सोन्याची साखळी-१

एक होता राजा. त्याला दोन राण्या होत्या; परंतु दोघींनाही मूलबाळ नव्हते. आपल्या राज्याला पुढे वारस कोण, असा विचार मनात येऊन राजा दु:खी होई. कशाला हे राज्य, कशासाठी ही धनदौलत, ही कोणाच्या स्वाधीन करू, असे विचार सारखे त्याच्या मनी घोळत. राजेच दु:ख पाहून राण्याही दु:खी होत.
एके दिवशी कोणी तरी एके बोवा आला होता. एक राणी तेथे होती. राणी रडत होती. बोवाजी म्हणाला, 'राणी, राणी तुझ्या डोळ्यांत का पाणी ? राजाची राणी असून दु:खी का ? दासदासी पदरी असून दु:खी का ? रथ, घोडे, हत्ती असून दु:खी का ? तुम्हाला काय कमी ? तुम्हाला कसला तोटा ? तुम्हासारख्या श्रीमंतांनी रडावे मग गरीबांनी काय करावे ? देवाने तुम्हाला भाग्य दिले, राज्य दिले. रडू नका, रुसू नका, सुखाने नांदा'.
डोळ्यांत पाणी आणून राणी म्हणाली, 'शेतात पीक नाही तर शेताला शोभा नाही; तळ्यात कमळ नाही तर तळ्याला शोभा नाही; आकाशात चंद्र नाही तर आकाशाला शोभा नाही; झाडाला फळ नाही तर झाडाला शोभा नाही; शिंपल्यात मोती नाही तर शिंपल्याला शोभा नाही. महाराज, जिला पुत्र नाही, त्या स्त्रीच्या जगण्यात काय अर्थ ? मला 'आई' अशी हाक कोण मारील ? पुत्रवती जी आहे तीच खरी सुखी, तीच भाग्याची, तीच दैवाची. देवाने सारे दिले परंतु हे दिले नाही; देवाने सोने दिले परंतु सोनुकला दिला नाही. मी रडू नको तर काय करू ? राजाचे दु:ख पाहून मला प्राण नको असे वाटते. तुम्ही तरी कृपा करा, मला मुलगा द्या.'
बोवाजीस दया आली. तो म्हणाला, 'माझ्या कृपेने तुम्हाला पुत्र होईल; परंतु दुसरी राणी त्या मुलाचा द्वेष करील. त्याला मारू पाहील. म्हणून मी एक युक्ती करतो. तुमच्या मुलाचे प्राण तुमच्या या राजधानीत जे मोठे तळे आहे, त्या तळ्यात जो एक सोन्यासारखा मासा आहे त्याच्या पोटात ठेवतो. त्या माशाच्या पोटात मी एके सोन्याची साखळी ठेवीन. ती जोपर्यंत तेथे आहे तोपर्यंत तुमच्या मुलाचे प्राण सुरक्षित राहतील.'

राणीला वर देऊन तो बोवाजी निघून गेला. पुढे काही दिवस गेले. राणीला मुलगा झाला. नवानवसाचा मुलगा. कोण आनंद, कोण उत्सव ! मोठमोठ्या श्रीमंतांच्या बायका राणीला बाळंतविडा घेऊन आल्या. बाळ कसा नक्षत्रासारखा होता. ही राणी राजाची आवडती राणी झाली. राजा दुसऱ्या राणीचे तोंड देखील पाहीना. ती राणी या राणीचा हेवा करू लागली., हिच्या मुलास पाण्यात पाहू लागली. त्या गोड मुलाला पाहून साऱ्यांना आनंद होई, परंतु त्या सावत्र आईचा संताप होई. सावत्र आई कधी त्याला मारी, कधी रडवी. 
राजपुत्र दिवसेंदिवस वाढत होता. तो आता पाचसहा वर्षांचा झाला. बाहेर हिंडे, फिरे, खेळे. तो सर्वांचा आवडता होता. सर्वांना हवासा वाटे. त्याला गर्व नव्हता. तो कोणाशी भांडत नसे. साऱ्यांशी खेळे. दिसायला गोड व गुणांनी गोड. बाहेर गोरापान होता. तसाच मनाचा निर्मळ होता. आनंदात दिवस जात होते. राजपुत्राला कबुतरे फार आवडत. त्याने सुंदर कबुतरे पाळली होती. एक दिवस त्याचे आवडीचे कबुतर उडाले, ते थेट सावत्र आईच्या घरात शिरले. राजपुत्र रडत तेथे गेला. तो म्हणाला, 'माझे कबुतर दे.' ती सावत्र आई म्हणाली, 'देत नाही जा. तुझी कबुतरे माझ्या घरात कशाला शिरतात ? मारून टाकते त्याला. तुमचे होतात खेळ, परंतु आम्हाला त्रास. घरात कबुतरे येतात, हगतात, घाण करतात.  जा, नीघ येथून.' राजपुत्र रडू लागला. शेवटी त्या सावत्र आईने ते कबुतर दिले. राजपुत्र आनंदला व हसत गेला.
परंतु रोज आपले असे व्हावयाचे. ते कबुतर त्या सावत्र आईच्या घरात नेमके उडून जायचे. राजपुत्र तिची मनधरणी करावयाचा व मग ते मिळावयाचे. एके दिवशी ती सावत्र राणी काही केल्या कबुतर देईना. राजपुत्र म्हणाला, 'तू सांगशील ते मी करीन, परंतु माझे कबुतर दे.' सावत्र आई म्हणाली, 'तुझ्या आईला तू तुझा प्राण कशात आहे ते विचार. ती जे सांगेल, ते मला येऊन सांग. कबूल कर, म्हणजे कबुतर देते. राजपुत्राने कबूल केले.

कबुतर घेऊन राजपुत्र गेला. तो खेळात दंग झाला. दिलेले वचन विसरला. दुसरा दिवस उजाडला. पुन्हा ते कबुतर गेले. सावत्र आईजवळ राजपुत्र रडत आला. ती रागाने म्हणाली, 'देत नाही. मेल्या, तू खोटारडा आहेस. दिलेले वचन पाळीत नाहीस, दिलेले शब्द मानीत नाहीस. हो चालता येथून.' राजपुत्र गयावया करू लागला. 'आईला आज विचारतो व तुला येऊन सांगतो. एरवी जेवणार नाही. विद्येची शपथ.' असे तो म्हणाला. सावत्र आईने कबुतर दिले.
राजपुत्र कबुतर घेऊन आपल्या आईजवळ आला. आईने त्याचा मुका घेतला. त्याच्या सुंदर केसांवरून हात फिरवला. त्याच्या तोंडावरचा घाम तिने पदराने पुसला. बाळ आईला म्हणाला, 'आई, माझा प्राण कशात आहे ते मला सांग. तू सांगितले नाहीस तर मी जेवणार नाही. मला खरे सांग. खोटे कधी सांगू नये.' राणी म्हणाली,'बाळ, हे वेड कोणी शिकविले ? कोणी तुला विचारावयास सांगितले ? असल्या गोष्टी विचारू नये. तू खावे, खेळावे, सुखाने नांदावे.' राजपुत्र ऐकेना. तो हट्ट धरून बसला व रडू लागला. शेवटी राणीच्याने राहवेना. ती म्हणाली, 'ऐक, रडू नको. रडूनरडून डोळे सुजले. किती बरे रडशील ! ऐक; परंतु दुसऱ्या कोणास सांगू नकोस. आपल्या गावात जे मोठे तळे आहे, त्यात जो सोन्यासारखा एक मासा आहे, त्या माशाच्या पोटात एक सोन्याची साखळी आहे. त्या साखळीत तुझे प्राण आहेत. जा, आता खेळ, कुणास सांगू नकोस.'
राजपुत्र बाहेर गेला. तो सावत्र आईकडे आला. त्याच्या मनात शंका नव्हती. लहान मुलाला शंका नसते. त्याचे मन निर्मळ असते, जसे गंगेचे पाणी. लहान मुलांचा सर्वांवर विश्वास असतो. राजपुत्राने आईने जे सांगितले, ते सावत्र आईस सांगितले व खेळावयास निघून गेला. 

त्या सावत्र आईने गावातील एका कोळ्याला बोलावले. ती त्या कोळ्याला म्हणाली, 'रात्रीच्या वेळी त्या तळ्यावर जा. त्या तळ्यातील मासे पकड. त्या माश्यांत एक सोनेरी रंगाचा मासा आहे, तो पकडून घेऊन ये.'
बाहेर रात्र झाली. सारी सृष्टी झोपली. घुबडे जागी होती. आणि तो कोळी जागा होता. त्याने आपले भले मोठे जाळे टाकले होते. जाळे टाकी व थोड्या वेळाने ओढी. किती तरी मासे त्याने मारले. परंतु सोनेरी मासा दिसेना. आता शेवटचे एक वेळ जाळे टाकू असे म्हणून त्याने जाळे फेकले व ओढले. एकच मासा त्यात आला होता व तो चमकला. कोळ्याला आनंद झाला. सोन्यासारखा मासा त्याने पिशवीत घातला. केव्हा उजाडते याची तो वाट पाहू लागला.
सकाळ झाली. सुर्यनारायण वर आला. फुले फुलली. तळ्यातून कमळे माना वर करून सूर्यास पाहून हसू लागली; परंतु राजपुत्र आज अजून उठला नाही. त्याचे तोंड हसले नाही. त्याची आई त्याला पाहावयास गेली. बिछान्याजवळ जाऊन राणी म्हणाली, 'ऊठ बेटा, किती उजाडले. तो बघ चौघडा वाजत आहे. मंदिरात आरती होत आहे. ऊठ राजा. आज तोंड सुकलेले का ? रात्री नीज नाही का आली ? मी नेहमी म्हणते, माझ्या कुशीत नीज. आईच्या कुशीतच बाळाला खरी झोप येते. बरे नाही का वाटत ?'
राजपुत्राला बरे वाटत नव्हते. त्याचे प्राण कासावीस होत होते. जीव व्याकुळ झाला होता. जिकडेतिकडे एकच हाक झाली. राजा आला. राजपुत्राच्या बिछान्याशेजारी सारी बसली. हकीम, वैद्य सारे जमले. मोठमोठे धन्वंतरी आले, नाडी पाहू लागले, लक्षणे पाहू लागले. कोणालाही परीक्षा होईना. सर्वांची तोंडे सुकून गेली. 'आई, आई' असे राजपुत्र म्हणे व तळमळे; त्या वेळेस सर्वांच्या डोळ्यांना टचकन पाणी येई.
इकडे तो कोळी सावत्र आईकडे आला. त्याने तो मासा तिला दिला. ती राक्षसीण आनंदली. त्या कोळ्याला तिने गळ्यातील मोत्यांचा हार दिला. कोळी मनात म्हणाला, 'एक रात्रभर उजागरा केला, शंभरदा जाळे फेकले, दमलो, परंतु जन्माचे दारिद्र्य गेले. घरची ददात गेली, माझी मुलेबाळे सुखाने खातील'.    

कोळी निघून गेला. राणीने हातात सुरी घेतली. इकडे राजपुत्राचे प्राण फारच कासावीस होऊ लागले. 'वाचवा हो माझ्या बाळाला ! कोणी तरी वाचवा हो !' असा हंबरडा त्याची आई फोडू लागली.
सावत्र आईने तो मासा चिरला. त्या माशाच्या पोटात सोन्याची साखळी होती. ती काढून तिने आपल्या गळ्यात घातली. तिने ती गळ्यात घालताच इकडे राजपुत्राचे प्राण निघून गेले. आईच्या मांडीवर तो मरून पडला. तेथील शोक काय वर्णावा, किती सांगावा? आईचा पुत्रशोक आईलाच ठाऊक. दुसऱ्याला त्याचे कल्पना कोठून येणार ?
राजपुत्राच्या शरीराला अग्नी देणार इतक्यात प्रधानाचा मुलगा तेथे आला. त्याचे राजपुत्रावर फार प्रेम होते. तो राजाला म्हणाला, 'हा देह जाळू नका. हा मला द्या. मला नाही म्हणू नका'. राजा म्हणाला,' जशी तुझी इच्छा. घेऊन जा हा देह.' सारी मंडळी घरी गेली. प्रधानाच्या मुलाने तो देह पालखीत घालून घरी नेला. पुढे त्याने काय केले ? गावाबाहेर त्याच्या मालकीची एक मोठी बाग होती. त्या बागेत बरोबर मध्यावर त्याने एक सुंदर इमारत लगेच बांधविली. एका दिवसात ती इमारत तयार झाली. त्या इमारतीत एक सुंदर पलंग ठेवण्यात आला व त्या पलंगावर त्याने राजपुत्राचा मृत देह ठेवून दिला.
रात्रीची वेळ झाली. सावत्र राणीला फार आनंद झाला होता. त्या आनंदात तिला झोप येईना. गळ्यातील ती माळ खुपत होती. तिने ती सोन्याची साखळी गळ्यातून काढताच तिकडे बागेत तो राजपुत्र जिवंत झाला. तो जिवंत होऊन पाहतो तो आजूबाजूस कोणी नाही. तो बागेत हिंडला शेवाटी दमून त्या पलंगावर जाऊन निजला. रोज आपले असे व्हायचे. रात्री राजपुत्र जिवंत व्हायचा व दिवसा मरून पडायचा. जणू रात्री जागा असे व दिवसा झोपत असे.

प्रधानाचा मुलगा एक दिवस सकाळी बागेत गेला. तो त्या इमारतीत शिरला. राजपुत्र एका कुशीवर झोपल्यासारखा पडला होता. राजपुत्राचे तोंड टवटवीत दिसत होते. देह सडला नाही, कुजला नाही.; घाण सुटली नाही. प्रधानाच्या मुलास आश्चर्य वाटले. रात्री येऊन पाहावे असे त्याने ठरविले.
रात्र झाली. बाहेर सुंदर चांदणे पडले होते. सावत्र राणी झोपली होती. तिने गळ्यातील साखळी काढून ठेवली. इकडे राजपुत्र जागा झाला. खावयास न मिळाल्याने तो अशक्त झाला होता. अंथरुणातच तो पडला होता व विचार करीत होता इतक्यात प्रधानाचा मुलगा तेथे आला. त्याला पाहताच तो उठून बसला. मित्र मित्राला भेटला. क्षणभर दोघांना बोलवेना, हृदये भरून आली होती. दोघांना गहिवर आला होता. राजपुत्र म्हणाला, 'मी रोज रात्री जागा होतो; परंतु उजाडते कधी ते समजतच नाही. मी दिवसा मरून पडतो व रात्री जिवंत असतो.' प्रधानाचा मुलगा आश्चर्य करू लागला, परंतु तो आपल्या मित्रास म्हणाला, 'आधी ही फळे आणली आहेत, ती तर खा. रोज तुला मी रात्री खावयास घेऊन येईन. तू काळजी करू नकोस. हे कोडे काय ते उलगडलेच पाहिजे.' दोघे मित्र बागेत हिंडले, फिरले. शेवटी येऊन दोघे निजले. बाहेर उजाडले. पाखरांच्या किलबिलीने प्रधानाचा मुलगा जागा झाला. परंतु त्याचा मित्र तेथेच मरून पडला होता.
प्रधानाचा मुलगा रोज रात्री तेथे खावयास घेऊन येई. कधी तेथेच झोपे. कधी घरी जाई. कधी गावाला जावयाचे असले म्हणजे तो दोनचार दिवसांना पुरेल इतके खाणे तेथे कपाटात ठेवून जाई. असे चालले होते.

एके दिवशी दूर एका रस्त्याने एक गरीब बाई चालली होती. ती म्हातारी होते. तिच्याबरोबर तिची मुलगी होती. मुलगी मोठी देखणी होती. आपल्या म्हाताऱ्या आईला तिचा हात धरून ती नेत होती. इतक्यात कोणी तरी एक विचित्र प्राणी त्यांना दिसला. म्हातारी त्या प्राण्याला म्हणाली, 'तू कोण ? आमच्याबरोबर तू का येतोस ? तुझी आम्हांस भीती वाटते.' तो प्राणी म्हणाला, 'मी तुझ्या मुलीचे नशीब. मी तिच्याबरोबर नाही जाणार, तर कोणाच्या ? तू बुढ्ढी झालीस. तुझ्या नशिबाचे सारे खेळ संपले. आत मुलीच्या नशिबाचे खेळ सुरू होतील.'
ती म्हातारी म्हणाली, 'माझ्या मुलीच्या नशिबी काय आहे ? कशी सोन्यासारखी पोर आहे; परंतु आम्ही पडलो गरीब. राजाला राणी शोभेल अशी आहे माझी मुलगी; परंतु काय तिच्या नशिबी आहे कोणास कळे ? माझ्यासारख्या भिकारणीच्या पोटी तिने जन्म घेतला, म्हणून हे हाल. तिचे पाय फुलाहून कोवळे आहेत, प्राजक्ताच्या फुलाहून नाजुक आहेत; परंतु अनवाणी चालावे लागते. ते पाहा तिचे पाय सोलून निघाले आहेत.' तो प्राणी म्हणाला, 'म्हाताऱ्ये, उगीच ऐट कशाला सांगतेस ? तुझ्या मुलीचे नशीब वाईट आहे. तिचे प्रेताजवळ लग्न लागणार आहे !'
ते शब्द ऐकून म्हातारी धाडकन खाली पडली. तो प्राणी दिसेनासा झाला. ती मुलगी धीराची होती. तिने पळसाच्या पानांचा द्रोण करून पाणी आणले. आईच्या डोळ्यांना लावले. झाडाच्या पानांनी ती वारा घालितं बसली. म्हातारीने डोळे उघडले. ' पोरी, कसे गं तुझे होणार ? असा गं कसा देव !' असे म्हणून म्हातारी लहान मुलाप्रमाणे रडू लागली. ती शहाणी मुलगी आईला धीर देऊन म्हणाली, 'आई, ऊठ. देव करतो ते सारे बऱ्यासाठी. त्याचा हेतू चांगलाच असतो. तो विष देवो. अमृत देवो; पाऊस देवो, ऊन देवो; सर्व आपल्या कल्याणासाठीच असते. देवाच्या दयेबद्दल शंका का घ्यावी ? ती बघ झाडे हालतं आहेत, तुला वारा घालितं आहेत. देवाचे हातच जणू तुला विंझणे वारीत आहेत. ऊठ आई.'

आईचा हात धरून ती धीराची मुलगी चालू लागली. होत होता सायंकाळ झाली. राजाची राजधानी दिसत होती. आईचा हात धरून मुलगी चालत होती. आता अंधार पडला. आईला तहान लागली होती. आता रात्री पाणी कोठे मिळणार ? कोठे शोधणार ? परंतु फुलांचा वास येत होता. जवळपास बाग असावी असे त्या मुलीला वाटले. ती आईला म्हणाली, ' आई, तू येथे बैस. कोठे तरी जवळच बाग असावी. फुलांचा वास येत आहे. रातराणीचा, निशिगंधाचा, प्राजक्ताच्या कळ्यांचा वास येत आहे.' असे म्हणून ती मुलगी पाणी शोधावयास निघाली.
************************
भाग २ सोबत जोडला आहे.

लेखक : साने गुरुजी
कॉपीराइट्स : केशव भिकाजी ढवळे.