मला सांगतो रोज वृत्तांत सारा...
तुझ्या गावचा शब्दवेल्हाळ वारा!
दुरापास्त झाली - नजरभेटसुद्धा!
असा बसवला आसवांनी पहारा...
धुक्याची कशाला तमा बाळगू मी?
धुके दूर होईल - उगवेल तारा!
लढू लागले लोक त्याच्याच नावे -
किती भासला देव तेव्हा बिचारा!
(लढू लागले लोक त्याच्याच नावे -
कुठे राहिला ईश्वराचा दरारा?)
तडाखे सदा सोसतो सागराचे
तरी शांत असतो कसा हा किनारा?
तुझे गीत गाईन मी जीवना, पण
जरा देत जा नीट लावून तारा!
- कुमार जावडेकर, मुंबई