कादवा व गोदावरी या दोन नद्यांच्यामध्ये कादवेच्या कुशीत टेकडीवर वसलेलं माझं जुनं जळगांव फार तर ७०-८० घरांचं असेल, मला ते फारसं आठवतही नाही. कारण माझा जन्मच मुळी आम्ही रानात वस्तीवर राहायला गेल्यावर झाला. गावाशी माझा फारसा संबंध आलाच नाही. जो काही संबंध आला तो शाळेत जाण्यापुरताच, तोही दोनच वर्ष. इतरवेळी फक्त सणासुदीला, कारु-नारुंकडे कामापुरते जाण्याच्या निमित्ताने आला तोही थोडकाच.
आमचं मळ्यात गुऱ्हाळ होतं. त्यामुळे सीझनमध्ये राहण्यासाठी मळ्यात शेड बांधलेलं होतं. जस जसा शेतीचा पसारा वाढला तसं गावात राहून शेती करणं अवघड झाल्यानं मळ्यातच मोठं घर बांधलं.