचा लहेजावरून मी थेट "रत्नांगिरीचे काय तुम्ही? " असा सवाल केला. त्याला भरून आले. वास्तविक रत्नागिरी श्रीवर्धन अंतर असेल दीडदोनशे किलोमीटर. पण तेवढ्यात त्याला होम सिक व्हायला झाले. "होय तर, राजिवऱ्यावर घर माजां" तो वदला. मी लगेच आजूबाजूच्या मासळीकडे पाहून "मिऱ्याबंदरावरच्या मासलीची सर नाय हो हिते" असे म्हणून समदभाईबरोबरचे बंध पक्के केले आणि सूर्यकांतपंताना घेऊन परत लॉज गाठले. बोटीचे नाव 'अझर' हे समदने सांगून ठेवले. कशाला कुणास ठाऊक?  तांडेल (कप्तान) समदभाई बरोबर नसता तर आम्ही काय रिक्षा करून जाणार होतो 'अझर'चा पत्ता शोधत?

सोबत काय काय सामान न्यावे याची माफक चर्चा झाली. मित्रवर्यांनी सगळ्या खलाशांना पुरतील एवढ्या avomin आणि digene चा साठा बरोबर घेतला (म्हणजे त्याच्या एकट्यापुरता. Avomin ची गरज पडणारा माणूस खलाशी कसा होईल?). एक पाव घेतला. एक बिस्किटाचा पुडा घेतला. अति आशावादी होता बिचारा.

मी विल्स नेव्हीकटची तीनचार पाकिटे घेतली. अजून काय घ्यावे हे सुचले नाही. मग वेळेत आठवले आणि काडेपेटीही घेतली.

पोट हलके असू द्यावे म्हणून जेवणही माफक केले आणि नऊ वाजता बंदराचा धक्का गाठला. एका डांभावर विजेचा पिवळा दिवा नागडा लटकत होता. त्याचा आणि कंदिलांचा प्रकाश आसमंतातील काही भाग उजळण्याचा क्षीण प्रयत्न करीत होते. या असल्या अंधारात माझा समदभाई दिसणार कसा म्हणून मी चिंतेत होतो. मित्रवर्यांनी thanking you in anticipation म्हणत avomin ची एक गोळी आधीच हाणली होती. त्यामुळे त्यांना यायला लागली पेंग. मग त्या दगडी धक्क्यावर आमच्या बॅगा उशापायथ्याला घेऊन त्यांनी तणावून दिली. मी चकरावत राहिलो. शेवटी एका म्हाताऱ्याला माझी दया आली. त्याने मला 'अझर' च्या मालकीचे होडके दाखवले. त्या होडक्यावर नजर लावून मी सिगरेट फुंकीत बसलो.

अचानक डोळे चोळायची पाळी आली. ते होडके दूर दूर जाते आहे असे भासू लागले. त्यात कुणीच तर नव्हते. डोळे चोळून आणि नवीन सिगरेट पेटवून तिकडे पाहिले तर होडके खरेच हळूहळू दूर जात होते. काय करावे ते सुचेना. मग मन लावून सिगरेटच ओढत बसलो. दोनच मिनिटांत पाण्यात धबाळ्ळ आवाज झाला. कुणीतरी त्या होडक्याकडे पोहत जाताना दिसले. मग पाच मिनिटांनी ओल्याचिंब त्या व्यक्तीने ते होडके परत वल्हवत आणले.

आता त्या होडक्याकडेच नजर लावून बसावे की त्याच्या रक्षणकर्त्याकडे असा माझ्या मनात संदेह उपस्थित झाला. त्यातून वाट निघायच्या आतच नाकात माडीचा भपकारा घुसला आणि समदभाई माझ्या डाव्या खांद्याला घसटून पुढे आले. "भाई, याने होरका परत मिलवलान आपला, तेच्याबरोबर जरा जावंन येतंय" असे म्हणून तो त्या रक्षणकर्त्याला घेऊन परत माडीदुकानाच्या दिशेने नाहीसा झाला. माडीदुकान कुठल्या दिशेला होते हे मला कसे माहीत? मला नाही तर कुणाला माहीत असणार? पोपला की शाही इमामाला?

समदभाई परत येईस्तोवर पार अकरा वाजून गेले होते. माझा विल्स किंगचा स्टॉक संपून नेव्हीकटचे अर्धे पाकिट संपले होते. कंदिलही एकेक करीत नाहीसे झाले होते. त्यामुळे आसमंत एकुलत्या पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात किणीकरांच्या कवितेप्रमाणे सुखद विषण्ण वाटत होते. समदभाई आले चालत, पण त्यांच्या डोक्यावर डोलकाठी असती तर ते गलबतात बसलेयत याबद्दल शंका उरली नसती.

मित्रवर्य एव्हाना गाढ झोपेत होते. बॅगांची हुसकापासक करून त्यांना जागे केले. समदभाईबरोबर बाराचौदा वर्षांचा एक चुणचुणीत मुलगा होता अब्दुल नावाचा. होडके वल्हवण्याचे बरेचसे काम त्याने केले.

किनारा सोडल्यावर काही अंतर मिट्ट अंधारात गेले. मग समुद्रात उभ्या असलेल्या बोटींवरचे कंदिल दृग्गोचर होऊ लागले. होडक्यातून त्या बोटी दोनमजली इमारतीसारख्या भासत होत्या. आणि दोन बोटींत अंतर जेमतेम दोन होडकी राहतील एवढेच होते. होडके वल्हवायचे असल्याने वल्हे मारण्याचा पल्ला धरून ते कसेबसे पुरत होते.

समदभाई "हिते डावीकरे, हिते उजवीकरे" करीत दिग्दर्शन करीत होते. एकदोन बोळकांड्या परत परत आल्यासारख्या वाटल्या. अर्ध्या तासाने अखेर Azhar अशी अक्षरे गोंदवून घेतलेली बोट सामोरी आली. बोटीवर चढायला दोरात गाठवलेली लाकडी सळयांची शिडी होती. वाऱ्याने ती बोटीच्या बाहेरच्या भागाला आपटत होती. जीव मुठीत धरून त्यावर चढलो.

बोटीवर चढल्यावर समदभाईंनी confession दिले. "भाई, पोचलो हां". मला कळले नाही, म्हणून विचारले. तर म्हणतो कसा, "आज चांगलीच जादा पियालेलो, आपला झाज वळखाया गावेना, शेवटी जमलां. तुमचा जेवन झालां? मासलीभात खातांव थोरा? " माझा जेवणसदृश कार्यक्रम सुदैवाने मी उरकून घेतला होता.

समदने अब्दुलला हाताशी धरून डेकच्या पोटातल्या चार फूट खोल, तीन फूट रुंद आणि सहा फूट लांब बिळात रॉकेलचा स्टो पेटवून त्यावर भात शिजवला आणि काही मासे तव्यावर दोन चमचे तेलात तळून घेतले. त्यावर त्याचे जेवण उरकले. वाजून गेलेले साडेबारा. निघायचे होते चारला.

आमची व्यवस्था त्याने इंजीनरूममध्ये केली होती. म्हणजे, इंजीनच्या वरती फळ्या टाकून एक माचल्यासारखी जागा केली होती तिथे. मित्रवर्य लगेच घेतलेल्या avomin ला जागण्याच्या (झोपण्याच्या?) तयारीला लागले आणि यशस्वी झाले. माझ्या पोटात ना होती avomin ना माडी. मला त्या फळ्यांतल्या पिसवांनी आणि ढेकणांनी जेरीस आणले.

पहाटे चार वाजल्यावाजल्या इंजीन सुरू झाले आणि खडखडून जाग आली. डिझेलच्या धुराचा वास कोंदला. उठण्यावाचून गत्यंतर नव्हते.

बाहेर बघतो तर सगळे खलाशी निघायच्या तयारीला लागले होते. आपली त्यात लुडबूड नको म्हणून पडून राहिलो.

पाच वाजेपर्यंत सर्वदूर अंधार होता. दिशा उजळू लागल्या तोवर जमीन दिसेनाशी झाली होती. सूर्योदय होईस्तोवर आम्ही इतके आत गेले होतो की सूर्य आम्हांला पूर्व दिशेच्या अरबी समुद्रातूनच उगवताना दिसला.

मित्रवर्य त्या फळकुटावरच मुरकुंडी मारून पडले होते. मी डेकवर फिरून अंदाज घेतला. बोट फार हलत नव्हती, पण सूर्यकांतला न झेपण्याइतकी निश्चितच हलत होती. बोटीवरचे खलाशी तंगड्या फाकून खेकड्यासारखे फेंगडे चालतात. ती खलाशी चाल मीही आत्मसात केली. आता बोट पुरेशी आत गेलेली होती. सगळ्यांचा कामाचा रेटा सुरू झाला. यांत्रिक जाळे मागे फेकायचे, ते ओढत अर्धा तास हळूहळू फिरायचे. मग ते विंचने ओढून त्यातला माल डेकवर ओतायचा, पापलेट, सुरमई, बांगडे असले विक्रीचे मासे वेगळे करून टोपल्यांत भरून डेकच्या पोटातल्या बर्फामध्ये ठेवायचे, की परत जाळे मागे फेकायचे. जाळे समुद्रात असताना डेकवरचा साकूळ माल परत समुद्रार्पण करायचा, डेक स्वच्छ करून घ्यायचे.

सुकाणूवर अब्दुल आणि समद आलटून पालटून होते. तीनचार खलाशी होते ते सगळे कानडी. त्यांची कुडकूड मधूनमधून वाजत होती. समद त्यांना कोकणी हिंदीतून हाकारत होता, झापत होता, शाबासकी देत होता. मी मधून अधून सिगरेट वाटप करून जमतील तशा गप्पा मारत होतो.

बोट जाळे ओढत असताना त्यांच्यातले काही पाण्यात पोहायला उतरले. पोहायला येत असूनही मला काही त्यात उतरायचा विचारही करायचा धीर झाला नाही. त्यांच्यातल्या एका रांगड्या खेळाची कहाणी समदने सांगितली. एखाद्याला 'बच्चा' या पायरीवरून 'खलाशी' या पायरीवर उडी मारायची असेल तर त्याला बोटीवरून पाण्यात उडी मारून, बोटीखालून जाऊन दुसऱ्या बाजूला निघून दाखवणे भाग असते. आणि एकदाच नव्हे, 'ज्येष्ठ' खलाशांचे समाधान होईस्तोवर म्हणजे तीन चार वेळेससुद्धा. बोटीखालच्या फिरणाऱ्या प्रॉपेलरला चुकवून हे दिव्य करणे म्हणजे..... माझ्या अंगावर काटा आला. माझी शंका विचारल्यावर समदने शर्ट बाजूला करून त्याच्या खांद्यावरचा घाव दाखवला. आणि तो घाव चालू नसलेल्या प्रॉपेलरचा होता. खालून चक्कर मारताना समदचा दम घुटला आणि अवचित तो वर आला तो थेट प्रॉपेलरच्या ब्लेडलाच धडकला. मग चालू असलेल्या प्रॉपेलरमुळे अपघात झाला तर? माझ्या शंकेला समदने उडवून लावले. "असले लार करायचे तर होरीवर यायचाच कशाला? भरल्या बोटीतून उरी मारावी लागली तर काय करनार असला पेद्रू? "

आणि ते जाळे विंचने ओढताना एकदा मीही हातभार लावला आणि दोन मिनिटांत बाजूला झालो. खाऱ्या पाण्याच्या त्या अभिषेकात एवढे वजन पेलत नीट डेकच्या मध्यावर आणणे म्हणजे सोपे नव्हते एवढे कळले. दिवसभर हे करून संध्याकाळी किनाऱ्यावर. आणि रात्री परत मुक्कामाला बोटीवर. समद म्हणाला की आज बर्फ कमी मिळाला म्हणून, नाहीतर ते दोन किंवा तीन दिवस समुद्रावरच राहतात.

थोडक्यात म्हणजे, हेमंतकुमारच्या आवाजात "दर्याचा राजा, घर पान्यावरी बंदराला करतो येजा" कितीही रोमँटिक वाटले तरी प्रत्यक्षात त्या राजाचा चांगलाच बाजा वाजतो.

पण त्या दिवशी दुपारी जेवणाची जी काही चंगळ झाली! कल्पना करा, चार फूट उंचीचा माशांचा ढीग, त्यातून एखादा सरंगा नाहीतर सुरमई उचलावा, जरा उलटासुलटा करून न्याहाळावा, मग उगाचच नाक मुरडून पलिकडे टाकावा आणि नवीन मासा उचलावा. पसंतीस आला की अब्दुलच्या ताब्यात द्यावा. तो त्याला बदनामीपुरते मीठ तिखट लावून तव्यावर तळून ताटलीत काढी.  तव्यावरच जरा आमसुलाचे पाणी टाकून रटरटवले की रस्सा तयार. त्याबरोबर लाल तांदळाचा गोळाभात. पण त्या दिवशी मी भात अगदी फणसाच्या दोन गऱ्यांइतका खाल्ला असेल जेमतेम. बाकी मत्स्योत्सव!

दुपार उलटल्यानंतर त्यांचे काम थोडे मंदावले - संपत आले होते म्हणून. मग उरलेल्या सिगरेटी घेऊन समदभाईबरोबर जरा सुखदुःखाच्या  गोष्टी केल्या. "भाई, म्होरल्या येलंला दोन दिवस कारून या. मंग जरा रातच्याला 'बसू' निवांत" या त्याच्या आमंत्रणाला उत्साहाने होकार दिला. "समदभाई, तुमी व्होरका पियालात कदी? " याला नकार आल्यावर मी म्होरच्या येलंला व्होरकाची बाटली आणायचे कबूल केले.

मित्रवर्यांनी एव्हाना दोन पावाचे स्लाईस, दोन ग्लुकोजची बिस्कीटे आणि दोन avomin असे भरपेट दुहेरी जेवण केले होते. धरलेले अंथरूण मात्र त्यांनी सोडले नव्हते.

अरबी समुद्रातून झालेला सूर्योदय पाहून दिवस सुरू झाला होता. तो अरबी समुद्रातला सूर्यास्त पाहून संपला. पण तेव्हाना आम्ही जमिनीवर पोहोचलो होतो त्यामुळे मित्रवर्यांना सूर्यास्त तरी बघता आला. शिखर परिषदेतली चर्चा मात्र नंतर पुण्याला परतल्यावरच झाली.

परत आल्यापासून "केव्हातरी पुन्हा एकदा जायला हवे" असे मनाशी घोकत बसतो. पुन्हा जाता आले नाही तरी त्या विचारानेच थोडे बरे वाटते.

अब्दुल स्वतः तांडेल झाला असेल आता...