श्रद्धा आणि व्यावहारिकता

मंडळी,
आपल्या हिंदु धर्मात देवतांवर अतीव श्रद्धा आहे. ती इतर धर्मीयांत पण आहे. पण हिंदूंमध्ये जास्त प्रमाणात आहे असे वाटते. (ती असण्याला माझा विरोध नाही.) आपल्या धर्मात व्रतवैकल्ये, पूजाअर्चा, दानधर्म इ. विविध पद्धतीने केले जातात व वेगवेगळ्या देवतांच्या नावाने केले जातात. वर्षातील किमान ४०% (रोजचे पूजेचे तसेच सणांवरचे, लग्न, मुंज इ. समारंभाचे तास मोजले तर ढोबळमानाने) दिवस हे पुजा, नैवेद्य, दान ह्यामध्ये जातात. ह्यात काही वावगे नाही. पण काही गोष्टींचा व्यवस्थित विचार केल्यास खालील गोष्टी आढळतात.
१. पूजेचे साहित्य चंदन, अत्तर, फुले, गंध, हळद, कुंकू, कापूर
२. पूजेसाठी वापरलेले धान्यः गहू, तांदूळ, उडीद
३. इतर खाद्य वस्तूः साखर, रवा, गूळ, तेल, तूप इ.
४. ह्या अनुशंगाने येणाऱ्या इतर वस्तू गॅस, लाकूड
५. जेवणावळी.
६. इतरही अनेक गोष्टी.


खूप वेळा आनंदाच्या भरात नियोजनाच्या अभावामुळे तसेच अतीव श्रद्धेमुळे वरीलपैकी कितीतरी वस्तूंची नासाडी होते. उदाः
१. वास्तूशांतीनंतर ठेवला जाणारा बळी (इथे भातापासुन बनवलेला बळीरूपी पदार्थ अपेक्षीत आहे). हा एखाद्या चौकात/ झाडात ठेवला जातो.
२. देवावर घातले जाणारे दूध, तूप, तेल इ.
३. जेवणावळींनंतर वाया जाणार अन्न.


नुकताच मी एका मोठ्या मारुतीच्या मंदिरात दर्शनास गेलो होतो. तिथे मारुतीबरोबरच नवग्रहांच्या मुर्त्या होत्या. नेहमीप्रमाणे मी थोडे तेल, मीठ व उडीद मारूतीला अर्पण केले. त्याठिकाणी मी पाहिले की येणारे भाविक मारूतीबरोबरच इतर सर्व मुर्त्यांवर तेल घालत होते. तिथे मी पाहिलेली काही द्रुश्येः


१. सर्व मुर्त्यांच्या चौथऱ्यावर तेलाचे १ इंच उंचीचे तळे साचले होते. ते त्यावरून वाहून फरशीवर सांडले होते.
२. मारूतीला वाहिलेली रुईची पाने अस्ताव्यस्त पडलेली होती.
३. तेलात मिसळलेले मीठ व उडीद सगळीकडे पसरलेले होते.
४. भावनेच्या भरात शास्त्र डावलले गेले असेल (मला माहिती नाही कोणकोणत्या देवांना तेल वाहतात व कोणत्या नाही. पण हा माझा अंदाज आहे.)


जर नीट विचार केला तरः
१. वाटीवाटीभर तेल वाहण्यापेक्षा १/२ थेंब तेल  देवावर घालून बाकी तेल एखाद्या भांड्यात ओतावे. असे तेल देवस्थानाने रोजच्या दिव्यांना व उत्सवाच्या वेळी वापरावे.
२. मीठ व उडीद तेलातच न मिसळता वेगळे वहावे जेणेकरून ते गोळा करता येईल. ते गरिबांना कमी किंमतीत उपलब्ध करावे.(इथे काहीजण मुद्दा उपस्थीत करू शकतात की देवाच्या सामगरीवर धंदा कसा करयचा? पण हा धंदा नसुन एक समाजसेवा आहे. आणि एखाद्या गरीबाला केलेली मदत हि देवपुजेसमान आहे.)
३. उडीद, मीठ, तेल, रूईची पाने यात औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे हे कचऱ्यात न टाकता एखाद्या आयुर्वेदीक औषधे बनविणऱ्या संस्थेस कमी किंमतीत दिल्यास खालील फायदे होतीलः
 - जास्तीचा कचरा तयार होणार नाही.
 - आयुर्वेदीक औषधे बनविणऱ्या संस्थेस कमी किंमतीत मिळाल्याने बनणारी औषधे स्वस्त असतील.
- देवस्थानापण खर्च बाहेर निघेल.


हेच सर्व इतर घटकांबाबत करता येईल. जर आपण ह्या गोष्टींमध्ये थोडी शिस्त आणली तर आपलाच फायदा आहे.


मी जमेल तितके ह्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मीपण इतरांसारखाच एक श्रद्धाळू आहे. त्यामुळे सुरवातीला थोडे जड जाईल. पण पाउल उचलायला काय हरकत आहे?


इथे मला कुणाच्या भावनांना दुखवायचे नाही.केवळ सध्याची महागाई, कष्ट, उपासमारी, एकिकडचा सुकाळ तर एकीकडचा दुष्काळ पाहिला तर श्रद्धेला व्यावहारिकतेची जोड देणे आवश्यक आहे असे वाटते.


तुमचे काय मत आहे? (जर हा विषय आधी चर्चेला आल्या असल्यास तसे सांगावे व आधीच दुवा द्यावा.)