घरी आल्यावर दूरचित्रवाणी संच चालू करायचा म्हंटले तर तोही बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्यामुळे बापुडवाणा चेहरा करून कोपऱ्यात उभा होता. चहा पीता-पीता गप्पा मारीत बसलो होतो आणि वहिनींनी माहिती पुरविली, 'घरातल्या नळाला पाण्याचा थेंबही नाहिए.'
वहिनींच्या आकाशवाणीने आमच्यावर काही विशेष परिणाम झाला नाही. घरच्या नळाला पाणी नसेल तर सुपरमार्केटमधून 'मिनरल वॉटर' (खनिज जल?) आणू असा विचार केला. दूरचित्रवाणी संचावर मोजक्याच वाहिन्या प्रसारित होत होत्या. गच्चीतील उपग्रह तबकडी हलली होती. (बहुतेक) पण नेमक्या बातम्या दिसत नव्हत्या.
पाण्यासाठी सुपरमार्केटला गेल्यावर समजले तिथेही पाणी नाही. होत्या त्या बाटल्या संपल्या होत्या. रस्ते वाहून गेल्यामुळे नविन माल येण्याची सुतराम शक्यता नाही. इथे, आम्हा दोघांच्याही मनात भीतीची पाल चुकचुकली. पाणी नाऽऽऽहीऽऽऽ? बापरे! ह्या नंतर पहिली कुठली भावना मनात जागृत झाली तर ती ही की, 'आपल्याला जोरदार तहान लागली आहे.' एखादी वस्तू मिळणार नाही म्हंटल्यावर त्या वस्तूची गरज अचानक वाढते. (जसे दारूबंदी.) पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर विचार करण्या अगोदर तातडीने तहानेचा प्रश्न सोडवावा ह्या विचाराने पेप्सी, माउंटन ड्यू सारख्या काही पेयांवर काम भागवले. पण पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा ह्या विवंचनेत आम्ही पडलो. ह्या देशात मला बरीच वर्षे झाली असल्यामुळे तो प्रश्न सोडविण्याची नैतिक जबाबदारी माझ्या दुबळ्या खांद्यांवर येऊन पडली. मित्राच्या तर बिचाऱ्याचे तोंडचेच पाणी पळाले होते. मी म्हणालो, 'काळजी करू नकोस. इथे अजून काही भागात टँकरने विहिरीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यांच्याकडून आपण आपल्यासाठी पाणी विकत घेऊ शकतो.' आम्ही त्या दृष्टीने तपासास सुरुवात केली. रस्त्यावर ऊभे राहून टँकरची वाट पाहात होतो. नेहमी सारखे सारखे इथे-तिथे पळणारे टँकर नेमके त्या दिवशी गायब होते. पाऊस थांबल्यानंतर वरच्या उन्हाचा चटका कमालीचा जाणवत होता. वातावरणातील आर्द्रताही भयंकर होती. परिणामतः चहुबाजूंनी घामाचे झरे वाहू लागले. शरिरातील होते नव्हते ते पाणीही बाहेर पळू लागले. घशाने पुन्हा एकदा पाण्याची मागणी केली. पण आता आम्ही सुपरमार्केटपासून दूर आलो होतो.
टँकरची वाट पाहताना एक लक्षात आले की समोरच्या कारंज्याभोवती असंख्य कबूतरे, साळूंक्या, चिमण्या गोळा झाल्या होत्या. रोज पाण्याचा मुबलक पुरवठा करणारे त्यांचे कारंजे आज कोरडेठाक होते. त्यांना कळेना असे का व्हावे? सारखे कारंज्याच्या कडेवर बसून आंत पाण्यासाठी नजर टाकायची आणि पाणी नाही दिसले की पुन्हा खाली गवतावर उतरायचे, दोन मिनिटे झाली की पुन्हा कारंच्यावर चढून पाण्याचा शोध घ्यायचा असा त्यांचा निष्फळ प्रयत्न चालला होता. दया आली त्या मुक्या प्राण्यांची. काय करणार आता ते? पण प्राणीसुद्धा प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत होते. बाजूच्या इमारतीतील वातानुकुलीत यंत्रणेतून बाहेर झिरपणाऱ्या पाण्या भोवती पक्षी जमून आपली चोच बुडवून तहान भागविण्याचा प्रयत्न करीत होते. माझ्या मनात विचार आला, वादळात जी काही झाडे उन्मळून पडली असतील त्यावर असणाऱ्या घरट्यांमधील पक्षांचे काय झाले असेल? त्यांची घरटी उद्ध्वस्त झाल्यामुळे त्या पक्षांची किती तरी दिवसांची (की महिन्यांची?) मेहनत माती मोल झाली असेल. ज्या पक्षिणींनी अंडी प्रसवली असतील त्या अंड्यांचे काय झाले असेल? ज्या पक्षिणींच्या पोटात अंडी असतील त्यांनी तातडीने काय उपाययोजना केली असेल? निसर्गाच्या उत्पातानंतर पेपरला किती वित्त हानी झाली, किती मनुष्य हानी झाली ह्याचे आकडे छापून येतात. पण ह्या मुक्या प्राण्यांची कोणी गणती करतो का? किती झाडे पडल्यामुळे किती घरटी उद्ध्वस्त झाली किती पक्षी बेघरटे झाले किती अंडी, किती नवजात पक्षी-अर्भके नाश पावली ह्यांचा हिशोब करण्याच्या फंदात आपण माणसे पडत नाही. वादळाने सर्वनाश झालेल्या कुटूंबांना तातडीने आर्थिक मदत, किराणा सामान, तात्पुरत्या राहण्यासाठी कँप्सची व्यवस्था सरकार करते. त्याच बरोबर काही शेकडा तयार रिकामी घरटी का पुरवली जाऊ नयेत? 'संबंधित अधिकारी ह्याकडे लक्ष देतील काय?' असा प्रश्न तरी वर्तमान पत्रात विचारला गेला पाहिजे. असो.
खूप वेळ होऊनही टँकर मिळेना तेंव्हा आम्ही एका खाजगी विहिरी कडे मोर्चा वळविला. तिथून टँकरला पाणी पुरवठा होतो. तिथे पोहोचल्यावर पाहिले तर तिथे टँकर्सची भली थोरली गर्दी होती. भवती असंख्य भारतीय, पाण्याच्या बाटल्या, ५ गॅलनच्या बरण्या, बादल्या, पातेली घेऊन इथे-तिथे पळत होते. कोणाला पाणी मिळत होते कोणाला नाही. टँकरवाले पाणी घेऊन कुठे-कुठे जात होते. आम्ही कित्येकांना विनंती केली पण कोणी टँकरवाला येईना. आता, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाची, संकटाची, व्याप्ती जाणवायला लागली होती. पाणी नाहीच मिळाले तर काय? हे देवा...! आमच्या जवळ रिकाम्या बाटल्या किंवा बादल्या काहीच नव्हते. काय करावे? पुन्हा घरी आलो. वाटेत विचार केलाच होता. ह्या, पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या, प्रदेशात काही ठिकाणी गोड्या पाण्याच्या विहिरी तर होत्याच, अशाच काही विहिरी मशीदींच्या ताब्यात होत्या. तिथे प्रयत्न करावा म्हणून घरून रिकाम्या बाटल्या, बादल्या घेऊन एका मशीदीकडे धाव घेतली. तिथे २०-२५ जणांची रांग होती प्रत्येका जवळ २-४ बादल्या होत्या. रांग सावकाश पुढे सरकत होती.रांगेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्व होते. अर्ध्या-पाऊण तासात नंबर आला आणि आम्हाला ( एकदाचे) पाणी मिळाले. मित्राघरी चूल पेटली. पण असे किती दिवस?
दुसऱ्या दिवशीही सरकारी पाणी आले नाही. बातमी मात्र आली. 'शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तुटल्या आहेत त्या दुरुस्त होई पर्यंत पाणी येणार नाही.' काही अफवाही होत्या की, 'पाण्याचे निर्मिठीकरण (समुद्राच्या पाण्यातील क्षार दूर करून ते पाणी पिण्या योग्य करणारे) कारखाने वाहून गेले आहेत त्यामुळे महिनाभर तरी पाणी येणार नाही.' लोकांमध्ये भय वाढत होते. मिळेल तिथून, मिळेल तितके पाणी, शक्य त्या-त्या प्रकारे साठवण्यासाठी लोकांची धांदल सुरू झाली. ४ दिवस सरकारी सुट्टी असल्यामुळे सर्व जण घरीच होते. सकाळ - संध्याकाळ पाण्याच्या कावडी घराकडे वाहून नेण्याच्या कामावर पुरूष मंडळी रुजू झाली. कचेऱ्यांमधून कामगार, व्यवस्थापक, महाव्यवस्थापक पदांवर काम करणारे सर्वच जण घरगडी दिसू लागले. कितीही कमीत कमी वापर केला तरी एका कुटुंबाला कितीतरी पाणी लागते. आणि पाणी मिळवण्याचा अन्य कुठलाही मार्ग नव्हता. पाहावे तेंव्हा मशीदींसमोर, खाजगी विहिरींच्या आसपास पाण्यासाठी दिवसेंदिवस वाढती गर्दी दिसू लागली. सुदैवाने, संकटाने सर्वांनाच घेरले असल्यामुळे लोकं भांडत नव्हती. मशीदीतील कर्मचारी पाणी वाटपाच्या ह्या पुण्यकर्मात धर्मावर आधारीत किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव करीत नव्हते. रांगेची शिस्त पाळली जात होती. २०-२० तास पाण्याचे पंप चालू होते.
तीन दिवस असे उलटल्यावर अंगावरच्या कपड्यांचा प्रश्न उभा राहिला. अजून पर्यंत धुतलेले, इस्त्री केलेले जोड घरात होते म्हणून भागले परंतु, बाहेरील ४८ डिग्री तापमान आणि ८० टक्के आर्द्रता, १० मिनिटात नवीन जोड भिजवून काढायची. दिवसाला २-२, ३-३ जोड लागू लागले. पुन्हा न धुतलेल्या कपड्यांवरच पुढचे ३ दिवस काढले. लाँड्रीवाले कपडे घेत नव्हते. पाणी नसल्यामुळे ते तरी बिचारे काय करणार? घरात अंतःवस्त्रे धुण्यासही मोजकेच पाणी वापरावे लागत होते. बाह्यवस्त्रांना गेल्या ६ दिवसात पाणी लागले नव्हते. कितीही परफ्यूम वापरले तरी घामाचा दर्प लपेना. घराबाहेर पडायची लाज वाटायला लागली.
टीव्ही बंद असल्यामुळे बाहेरील बातम्या मिळेनात. कर्णोपकर्णी येणाऱ्या बातम्या 'गोनू' वादळामुळे इतरत्र विस्कळीत झालेल्या जनजीवनाचे विदारक चित्र डोळ्यासमोर उभे करीत होत्या. काही प्रदेश, रस्ते वाहून गेल्यामुळे, मुख्य शहरांपासून तुटले होते. तिथे पाणी तर नव्हतेच पण वीजही नव्हती. त्यामुळे विहिरीचे पाणीही फार कष्टाने मिळत होते. सर्व नैसर्गिक विहिरींची तोंडे बंद करून विजेचे पंप बसवले आहेत. त्यामुळे आत डबा टाकून पाणी उपसणे अशक्य आहे. दूरध्वनी, भ्रमणध्वनी बंद झाले होते. आजारी माणसांना डॉक्टरकडे, हॉस्पिटलला नेणे अशक्य झाले. दुकानांना सामानाचा पुरवठा नाही. सरकारी यंत्रणा कुठे कुठे पुरी पडणार. गरीबांना वाली उरला नाही. मदती अभावी कित्येकजणं मेले.
आठवडाभर सर्वत्र कहर माजला. आठवड्यानंतर सैन्यातील जवानांच्या मदतीने पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला. काही जलवाहिन्या ६दिवस X २४ तास काम करून दुरुस्त करण्यात आल्या त्यामुळे काही काही भागात पाणी सुरू झाले. (आमच्या भागात पहिल्याच दिवशी आले). 'जीवन' सुसह्य होऊ लागले. काही भागात आजही (१७ दिवसांनंतरही) वीज आणि पाणी नाही अशी अवस्था आहे. काही रस्ते सैन्याच्या मदतीने तात्पुरते, कच्चे बांधले आहेत. रखडत रखडत का होईना वाहतूक सुरू झाली आहे. सैन्य, स्थानिक रहिवासी, सेवाभावी संस्था मदतकार्यात गुंतल्या आहेत. ज्यांचे पासपोर्ट वाहून गेले आहेत अशा १०००० जणांना भारतीय वकिलातीने नवीन पासपोर्ट दिले आहेत. सर्व हळू- हळू पूर्वपदावर येण्याच्या प्रयत्नात आहे.
BBC ची ताजी बातमी अशी आहे की आखाती प्रदेशात येत्या ८ दिवसांत पुन्हा एकदा बर्फाळलेले वारे आणि धुवांधार पावसाची शक्यता आहे..............
समाप्त.