सकाळची साडेसहा-सातची वेळ, रविवार असूनही फलाटावर चिक्कार गर्दी होती. पण त्या गर्दीची मला मात्र पर्वा नव्हती... कारण त्या दिवशी मी अनेक दिवसांनी - दिवसांनी कशाला अनेक महिन्यांनी, कदाचित अनेक वर्षांनी - एकटीच मुंबईला निघाले होते. म्हणजे, ’प्रवास करणारी एकटी बाई’ या अर्थाने नव्हे तर बरोबर माझा मुलगा नाही, काहीही सामान नाही आणि मुख्य म्हणजे नवरा पण नाही अशी एकटी!!... सडी-फटिंग आणि म्हणूनच एकदम निवांत!! मुंबईला एका लग्नाला निघाले होते. लग्न आटोपून संध्याकाळी लगेच परतायचं होतं, पण तोपर्यंत म्हणजे तब्बल १२-१३ तास मी एकटी असणार होते आणि तीच माझ्यासाठी विशेष उल्लेखनीय गोष्ट होती.