जी.एं. च्या कथांमधील नियतीवाद

चित्रकार सुभाष अवचट हे जी.एं. चे (त्यातल्या त्यात ) मित्र. त्यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण जी.एं. ना पाठवले. जी.ए. लग्नाला उपस्थित रहाण्याचा प्रश्नच नव्हता. जी.एं. नी अवचटांना जे उत्तर पाठवले त्यात म्हटले आहे
'आयुष्यात अनेकदा तडजोडी निर्विकारपणे कराव्या लागतातच, व माणसाचे मर्यादित सामर्थ्य ध्यानात घेता आपण फारशी तक्रार करू नये. पण या तडजोडी जेथे आंतडे गुंतलेले नाही अशा बाबतीत घडल्यास त्याचे सोयरसुतकही फारसे नसते. पण प्रत्येक इमानदार व्यक्तीच्या जीवनात एक लहानमोठा कोपरा असा असतो की त्याठिकाणी तो तडजोडीच्या मळकट, ओबडधोबड पावलांना प्रवेश देऊ इच्छीत नाही - निदान त्यानी येऊ नये म्हणून त्याची अविरत धडपड असते. जी व्यक्ती हे इमान शेवटपर्यंत अनाघ्रात ठेवू शकते, तिला ( मग तिचे लौकिक यश काहीही असो ) मी अत्यंत भाग्यवान समजतो. याचे एक कारण म्हणजे अशा या जिव्हाळ्याच्या जागी तडजोड असहायपणे करावी लागली की सारे आयुष्यच शरमेने कळकून गेल्यासारखे होते. (नंतर ही शरमदेखील हळूहळू नाहीशी होऊन मन निबर होऊन बसते ही माणसाची खरी शोकांतिका)'
जी.एं. च्या लिखाणात सगळीकडे दिसून येणाऱ्या नियतीशरणतेचेच हे उदाहरण आहे. जी.एं. च्या कथांतील माणसे दुःखाने, वेदनेने, दारिद्र्याने पिचलेली, हतबल, असहाय झालेली असतात. नियती नावाच्या अदृष्य शक्तीच्या फटकाऱ्याने मोडून पडलेली असतात. जेथे प्रयत्न आणि आशा संपून जाते अशा ओलसर, अंधाऱ्या कोपऱ्यात कशीबशी जगत मरणाची वाट पहात पडलेली असतात. हाडेकातडी टाकायला एक हक्काची जागा, दोन वेळचे गोळाभर अन्न आणि कुणाचातरी मायेचा एखादा शब्द अशा माफक अपेक्षाही ती नियती नावाची चेटकीण पूर्ण होऊ देत नाही आणि माणसाचे आयुष्यच दुःखाने गच्च गच्च होऊन जाते.
जी.एं. च्या टीकाकारांनी याला जी.एं. चा एकसुरीपणा, निराशावाद, क्वचित पलायनवादही म्हटले आहे. पण जी.एं. चे लिखाण वाचताना तसे वाटत नाही. 'सगळी सुखी माणसे एकाच पद्धतीने सुखी असतात, पण प्रत्येक दुःखी माणसाच्या दुःखाचे तऱ्हा वेगळी असते' या अर्थाचे टॉलस्टॉयचे वाक्य जी.एं. नी 'रक्तचंदन' या कथासंग्रहाच्या पहिल्या पानावर लिहिले आहे. जी.एं. च्या कथांमधील व्यक्ती दुःखाच्या अशाच वेगवेगळ्या जात्यांखाली भरडल्या गेल्या आहेत. संसार उद्वस्त झालेल्या सण्ण्याच्या आयुष्यात वरून धुळीत नाणे पडावे तसे आलेले, केवड्यासारख्या अंगाचे आणि शिंपल्यासारख्या पायाचे कबूतर पैजेच्या इर्षेत शिकारी ससाण्याचा घास होते (चंद्रावळ), आपले जीर्ण, म्हातारे, नकोसे झालेले आयुष्य रेटणाऱ्या भाऊन्च्या आंधळ्या डोळ्यांआड त्यांची हसरी, सोनकेळीसारखी नात अचानक निवर्तते (राणी), लंगड्या गोविंदाचार्याची उठवळ बायको त्याच्या पदरात काळे, वातीसारखे अशक्त पोर टाकून कुणा गणागणपाचा हात धरून निलाजरेपणाने निघून जाते आणि ते पोरही बघताबघता पोट फुगून मरून जाते ( अवशेष),  सगळे आयुष्य शिक्षकी आदर्शात काढलेल्या नाडगौडा मास्तरांचा तरणाताठा मुलगा परीक्षेत तिसऱ्यांदा नापास होण्याच्या भीतीने विहीरीत जीव देतो (सांगाडा), नरसूभटाच्या पहिल्या बायकोप्रमाणेच दुसरी बायको कावेरीही मेस्त्रीच्या उग्र, रानवट हातून कुस्करली जाते (काकणे), आयुष्यभर कुरूप, हाडकुळे, सरड्यासारखे पाय घेऊन, बापाच्या तुच्छतेचे वळ झेलणाऱ्या काशीची बापाच्या मृत्यूनंतर सुटका होते तोच नामूच्या विखारी वासनेची काळी अभद्र सावली तिच्यावर पडते ( शलॉट), कंजूषपणे पै पै करून जगलेल्या गोविंदरावांच्या एकुलत्या एका बापूला वेड लागते आणि गोनिंदरावांचे सगळे आयुष्यच दरिद्री, भिकारडे होऊन जाते (जखम), मानेवर कोड असलेल्या मेधाला फसवून कंटाळवाण्या रूपवान लिलूशी लग्न करणाऱ्या माधवला मेधाची आई निरोप घेण्याआधी सगळेच गुपीत उघडे करून सांगते आणि मग माधवचे अस्तित्वच जणू शरमेने बुळबुळीत होऊन बसते (रातराणी), गैरसमजातून आपल्या जन्मदात्या आईविषयी मनात फक्त विषारी तिढे घालत बसलेल्या रुक्मिणीचा शेवटी नियतीकडून पराभवच होतो (पराभव), आपल्या हाताला जणू कातडीप्रमाणे चिकटलेले अपयश सोडवण्याच्या डॉक्टर दादा पाठकांची सुटका शेवटी मृत्यूच करतो (सोडवण), वाईट नजरेची म्हणून समाजाने वाळीत टाकलेली राधी शेवटी तिने माया लावलेले कुत्र्याचे पिलू चावून तडफडून मरते ( राधी), आयुष्यभर घरगुती गिऱ्हाइकांना खमंग, झणझणीत मसाला भजी, चरचरीत उसळ आणि जाड, कापडाच्या पट्टीसारखा चहा देणाऱ्या गावठी सदूभाऊंचे त्यांचा मुलगा ताब्यात घेतो आणि त्याच्या धंद्याच्या नवीन गणितात कुठेच जागा नसलेले सदूभाऊ आणि सीताबाई अगदी बेवारस, पोरके होऊन जातात ( माघारा), वांझोटी म्हणून जगाकडून हिणवून घेणारी करेव्वा एका आगळ्या तिरीमिरीत अंधाऱ्या रात्री गावाबाहेरच्या रानमारूतीसमोर नवस बोलायला जाते, पण तिच्या हाती अपेक्षाभंगासोबतच येते ते एक भयाण जळते सत्य (वंश)......
जी.एं. च्या पात्रांची दुःखे अशी बहुपेडी, सर्वस्पर्शी आहेत.  मानवी भावभावना, विकार, वासना यांचे इतके जिवंत चित्रण करणारा दुसरा साहित्यिक माझ्या तरी वाचनात नाही. एक मात्र खरे, जी.ए. हा केवळ मनोरंजन म्हणून वाचण्याचा लेखक नव्हे. दुपारच्यी झोपेपूर्वी डोळ्यासमोर धरायला चार अक्षरे पाहिजे असतील तर त्यांनी जी.एं. च्या वाट्याला न गेलेले बरे.
जी.एं. च्या व्यक्तीरेखांना अस्सल खानदानी मराठमोळी पार्श्वभूमी आहे. त्यांच्या पात्रांची भाषा, त्यांवरचे संस्कार,  परंपरागत, क्वचित जुनाट आहेत. त्यांच्या मराठीवर कानडीची एक गोड झाक आहे. जी.एं. नी भाषेला तर गारूडी नागाला जसा डोलावतो तसे डोलायला लावले आहे. त्यांच्या प्रतिमा, भाषेवरची त्यांची हुकुमत थक्क करून टाकणारी आहे. सर्पप्रतिमा ही जी.एं. च्या आवडत्या प्रतिमांपैकी एक. जयवंत दळवींच्या लिखाणात जसे वारंवार वेड्यांचे उल्लेख येतात तसे जी.एं.च्या  लिखाणात सापांचे. आणि हे इतके जिवंत की जणू डोळ्यासमोर ते साप सळसळत जातात. उदाहरणच द्यायचे झाले तर दानय्या गारूड्याचे चित्रण करणाऱ्या 'तळपट' या कथेतले हे वर्णन पहाः
'दानय्याचे पावले थांबली. त्याच्यावर पुटाप्रमाणे चढलेली वर्षे गळून पडली. सारे अंग इशारा दिल्याप्रमाणे खडबडून जागे झाले अणि एक पीळ होऊन प्रसंगासाठी तयार झाले. अंग असे खबरदार झाले, हातावर असा हलकाच फुलोरा झरझरून गेला की जवळच कुठे तरी नाग आहे हे त्याला जाणवे. थोड्याच वेळात दगडांच्या ढिगाऱ्यात त्याला धगधगीत केशरी रंगाचा एक वळसा दिसला. तो वळसा पिंढरीएवढा जाड होता व त्यावर खवल्यांची उग्र कुसर होती'
जी.एं. चे शब्दसामर्थ्य हे असे दिपवून टाकणारे आहे. ही दैवदत्त देणगी तर खरीच, पण त्याबरोबर जी.एं. चा शब्दांचा आणि भाषेचा सखोल व्यासंग हेही त्यामागचे एक कारण आहे. पण त्याविषयी पुन्हा कधीतरी...


सन्जोप राव