खरंच.......मराठी पाऊल पडती पुढे???????

मुंबई,मराठी माणूस आणि मराठी भाषा हे तीन विषय किती संवेदनशिल आहेत,हे सगळ्यात चांगल कोणाला माहित आहेत? याच उत्तर आहे,"सामान्य मुंबईकर".


पण....


पहाटे उठल्यावर आपण 'जागरण'मध्ये कबिराचे दोहे, मीरेची भजने आणि पंकज उधासची भक्तिगीते ऐकतो, नंतर ब्रेकफास्ट घेताना टाइम्स वाचतो. रिक्षावाल्याला 'अंधेरी वेस्ट को चलो'ची आज्ञा फर्मावतो, नंतर तिकिटाच्या खिडकीत डोके खुपसून 'चर्चगेट रिटर्न' मागतो. ट्रेनमध्ये शेजारच्या प्रवाशाशी 'आज स्टॉक कितना उपर जायेगा?' याची चर्चा करतो. ऑफिसात बॉस आणि सहकाऱ्यांबरोबर फर्मास इंग्रजीत व्यवहार करतो. लंच अवरमध्ये फिल्म फेअर किंवा मिरर वाचतो. बेस्टच्या कंडक्टरशीही न चुकता हिंदीतच बोलतो. संध्याकाळी मुलाचा होमवर्क तपासतो आणि नंतर साँस आणि बहूच्या सिरियल्स बघत झोपी जातो. खरच आपण असे का वागतो बरे,कधी विचार केलाय याचा??


नाही ना ??? मग विचार करण्याची वेळ आली आहे......‌सावधान.


खरेच मुंबईचा मराठीशी आणि मराठी भाषिकांशी संबंध उरलेला नाही का? . हे सारे खरे आहे. त्यापेक्षा महत्त्वाची बाब ही की, मुंबईच्या २२७ नगरसेवकांपैकी बहुसंख्य मराठी भाषिक आहेत. ३४ आमदारांमध्येही बहुसंख्य मराठी आडनावेच दिसतील. सहापैकी दोन खासदार मराठी आहेत. सर्व राजकीय पक्षांचे मुंबईचे अध्यक्ष मराठी आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (सध्या तरी!) आणि महापौरही मराठी आहेत. तरीही या शहराचे मराठीपण हरवले आहे, हे वास्तव मान्य करावे लागते.


आदरणीय शिवसेनाप्रमुख श्रीमान 'बाळासाहेब ठाकरे" यांच्यासारख्या धुरंधर नेत्याची साथ मुंबई करांना लाभली,हेच मुंबईतील मराठी माणसाचे सगळ्यात मोठे भाग्य म्हटले पाहिजे.शिवसेनेच्या रूपाने मराठी माणसाची राजकीय शक्ती उभी राहिली;
मुंबईतून तडीपार झालेल्या मराठी माणसाचे याच शहरात येत्या काही वर्षांत पुनर्वसन झाले नाही, तर २०२५पर्यंत हाच मराठी माणूस मुंबईबाहेर वसई, विरार, पनवेल, कर्जत, उरण, पेण इथे दुसरी मुंबई वसवेल. परागंदा झालेल्या मराठी माणसाबरोबर मुंबईचेही स्थलांतर होईल. तिथे मराठी संस्कृती पुन्हा रुजेल व बहरेल.

पण तेव्हा आताची मुंबई सांस्कृतिक ऱ्हासामुळे शहर म्हणून संपून गेलेली असेल.


हल्ली नाटके चालत नाहीत. थिएटर्सची संख्या वाढली आणि चांगल्या संहिता मिळेनाशा झाल्या, ही त्याची काही कारणे असली, तरी मराठी प्रेक्षक हरवला, हे महत्त्वाचे कारण आहे. मुंबईतील ठिकठिकाणच्या मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमुळे मराठी चित्रपट एका शोसाठी का होईना, प्रदर्शित होतात. पण त्यांना मुंबईत प्रेक्षक मिळणे मुश्कील होऊन बसले. नाटके आणि चित्रपट यांना सरकार आता अनुदान देते. त्यामुळे निर्मात्यांचे खिसे भरले; पण सरकारी अनुदानामुळे प्रेक्षक कसे येणार? मराठी चोखंदळ प्रेक्षक दादर, विलेपार्ल्यातून थेट विरार, वसई, कल्याण, डोंबिवलीपर्यंत फेकला गेला; तर रोजच्या प्रवासाच्या दगदगीतून नाटकासाठी फुरसद कुणाला? मराठी वाचकांचा दुष्काळ आणि चांगल्या साहित्यकृतींचा अभाव हे दुखणे आता जुने झाले. पण त्यावर इलाज सापडलेला नाही.



आपण न चुकता मराठी पेपर वाचतो, कधी मराठी नाटकाला जातो, सणाच्या दिवशी पुरणपोळी, श्रीखंड खातो, गणपतीला धोतर नेसतो आणि रामदासांची 'सुखकर्ता, दु:खहर्ता...' आरती जोरजोरात म्हणतो आणि मुंबईत मराठी माणसाचे काही खरे नाही, असे म्हणत मराठी राजकारण्यांच्या नावाने बोटे मोडतो. मुंबईतील मराठी माणसाचा मराठीशी इतकाच संबंध उरला आहे.

दक्षिण मुंबईतील गिरगाव, मध्य मुंबईतील गिरणगाव, दादर, विलेपार्ले, गोरेगाव या मुंबईतील मराठी माणसाच्या परंपरागत वसाहती. आज परिस्थिती अशी आहे की, यापैकी एखादा अपवाद वगळता कुठेच मराठी माणूस बहुसंख्येने उरला नाही. मराठी साहित्यात गिरगावची मराठी 'चाळसंस्कृती' मानाने आणि थाटात वावरली. आज गिरगावातून मराठी माणूस परागंदा झाला. तिथे परप्रांतीय आले. त्याबद्दल मराठीतर लोकांना दूषणे देणे, हा मराठी माणसाचा आवडता टाइमपास. गिरगावातील चाळींतील घरे मराठी माणसाने कुणाच्या धाकाने रिकामी केली? कुणी त्यांना जबरदस्तीने घराबाहेर काढले? यातले काहीच खरे नाही. मराठी कुटुंबे गिरगावातल्या चाळीतून स्वखुशीने बाहेर पडली आणि डोंबिवली, कल्याण, वसईला स्थलांतरित झाली. त्यांच्या घरांत गुजराती व्यापारी आले. मराठी कुटुंबांनी आपली घरे केवळ कौटुंबिक कलह आणि लाखो रुपयांचा मोह यापायी सोडली. त्याबद्दल इतरांना दोष का द्यायचा?

गिरणगावात १९८२ साली संप झाला आणि मध्य मुंबईची संस्कृतीच बदलली. संपामुळे गिरण्या बंद पडल्या आणि कोकणी चाकरमान्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. गिरण्यांच्या जमिनींवर मॉल, गगनचुंबी इमारती आणि बोलिंग क्लब्ज, डिस्कोथेक्स आले. बेकार गिरणी कामगार गावाकडे गेला आणि त्यांच्यापैकी अनेकांची मुले भाईंना शरण गेली आणि पुढे तीही उद्ध्वस्त झाली. दादरच्या सिद्धिविनायक मंदिरापुढील भक्तांची गर्दी पाहा. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ताटकळणाऱ्या मोटारींच्या ताफ्यातून गणेशाला नमस्कार करण्यासाठी कोण येते? त्यात मराठी माणसे किती? विलेपार्ल्याची उपनगरी मराठी संस्कृती हे मुंबईचे एक अभिमानस्थळ होते. तिथल्या दीनानाथ नाट्यगृहात आता रविवारी रात्रीही ऑर्केस्ट्राचे प्रयोग लागतात. मृणाल गोरेंचा प्रभाव संपला आणि गोरेगावातील सत्त्वशील मराठी संस्कृतीही हटली.
सोने-चांदीच्या पेढी, वसई, नाशिक, जळगावच्या भाज्यांचा व्यापार आणि मासे विक्री हे मराठी माणसाचे हुकमी व्यवसाय. तिथेही कमालीची पीछेहाट. सोने, जवाहिराच्या व्यवसायातील हाताच्या बोटावर मोजता येतील, इतकी नावे वगळली, तर हा श्रीमंती व्यवसाय अन्य भाषिकांच्या ताब्यात केव्हाच गेला. भाजी आणि भय्या हे समीकरण बनल्यालाही आता कित्येक वर्षे लोटली. रत्नागिरीचे हापूस आंबे विकण्यासही दारात भैय्या येऊ लागला आणि आपण बिनदिक्कतपणे त्याच्याकडून हापूस घेऊ लागलो. मुंबईतील मच्छिमार समाज, तिथल्या कोळणी आणि त्यांचे टेचातले वागणे, यावर अनेक चित्रपट आणि नाटकांना विषय मिळाले. ससून डॉक्सपासून ठाण्याच्या खाडीपर्यंतच्या या कोळणी कुठे गेल्या? 'ताजे मासे' जाऊन 'ताजी मछली' कशी आली? केसांवर आणि कपाळावर ओघळणारे बर्फाचे पाणी टिपत बांबूच्या टोपलीतून 'मावरं' आणणाऱ्या कोळणींची जागा अॅल्युमिनियमच्या घमेल्यातून 'मछली' आणणाऱ्या बिहारी मुसलमानाने घेतली आणि त्याच्याकडे मासे स्वस्त मिळतात, यावर आपणही खुश झालो. बिहारींना होलसेलने मासे विकले की, बाजारात दिवसभर बसण्याचे किंवा दारोदार फिरण्याचे कष्ट नकोत, म्हणून मच्छिमारांनीही आपला परंपरागत धंदा विकला.


जी अवस्था मराठी माणसाची, तीच मराठी भाषेची. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी; पण महाराष्ट्राच्या राजधानीत मात्र ती भिकारणीसारखी लक्तरे लेवून दयेची भीक मागत उभी आहे. राज्यकारभाराची भाषा मराठी असली, तरी व्यवहाराची भाषा मात्र हिंदी व इंग्रजी. दुकानांचे बोर्ड मराठीत असायला हवेत असा नियम आहे, म्हणतात. कोलकात्यात, चेन्नई, बंगलोरमध्ये त्या त्या राज्यांच्या भाषांमधले बोर्ड दिमाखात फडकत असतात. मुंबईत मात्र अस्सल मराठी मुलखांतही सारे बोर्ड इंग्रजीत आणि कायद्यातून पळवाट काढण्यासाठी कोपऱ्यात छोट्या अक्षरांत मराठीत. हे असे घडते, कारण आपल्या भाषेबद्दल इथल्या स्थानिक जनतेस आस्था नाही; अभिमान तर नाहीच.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरकारी अनुदान मिळत नाही. त्यामुळे या शाळांची फी दामदुपटीने वा त्याहूनही अधिक असते. पण मुलांच्या भविष्याची काळजी घ्यायची, तर इंग्रजी शाळेची मोठ्ठाली फी भरलीच पाहिजे, अशी मराठी समाजाचीही मानसिकता आहे. इथे इंग्रजीतून शिक्षणाला विरोध करण्याचा हेतू नाही. इंग्रजीतून शिकल्याने आपल्या पाल्यांचे भवितव्य उज्ज्वल होईल, अशी भाबडी आशा ज्यांना वाटते, त्यांनी अवश्य मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत घालावे. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे आणि त्यामुळे जगाची प्रगतीची कवाडे उघडतात, हे एकदम मान्य. पण मुंबईतील मराठी माणूस शिक्षणाची भाषा आणि संस्कृती यांची कमालीची गल्लत करतो. केरळमध्ये इंग्रजी माध्यमातील शाळांचे प्रमाण सर्वाधिक असूनही 'केरळ कौमुदी' आणि 'मल्याळम मनोरमा' या मल्याळी वर्तमानपत्रांचे खप दशलक्षाच्या घरात आहेत. याचे कारण केरळी, तामीळ, बंगाली समाजाने आपली संस्कृती अभेद्य राखली. इंग्रजीत शिकून मुंबई, दिल्ली, दुबई किंवा न्यूयॉर्कमध्ये नोकरी करणारे तामीळ तरुण आजही आईला अम्मा आणि वडिलांना अण्णा म्हणतात, त्याबद्दल मुले वा त्यांच्या पालकांना शरम वाटत नाही. मराठी कुटुंबातील आई-बाबा मात्र केव्हाच इतिहासजमा झाले. त्यांची जागा मम्मी-पप्पांनी घेतली. मूल वर्षभराच्या वयात पहिले बोल बोलायला लागते, तेव्हाच 'आई'ची 'मम्मी' करून आपण त्याची मराठी संस्कृतीशी नाळ तोडली.
खाजगी क्षेत्रात टाटा, गोदरेज या पारशी उद्योग समुहांचा अपवाद वगळता मराठीचे प्रभुत्व केव्हाच नव्हते. पण निदान सरकारी पातळीवर तरी मराठी सनदी अधिकारी होते. स. गो. बर्वे, सुकथनकर, म. वा. देसाई या आणि अशा अनेक ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी नोकरशाहीवर पकड ठेवली. त्यामुळे मराठी संस्कृतीही जिवंत राहिली. आज अशी परिस्थिती आहे की, मुंबईतून कारभार हाकणारे महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, दूरदर्शन केंदाचे प्रमुख, मुंबईचे पोलिस व महापालिका आयुक्त, महानगर टेलिफोनचे जनरल मॅनेजर, म्हाडा आणि एमएमआरडीएचे मुख्य अधिकारी, मुंबईचे कलेक्टर हे सारेच अमराठी. त्यांच्याकडून मराठी जनांचा आणि मराठी भाषेचा उद्धार कसा व्हायचा? सार्वजनिक क्षेत्रातील नोकरशाही अमराठी अधिकाऱ्यांच्या हातात गेल्याने रेल्वेतील भरतीपासून दूरदर्शनच्या कार्यक्रमापर्यंत सर्वत्र मराठीची पीछेहाट होत गेली. यावर आंदोलन हा प्रभावी उपाय असला, तरी आंदोलन करण्याइतकी प्रभावी वृत्ती समाजात असावी लागते. तिचाच अभाव असल्यामुळे नोकरशाहीच्या हुकमतीखाली लोकनियुक्त प्रतिनिधीही दबले गेले. त्याचा परिणाम दिसतोच आहे.
मुंबईत बॉम्बस्फोटांच्या मालिकेने साऱ्या जगाला हादरवले. पण दुसऱ्या दिवशीच शहर पुन्हा पूर्वपदावर आले, त्याबद्दल सर्वांनी मुंबईकरांना सलाम केला. प्रत्यक्षात हे शहर मृत झाल्याचे लक्षण आहे. संस्कृती हरवलेल्या या शहरात शेजार आहे; पण सोबत नाही. घर नंबर आहे; पण घरपण नाही. कोलकाता, बंगलोर, चेन्नई ही महानगरेही बाहेरून आलेल्यांना सामावून घेत आहेत; पण त्यामुळे कोलकात्याचे बंगालीपण, बंगलोरचा कानडी स्वभाव आणि चेन्नईतील तामीळ तरंग आटले नाहीत.
आता प्रश्न मराठी माणसाचा. तो शहर आणि अनेक उपनगरांतून उखडला गेला. कधी गिरण्या, कारखाने बंद पडल्याने; तर कधी व्हीआरएसच्या दुष्टचक्रात अडकल्याने अवेळी रिटायर व बेकार झाला. आता तो बृहन्मुंबईच्या सीमापार विरार-वसई, कल्याण-डोंबिवली-कर्जतपर्यंत विखुरला गेला. जगाच्या इतिहासात असे घडतच राहते. उत्तर आशियातून असेच परागंदा झालेले आर्य भारतात आले. पश्चिम आशियातून उपजीविकेसाठी जमिनीच्या शोधात बाबर भारतात आला. पशिर्यातून पारसी समाज असाच अस्तित्व टिकवण्यासाठी नवसारीला पोहोचला. चीनमध्ये माओ-त्से-तुंगने आपल्या समाजाला वाचवण्यासाठी लाँग मार्च केला. जगभरचे ज्यू इस्त्रायलमध्ये एकमेकांच्या आसऱ्याने राहिले व त्यांनी एक शक्तिमान राष्ट्र उभे केले.

तिला कुणी शांघाय म्हणेल, कुणी पॅरिस, तर कुणी सिंगापूर; तिच्यात मुंबईपण मात्र सापडणार नाही. आम्हाला फ़क्त मराठी माणसाच कल्याण करणारी शिवसेनाप्रमुखांच्या स्वप्नातील "आमची मुंबई"बनवायची आहे.


जय हिंद !!! जय मराठी !!! जय महाराष्ट्र !!!


                                                     _  प्रणयदादा बाळासाहेब बांदल