जाई-२

जाईच्या कानांवर या गोष्टी गेल्या. रामजीला न कळत ती मोहनच्या बायकोकडे मदत पाठवी. कधी दूध, कधी फळे, कधी काही ती पाठवू लागली. मोहन मरणाच्या दारात होता. त्याला भेटण्यासाठी जाईचा जीव तडफडत होता; परंतु ती जाऊ शकली नाही. तिची व मोहनची भेट ह्या जगात जणू पुन्हा व्हावयाची नव्हती. मोहन मरण पावला ! 
****************

गजरीच्या दु:खाला अंतपार राहिला नाही. तिला कोणाचा आधार ? माहेरचे मायेचे तिला कोणी नव्हते आणि सासर असून नसल्यासारखे. आपल्या चिमण्या बाळाला जवळ घेऊन ती रडत बसे; परंतु गरीबाला रडण्याला तरी कोठे पुरेसा वेळ आहे ? गरीब मनुष्य काम करील तेव्हा खाईल ! परंतु गजरी कामाला तरी कशी जाणार ? लहान मुलाला कोठे ठेवणार ? त्याला पाठीशी बांधून कामावर गेली असती, परंतु बाळाच्या जिवाला बरेवाईट होईल असे तिला वाटे.
मोहनच्या मरणाची बातमी रामजीला कळली. जाईला कळली. जाई रडरड रडली. एके दिवशी तिने काहीतरी निश्चय केला. रामजीला न सांगता ती गजरीकडे आली. गजरी मुलाला घेऊन बसली होती. जाई म्हणाली, 'वैनी, आपण दोघी एकत्र राहू. दोघी मिळून ह्या बाळाला वाढवू. कधी तू कामाला जा, कधी मी जाईन.'
गजरी म्हणाली, 'तुम्ही आपला सुखाचा जीव दु:खात का घालता ? मामंजी तुम्हाला पुन्हा घरात घेणार नाहीत. आम्ही दु:खात आहोत तेवढं पुरे. होईल कसं तरी आमचं. नाही तर ते गेले तिकडे बाळ व मी जाऊ.' जाईच्या डोळ्यांना पाणी आले. ती केविलवाणी होऊन काकुळतीने म्हणाली, 'वैनी ! नको ग अशी कठोर होऊ. ह्या झोपडीत माझं समाधान आहे. ही गरिबी मला प्रिय आहे. मी सुखात का तिथं होते ? वैनी ! माझ्या मनाची स्थिती कोणाला माहीत ? मी दुर्दैवी आहे. जन्मल्यावर थोड्याच दिवसांत माझे बाबा दूर गेले व मेले. माझी आई मला सोडून गेली. मी ह्यांच्या घरात आले तर इथं पिता-पुत्रांची ताटातूट माझ्यामुळंच झाली. ह्यामुळंच मोहन श्रम करून लवकर मेला. माझा हा पायगुण. मी या साऱ्याला कारण ! जन्मताच आईनं माझ्या गळ्याला नख का लावलं नाही ? देवानं मला जिवंत तरी का ठेवलं ? मला काहीच समजत नाही. मला सुख नको, संपत्ती नको; मला ऐषआराम नको; मला गरिबीतच राहू दे. तुझ्याजवळच राहू दे. तू मला नाही म्हणू नकोस.'

शेवटी जाई व गजरी एके ठिकाणी राहू लागल्या. लहानगा बाळ वाढू लागला. एके दिवशी जाईच्या मनात विचार आला की, 'म्हातारा रामजी ह्या बाळाला नाही का घेणार ? मोहनच्या मरणाने रामजीने वरती दाखविले नाही तरी आतून तो दु:खाने भाजून निघाला होता. मोहनला त्याने घरात घेतले नाही, परंतु या बाळाचा काय आहे अपराध / ह्या बाळाची का आबाळ व्हावी ? रामजी ह्या बाळाला आनंदाने घेईल, नातवाला खेळवील, वाढवील, प्राणपणाने जपेल. बाळाला मग दुधा - तुपाला वाण पडणार नाही, कपड्यालत्त्याला कमी पडणार नाही.'
जाईने आपल्या मनातील विचार गजरीजवळ बोलून दाखविले. हो ना करता करता गजरी कबूल झाली. आपला मुलगा दारिद्र्याच्या गारठ्यात कुडकुडावा असे कोणत्या मातेस वाटेल ? दारिद्र्यामुळेच मोहन लवकर मेला. हा बाळ तरी शतायुषी होवो असे गजरीला वाटले असेल. ती जाईला म्हणाली, 'मामंजी निग्रही व करारी आहेत. ते बाळाला घेणार नाहीत. तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर करून पाहा. तुम्हाला प्रचीती येईल. माझी ना नाही.'
जाईला आनंद झाला. रब्बीच्या पिकाचा हंगाम होता. गहू तयार झाला होता. शेते सोन्यासारखी पिवळी दिसत होती. रामजीची शेते अपरंपार पीक घेऊन उभी होती. रामजीचा मोहन मरून गेला, परंतु पीक सोळा आणे आले. शेते अशी कधी पिकली नव्हती.
रामजीच्या शेतात कापणी सुरू झालेली होती. खसाखसा विळे चालले होते. कापणारे गाणी म्हणत होते. रामजी एका झाडाखाली बसला होता. देखरेख करावयास, काम करून घ्यावयास तो स्वत: जातीने हजर असे. काम जोरात चालले होते.

जाईने मोहनचा बाळ बरोबर घेतला व ती निघाली. प्रेमळ जाईचा बाळाला फार लळा लागला होता. प्रेम मुलांनाही समजते. रामजीच्या दृष्टीला बाळ पडेल अशी काहीतरी योजना करण्याचे जाईच्या मनात होते. ती शेतावर निघाली. ती एका बांधावर बाळाला घेऊन बसली. लहान झाडाची तेथे सावली होती. बाळ देखणा होता, मोहक होता. त्याला अधिक मनोहर व मोहक करण्यासाठी जाईने फुलांनी त्याला नटविले. तो बाळ जणू बाळकृष्णाचीच रमणीय मूर्ती आहे असे वाटत होते. जाई त्याच्याकडे पाही व पटकन त्याला पोटाशी धरी, त्याला चुंबी. 'घेतील, बाबा ह्या बाळाला घेतील. त्याच्या कुळातीलच हा मोत्याचा दाणा आहे. त्यांच्या वंशाचेच बीज. किती सुंदर दिसतो आहे ! ह्याला कोण घेणार नाही ? कोण कौतुक करणार नाही ? कोण कुरवाळणार नाही ? ह्या बाळाच्या पायाला बोचू नये म्हणून काटे बोथट होती, दगडाची फुले होती. मग बाबा का विरघळणार नाहीत ? त्यांचे हृदयही बाळाला पाहून मऊ लोण्यासारखे होईल.' अशा आशेने जाई त्या बांधावर  बसली होती. कामकऱ्यांनी जाईला पाहिले परंतु रामजीला सांगण्याचे त्यांना धैर्य झाले नाही. म्हाताऱ्याचा राग त्यांना माहीत होता. जाई बस बस बसली. शेवटी सांजावले. कामकरी निघून गेले. सूर्य निघून गेला. देव मावळला व अंधार पडला. जाईचा आशासूर्यही मावळला व तिच्या हृदयात अंधार भरला.
दुसऱ्या दिवशी जाई पुन्हा त्या बाळाला घेऊन बांधावर बसली. कापणारे कापत होते. पक्षी गात होते. जाई बाळाला फुलांनी मढवत होती. तो पाहा रामजी शेते पाहतं येत आहे. जाईच्या मनात आशा जागी झाली. धावत जावे असे तिला वाटले; परंतु आला, रामजीच जवळ आला.

रामजीने रागाने जाईकडे पाहिले व तो म्हणाला, 'तू शेवटी त्या घरी गेलीस. तूही त्याच्यासारखीच मर. काढ उपास, कर उन्हात काम. तुमच्या नशिबीच नाही, त्याला कोण काय करणार ? सुखाचा घास नाही तुमच्या दैवी. मरा सारी उपासमारीनं व मला म्हाताऱ्याला मात्र खायला जिवंत ठेवा !'
म्हाताऱ्याच्या बोलण्यातील दु:ख व निराशा जाई समजू शकत होती. ती म्हणाली, 'बाबा ! तुमचं घर मला बंद झालं हे खरं; परंतु ह्या बाळाला ते का बंद व्हावं ? ह्या लहानग्याचा काय अपराध ? या मोहनच्या मुलाला तुम्ही नाही का जवळ घेणार, नाही का नीट वागवणार ? या बाळाची आबाळ का व्हावी ? याला घ्या, तुमच्या घरी न्या. त्याला गरम कपडे करा, त्याला गाईचं दूध पाजा. या बाळाची उपासमार न होवो म्हणजे झालं. हा तुमचाच आहे. तुम्हीच लावलेल्या, वाढवलेल्या झाडाचं हे फळ आहे.'
रामजी ऐकत होता. त्या मुलाकडे तो पाहतं होता. त्याने जरासे तोंड का तिकडे फिरविले ? कापणारे कापीत आहेत की नाहीत हे का तो बघत होता ? त्याने डोळ्यांवरून हात का फिरविला ? घाम का त्याने पुसला ? पुन्हा जाईकडे तो वळला. तो बोलेना. त्याच्याने बोलवत का नव्हते ? का बोलण्याची त्याची इच्छा नव्हती ?
बाबा ! घेता ना या बाळाला ! घ्या, घ्या, घ्या -' जाई दगडालाही पाझर फुटेल अशा स्वरात म्हणाली.
रामजीचे ओठ हालले. म्हातारा बोलू लागला; परंतु त्याच्याने फार बोलवले नाही. 'दे!' एवढेच तो बोलला. त्याने आपले हात पुढे केले. जाईच्या तोंडावर कृतज्ञतेची कोवळीक होती. तिने बाळ बाबांच्या हातात दिला; परंतु बाळ म्हाताऱ्याजवळ जाईना. तो जाईचा पदर सोडीना. बाळ रडू लागला. त्याच्या डोक्यावरचे हार खाली पडले; परंतु शेवटी जाईने बाळाच्या त्या चिमुकल्या घट्ट मुठी सोडवल्या व ती दूर झाली. रडणाऱ्या मुलाला 'उगी उगी - तो बघ काऊ, ती बघ चिऊ, उगी हां - ही बघ फुलं - रडू नको असा !' अशा शब्दांनी उगी करीत रामजी निघून गेला.

देव मावळला. सांजावले. कामकरी निघून गेले. विळे थांबले. अंधकार पडू लागला. त्या बांधावर जाई तेथेच बसली होती. बाळाच्या डोक्यावरची पडलेली फुले तिच्या हातात होती. ती रडत होती. स्वत:चे सारे जीवन तिला आठवले. रामजीने तिचे किती लाड केले, कसे कौतुक केले, ते सारे डोळ्यांसमोर आली. त्याचे हाल, त्याचे मरण. सारे प्रसंग समोर उभे होते. 'मी दुर्दैवी आहे. खरंच दुर्दैवी. अशा दुर्दैवी माणसांना जन्माला घालण्यात प्रभूचा काय बरे हेतू असावा ? परंतु आज बाबांनी बाळ नेला, एवढं तरी सुदैव माझं होतं, एवढं तरी पदरी सुकृत होतं म्हणायचं' असे म्हणत ती उठली व आपल्या झोपडी कडे निघाली. गजरी कामावरून आली होती. पाण्याची घागर तिने भरून आणली व चूल पेटवून ती भाकर भाजीत होई. तो जाई आली. जाईला पाहून गजरी म्हणाली, 'बाळ नाही तो ?'
'वैनी, बाबांनी नेला हो बाळ. बरं झालं. बाळ सुखात राहिलं. त्याला थंडी बाधणार नाही, उपास पडणार नाहीत. आपण दोघी कशाही राहू.'
जाईचे शब्द ऐकून गजरी आनंदली नाही. गजरीचा दु:खी चेहरा पाहून जाईला बरे वाटले नाही. तिने बऱ्यासाठी केले होते; परंतु बाळाच्या आईला ते पसंत का नव्हते ? मातृहृदय जाईने कसे ओळखावे ? तो धन्य अनुभव, पावन व थोर अनुभव माता होऊनच घ्यावा लागतो. जाई माता नव्हती. ह्या जन्मी तरी मी माता होणार नव्हती. अप्रत्यक्ष माता होण्याचे तिचे प्रयत्न होते; परंतु अशा प्रयत्नांनी - दुसऱ्यांची मुले वाढविण्याच्या प्रयत्नांनी- खऱ्या मातेचा अनुभव कसा येणार ?

गजरी खिन्न म्हणून जाईही खिन्न झाली. कोणी कोणाशी बोलले नाही. भाकरीचा तुकडा खाऊन दोघी घोंगडीवर पडल्या; परंतु डोळा एकीचाही लागेना. पहाटेचा - प्रहरभर रात्र उरली तेव्हाचा - कोंबडा आरवला. गजरी जाईला म्हणाली, 'आपण बाळ परत आणू. माझा बाळ मामंजींच्या जवळ नको. मी रात्रभर विचार करीत आहे. शेवटी हाच निश्चय मी केला. बाळ परत आणायचा. आपण दोघीजणी जाऊ. तू माझ्याबरोबर ये.' जाई काय बोलणार ? मातेच्या इच्छेपुढे ती काय बोलणार ? परंतु खरे सांगावयाचे तर बाळ तिकडे गेल्यापासून जाईलाही हुरहूर लागल्यासारखे वाटत होते. काहीतरी चुकल्यासारखे तिला वाटत होते. तिने फार आढेवेढे घेतले नाही, वादविवाद केला नाही. सकाळ केव्हा होते ह्याची दोघीजणी वाट बघत होत्या. झोप येईना. म्हणून जाते घालून दोघींनी दळले. लहान मुलांवरच्या गोडगोड ओव्या दोघीजणींनी म्हटल्या.

"मांडीवरला बाळ कशी करी दूर माय
प्राण कसा तो ठेवील वासरा ग वीण गाय ॥
तान्हुला ग माझा बाळ नको त्याची ताटातूट
जाग जाई झणी ऊठ त्याची माझी करी भेट ॥"

अशा ओव्या गजरी म्हणत होती. त्या कविता, त्या ओव्या ती स्वत:च रचून  का म्हणत होती ? तिच्या हृदयाची का ती हाक होती ? तिच्या हृदयाची का ती भूक होती ? तिच्या भावनांनी का तिला स्फूर्ती दिली, वाचा दिली ?

बाहेर चांगलेच उजाडले. गडी माणसे कामावर जाऊ लागली. सूर्यनारायण सर्वांना हाका मारू लागला; सर्वांना हालववू-नाचवू लागला, हसवू-खेळवू लागला, फुलवू-फळवू लागला. जाई व गजरी दोघी निघाल्या. रामजी आरामखुर्चीत बसून बाळाला खेळवीत होता. गोड द्यावे व मुलाला घ्यावे, गोड बोलावे व मुलाला घ्यावे. गुळाला मुंगी, मधाला माशी, तशी गोडाला मुले. म्हातारा गोड-गोड बोलत होता -
'काऊ काऊ, चिऊ चिऊ इघे इथे बस, चारा खा, दाणा खा, पाणी पी आणि बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन उडून जा.'
असे रामजी म्हणत होता. मुलाला त्याने गोडशी वडी दिली होई. बाळ वडी चघळीत होता. रामजीच्या गुंड्यांजवळ खेळत होता. गजरी व जाई दारात उभ्या होत्या. दार लोटण्याचे धैर्य कोणासच होईना. शेवटी जाई पुढे झाली. गजरीने दार लोटले. दोघी न विचारता आत शिरल्या. म्हातारा चकितच झाला.
गजरीने बोलायला आरंभ केला. ती म्हणाली, - 'मामंजी ! माझा मुलगा परत न्यावयास मी आल्ये आहे. तो तुमच्याकडे नको. तो तुमच्याजवळ तुमच्यासारखाच कठोर होईल, दृष्ट होईल. आई-बापाची आठवण तो विसरेल. आई-बापाविरुद्ध वाटेल ते त्याच्या मनात तुम्ही भरवाल. तो स्वत:च्या आई-बापाचा अपमान करावयास लागेल. छे. नकोच ते. द्या माझा बाळ. तो गरिबीत राहून मेला तरी चालेल; परंतु श्रीमतींत वाढून फत्तर व्हावयास नको. त्याचं मन गरिबीत कोवळं राहील, प्रेमळ राहील. तो पित्याच्या स्मृती पुण्य मानील. आईला प्रेम देईल. माझा बाळ दीन-दरिद्री झाला तरी चालेल, परंतु मनानं तो श्रीमंत होऊ दे. द्या, खरंच द्या. त्याला नेण्यासाठी मी आले आहे.'

गजरीचा एकेक शब्द सुरीप्रमाणे म्हाताऱ्याचे काळीज चिरून जात होता. तो पहाड पाझरला. तो पाषाण विरघळला. म्हातारा एकदम उठला. जाईला व गजरीला त्याने पोटाशी धरले व रडत म्हणाला, 'पोरींनो ! नका माझा अंत पाहू. नका मला छळू. माझं हृदय किती जळतं आहे, तुम्हाला कसं दाखवू ? परंतु खोट्या अभिमानाला मी बळी पडलो. माझ्या अहंकारानं, हट्टानं मी माझा गुणी मुलगा गमवून बसलो. पुत्रघातकी आहे मी. तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका. ह्या घरात राहा. ह्या बाळाला तुम्हीच वाढवा. इथं नांदा. मोहनच्या मरणानं आपण सारी जोडली गेलो. मोहन मेला व माझा अहंकारही मेला. प्राणांचं मोल देऊन माझ्या मुलानं मला पवित्र केलं आहे. प्रेमळ, कोमल, निर्मळ केलं आहे. मुलींनो, रडू नका. झालं गेलं विसरा व म्हाताऱ्याला क्षमा करा. मी अपराधी आहे.' असे म्हणून तो पहाड खरोखर त्या मुलींचे पाय धरण्यासाठी वाकला.
'हे काय भलतंच - आम्हीच तुमच्या पायांवर डोकं ठेवायचं. तुम्ही प्रेमाचे मंगल आशीर्वाद द्या म्हणजे झालं.' असे म्हणून गजरीने म्हाताऱ्याच्या पायांवर डोके ठेवले. तिने बाळ आजोबांच्या पायांवर घातला.
ती सारी आनंदाने एकत्र राहू लागली. जाईने लग्न केले नाही. म्हातारा त्या बाबतीत कधी काही बोलला नाही. गजरी त्या बाबतीत बोलली नाही. तो फार गंभीर, नाजूक, पवित्र प्रश्न होता. त्या बाबतीत बोलणे म्हणजे अपवित्रपणा होता. एखादे वेळेस मोहनची सर्वांस आठवण येते. व सर्वांना रडू येते; परंतु हसरा व खेळकर बाळ त्यांचे अश्रू ताबडतोब दूर करतो. मोठा जादूगार आहे तो. 

इटकुली मिटकुली गोष्ट ऐकणारांचे अभीष्ट.

लेखक:  साने गुरुजी
************************
कॉपीराईटस:
केशव भिकाजी ढवळे.