पाखराची गोष्ट : भाग २

पाखराला जणू ती वाणी समजली. ते उडाले. पुन्हा एकदा येऊन, खंडूसमोर जरा नाचून, त्याच्या डोक्यावर घिरट्या घालून ते गेले. खंडू पाहतं होता. पूर्वेकडच्या बाजूला ते उडाले. ते दमले. एका झाडावर ते बसले. पिंजऱ्यात बसून त्याच्या पंखांची शक्ती कमी झाली होती; परंतु ते पाहा पुन्हा उडाले. निळ्या निळ्या आकाशातून उडत चालले. खंडू पाहतं होता. ते पाखरू दिसेनासे झाले. खंडू पुन्हा काम करू लागला.

काही दिवस गेले. काही महिने गेले. एके दिवशी खंडू शेतावर न जाता, पूर्वेकडच्या बनाकडे वळला. ते पाखरू दृष्टीस पडावे, पुन्हा एकदा भेटावे म्हणून त्याचा जीव आसावला होता. ते पाखरू म्हणजे त्याच्या पंचप्राणातील जणू एक प्राण बनले होते.
तो चालला बनातून. झाडांकडे तो पाहतं होता. पाखरांकडे तो पाहतं होता; परंतु ते पाखरू त्याला कोठे दिसेना.
खंडू निराश न होता चालला पुढे आणि तो खळखळ वाहणारा झरा आला. कसे स्वच्छ स्फटिकासारखे पाणी ! जणू वनदेवता त्यात आपले तोंड पाही. वनदेवतेचा जणू तो आरसा. रानातील पशुपक्षांचा जणू तो आरसा !
खंडू त्या झऱ्यातले पाणी प्यायला. त्याच्या काठाने तो पुढे चालला. तिरावर ओलाव्याने रानफुले फुलली होती. ना रंगांची फुले. पांढरी, पिवळी, निळी, लाल, नाना छटांची, नाना आकारांची. काही चिवटीबावटीही होती आणि ती पाहा फुलपाखरे नाचत आहेत. या फुलावरून त्या फुलाकडे जात आहेत. ती फुलपाखरे फुलांचे संदेश पोहचवीत होती. फुलांचे टपालवाले जणू. का ती फुलपाखरे म्हणजे छोटे पतंग होते ? बिनदोरीचे पतंग; परंतु कोण उडवीत होते त्यांना ?

खंडू ती सारी मौज पाहतं होता; परंतु तेथे तो थांबला नाही. त्याचे लक्ष फुलांकडे नव्हते. फुलपाखरांकडे नव्हते. झऱ्याकडे नव्हते. ते आपले पाखरू केव्हा कोठे भेटेल असे त्याला झाले होते.
ती पाहा वेळूची बने आली. कळकीची बने, उंचच उंच. जणू उंच वाढलेले रसहीन ऊसच. वारा त्या बनांतून खेळत होता. गोड आवाज येत होता. ते वेळू म्हणजे निसर्गाचे का वेणू होते ?
'येथेच असेल ते पाखरू' खंडू म्हणाला. तो चौफेर पाहतं होता. तेथे एका शिलाखंडावर बसला. दुपार होत आली. पाखरे घरट्यात चालली. जरा विश्रांती घ्यायला, पिलांना घास द्यायला ती घरट्यात आली. झाडांवर मंजुळ किलबिल होत होती.
अरे, ते पाहा खंडूचे पाखरू. ते पाहा जात आहे. खंडूने शीळ वाजवली, टाळी वाजवली.
'पाखरा ये ये. हा बघ खंडू आला आहे. दमलास का म्हण. ये' पाखराने ते शब्द ओळखले. ते पाखरू खंडूजवळ आले. ते नाचले. ते गाऊ लागले.
'अरे तुझी जीभ तुटली ना होती ? गाणे कसे गातोस ? आवाज कसा काढतोस ?' खंडूने विचारले.
'माझी वाणी परत आली. इतकेच नव्हे, तर मला माणसांसारखे सारे बोलता येते. आकार पाखराचा, परंतु तुमच्यासारखे सारे बोलतो. खंडू, तुला पाहून मला खूपच आनंद होत आहे. तू माझ्यावर प्रेम केलेस. आज माझ्या घरी तू आला आहेस. माझा पाहुणचार घे. त्या वेळूच्या बनात आमचे मोठे घरटे आहे. माझी मुलेबाळे तेथे आहेत. बायको तेथे आहे. त्या सर्वांना मी घेऊन येतो. तुझे दर्शन होईल त्यांना. तुझ्या कितीतरी गोष्टी त्यांना मी सांगत असतो. बस हो येथे. जाऊ नको.'
असे म्हणून ते पाखरू उडाले. ते आपल्या घरट्यात गेले. पिले चिव चिव करीत त्याच्याभोवती आली. बायकोने त्याचे स्वागत केले.

'बाबा, बाबा, आज का उशीर केलात ? आम्हाला भूक लागली.' पिले म्हणाली.
'खरेच, कोठे गेले होतेत आज लांब फिरत ?' बायकोने विचारले.
'रोजच्यासारखा वेळेवर मी येत होतो; परंतु माझा तो मानव मित्र आज येथे आला आहे. त्या झाडाखाली बसला आहे. त्याच्याजवळ मी बोलत होतो. म्हणून मला उशीर झाला. चला. तुम्हाला मी तो दाखवतो. माझ्यावर त्याचे किती प्रेम. मला शोधीत शोधीत तो आला. आज आधी त्याला जेवण. चला सारी. करू त्याचे स्वागत. येता ना ?' पाखराने विचारले.
'हो बाबा चला' पिले म्हणाली.
'चला. मीही त्याला पाहीन.' बायको म्हणाली.
ते पाखरू निघाले. बरोबर पिले होती. पत्नीही आली. सारी त्या खंडूजवळ आली. पिले नाचू लागली. पत्नीने प्रणाम केला.
'ही माझी पत्नी, ही माझी पिले.' पाखरू म्हणाले.
'वा ! आनंदी आहे तुझे कुटुंब' खंडू म्हणाला.
'माझी पत्नी गोड बोलते, मी घरी येताच माझे स्वागत करते. पिले माझ्याभोवती नाचतात. मी त्यांना गोड गाणी शिकवतो. म्हणा रे गाणी. बाळांनो, सोनुकल्यांनो, म्हणा गाणी. खंडूचे स्वागत करा.' पाखराने सांगितले.
पिले गाऊ लागली. मानवी वाणी असलेल्या त्या पाखरानेच ती गाणी रचली होती. सुंदर अर्थाची गाणी. काय होता त्यांत अर्थ ?

'जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत. आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत. देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत. हे निळे निळे अनंत आकाश. ते नेहमी तुमच्यावरच पाखर घालील. तारे तुम्हाला रमवतील. नद्या पाणी देतील. वारे गाणी गातील. फुले सुगंध व सौंदर्य देतील. वृक्षलतावेली तुमच्यासमोर डोलतील, नाचतील. फार दु:ख नका करू. कोणी शिव्याशाप दिले तरी वाईट नका वाटून घेऊ. या निसर्गाकडे पाहा व आनंदी राहा.'
'आनंद आनंद ! हृदयात आनंद असला म्हणजे मन कसे हलके होते ! ते मग चिखलात न पडता उंच उंच उडते. देवाजवळ जाते. हसा व देवाजवळ जा. आनंदी व्हा व प्रभूजवळ जा.'
'दु:ख ? होय. दु:ख आहे; परंतु ते का आहे ? आपणच ते निर्मितो व मग रडतो. चला, दु:ख दूर करू. सर्वांजवळ गोड बोलू. सारे मिळून खाऊ, सारे मिळून राहू. भांडण नको, मत्सर नको. आपल्यासारखेच सारे सुगंध सर्वांना द्या. झाडे आपली फळे देतात. मेघ आपले पाणी देतात. फुले आपला सुगंध देतात. सूर्य प्रकाश देतो. आपणही देऊ. सारे सुखी राहू. म्हणजे मग आनंद होईल !'
अशी ती गाणी होती. एक गाणे तर फारच छान :
'नाचा, नाचा, नाचा. वाऱ्यावर नाचा. प्रकाशकिरणांवर नाचा. लाटांवर नाचा. डोंगरावर नाचा. भावनांवर नाचा. आनंदावर नाचा. सारी सृष्टी नाचत आहे. पृथ्वी सूर्याभोवती नाचते. चंद्र पृथ्वीभोवती नाचतो. नाच, विराट नाच. नाचा, नाचा.'

'कशी आहेत गाणी ?' पाखराने विचारले.
'छान आहेत. आमच्यामध्ये अशी नाहीत आणि तुझी पिले म्हणतातही छान.' खंडू म्हणाला.
'बाळांनो, जा. पळसाची ताजी पाने आणा आणि गोड गोड फळे घेऊन या. खंडूला भूक लागली असेल. जा.' पाखरू म्हणाले.
पिलांनी पळसाची पाने आणली. बायकोने चोचीत धरून रसाळ फळे आणली. पेरू होते. अंजीर होते. पिस्ते होते. रानातील नाना प्रकारचे मेवे होते. त्या पानांवर फळे वाढण्यात आली.
'खंडू, कर फलाहार. पोटभर खा.' पाखरू म्हणाले.
खंडू फळे खाऊ लागला. त्याने त्या पिलांना 'घ्या' म्हटले.
ती म्हणाली, 'नको, मग आम्ही खाऊ.'
'अरे, तुम्ही लहान. घ्या हो.' खंडू म्हणाला.
'घ्या हो.' पाखरू म्हणाले.
पिलांनी पाहुण्यांचा प्रसाद घेतला. फलाहार झाला.

'आता मी जातो. तुला सुखात पाहून मला सुख झाले. मधून मधून येत जाईन.' खंडू म्हणाला.
'जरा थांबा. तुम्हाला एक देणगी देतो. आम्हाला कधी कधी गवताच्या विणलेल्या सुंदर सुबक अशा पेट्या सापडतात; परंतु आम्ही त्या कधी उघडीत नाही. काही जड असतात. काही हलक्या. जा रे बाळांनो. आणा दोन पेट्या. एक हलकी आणा, एक जड आणा.' पाखराने सांगितले.
ती पिले गेली. ती दोन पेट्या घेऊन आली.
'घ्या. हवी असेल ती घ्या.' पाखरू म्हणाले. खंडूने दोन्ही पेट्या हातात घेऊन पाहिल्या. त्याने हलकी पेटी पसंत केली.
'ही हलकीच नेतो. थोडेच बरे. अधिक कशाला ? ही जड पेटी ठेवा.' खंडू म्हणाला.
'त्या पेट्यांतून काय असते ते आम्हांस माहीत नाही. आम्ही त्या उघडीत नाही. आम्हाला फार सोस नाही, हव्यास नाही.' पाखराची बायको म्हणाली.
'बरे येतो, नमस्कार.' खंडू म्हणाला.
'येत जा, आम्हाला भेटत जा.' ती सर्वजण म्हणाली. खंडू ती पेटी घेऊन निघाला. पाखरू थोड्या अंतरापर्यंत त्याला पोचवीत आले.
'जा हो पाखरा, तुम्ही अद्याप खाल्ले नाही. जा. असेच प्रेम ठेव. माझी आठवण ठेव.' खंडू प्रेमाने म्हणाला.
पाखरू परत गेले, खंडू परत घरी आला.

'आज गेले होतेत कोठे मस्णात ? घरी यायचे नसेल तर तसे सांगा. कोठे होती धिंडका ? शेतात आज गेला नाहीस ना खंड्या ? घरातून चालते व्हायचे असेल तर तसे सांग. माझा त्रास तरी वाचेल.' चंडी ओरडू लागली.
'अग, आज बनात गेलो होतो; त्या पाखराला भेटायला गेलो होतो.' 
'अशी पाखरे भेटतात वाटते ? भुतासारखे हिंडत बसलेत वाटते ? आणि आता आलात घरी.'
'परंतु पाखरू मला भेटले. त्याला किती आनंद झाला. त्याने माझे स्वागत केले. त्याच्या पिलांनी गाणी म्हटली. त्यांनी मला फळे दिली. किती सुखी त्यांचे कुटुंब आणि ही पेटी मला भेट म्हणून दिली. कशी आहे छान, नाही ? ही बघ. दोन पेट्या त्यांनी आणल्या होत्या. एक जड व एक हलकी. म्हणाली, 'वाटेल ती न्या.' मी हलकीच आणली. थोडी तो गोडी. ' तो ती पेटी दाखवून म्हणाला.
'आहे काय त्या पेटीत ? असतील किडेबिडे. रद्दी पेटी. गवताची पेटी.'
'परंतु उघडून तरी बघ, थांब मीच उघडतो.' असे म्हणून त्याने ती पेटी उघडली. तो आतून मोत्यांचे सर निघाले. सुंदर पाणीदार गोलबंद मोती ! पृथ्वीमोलाचे मोती. टपोरे मोती.
'अहाहा, किती रमणीय ही मोती.' खंडू म्हणाला. चंडी ती मोती मोजीत बसली.
'चांगली आहेत की नाही ? आकाशातील जणू तारे तशी ही आहेत.' खंडू म्हणाला.
'परंतु ती जड पेटी का नाही आणलीत ? हलकी आणलीत. खंड्या, तुला अक्कल नाही. अगदी दगडूशेट आहेस. जा, ती जड पेटी घेऊन ये.'
'मी जाणार नाही'.
'तू नसशील जाणार तर मी जात्ये. तू घरी स्वयंपाक कर. भाकरी भाज. मी उद्या सकाळी उठून जाईन. मला रस्ता सांग. जाईनच मी. जाणारच. जड पेटी घेऊन येईन. तीत हिरे असतील. रत्ने माणके असतील. सांग रस्ता.'
खंडूने तिला रस्ता सांगितला. दुसरा दिवस केव्हा उजाडतो असे तिला झाले. एकदाची रात्र संपली. बाहेर झुंजूमुंजू होते तोच चंडी निघाली. घरी खंडू होता. आज चुलीजवळ भातभाकरी तो करणार होता. उगीच गेली चंडी. हे बरे नाही, असे त्याला राहून राहून वाटत होते.

चंडी गेली. हिंडत हिंडत दूर आली. ते बन लागले. त्या बनात ती शिरली. ते वेळूचे बन कोठे आहे ? तो खळखळ वाहणारा झरा कोठे आहे ? रस्ता चुकले की काय ? नाही. तो पाहा आला झरा. गाणे गाणारा झरा. सतत वाहणारा, निर्मळ पाण्याचा झरा. चंडी झऱ्याचे पाणी प्यायली. तेथे एका दगडावर बसली.
आता दुपार झाली. पाखरे विश्रांतीला झाडांवर येऊन बसली. वेळूचे बन गजबजले. ते पाहा आपले पाखरू येत आहे. त्याने चंडीला पाहिले. पाखरू चंडीकडे आले.
'आज इकडे कोठे आलात?' त्याने विचारले.
'अरे, तुझी जीभ ना कापली होती मी ? तरी बोलतोस ?' 
'मला देवाने मानवी वाणी दिली, जीभ परत आली. तुम्ही आज माझ्या दारी आल्यात. मला तुमचे स्वागत करू दे. गोड फळे देऊ दे. काही देणगी देऊ दे. बसा येथे.' असे म्हणून ते पाखरू उडत घरी आले.
'बाबा, बाबा, आज पुन्हा उशीर ? आज कोण आले ? कोण भेटले ?' पिलांनी विचारले.
बाळांनो, आज त्या खंडूची चंडी आली आहे.' त्याने सांगितले.
'तुमची जीभ कापणारी चंडी, होय ना ?' पिलांनी एकदम संतापून विचारले.
'होय तीच.' त्याने सांगितले.
'बाबा, आम्ही जातो आणि तिचे डोळे फोडतो.' पिले म्हणाली.
'मी जात्ये व तिचे नाक तोडतेय. फोडत्ये तोंड.' बायको म्हणाली.
छी छी, असे नका म्हणू, असे नका करू. मग तिच्यात नि आपल्यात फरक काय ?ती दृष्ट असली तरी आपण दृष्ट होऊ नये आणि ती कशीही असली तरी तिच्या नवऱ्याने माझ्यावर भरपूर प्रेम केले आहे. ती त्याला छळते; परंतु तो सारे सहन करतो. मग आपण नये का सहन करू ? चला सारी, पिलांनो गाणी गा. गोड गोड फळे आणा. केळीची पाने तोडून आणा.'
'हिला कशाला केळीचे पान ?' बायकोने विचारले
'जो वाईट असतो त्याचेच अधिक स्वागत करावे. त्याला अधिक प्रेम द्यावे. चला, ती वाट पाहतं असेल.'
पाखरू आले, त्याची बायको आली. ती पिलेही आली. पिलांनी गाणी म्हटली. बायकोने केळीचे-रानकेळीचे- पान चोचीने तोडून आणले.
'पुरे तुमची गाणी. मला लागली भूक.' चंडी म्हणाली.
'जा रे बाळांनो, फळे आणा.' पाखराने सांगितले.
पिलांनी रसाळ फळे आणली. पानावर वाढली. चंडीने पटापट खाल्ली. तिचे पोट भरले.
'जा रे पिलांनो, त्या दोन पेट्या आणा. एक हलकी आणा, एक जड आणा.' पाखराने सांगितले.
'हलकी नकाच आणू. जडच आणा. त्या जड पेटीसाठीच तर मी आल्ये.' चंडी म्हणाली.
'बरे तर. जडच फक्त आणा. जा लवकर.'
पिलांनी ती जड पेटी आणली. चंडीने ती उचलली. नमस्कार वगैरे न करता, निरोप वगैरे न घेता लगबग ती निघाली.
'या हां बाई.' पाखरू म्हणाले.
'या हां बाई.' बायको म्हणाली.
'या हां बाई.' पिले म्हणाली.
'अडलय माझं खेटर, झाल माझं काम.' असे चंडी म्हणाली.

धावपळ करीत ती घरी आली. खंडूने स्वयंपाक केला होता. तो वाट पाहतं होता.
'ही बघ आणली जड पेटी. आता बघत्ये उघडून काय काय आत आहे ते.' चंडी म्हणाली.
'आधी जेव. मग फोड.' खंडू म्हणाला.
'आधी फोडीन. जेवण काय आहेच रोजचे.'
'नको फोडू ती पेटी. माझे ऐक. ती पेटी तशीच ठेव. मला लक्षण बरे दिसत नाही.' खंडूने सांगितले.
'गप्प बस. तू जा जेवायला. माझे पोट भरले आहे.' असे म्हणून चंडी पेटी फोडू लागली.
तो काय निघाले आतून ? काय होते आत ? हिरे की माणके ? पाचू की पोवळी ? हे काय ? चंडीने ती पेटी एकदम फेकली. आतून एकदम एक सर्प बाहेर आला. फणा काढला त्याने. दहाचा आकडा. तो सर्प बाहेर पडून मोठा झाला. त्याने चंडीच्या अंगाला विळखे घातले. चंडीला त्याने दंश केले. चंडी मरून पडली. सर्प फूं करीत निघून गेला.
चंडी मेली. खंडू आता एकटा राहिला. त्याने घरातील मोती वगैरे गावातील राममंदिरातील मुर्तींना दिले. खंडू शेतात खपतो. आनंदात असतो. तो सर्वांना सांगत असतो, 'अती लोभ करू नये. गोड बोलावे. प्रेम द्यावे. द्वेष कराल तर तुमच्या हातात माणिकमोती पडले तरी त्यांचे साप होतील, प्रेम कराल तर सापांचे हार बनतील. पाखरेसुद्धा मानवांवर प्रेम करतात. मानवांनी परस्परांवर करू नये का ?'
कंटाळा आला म्हणजे खंडू त्या वेळूच्या बनात जातो. त्या पाखराला भेटतो. तेथे फळे खातो. गाणी ऐकतो. मग घरी येतो.
पुढे खंडू वारला; परंतु त्या वेळूच्या बनात गोड गाणी ऐकू येतात. त्या पाखराला मनुष्याची वाणी मिळाली तसे अमर जीवनही मिळाले होते का ?

इटुकली मिटुकली गोष्ट ऐकणारांचे अभीष्ट.

लेखक : साने गुरुजी

कॉपीराईटस:
केशव भिकाजी ढवळे