स्मृतिगंध-५ "त्रिपुरी पौर्णिमा"

दिवाळीच्या सुमारास पिके तयार होतात त्यामुळे सणाला घरात धान्यधुन्य भरलेले असे. फराळाला 'घरी कांडलेल्या' पोह्यांचा चिवडा, रव्याचे लाडू, करंज्या, शंकरपाळे आणि कडबोळी असत. चकल्या केलेल्या आठवत नाहीत. दिवाळीच्या पहाटे पाणचूल रसरसून पेटवत असू. अंगाला आई तेल लावत असे आणि घरातच तयार केलेले उटणे लावून अभ्यंगस्नान होई. त्याच दिवशी वासाचा एकुलता एक साबण ]हमाम' लावत असू. लक्स, मोती सारखे इतर सुवासिक साबण तर आम्हाला माहितीच नव्हते. इतर वेळी अंघोळीकरता रिंगे म्हणजे रिठे लावत असू. बायकामाणसे रिठे व शिकेकाईने न्हात असत. नंतर देवाला नैवेद्य दाखवून फराळ केला जाई. दिवाळीच्या पहिल्या दिवसाला 'चावदिवस' असे तेथे म्हणतात. ह्याच दिवशी गावातील मुले, बायका, गडीमंडळी असे सारेजण पोहे मागावयास येत असत. त्यांना प्रत्येकी मूठ, मूठ पोहे देण्यात येत असत. पाटील व इतर गावकरी मंडळींना पंचपात्री भरून पोहे देत असू. पोहे मिळाल्यावर आनंदित होऊन ते आपापल्या घरी जात असत. आता मात्र पोहे बाजारात उपलब्ध झाल्याने ही प्रथा जवळजवळ बंदच झाली आहे. फटाके म्हणजे बांबूची नळी करून त्यात आपट्याची पाने घालायची आणि पिचकारीसारखे मागून दुसऱ्या काठीने ती पुढे ढकलली की आतील पाला फोर्सने बाहेर पडताना आवाज येत असे. आपट्यांच्या पानांसारखीच कधीतरी तिरफळेही घालत असू, त्यांचा आवाज पानांपेक्षा जोरात येत असे पण तिरफळांपेक्षा आपट्याची पानेच मुबलक उपलब्ध असत. हेच आमचे फटाके!

परंतु दिवाळीपेक्षाही व्हेळ आणि आसपासच्या गावांत दिवाळीनंतर येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व फार! त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव जुगाईदेवीच्या देवळात आजही होतो. त्यास गावकरी 'टिपूर' असे म्हणतात. टिपरासाठी गावोगावहून आपल्या मुळाकडे लोक येतात. जुगाईच्या डोंगरावरच्या राईत पाषाणरूपी ब्रह्मदेव वसला आहे. ब्रह्मदेवाचे देऊळ कोठेच नसते. त्याविषयीची कथा सांगतात ती अशी, एकदा ब्रह्मा, विष्णू, महेश काही बोलत बसले असता ब्रह्मदेव खोटे बोलले. राग येऊन विष्णुने त्यांना शाप दिला, "तुझे कोठेही घर होणार नाही. तू असाच उन्हातान्हात राहशील. " म्हणून ब्रह्मदेवाचे कोठेच देऊळ बांधलेले आढळत नाही. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी दुपारी राईतील ब्रह्मदेवाजवळ समाराज्ञा होते. समाराज्ञा म्हणजे गावातील सर्व मंडळी ब्रह्मदेवाजवळ जमतात, सडारांगोळ्यांनी तेथील जागा सुशोभित करतात. उपाध्ये तेथील पाषाणरूपी ब्रह्मदेवाची पूजा करतात व एकादष्णीही होते. तेथेच बाजूला ब्रह्मदेवाच्या नावचे एक शेत आहे, त्यावर कोणाची मालकी नाही, देवच त्या शेताचा मालक. त्यात गावकरी भात पिकवतात व ते तांदूळ प्रसादाच्या जेवणासाठी वापरले जातात.

गावातील मंडळी तेथे चर खणतात. म्हणजे जमिनीत लांबटसर खोदून त्यावर मोठाली तपेली, पातेली ठेवून, चरात लाकडे लावून विस्तव पेटवतात व भात, उडदाचे वरण, भोपळ्याची भाजी, तांदूळ+ उडीद घालून दळलेल्या पिठाचे वडे व घारगे हा स्वयंपाक दुपारी करतात. त्या सुमारास भाजीचे भोपळे जवळपास सगळ्यांच्याच परसात येतात आणि गावजेवणासाठी पुरवठ्याला येणारी भाजी म्हणून कदाचित भोपळ्याची भाजी करत असावेत. तसेच उडदाचे पीक त्या भागात जास्त आणि तूर, मूग नाहीतच, म्हणून मग उडदाचे वरण करीत असावेत. आजही गावातील मंडळीच स्वेच्छेने तेथे सेवा म्हणून स्वयंपाक करतात. कोणालाही आमंत्रण नसते तर सारे घरचेच कार्य समजून हजर राहतात. आपल्या जवळ असलेले दही, दूध, ताक, लोणचे, मिरची, भाजीचे भोपळे असे जे असेल ते घेऊन ब्रह्मदेवाच्या पायाशी जातात. दुपारी दीडच्या सुमारास देवाला वरणभात, वडे, घारगे, भोपळ्याची भाजी असा नैवेद्य दाखवला जातो. तद नंतर केळीच्या पानावर पंगत बसते. गावातले उत्साही स्त्रीपुरुष आपणहून वाढपाचे काम करतात. किती सुटसुटीतपणे आजही ही गावजेवणाची प्रथा चालू आहे. थाटमाट नाही, केटरर, आचारी नाही की ताटवाट्यांचा पसारा नाही. तेथेच उपलब्ध असलेली केळीची किंवा करंबेळाची पाने जेवावयास वापरतात तर तांब्याभांडे ज्याचे त्याने आपापले आणावयाचे असते. २ ते ३ हजार पान त्यावेळी सहज जेवते. तेथील जेवणाला एक वेगळाच रुचकरपणा असतो आणि कितीही वडे खा, बाधत नाहीत. वडे वाढताना एक, दोन असे न वाढता पाच पाच वडे एकदम वाढतात, त्यास पाचुंदा म्हणतात. एकमेकांना किती पाचुंदे खाल्ले अशी विचारणा केली जाते आणि जास्तीत जास्त पाचुंदे खाण्यासाठी पैजा लागतात. तरीही कधी जेवण कमी पडत नाही.

जेवणे झाल्यावर ब्रह्मदेवाची प्रार्थना करून गाऱ्हाणे घातले जाते. "जय देवा, ब्रह्मदेवा, म्हाराज्या.. सगळ्या बाळगोपाळांनी तुझ्याकडे येऊन, तुला नैवेद्य दाखवून प्रसाद घेतला आहे. तरी आमचा सर्व प्रकारे जीवजीवडेपासून, चोराचिलटापासून, रोगराईपासून सांभाळ कर आणि अशीच सेवा दरवर्षी करून घेत जा... होय देवा, म्हाराज्या.. " अशा प्रकारचे ते गाऱ्हाणे असते. गाऱ्हाणे घालून झाल्यावर नारळ फोडतात आणि प्रसाद घेऊन आपापल्या घरी जातात.

त्याच रात्री डोंगरावरील जुगाईदेवीच्या देवळात त्रिपुरीपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. बरोब्बर रात्री १२ वाजता भटजी दीपमाळेची पूजा सांगतात. प्रथम देवळातील तुळशीचे लग्न लावले जाते. नंतर ब्रह्मदेव, ढोपरोबा, गांगोबा ह्या राईतील देवांजवळ पणत्या लावल्या जातात. नंतर सर्व देवांची नावे घेऊन 'त्रिपुराच्या पूजेला या 'असे आवाहन केले जाते. नंतर टवळ्याची पूजा केली जाते. टवळे म्हणजे मोठा तेलाचा दिवा, त्यात जवळजवळ २ लिटर तेल मावते. तो पेटवून दीपमाळेवर सर्वात उंच ठेवायचा असतो. ही पूजा सोवळ्याने केली जाते, ह्या दीपमाळेच्या पूजेचा मान आमच्या घराण्याकडे आहे. माझे चुलतबंधू ती. अच्युतदादा कोठेही असले तरी ही पूजा करावयास तेथे हजर असत. आजही आमच्या घराण्यातील कोणीतरी ह्या पूजेसाठी मुद्दाम तेथे जातातच जातात. टवळे दीपमालेवर ठेवल्यानंतर प्रत्येक मानकरी दीपमालेवर चारही बाजूंनी वरपासून खालपर्यंत पणत्या लावत येतात. ह्या पणत्या लावण्यांवरून गावकऱ्यांमध्ये मानापमान नाट्य कधीकधी रंगते.

ह्यानंतर देवळात पालखीसमोर धूप घातला जातो. सर्वजण हातात तेलाचे पेटते काकडे घेऊन, पालखी नाचवीत, ढोलताशाच्या गजरात 'हरी बोला हरी बोला' असे म्हणत देवळाभोवती ५ प्रदक्षिणा घालतात. ह्या प्रदक्षिणा घालताना पालखी नाचवण्याच्या मानासाठी अहमहमिका लागते. पहाटेचे पाच साडेपाच होईपर्यंत पालकी नाचवली जाते. गावचे २ ते ३ हजार लोक ह्या कार्यक्रमात भाग घेतात. ह्या निमित्याने गावातले सारेजण हेवेदावे विसरून एकत्र येतात आणि मग कधीतरी मानापमानावरून नवीन हेवेदावे निर्माण होतात जे सोडवण्यात कधीकधी पुढचे वर्षही सरत असे. परंतु कोर्टाची पायरी न चढता सारे एकत्र बसून प्रश्न, भांडणे सोडविली जात असत. पूर्वी रेडिओ, टीव्ही अशी करमणुकीची साधने नसल्याने असे उत्सव हीच मोठी करमणूक असे.

ह्या प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत टवळ्याचा दिवा तेवता राहिला पाहिजे असा संकेत आहे. त्याआधी दिवा गेल्यास गावावर काहीतरी संकट येणार असे समजले जाते. त्यामुळे टवळ्याचा दिवा तेवतो आहे ना ह्याकडे सर्वांचेच लक्ष असते. पाच प्रदक्षिणा संपल्यानंतर पालखी परत देवळात जाते आणि सोहळा संपतो. सारेजण मग आठवणी जागवीत आपापल्या घरी जातात.