गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ८

आधी सांगितल्याप्रमाणे माझी परतीची तारीख ८ एप्रिल पक्की झाली. मला आता परतीचे वेध लागले होते. तृप्ती ला पण आता परत यायची इच्छा होत होती पण संदिप चे तिकडचे काम संपल्याशिवाय त्यांच्या परतीची तारीख पक्की होत नव्हती. गिरीश चे परतीचे मात्र त्याच्या कामावर अवलंबून होते.(म्हणजे बहुतेक करून त्याचे काम ८ तारखेच्या आधी संपायची चिन्हे दिसत होती.) तसे भारतातून निघतानाच आमचे दोघांचेही परतीचे तिकिट ८ एप्रिल चे होते.(दोघांचे तिकिट ओपन मात्र होते.) परंतू काही कारणामुळे मी मार्च मध्ये ती तारीख  बदलून घेतली होती आणि मग माझे मार्च मध्ये परतणे रद्द झाल्याने आता मात्र मला ८ एप्रिल तारीख हवी होती. आम्ही तसे त्या सुनिता ला सांगितले. तिनी बघितले तर माझे तिकिट confirm मिळाले नाही. आता ती म्हणाली की तुम्ही त्या KLM airways च्याच ऑफिस मध्ये चौकशी करा. मी तिथे जवळ जवळ रोज च फोन करत होते. पण ती बाई मला म्हणायची की तुमचे तिकिट confirm होईल उद्यापर्यंत. तुम्ही internet वर चेक करा. मार्च अखेर नंतर मी प्लॅंट वर जाणे बंद केल्याने गिरीशच रोज internet वर बघायचा. पण तिकिट वेटिंग लिस्ट वर च!! पुन्हा त्या बाईला फोन केला की ती म्हणायची की तिकिट confirm होईल. असे चार/पाच दिवस गेले. शेवटी म्हणजे अशी परिस्थिती आली की माझ्याकडे तिकिट नाही आणि परतायचे पक्के आणि गिरीश कडे तिकिट आहे पण त्याच्या कामामुळे यायची तारीख तितकीशी पक्की नव्हती. मला सगळे चिडवायला लागले की आता गिरीश परत जाणार आणि तू मात्र इकडेच राहणार. मला टेन्शन यायला लागले होते की आता खरेच तसे होणार की काय!!

 तेव्हा सौजन्या गर्भवती होती आणि तिचा पाचवा महिना सुरू होता. माझे परत जाणार हे नक्की म्हणून मग वेंकटने तिला परत येताना माझी सोबत  आहे असा विचार करून तिचे ८ एप्रिल चे तिकिट काढायला दिले आणि तिला मात्र कसे कोणास ठाउक पण confirmed  तिकिट मिळाले! मी अजून ही आशा सोडली नव्हती. पॅकिंग सुरू केले होते. हळू हळू असे दिसायला लागले की गिरीश चेही काम पूर्ण होइल आणि तोही ८ एप्रिल ला निघू शकेल. पण अर्थात अचानक काम येईल आणि मग पुन्हा गोंधळ नको म्हणून तो परतणार आहे असे आम्ही घरी सांगितलेच नाही. माझाही गोंधळ चालू असल्याने जवळपास रोज फोन चालू होते की तिकिट होतेय का नाही confirm. आणि अशातच आदल्या दिवशी internet वर गिरीश ला तिकिट confirmed दिसू लागले. मी तर त्याला म्हणाले की नक्की बघ. मी पुन्हा त्या ऑफिस मध्ये फोन करून विचारले. त्यावर ती बाई म्हणाली की तू इकडे येऊन नवे तिकिट घेऊन जा. त्या दिवशी तृप्तीने माझ्या पॅकिंग साठी रजा घेतली असल्याने ती पण माझ्याबरोबर येते म्हणाली. सुरीनाम मध्ये तसे म्हणले तर आम्ही दोघीच कुठे जायचा हा पहिलाच प्रसंग होता. गिरीश कडे एका टॅक्सी ड्राइव्हर चा फोन नंबर असल्याने त्याने आम्हाला टॅक्सीने जायचा सल्ला दिला. तसाही दुसरा काहीच पर्याय नव्हता.

आम्ही दोघी निघालो. मनात काळजी होतीच की ते ऑफिस सापडेल की नाही वगैरे. पण मागे एकदा गिरीश बरोबर आल्याने ते ऑफिस सापडले. आम्ही टॅक्सी वेटिंग वर च ठेवली. गर्दी असल्याने आम्हाला थोडा वेळ थांबावे लागले. आमचा नंबर लागल्यावर तिनी लगेच मला नवीन तिकिट दिले खरे. पण ती मला म्हणाली की तारीख बदलल्याचे इतके पैसे होतात. तर तू दे. मी तर फक्त अमेरिकन डॉलर्स च आणले होते. तिला विचारले ते चालतील का? तर ती म्हणाली की नाही. मला तू सुरीनाम डॉलर्स मध्येच पैसे दे. आता आली का पंचाईत! एकतर तिथून कॅंबिओ शोधा आणि पुन्हा इकडे येऊन हिला पैसे द्या. त्यात ४ ला ते ऑफिस बंद होणार आणि ३.३० तर वाजून गेलेले. पुन्हा दुसऱ्याच दिवशीचे संध्याकाळचे विमान होते. मी गिरीश ला फोन केला तर तो म्हणाला की तिला पुन्हा एकदा विचार. कारण ओपन तिकिट आहे आपले. आणि पुन्हा free date change आहे. त्यामुळे पैसे पडतील असे मला वाटत नाही. त्यात जर लागलेच तर तू टॅक्सी ड्राइव्हर ला कॅंबिओ कुठे आहे ते विचारून पैसे convert  करून तिला आणून दे. पर्याय नाहीये दुसरा. पण मी इतके बोलून फोन ठेवतेय तोवर तीच बाई मला म्हणाली मला कसे ते कळत नाही पण तुला ह्या कामाचे पैसे नाही द्यावे लागणार असे कॉंप्युटर वर दिसत आहे!! मी हुश्श केले. मला खरोखर च आनंद झाला होता की आता मी नक्किच पुण्याला परत चाललेय म्हणून. आणि मग तिकिट घेऊन आम्ही घरी आलो. मी तर खूप च खूष होते. त्यात गिरीशचेही ८ चे नक्की झाले होते. फक्त त्याला निघायच्या दिवशी पण ऑफिस ला जावे लागणार होते. तृप्ती तर मला मदत करायला रजाच घेणार होती. ३ महिने राहिल्यावर आख्खे घर रिकामे करणे काही सोप्पे नव्हते. पण तृप्ती मदतीला असल्याने मला जरा बरे वाटत होते. तिलाही मी भारतातून आणलेले पण काही उरलेले सामान दिले. (परदेशात असताना हे असले भारतिय पदार्थ लगेच मिळत नाहित म्हणून किम्मत असते.) तिनी पण ते तिच्याकडे घेऊन ठेवले.

गिरीश अगदी निघायच्या दिवशी पण ऑफिसला गेला. त्याचे थोडेफार काम उरले होते. आणि काही डॉक्युमेंटस देणे वगैरे ऑफिस चे काम राहिले होते. तो जेवायला घरी येईन असे सांगून गेला खरा पण सगळ्यांचे निरोप घेणे वगैरे कामे करत तो दुपारी ४ ला आला. आम्हाला ६ ला घरून निघायचे होते. माझे मात्र निघायचे पक्के असल्याने मी आधिच ही सगळी कामे केली होती. आम्हाला एअरपोर्ट वर सोडायला यायची तृप्ती ची इच्छा होती पण मी, गिरीश, सौजन्या आणि तिला सोडायला वेंकट येणार असल्याने गाडिमध्ये सामान आणि पुन्हा इतकी माणसे होती की जागाच उरली नाही. मग तिनी घरूनच आम्हाला निरोप दिला ते पुण्यात ती आली की नक्की भेटू ह्याच आश्वासनावर. तिला तर आता आख्खे घर खायला उठणार होते. मलाही एकिकडे तृप्ती साठी वाईट वाटत होते आणि दुसरीकडे मी परत येतेय म्हणून आनंद होत होता.

अतिशय जड अंतःकरणाने मी तृप्ती चा आणि सुरीनाम मधिल घराचा निरोप घेतला. ज्या घरात मी माझा नवा संसार थाटला होता ते घर आपल्याला पुन्हा कधीच बघायलाही मिळणार नाही म्हणून मी घराकडे अगदी डोळे भरून बघून घेतले. अगदी ३ महिने राहूनही मी त्या घरात एका छान मैत्रिणिचे नाते जुळवले होते. तसेच सुरीनाम मधून निघताना अगदी रोजच्या खरेदीची दुकाने, मॉल्स आणि रस्त्यांकडे मी भरल्या डोळ्यांनी बघत होते. आणि सुरीनामचा शेवटचा निरोप घेत होते. पुन्हा आयुष्यात तिथे जायला मिळायचे चान्सेस तसे शुन्य म्हणले तरी चालेल असे होते. 

(क्रमशः)