तुझ्याविना हे शहर तुझे

जिथे तिथे लूटमार अन जाळपोळ येऊन गाठते
तुझ्याविना हे शहर तुझे एकट्या जिवाला लुबाडते

मनात इच्छा नसूनसुद्धा समेट होतो पुन्हा पुन्हा...
अबोल आयुष्य आसवांचे हत्यार जेव्हा उगारते

दंवात न्हाल्या तुझ्या फुलांना किमान जाणीव पाहिजे
कुणीतरी रात्र जाळल्यावर कुठेतरी बाष्प साठते

क्षणेक झाल्या गळामिठीचा मला नसे खेद एवढा
क्षणात निर्माल्य जाहल्याची अजूनही खंत वाटते

सदैव कंटाळल्या लयींचे प्रवाह पाहून गांजलो
तुझे हसू ऐकुनी समजले नदी अशीही खळाळते

असाच तू जोर लावुनी हे फिरव तुझे चक्र जीवना
बघूच आता नशीब हे कोणत्या घरावर स्थिरावते

अता कसे पेटणे जमावे, अता कुठे आग तेवढी?
दिव्यातले तेल आजही कालची जुनी वात मागते

कधी तुला जाणवेल धोका? कधीतरी जाणवेल का??
अथांग डोहामध्ये तुझे चांदणे किती खोल वाकते