हिंदुस्तानी संगीत ५ - भातखंड्यांचे थाट


यापूर्वी मनोगतावर हिंदुस्तानी संगीत ० ते ४ हे लेख सादर झाले. या लेखांमधून स्वरांची प्राथमिक व पायाभूत माहिती आपण घेतली. पण लेखांनंतर काहीशी खीळ बसल्यासारखे झाले. दरम्यानच्या काळात इतर व्यग्रतेमुळे लेखनात खंड पडला आणि जिथपर्यंत जायचे मनाशी ठरविले होते ते ठिकाण दूरच राहिले.
असो. आता पुनश्च हरि ॐ करीत आहे. या विक्षेपाबद्दल क्षमस्व. जिथे येऊन पोचलो होतो तेथून पुन्हा एकदा या संगीतप्रवासाला सुरुवात करूया.


यापुढे हिंदुस्तानी रागसंगीताचा अल्प परिचय करून घेण्याचा आपला उद्देश आहे.
या लेखात आपण पंडित विष्णु नारायण भातखंडे यांनी प्रस्थापित केलेल्या संगीतातल्या "थाट" या संकल्पनेची माहिती करून घेणार आहोत.

सप्तकात येणारे बारा स्वर आपण पाहिले, पण असे ध्यानात येते की या सर्वच स्वरांचा समावेश एकाच संगीतरचनेत करण्याची आवश्यकता नसते. येथे संगीतरचना म्हणजे ख्याल, चीज़, ठुमरी, धुन, किंवा एखादे साधे गाणे यापैकी काहीही म्हणता येईल. 
सगळेच स्वर असलेल्या सर्व रचना एकसारख्याच वाटू लागतील.
वास्तवात बहुतेक रचनांत यांपैकी थोडे व ठराविक स्वर असतात, फक्त हे स्वर वेगवेगळ्या गाण्यात वेगवेगळे निवडलेले असतात. आपल्या संगीतात विविध रागांचा समावेश झालेला आहे. राग म्हणजे काय याचे वर्णन नंतर येणारच आहे.  पण सध्या एवढेच सांगतो की प्रत्येक रागात काही निवडक स्वर असतात.
तर याचे काही वर्गीकरण करता येईल का?
समजा आपल्याला एक स्वरसप्तक बनवायचे आहे. ठोकळ मानाने सा (रे किंवा रे) (ग किंवा ) (म किंवा ) प (ध किंवा ) (नी किंवा नी) असे स्वर घेतले तर आपल्याला असे एक सप्तक मिळते की ज्यात सात स्वर आहेत. येथे कंसात दाखविलेल्या स्वरांच्या जोडीपैकी एकच स्वर निवडलेला आहे असे समजावे.
अशी किती वेगवेगळी सप्तके होऊ शकतात याचे गणित केले तर २ * २ * २ * २ * २ = ३२  हे उत्तर येते. पण ही केवळ आकडेमोड झाली आणि नुसत्या आकडेमोडीने संगीत बनत नाही.

या ठिकाणी पंडित विष्णु नारायण भातखंडे यांनी हिंदुस्तानी संगीतासाठी एकट्याच्या परिश्रमाने करून ठेवलेल्या महान कार्याची आठवण येणे अपरिहार्य आहे, कारण त्यांनी रेखाटलेल्या संगीताच्या नकाशाच्या आधारेच आपण वाटचाल करतो आहोत.
१८६० साली मध्यमवर्गात जन्मलेल्या भातखंडे यांना संगीताची अतिशय आवड होती. असे असूनही त्यांना संगीत क्षेत्राला आपले आयुष्य वाहून घेणे शक्य झाले नाही. कारण सनातनी विचाराच्या त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडून वचन घेतले होते की मी केवळ हौस म्हणून संगीत शिकेन, कधीही कोठेही सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही व विद्यार्जनावर संगीतसाधनेचा परिणाम होऊ देणार नाही. तरीही त्यांच्या वडिलांचे मन उदारच म्हणावे लागेल, कारण एकदा ही अट मान्य झाल्यावर पुढे ते मुलाच्या संगीतसाधनेच्या आड आले नाहीत.
पुढे भातखंडे वकील झाले व तो व्यवसाय त्यांनी प्रामाणिकपणे केला, पण त्यात त्यांचे मन नव्हते. सतारवादनात प्राविण्य प्राप्त करूनही पित्राज्ञेमुळे कार्यक्रमात भाग घेण्याची मुभा नव्हती. १९०३ च्या सुमारास त्यांची पत्नी व मुलगी दोघीही निवर्तल्या. त्या धक्क्यातून सावरताना मग त्यांनी आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेला पूर्णवेळ संगीताच्या अभ्यासात गुंतविले. अस्ताव्यस्त अवस्थेत असलेल्या व भारतभर पसरलेल्या संगीताच्या सागरात खोलवर बुडी मारून त्यातली अमूल्य रत्ने हरप्रयत्नांनी गोळा केली. पारंपरिक संगीताचे "शास्त्र" जाणून घेतले व त्याची तर्काधिष्ठित रचना केली. संगीताच्या केलेल्या अभ्यासाला एका शिस्तीत बसवले. स्वरलिपी करण्याच्या प्रणालीची नव्याने निर्मिती केली. आधुनिक काळातले शास्त्रीय संगीतावरचे पहिले ग्रंथ लिहिले. त्यांनी स्वतःच धारण केलेले "चतुर पंडित" हे टोपणनाव सार्थ करून दाखविले.  (टीप १ पहा)

आपण वर केली तशी आकडेमोड भातखंड्यांनीसुद्धा केली होती पण त्याचबरोबर त्यांनी आधीपासून अस्तित्वात असलेल्या अनेक रागांनाही विचारात घेतले. त्याना असे वाटले की या सगळ्या ३२ स्वरावली काही सारख्याच रंजक नाहीत. त्यांना रंजक वाटलेल्या त्यातील १० स्वरावलींची त्यांनी निवड केली व त्यांना "थाट" अशी संज्ञा दिली.  
हे दहा थाट खालीलप्रमाणे -


सा रे ग म प ध नी सा - बिलावल थाट


सा रे म प ध नी सा - काफी थाट


सा रे ग म प ध नी सा - खमाज थाट


सा रे म प नी सा - आसावरी थाट


सा रे ग म प नी सा - भैरव थाट


सा रे म प नी सा - भैरवी थाट


सा रे ग प ध नी सा - कल्याण थाट


सा रे प ध नी सा - मारवा थाट


सा रे नी सा - पूर्वी थाट


सा रे नी सा - तोडी थाट


हे वर्गीकरण काहीसे सैलसर आहे, कारण या १० थाटांत सगळेच जुने राग बसतात असे नाही.
उदा. अहीरभैरव या रागाचे स्वर सा रे ग म प ध नी सा असे आहेत. म्हणजे हा एक वेगळाच थाट तयार झाला पाहिजे. पण भातखंड्यांनी त्याला भैरव थाटातच मोडलेले आहे.
काही काही जुन्या रागांत दोन मध्यम येतात. ते राग सुद्धा जवळपासच्या एखाद्या थाटात त्यांनी असेच वर्गीकृत केले आहेत.
भातखंड्यांच्या मते म नी हे स्वर एका रागात/थाटात तेवढेसे रंजक वाटत नाहीत, म्हणून त्यांनी त्या थाटाचा आपल्या यादीत समावेश केला नाही.
परंतु नंतरच्या काळात कर्नाटक संगीतातून वरील वर्गीकरणात न बसणाऱ्या रागांची आपल्याकडे आयात झाली व ते राग लोकांना देखील पसंत पडले.
उदा. सरस्वती - सा रे ग प ध नी सा
आणखी एक उदाहरण चारुकेशी रागाचे -  सा रे ग म प नी सा.  ही स्वरावलीदेखील त्यांच्या थाटांत बसत नाही.
म्हणजे आता हे शास्त्र व्यवहारात आणखी थोडे शिथिल झाले आहे.


एकूण पाहता थाट ही कल्पना ठोकळ मानाने वापरता येण्याजोगी आहे. सध्याच्या काळात ती अगदी काटेकोरपणे सर्वच रागांना लागू करणे शक्य होईल असे वाटत नाही.
मग थाटांचा उपयोग तरी काय?
माझ्या मते, एखादी अज्ञात स्वररचना ऐकली व तिचा राग कळला नसेल तर निदान ती कोणत्या थाटात बसते ते शोधून काढता येते व मग आपले शोधक्षेत्र काही प्रमाणात लहान होते आणि शोध सोपा होतो.


थाटांच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्वरांचा चित्तवृत्तीवर केव्हा कोणता परिणाम होतो त्याविषयी थोडेसे पाहूया.
सर्वात आधी "बिलावल". यात सगळे शुद्ध स्वर आहेत. रसाच्या दृष्टीने याला न्यूट्रल किंवा विशेष गुणविरहित मानता येईल. दिवसाचे ८ प्रहर धरले (१ प्रहर म्हणजे ३ तास, सूर्योदयाबरोबर १ला प्रहर सुरू होतो) तर पहिल्याच्या उत्तरार्धात व दुसऱ्या प्रहरात यातील राग गायले जातात.
यानंतर कोमल निषादाचा प्रवेश होतो. दुपारच्या सुमाराला व तिसऱ्या प्रहरापर्यंत खमाज, काफी असले "क्षुद्रगीतिक" म्हणवल्या जाणाऱ्या रागांचे थाट येतात.
सकाळ व संध्याकाळ ही कोमल रिषभ व धैवत युक्त, भावनांना उत्तेजित/तीव्र करणाऱ्या रागांची.
जसे आपण संध्याकाळकडे जातो तसे कोमल रिषभाच्या जोडीला तीव्र मध्यम प्रवेश करतो, निषाद शुद्ध होतो व मारवा, पूर्वी असे थाट रिंगणात येतात.
भावनांना एवढा ताण दिल्यानंतर मन शांत करण्यासाठी रे व ध शुद्ध होतात व तीव्र मध्यमयुक्त पण बाकी सगळे शुद्ध स्वर असलेला कल्याण थाट सुरू होतो. हा रात्रीचा पहिला प्रहर.
जशीजशी रात्र पुढे जाते तसे पुन्हा एकदा काफी व खमाज प्रवेश करतात. म्हणजे तीव्र मध्यमाच्या जोडीला शुद्ध मध्यम परत येतो. तीव्र मध्यमाचे राज्य यथावकाश लयाला जाते. वातावरण निवळलेले असते पण मूड हलकाफुलकाच असतो.
मध्यरात्रीच्या सुमाराला कोमल गंधार, धैवत व निषाद एकत्रपणे अवतीर्ण होतात. गंभीर, सखोल अशी काहीतरी, गुंगवत गुंगवत आवळत आवळत जाणारी, अनुभूती येऊ लागते. हे आसावरी थाटाचे राज्य.
रात्र संपत येते आणि दुसऱ्या संधिप्रकाशाचे व सकाळचे राग येऊ लागतात. कोमल रिषभ पुन्हा एकदा प्रवेश करतो. एका बाजूला शुद्ध मध्यम घेऊन भैरव थाट येतो तर दुसरीकडे कोमल रे, ग आणि तीव्र म घेऊन तोडी थाटही येतो. भैरव थाटात भावना तीव्र होऊ लागतात पण तोडी थाटात भावनांच्या तणावाची, आर्ततेची पराकाष्ठा होते.
या पार्श्वभूमीवर शेवटी सर्व कोमल स्वर समाविष्ट करणारा भैरवी थाट येतो व सगळ्या तणावांचे विरेचन (कॅथार्सिस) होते, जणू परमेश्वराशी एकरूपता व शरणता यांचा प्रत्यय येतो.
या अवस्थेनंतर काय होणार? सर्व थंड होऊन गाडी न्यूट्रल मध्ये येते व जड पायांनी बिलावल दाखल होतो -चक्रनेमिक्रमेण.
हे थोडेफार व्यक्तिसापेक्ष आहे. आणि ते तसे असणे अपरिहार्य आहे हे  येथे नमूद करावे लागेल. एकदा रसनिष्पत्तीचा प्रांत सुरू झाला की प्रत्येकाचा रसानुभव वेगळा. एकेक राग म्हणजे विशिष्ट भावरूप असते, ते कोणाला कसे दिसेल हे त्या त्या रसिकालाच जाणवणार आणि तोच सांगू शकणार. तरीही जी अनुभूती सर्वांना येते असे (मला) वाटते तिचेच वर्णन करण्याचा प्रयत्न वर केला आहे.

आता हा राग म्हणजे असतो तरी काय हे पुढील लेखात पाहू.


या आधीच्या लेखांत सगळी माहिती मूलभूत स्वरूपाची होती व त्यात वादाला फार जागा नव्हती. आता या लेखापासून वेगळा प्रांत सुरू होतो आहे. येथे संगीताच्या सखोल ज्ञानाला महत्त्व आहे आणि मी काही त्यातला तज्ज्ञ नव्हे. खऱ्या संगीतज्ञानी लोकांपुढे माझा पाड लागेल अशा भ्रमात मी नाही. कदाचित ओळीओळीवर मतभेद/टीका होऊ शकेल व त्यातल्या चुकाही निघू शकतील. या सर्वाची मी तयारी ठेवली आहे.
आलिया भोगासी मी सादर आहे व त्यातून काहीतरी चांगलेच निघेल - वादे वादे जायते तत्त्वबोधः - या भावनेने सर्व प्रकारच्या टीकेचे धीराने स्वागत करण्याचा मी प्रयत्न करेन.
-------------------------------------------------------
टीप १ - भातखंड्यांचे चरित्र व कामगिरी यांसाठी प्रा. रमेश गांगोली यांच्या लिखाणाचा आधार घेतला आहे.


टीप २ - भातखंडेआजोबांचा आम्हाला फार मोठा आधार होता आणि त्याबद्दल माझ्या मनात अत्यंत कृतज्ञता आहे. भातखंड्यांनी लिहिलेल्या पुस्तकांत एक "क्रमिक पुस्तक माला" हे ६ खंडांचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी ज्ञात असणाऱ्या सर्व १८९ रागांची १५०० चिजांसह थाटवार माहिती दिली आहे. माझ्या विद्यार्थी दशेच्या काळात आम्हा संगीतप्रेमी मित्रांना कोणी मान्यवर गुरू मिळाले नाहीत, पण दैवयोगाने हे पुस्तक लाभले. ("जणू माकडांच्या हाती कोलीत" असे म्हणू नका. विद्या तर घेतलीच ना आम्ही त्यातून, एरवी कुठून मिळाली असती ती आम्हाला? ऐकलेले संगीत तसेच विरून फक्त गेले असते.) भातखंड्यांच्या विद्वत्तेचा दरारा त्या काळात असा विलक्षण होता की त्यांच्या पुस्तकात अमुक राग असा दिलेला आहे हा दावा जेव्हा जेव्हा आम्ही करायचो तेव्हा त्याचा प्रतिवाद करणे भल्याभल्यांना अशक्य होत असे. "सोडा बाबा, या भातखंडेवाल्यांशी काही बोलायची सोय नाही .." असे म्हणून लोक गप्प व्हायचे.
(ज्यांना संगीताचे सखोल ज्ञान मिळविण्याची इच्छा आहे त्यांनी "हिंदुस्तानी संगीत पद्धती" हे त्यांचे २००० पानी अभिजात पुस्तक अवश्य वाचावे. इतके सुंदर पुस्तक आजही दुसरे मिळणे कठीण.)
माझ्या ह्या लेखनाचे बहुतेक श्रेय त्या एकेकाळी वाचलेल्या व आता पूर्ण विसरलेल्या भातखंड्यांच्या पुस्तकांना द्यावे लागेल.
आणि आता त्यांचे चरित्र पुन्हा वाचल्यावर जाणवते की प्रत्येक बाबतीत प्रश्न विचारून खोलवर शोध घेण्याची व बुद्धिवादी दृष्टिकोणातून संगीताचे आकलन करून घेण्याचा प्रयत्न करण्याची ही वृत्तीसुद्धा त्यांचीच देणगी आहे.


टीप ३ - भातखंड्यांनी "थाट" शोधले म्हणजे अगदीच काही नवीन केले असे म्हणता येणार नाही. कारण हाच उद्योग कर्नाटक संगीतात शेकडो वर्षांपूर्वी करून झाला आहे. दक्षिणी म्हणजे कर्नाटक संगीतात स्वरांचे नामकरणसुद्धा आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने केले गेले आहे. आपल्या एका स्वराला ते तीन-तीन नावे (रे३, ग२, म१, इ.) देतात. जुन्या काळी तिथल्या व्यंकटमखी किंवा व्यंकटमुखी नावाच्या पंडिताने अशाच गणिती रीतीने ७२ सप्तके बसवली व त्यांना मेळ असे नाव दिले. या मेळांना त्याने कटपयादि सूत्रांच्या सहाय्याने अशी नावे दिली की केवळ मेचकल्याणी किंवा हरिकांभोजी असे एखाद्या मेळाचे नाव समजले की त्यात कोणते स्वर येतात हे गणिताने काढता येते. त्या त्या मेळातल्या मुख्य व संपूर्ण रागाला मेळकर्ता राग असे म्हणतात.