सांजवेळ ...

........................................
सांजवेळ ...
...........................................

सांज येई; न येई परी एकटी...
सावटांनाच घेऊन येई सवे !
दाटती कोणत्या खिन्न या सावल्या ?
कोणते दुःख आता पुन्हा हे नवे ?

सांजवेळीच अंधारती का दिवे ?
मालवे सांजवेळीच मनही कसे ?
कालवे सांजवेळीच प्राणात का ?
आठवांनी कुणाच्या कुणाच्या असे ?

सांज काळोखकाळी जणू भूल ही...
सांज तिथल्या तिथे गूढ चकवा जणू...
सांज सरकेचना ही जराही पुढे...
आसमंतात साऱ्याच थकवा जणू...!!

सांजवेळी कुणाशी न बोले कुणी...
भोवतालास केले कुणी या मुके ?
ओळखू येत नाही कुणाला कुणी...
सांजवेळीच डोळ्यांत दाटे धुके !

सांजवेळीच हुरहूर दाटे उरी...
सांजवेळीच काहूर हृदयी उठे...
जीव कोंदाटतो सांजवेळीच का ?
दाट अंधार बाहेर ! जावे कुठे ??

सांजवेळीच जो तो इथे एकटा !
सांजवेळी कुणाचेच नाही कुणी!
सांज जाईल केव्हा असे वाटते...
सांज काही क्षणांची जरी पाहुणी !

- प्रदीप कुलकर्णी

...........................................
रचनाकाल ः २१ जुलै २००५
...........................................