मंत्रपुष्पांजली...१

मंत्रपुष्पांजली ही सर्रास म्हटली जाणारी एक प्रार्थना आहे. त्यातील पहिली ऋचा ही पुरुषसूक्तांतर्गत येणारी सोळावी ऋचा आहे.

यज्ञेन यज्ञम यजंत देवाः तानी धर्माणी प्रथमान्यासन । तेहनाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संती देवाः॥

- प्रजापती आदी देवांनी त्या (मानस) यज्ञकर्मानुष्ठानाने यज्ञरूपी परमात्म्याचे पूजन केले आणि त्या पूजनामुळे ती जगदाधार कर्मे मुख्य झाली. ज्या ठिकाणी पुरातन साध्य देव राहातात, तो स्वर्ग यज्ञेश्वराची याप्रमाणे उपासना करणाऱ्यास प्राप्त होतो. (ऋग रत्न भांडार-रा. गो. कोलंगडे)

यापुढील मंत्र म्हणजे ज्या देवाचे पूजन केलेले असते, त्या देवाला केलेली प्रार्थना आहे. त्याद्वारे संपन्नता मागितली आहे. कोणताही यज्ञ सांग करण्यासाठी धनाची, सामुग्रीची आवश्यकता असते. अशी संपन्नता लाभावी, यासाठी ही प्रार्थना आहे. यात उल्लेख केलेल्या साम्राज्य, भौज्य, स्वाराज्य, वैराज्य, पारमेष्ठ्य राज्य, महाराज्य आदी पदांचा विचार पं. सातवळेकर यांच्या 'ऋषियों के राज्यशासन का आदर्श' या वैदिक व्याख्यान मालेत पाहावयास मिळाला. तो आपण थोडक्यात पाहू...

पश्चिमेला असुरांचे राज्य होते. असिरियाचे असुर, दान्यूब नदीच्या तीरावरील दानव, बॅट्रियाचे बक वगैरे राज्ये हजारो वर्षांपूर्वी होती. हे सारे रक्षक होते, तोपर्यंत त्यांना राक्षस म्हणत. ते पूर्वदेव. पुढे सत्तेच्या मदाने त्यांनी प्रजेची छळणूक सुरू केली, तेव्हा त्यांना दुष्ट (दोषग्रस्त) म्हणू लागले. त्यांचे दमन करणे शक्य झाले नाही, तेव्हा विस्थापित प्रजाजन पूर्वेकडे सरकले. त्रिविष्टप भूमीत अशा विस्थापितांचे जे गण वसले, त्यांना सुर संज्ञा प्राप्त झाली. ते आधुनिक किंवा साध्य देव झाले.

दुष्ट वा दैत्य जे होते, त्यांचे गुरू शुक्राचार्य होते तर सुर गणांचे गुरू बृहस्पती. हे दोघेही ब्राह्मण होते. त्यामुळे पृथ्वीवर सत्ता राबविण्याची विचारधारा ब्राह्मणांच्या हातात होती. म्हणून ते पृथ्वीचे नेते होते.

'मीच खरा' असा हट्ट जेव्हा सुरू होतो, तेव्हा झगडा, भांडण व पर्यायाने युद्ध होते. 'त्वां जना ममसत्येषू इंद्र संतस्था विह्व्यंते समीके' (ऋ. १०. ४२. ४) या मंत्रातून ध्वनित होणारा अर्थ तसाच असून सत्यरक्षणात साहाय्यासाठी इंद्राला आवाहन या मंत्रातून केलेले आहे. वारंवार होणाऱ्या झगड्यातून मार्ग काढण्यासाठी साऱ्या पृथ्वीवर, जिच्या मर्यादा समुद्रापर्यंत आहेत, एकच सत्ता असावी, असा विचार ऋषिंनी मांडला.

त्या काळी जे वेगवेगळे राज्य-प्रकार होते, त्यांचा उल्लेख मंत्रपुष्पांजलीच्या मंत्रात पाहावयास मिळतो.

१) साम्राज्य : अनेक छोट्या मोठ्या राज्यांचा एकच सामर्थ्यवान अधिपती असलेली व्यवस्था. यासाठी अश्वमेध यज्ञ केला जाई.
घोड्याच्या मस्तकावर एक आदेशवजा पत्र असे. तो घोडा ज्या ज्या प्रदेशातून जाई, त्या त्या देशाच्या राजाला जर त्या सम्राटाचा आदेश मान्य असेल, तर त्याचे अधिपत्य मान्य करे. जे अमान्य करीत, त्यांना युद्धाला तोंड द्यावे लागे. यात मोठी मनुष्यहानी होई. अशी मनुष्यहानी न होता सामर्थ्यशाली शासन पृथ्वीवर असावे, अशी ऋषींची इच्छा होती.

क्रमशः