सुरस आणि चमत्कारिक

ग्रीष्माच्या उग्र सहस्त्ररश्मींनी रुक्ष झालेल्या हिरण्यगर्भा मेदिनीला पर्जन्यधारांच्या सुखद आगमनाची चाहूल लागली होती. नैऋत्येकडून वाहणाऱ्या शीतलक वातलहरी अधिकाधिक प्रबल होऊ लागल्या होत्या. राजमहालाच्या प्रवेशद्वारांवर आणि गवाक्षांवर असलेली कलाबतूपूर्ण रेशीमवस्त्रे वारंवार विचलित होत होती आणि महालातील सुवर्णदीपांमधील दीपशिखा पवनलुप्त होतात की काय असेच वाटत होते.
निशापती महाराजांनी आपल्या हातातील द्राक्षफलांच्या गुच्छातील अखेरचे पुष्ट रसाळ फळ आपल्या ओष्ठांनीच अलग केले. त्यांच्या दंतपंक्तींची आणि कंठमण्याची सूक्ष्म हालचाल झाली. हातातले शुष्क फलदेष्ठ त्यांनी शेजारच्या रिक्त फलपात्रात टाकले आणि आपल्या मृदू करकमलांनी एक तालिकाध्वनी केला.
महालाच्या द्वाराबाहेर अष्टप्रहराच्या कर्तव्यपूर्तीनंतर क्लांत होऊन किंचित्काल आसनस्थ झालेला भ्रातृभजन तडिताघात व्हावा तसा जागृत झाला. महालातला ध्वनी ऐकताच त्याचे मंडूकाप्रमाणे दिसणारे नेत्र तात्काळ प्रज्वलित झाले. स्वतःलाही जाणवणार नाही असा पदरव करीत तो महालात प्रविष्ठ झाला आणि आपले किंचित ताठरलेले पृष्ठ लीन करीत त्याने महाराजांना प्रणाम केला.
"भ्रातृभजना.. "
"आज्ञा महाराज"
"सेनापती पीतप्रतापांचे नगरात आगमन झाले आहे काय? "
"होय महाराज. पश्चिमेकडील स्वारी संपन्न करून सेनापती आज प्रातःकालीच नगरात परतले आहेत. "
"मग ते अद्याप आमच्या दर्शनार्थ कसे उपस्थित झाले नाहीत? "
"महाराज, क्षुद्र मुखी विराट ग्रास घेतो आहे, क्षमा असावी. पण सेनापती पीतप्रतापांचे स्वास्थ्य गतकालातील अखंड कार्यबाहुल्यामुळे किंचित ढळले आहे. गुरुदेव राजवैद्य दल्यप्रवाद यांनी त्यांना काही घटका विश्राम करण्याचे बळ केले आहे. "
" गुरुदेव वैद्यराज? हे काय गूढ आहे भ्रातृभजना? "
"महाराज, वैद्यराज आपल्या गुरुकुलाचेही प्रमुख नाहीत का? तेंव्हा आपल्याला गुरुदेव आणि वैद्यराज या दोन्ही उपाध्यांनी संबोधावे असा त्यांचा आग्रह असतो, महाराज. "
"या कसल्या बाललीला आहेत भ्रातृभजना? पण असो. ते आमचे निष्ठावंत सहकारी आहेत, त्यामुळे असले प्रमाद आम्ही दुर्लक्षित करावे हेच रास्त.  भ्रातृभजना, आमच्या अष्टप्रधान मंडळातील अन्य सदस्यांचे स्वास्थ्य कसे आहे? "
"ईश्वराची कृपा आहे, महाराज. काही दिनांपूर्वी नगरात निर्माण झालेल्या वातचक्रामुळे आपल्या उच्च्तम नगरश्रेष्ठांचे स्वास्थ्य म्लान होते की काय असा किंतु मनी उद्भवला होता. पण आता हे कृष्णनभ दूर झाले आहेत महाराज. "
"भ्रातृभजना, हे सगळे आमच्याच कुशल नेतृत्वामुळे साध्य झाले, हे तुझ्या स्मरणात आहे ना? "
"याचे मला कसे विस्मरण होईल महाराज? आपण स्वतःच मला ते निदान अष्टशत वेळा कथन केले आहे महाराज. "
"आमच्यासारखे सम्राट असल्यामुळेच या नगराची प्रतिष्ठा नित्यदिनी गगन चुंबू पाहत आहे, हे तू जाणतोस ना भ्रातृभजना? "
"होय महाराज. "
"आमच्यासारखा मुत्सद्दी, कलासक्त, दूरदर्शी आणि कर्तबगार अन्य कोणी सम्राट तुझ्या पाहण्यात आहे काय? "
"नाही महाराज. "
"इतर कोणाच्या पाहण्यात?"
"नाही महाराज. या प्रश्नाचे 'होय' असे उत्तर देणाऱ्या सर्वांचा आपल्या आज्ञेनुसार शिरच्छेद करण्यात आला आहे महाराज. "
"संतोष. परम संतोष. "
निशापती महाराजांचे नयन आकुंचित होऊ लागले. अधोउर्द्व अवस्थेतले त्यांचे शरीर हळूहळू धरणीसमांतर होऊ लागले. तृणधान्यांचे पिष्टीकरण करणाऱ्या संयंत्राच्या ध्वनीप्रमाणे भासणारा एक ध्वनी महालात अखंड गुंजारव करू लागला. गुलाबपुष्पांच्या शय्येवरून मार्गक्रमणा करावी तसा भ्रातृभजन महालाच्या बाहेर पडला. राजदालनाचे भव्य द्वार त्यांने कोमलपणाने ओढून घेतले.

गर्द हिरवाईतील श्री केशवराज

"घर सोडा घर आणि जरा बाहेर निघा, जग किती सुंदर आहे थोडं तरी बघा"
परदेश राहिला दूर तरी देश आपला छान, किती रंग! कसे रूप! पाहुनी हरते भान. "

लहानपणी वाचलेल्या शांता शेळके यांच्या कवितेचा अर्थ आता पूर्णपणे समजू  लागला आहे. भटकंतीची आवड ज्यांना लागली आहे त्यांना "घर सोडा" असे सांगावे लागत नाही. त्यांची पाऊले आपोआपच बाहेर वळतात. डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टींचा फायदा उचलत आम्ही दापोली भटकंतीचा कार्यक्रम आखला. तालुक्याचे ठिकाण असलेले हे शहर थंड आणि आल्हाददायक वातावरणामुळे "कोकणचे महाबळेश्वर" म्हणून ओळखले जाते. सुप्रसिद्ध कोकण कृषी विद्यापीठ असलेल्या ह्या शहरास विलोभनीय समुद्रकिनारे, किल्ले, प्राचीन लेणी यांची साथ लाभली आहे. कोणीही ह्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडावे असा हा परिसर. कोकणचा कॅलीफोर्निया जेव्हा होईल तेव्हा होईल पण कॅलीफोर्नियाला "टफ" द्यावे असे निसर्गसौंदर्य कोकणचे नक्कीच आहे. अशा या दापोली शहरास भेट दिली आणि कायम स्मरणात राहिले ते आसुद येथील "श्री केशवराज मंदिर आणि तेथील परिसर".

परतफेड -२

तू एक प्रतिष्ठित, यशस्वी व्यावसायिक. छोटासा सुखी संसार. एका बेसावध क्षणी तुझे पाऊल घसरते. त्या मोहाच्या क्षणातून जन्माला आलेला तुझा मुलगा. परिस्थितीच्या पिरगाळ्यातून तुला त्याला घरी आणावे लागते. तुझा संसार या वादळाने उध्वस्त व्हायला आलेला आहे. एका रात्री हा छोटा मुलगा घरातून गायब होतो. त्याला शोधायला रस्त्यावर तुझी तगमग होते आहे. मुलगा कुठेच दिसत नाही. तुझा मित्र तुला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतो.   संवेदनाहीन मद्दड पोलीस इन्स्पेक्टर. तुझी -एका बापाची- अस्वस्थ घालमेल, मुलाचे वर्णन तू सांगतोस...
"बापका नाम? " इन्स्पेक्टर.
"बापका नाम लेकर क्या करेंगे आप? बच्चा मिलनेपर उसे बापका नाम पूछेंगे? " तुझा संताप अनावर
"बापका नाम? "  पोलीस इन्स्पेक्टर थंड.
"डी. के. मल्होत्रा" तू खालच्या आवाजात म्हणतोस.
"जरा जोरसे बोलिये.. "
"डी. के. मल्होत्रा... सुनाई नही देता क्या आपको? डी. के. मल्होत्रा! "  तू संतापाने फुटून टेबलवर मूठ आपटतोस. एका अगतिक, हताश बापाची कैफियत...

अनिल विश्वास यांचा पाचवा स्मृतिदिन

हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील एक महान संगीतकार, श्री. अनिल विश्वास, यांचा आज पाचवा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

     १९३५ साली 'बालहत्या' या चित्रपटाचे संगीतकार मधुलाल दामोदर मास्टर ह्यांचे सहायक म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्याच वर्षी 'भारत की बेटी' या चित्रपटाचे संगीतकार झंडे खान यांचेही ते सहायक होते. यानंतर आला तो संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला स्वतंत्र चित्रपट 'धर्म की देवी' (१९३५). तीस वर्षाच्या देदीप्यमान कारकीर्दीत त्यांनी जवळ-जवळ ८० चित्रपटांसाठी संगीत दिले. त्यांचा शेवटचा चित्रपट होता 'छोटी छोटी बातें' (१९६५). 'औरत' (१९४०, मदर इंडियाची मूळ आवृत्ती), 'किस्मत' (१९४३), 'गजरे', 'अनोखा प्यार' (१९४८), 'लाडली', 'जीत', 'गर्ल्स् स्कूल' (१९४९), 'तराना', 'आराम' (१९५१), 'दो राहा' (१९५२), 'वारिस' (१९५४), 'जलती निशानी' (१९५५) या चित्रपटांचे संगीत त्यांच्या उत्तुंग प्रतिभेची साक्ष देते. मुकेश व तलत महमूद या गायकांना पुढे आणण्यात अनिल विश्वास यांचा मोलाचा वाटा होता. दूरदर्शनवरील आद्य महामालिका, 'हम लोग', हिचे संगीतही अनिल विश्वास यांचे.

एक अभिनव "रेकॉर्ड-ब्रेक" प्रयोग!! (नव्हे-"रेकॉर्ड-ब्लेड")

ग्रामोफोनची रेकॉर्ड घ्या. सारख्या गतीने फिरवा. हातानेच. ईलेक्ट्रीक सप्लाय व स्पीकरचे कनेक्शन काढून टाका. ग्रामोफोनच्या नेहेमीच्या सुई ऐवजी, दाढीला वापरतो त्या ब्लेडचे एक टोक त्यावर ठेवा. रेकॉर्ड नेहेमीच्या सुलट्या दिशेने फिरवा. ब्लेडजवळ कान न्या. (सांभाळून बरं!) ब्लेडमधून गाणे ऐकू येते. अर्थात वीज नसली तरी!

ऊर्जेचे अंतरंग-१३

ऊर्जेचे अंतरंग-१३: ऊर्जेच्या गरजेची विस्तारती क्षितिजे

आपली स्थापित वीजनिर्मितिक्षमता आणि वर्तमान पंचवार्षिक योजनेदरम्यान (२००७-२०१२) त्यात आपण घालणार असलेली भर खालील तक्त्यात दाखवलेली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचा, जानेवारी २००८ मध्ये, असा दावा आहे की २०१२ मध्ये खालीलप्रमाणे स्थापित क्षमतेत भर पडल्यास आपल्या ऊर्जाविषयक गरजा पूर्णपणे पुरवता येतील.

मेणबत्त्या

सलीलचे हे इंजिनियरिंगचे महत्त्वाचे वर्ष होते, पण तो अभ्यास करायला नेहमीच नाखूष असे. पहाटे उठून करतो असे म्हणून रात्री लौकर झोपायचे, आणि आज रात्री उशीरापर्यंत बसून करतो म्हणून सकाळी उशीरा उठायचे असा त्याचा नेहमीचा क्रम होता.  आईचा (छुपा) पाठिंबा असल्याने तो फारच शेफारला होता.  आणि झोपेच्या बाबतीत तर तो एकदम कुंभकर्ण होता. एकदा झोपला की झाले.

मुद्रिका रहस्य

ख्यातनाम हिंदी साहित्यिक शरद जोशी यांच्या कथेचे हे स्वैर भाषांतर आहे.

त्या दिवसांत विक्रमदित्याच्या दरबारात येऊन-जाऊन कायम कवी कालिदासाबद्दलच बोलले जात असे. 'शाकुंतल'च्या प्रकाशनाची तयारी सरकारी पातळीवर सरकारी पद्धतीने चालू होती. श्लोकांचा उच्चार, अर्थ आणि रस यावरून दिवस नि दिवस कर्मचारीमंडळी कलकलाट करीत बसत. विक्रम राजाला तेव्हा काही काम नव्हते. परमशत्रू शक पराजित झालेले होते, आणि सातवाहनांचा उदय झालेला नव्हता. इकडे-तिकडे सेना पाठवून तो एक बरासा चक्रवर्ती झालेला होता, आणि बर्याच दिशांना 'पृथ्वीचा स्वामी' म्हणून गाजत होता.

नियमांस धरून... (२)

'जागतिक'च्या लोकआवृत्तीचे प्रकाशन कर्णिकांच्या घरी एका साध्या समारंभात झालं तेव्हा तिथं उपस्थित असलेल्यांपैकी एकट्या विश्वनाथ देसायांनाच कर्णिकांच्या प्रकृतीची कल्पना होती. डायलिसीस सुरू होऊल चौदा महिने होत आले होते. मधल्या काळात कर्णिकांच्या या नव्या कादंबरीनं यशाची नवी शिखरं गाठली होती. केवळ खप म्हणून नव्हे; तिनं चर्चेतही भर टाकली होती. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतरचा एकही महिना असा गेला नव्हता की, जेव्हा या कादंबरीच्या अनुषंगानं समाजगटांमध्ये चर्चा झाली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर लोकआवृत्तीच्या प्रकाशनाचा सोहळा संपल्यानंतर कमलताईंचा निरोप घेण्यासाठी नाडकर्णी स्वयंपाक घरात गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची खिन्नता त्यांच्यातील संपादकाच्या नजरेनं बरोबर टिपली.
"वहिनी, इतका सुरेख कार्यक्रम झाल्यानंतरही तुम्ही अशा खिन्न का?"
"..." कमलताईंनी नुसतंच त्यांच्याकडं पाहिलं. ते मौन पुरेसं बोलकं होतं. काही तरी घडतंय हे निश्चित, हे नाडकर्ण्यांच्या ध्यानी आलं. डायनिंग टेबलावरची एक खुर्ची ओढून त्यांनी बैठक मारली आणि बाहेर देसायांना हाक मारली. ते आत आले आणि काही काळातच नाडकर्ण्यांसमोर चित्र स्पष्ट झालं.
आरंभी महिन्याला एकवार करावं लागणारं डायलिसीस आता आठवड्याला एकदा करावं लागत होतं. पेन्शन आणि लेखनाचं मानधन यांच्या जोरावर आर्थिक आघाडी सांभाळली जात असली तरी इथून पुढं ती किती निभावली जाईल याची चिंता करण्याची वेळ आली होती. कर्णिकांनी आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेत काम केलं असल्यानं त्यांना मिळणारी पेन्शन विदेशी चलनातील असली तरी आधीची बचत आता संपत आली होती. यापुढं महिन्याचा खर्च दर महिन्याच्या पेन्शनमधूनच भागवावा लागणार हे दिसत होतं. कमलताईंची घालमेल होत होती. विषय काढला की, कर्णिक लगेचच "आपल्यापुढं खाण्याची चिंता तर निर्माण झालेली नाही ना?" असं विचारून त्यांना गप्प करत. वर "मला हात पसरायचे नाहीत. तुझी सोय आहे. त्याची चिंता करू नकोस," असंही सांगत; त्यामुळं कमलताईंना बोलणं अशक्य व्हायचं. पण या विषयाची तड लावावी लागेल आणि ऐकतील तर फक्त देसायांचं हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. अनायासे नाडकर्ण्यांच्या समोर हा विषय खुला झाला आणि त्यांच्या मनावरचं मणामणाचं ओझं एकदम हलकं झालं.
---
सगळा हिशेब केल्यावर जेव्हा देसायांनी दाखवून दिलं की, केवळ पेन्शनवर आयकराची सूट मिळाली तरी, डायलिसिसचा खर्च भागवून नियमित निर्वाहही स्वबळावर शक्य आहे तेव्हा कुठं दरवाजा थोडा किलकिला झाला. हात पसरायचे नाहीत हा कर्णिकांचा हट्ट मोडून काढणं एकट्या देसायांना शक्यही नव्हतं. नाडकर्ण्यांचं वजन कामी आलं.
"आपण एक करू. अर्थमंत्र्यांना सांगू. विदेशी चलनात मिळणाऱ्या पेन्शनवरील आयकर माफ करण्याची तरतूद काही विशिष्ट संस्थांसाठी आहे. त्याच चौकटीचा आधार घेत तुमच्या पेन्शनवरील आयकर माफ केला जावा अशी व्यवस्था करण्यासाठी त्यांना सांगू. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या डिस्क्रिशनरी पॉवर्समध्ये ते बसते," नाडकर्ण्यांनी सांगितलं तेव्हा कर्णिकांना मान डोलावण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. पुढच्याच आठवड्यात डायलिसीसचा पुढचा कोर्स आखावा लागेल, असं गोडबोल्यांनी सांगून ठेवलं होतंच.
---
नाडकर्ण्यांनी दिल्लीला सुधीरला फोन केला तेव्हा तो बाहेर पडण्याच्या तयारीतच होता. नाडकर्ण्यांच्या वृत्तपत्राचा विशेष प्रतिनिधी म्हणून राजकीय वर्तुळात उठबस असल्यानं पटेलांपर्यंत त्याला पोचता येणार होतं.
"बाहेर फारसं कुठं काही कळता कामा नये. कर्णिकांवर डायलिसीस सुरू आहे. पैशांची तजवीज आत्तापर्यंत पेन्शनमधूनच झाली आहे. पण यापुढं थोडं अवघड आहे..."
पलिकडं सुधीर सुन्न झाला असावा. नाडकर्ण्यांना ठाऊक होतं की, सुघीरच्या पिढीवर कर्णिकांचा प्रभाव मोठा होता. केवळ कादंबऱ्या आणि नाटकं यामुळं नव्हे किंवा कर्णिकांच्या विनोदी कथांमुळंही नव्हे. सुधीरसारख्यांवर खरा प्रभाव होता तो कर्णिकांच्या विपुल राजकीय उपहासात्मक लेखनाचा. बाईंची राजवट आणि त्यानंतर आघाडी या गोंडस नावांखाली झालेल्या खिचड्यांच्या प्रयोगांनी कर्णिकांची लेखणी इतकी फुलवली होती की त्या काळात कर्णिक हे गंभीर वृत्तीचे कादंबरीकार आणि नाटककारही आहेत हे विस्मृतीतच गेल्यासारखं झालं होतं. पुढं देशानं धार्मिक आधारावरचं धृवीकरण अनुभवलं तेव्हाही त्या राजकारण्यांची खिल्ली उडवण्यात कर्णिक आघाडीवर होतेच. सुधीरच्या पिढीवर या साऱ्याचा प्रभाव जबरदस्त होता.
"पार्सलमधून अर्ज पाठवतो आहे. पटेलांशी बोलून ठेव. उद्या त्यांच्या हाती अर्ज देता येईल असं पहा," नाडकर्ण्यांनी सांगितलं. सुधीरनं होकार भरला. "बाकी काय घडामोडी आहेत?" नाडकर्णी कामाकडं वळले.
"विशेष काही नाही. आज चव्हाणांची प्रेस आहे. रुटीन. कॉमर्स मॅटर्स. शिंदे बहुदा आज येथे येताहेत, त्यांचं पहावं लागेल." प्रदेशाध्यक्षांच्या या दिल्लीवारीत तसं विशेष काही नव्हतं. पण बातमी म्हणून तेवढी घडामोड पुरेशी होती.
"तो येईल आणि परतेल. त्यातून काहीही होणार नाही," नाडकर्ण्यांनी नेतृत्त्वबदलाच्या हालचालींबाबतची त्यांची नापसंती व्यक्त केली आणि फोन बंद केला.
---
"कर्णीकांची मराठी मनावर मोहिनी आहे. वन ऑफ द स्टॉलवर्ट्स ऑफ हिज जनरेशन..." नॉर्थ ब्लॉकमध्ये सुधीरनं पटेलांना गाठून कर्णिकांचा अर्ज त्यांच्या हाती ठेवला. सुधीरसारख्या पत्रकारानं पुढं केलेला अर्ज. त्यामुळं पटेलांनी शांतपणे ऐकून घ्यायला सुरवात केली. कामाचं स्वरूप सांगून झाल्यानंतर सुधीर कर्णिकांचं मोठेपण सांगू लागला तेव्हा स्टॉलवर्ट्स या शब्दानंतरच पटेलांनी त्याला रोखलं.
"इफ इट्स जेन्युईन, वील डू इट. आय नो यू आर नॉट गोईंग टू पुट इन अ वर्ड फॉर एनीबडी..."
"नो सर, इन फॅक्ट, त्यांच्यासाठी शब्द टाकावा इतका मी मोठा नाही. त्यांच्यासारख्यांचं माझी पिढी एक देणं लागते म्हणून..."
"ओह, आय अंडरस्टॅंड. वील डू इट. फॉलोअप ठेव. पांडे वील सी इट थ्रू. आय'ल टेल हिम टू टॉक टू यू" पांडे हा पटेलांचा सचिव. पटेलांनी तिथंच अर्जातील आवश्यक त्या मजकुरापाशी खूण करून शेजारी 'ए' असं इंग्रजीतील अक्षर लिहिलं. खाली शेरा टाकला, "प्रोसेस अकॉर्डिंग टू रूल्स." सुधीरच्या खांद्यावर थोपटत पटेलांनी शेजारीच उभ्या असलेल्या खासदारांकडं मोर्चा वळवला.
---
पंधरवडा उलटून गेला तरी पांडेचा काहीच निरोप न आल्यानं अस्वस्थ झालेल्या सुधीरनं ठरवलं की, प्रत्यक्ष पहायचं. "यू नो सुधीर. सरांनी मार्क केलं आहे त्या अर्जावर. पण त्यांना सगळं कसं नियमांनुसार लागतं. त्यामुळं प्रोसिजरली तो अर्ज प्रोसेस केला जातोय. अॅट प्रेझेंट, अ नोट इज बीईंग प्रिपेअर्ड ऑन दॅट. आय'म ऑल्सो फॉलोईंग इट अप. मी पाहीन तो लवकर जॉईंट सेक्रेटरी आणि सेक्रेटरीकडं कसा जाईल ते."
---
सरकारी काम आणि सहा महिने थांब, असं सुधीर नेहमी म्हणायचा. त्याचा अनुभव असाही प्रत्यक्ष स्वतःला घ्यावा लागेल हे मात्र त्याच्यालेखी नवं होतं. महिन्यानंतर त्यानं पुन्हा अर्जाची चौकशी केली तेव्हा तो कर विभागाच्या सचिवांपर्यंत पोचला होता इतकंच त्याला कळलं. बजेटची तयारी सुरू असल्यानं आता पटेलांची भेट मिळणं मुश्कील होतं. त्यामुळं त्यानं कर्णिक कोण, हे काम होणं कसं आवश्यक आहे वगैरे पांडेच्या डोक्यावर बिंबवण्याचा जोरदार प्रयत्न केला. "मी समजू शकतो. पण सरांची कामाची पद्धत तुला मी सांगण्याची गरज नाही. ती वेलनोन आहे." पांडेच्या या विधानांवर सुधीर किती नाही म्हटलं तरी संतापला होताच. तरीही त्याला आवर घालत त्यानं, "पांडेजी, यहा दिल्लीमें प्रोसेस एक्स्पडाईट भी होती है ना. अशी किती उदाहऱणे देऊ तुम्हाला?" त्याच्या या प्रश्नावर पांडेनं आपल्या वाणीत मिठास आणत, "आय'ल पर्सनली एन्शुअर दॅट इट ईज डन विदिन अ वीक,"असं सांगितलं.
आठवड्यात पुन्हा फॉलोअप घेण्याचं दोघांचंही ठरलं.
---
"निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळणारे पैसे जनकल्याणाच्या योजनांवर खर्च केले जात असल्यानं त्याला विरोध करण्याचं कारण नाही. किंबहुना यासंबंधी सरकारची बांधिलकी स्पष्ट व्हावी म्हणून निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांपैकी २५ टक्के रक्कम तात्काळ लोककल्याणाच्या योजनांसाठी, २५ टक्के रक्कम शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील पायाभूत संरचनांसाठी वापरण्याचे बंधन टाकणारी तरतूद यासंबंधीच्या कायद्यात केली जाणार आहे. याच अधिवेशनात त्यासंबंधीचे दुरूस्ती विधेयक मांडले जाईल," अशी घोषणा अर्थसंकल्पाच्या भाषणात पटेलांनी केली तेव्हा लोकसभेत बाके दणाणली. अर्थसंकल्प मांडल्यानंतर दूरचित्रवाहिन्यांवर त्यांचा प्रफुल्ल चेहरा झळकत होता. अर्थकारणाला आणखी एक महत्त्वाचे वळण देणारा निर्णय, अशी त्यांच्या या निर्णयाची वाखणणी सर्वत्र होत होती. निवडणुकांचे पडघम वाजू लागले होते.
---
दुसरा अर्ज करण्यास किंवा स्मरणपत्र पाठवण्यास कर्णिकांनी नकार देऊन दोन महिने झाले होते. डायलिसीस आता आठवड्यात दोनदा करण्याची गरज होतीच, पण ते आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यानं एकदाच करावयाचं, असं त्यांनी डॉ. गोडबोल्यांना सांगून टाकलं होतं. कमलताईंच्या डोळ्याला धार लागायचीच बाकी होती. अस्वस्थ देसाई आणि नाडकर्णी यांनीही कर्णिकांच्या निर्धारापुढं हात टेकले होते. पण त्यांनी त्यांच्या पातळीवर सुधीरकडून पाठपुरावा सुरू ठेवला होता. नाडकर्ण्यांनी एरवीची त्यांची चौकट बाजूला सारून राज्यातील तिन्ही केंद्रीय मंत्र्यांशी बोलणं करून पाठपुरावा करण्यास सांगितलं होतं. आश्वासनं मिळाली होती; पण त्यातून किती यश येईल याची त्यांना खुद्द खात्री नव्हती. कारण हे तिन्ही मंत्री आणि पटेल यांचा स्तरच अतिशय भिन्न होता.
---
पुणे (प्रतिनिधी) - ज्येष्ठ साहित्यीक राधाकृष्ण कर्णिक यांचं आज दीर्घ आजारामुळं निधन झालं. मराठी मनावर गेली तीस वर्षे अधिराज्य करणाऱ्या या साहित्यीकाच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे...
...पंतप्रधान श्री कांत आचार्य यांनी कर्णिकांच्या 'जागतिक' या कादंबरीचा उल्लेख करून श्रद्धांजली वाहताना सांगितलं की, कर्णिकांसारख्या अर्थतज्ज्ञाची नाळ त्यांच्या साहित्यविषयक जाणिवांमुळे लोकांमध्ये पक्की रुजलेली होती...
---
अंत्यसंस्कार करून देसाई, नाडकर्णी वगैरे मंडळी कर्णिकांच्या घरी परतली, तेव्हा गेटवरच पोस्टमननं सावधपणे देसायांना बाजूला घेतलं.
"अण्णांसाठी आलेलं पत्र आहे. आत जाऊन देऊ शकणार नाही..." त्यालाही भावनावेग आवरत नव्हता. देसायांनी त्याच्या खांद्यावर थोपटत पाकिट हाती घेतलं. यू.जी.आय.एस.चा शिक्का त्यावर होता. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ही अक्षरं देसायांच्या पाणावलेल्या डोळ्यांनाही नीट दिसली. देसायांनी पाकिट फोडलं. कागद उघडला. राधाकृष्ण कर्णिक यांची साहित्यसेवा ध्यानी घेऊन त्यांना विदेशी चलनात मिळणाऱ्या निवृत्तीवेतनावरील आयकर माफ करण्यात येत असल्याचा निर्णय झाला असल्याची माहिती त्यात संदर्भ क्रमांक आणि तारखेसह देण्यात आली होती. प्रत पुण्याच्या मुख्य आयकर आयुक्तांना पाठवल्याचा उल्लेख होता. खाली सचिवांचा शेरा होता, पुण्याच्या आयकर आयुक्तांशी संपर्क साधण्याचा.
---
"मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःस्पृहपणे, तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन."
"मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, संघराज्याचा पंतप्रधान म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीजकरून एरव्ही मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही."

नियमांस धरून... (१)

एनडीटीव्ही आणि आयबीएनवर १७० अधिक ५२ असा आकडा आला तेव्हा माधवेंद्र सिन्हांच्या चेहऱ्यावर किंचीत स्मितरेषा उमटली. पण त्यांना पूर्ण खात्री नव्हती. नेमक्या याचवेळी आतमध्ये एसकेंकडचे म्हणजेच श्री कांत आचार्यांकडचे आकडे काय असतील, हे सांगणं मुश्कील होतं. आचार्यांचे कॉण्टॅक्ट्स ध्यानी घेता, ते वेगळे असण्याची शक्यता अधिक होती. शिवाय या दोन्ही चॅनल्सचा कल त्यांना पक्का ठाऊक होता. त्यामुळं त्यांनी एक सावध निर्णय घेतला. 'आजतक'कडे ते वळले. तिथं १६५ अधिक ५० असे आकडे होते. म्हणजेच येऊन - जाऊन ७ जागांचा फरक होता. क्षणभर त्यांनी काही विचार केला आणि त्यांची पावले आतल्या खोलीकडे वळली.
"या," आचार्यांनी त्यांचं स्वागत केलं. "काय म्हणतेय परिस्थिती?"
"आकडे स्पष्ट आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युवर न्यू रिस्पॉन्सिबिलिटी सर. अॅज ऑफ नाऊ वी आर क्लोज टू २२५. आणखी ७५ पर्यंतची जमवाजमव झाली की वी वुड बी सेफ अँड स्टेबल."
"आर यू शुअर?" आचार्यांचा हा प्रश्न केवळ खुंटी हलवून बळकट करून घेण्यासाठीच आहे, हे माधवेंद्रांना पक्कं ठाऊक होतं.
"शुअर. इव्हन इण्टिलिजन्स फिगर्स आर नॉट एनी डिफरण्ट. आपल्या अंदाजापेक्षा आपण कमी आहोत. पण या घडीला, गिव्हन द रिसोर्सेस अव्हेलेबल विथ चॅनल्स, हाच ट्रेंड चालू राहील, असं दिसतंय."
आचार्यांचा चेहरा खुलला. त्यांनी सकाळीच माधवेंद्रांना सांगून ठेवलं होतं. ज्या क्षणी आपण २२० च्या पुढं सरकतो आहोत, असा अंदाज येईल तेव्हा आपण मंत्रिमंडळाची रचना निश्चित करण्यासाठी बसायचं. त्यासाठी यादी सुरू करा आणि आकड्यांवर लक्ष ठेवा, अशी त्यांची सूचना होती. आचार्यांनी या काळात इतर पक्षांशी बोलणं सुरू केलं असणारच हे माधवेंद्रांना ठाऊक होतंच. त्यामुळं त्यांनी केवळ आचार्यांकडं पाहिलं.
"येस, शुअर, वी कॅन स्टार्ट नाऊ." आचार्यांचा सूर आश्वासक होता. त्याअर्थी सरकार आपणच बनवतो आहोत याची त्यांना पक्की खात्री झाली आहे, हेही स्पष्ट झालं.
"थ्री एरियाज आय वॉण्ट यू टू फोकस. परराष्ट्र, अर्थ आणि वाणिज्य. या तिन्ही क्षेत्रात आपल्याला बरेच नवे निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्या नेहमीच्या मंडळींचा फारसा उपयोग नाही. आय वॉण्ट प्रोफेशनल्स." आचार्यांनी चौकट समोर मांडली. त्या चौकटीतच माधवेंद्रांना नावं द्यावी लागणार होती.
"शुअर सर." ते म्हणाले आणि पुढच्याच क्षणी आचार्यांचा खमका आवाज आला.
"वेल, या तिन्ही बाबींमध्ये स्वातंत्र्यावेळी होती, तशीच परिस्थिती आत्ताही आहे. स्थित्यंतराचा उंबरठा. इतिहास आपल्याला शिकवतो, माधवेंद्र. परराष्ट्र हे आता मीच हाताळावं. कॉमर्स इज इम्पॉर्टण्ट, बट, तिथं अर्थ खात्याच्या धोरणांची चौकट असतेच. तेव्हा त्याचाही प्रश्न नाही... अॅण्ड यस, नो नीड टू सर मी. जस्ट कॉल एसके. वी आर वर्किंग ऑन अ डिफरण्ट लेव्हल नाऊ."
आचार्यांचं हे एक खास वैशिष्ट्य होतं. त्यांना ही अनौपचारिकता शोभायचीही. त्यांचा उल्लेख राजकीय वर्तुळात अत्यंत आदरानं आचार्य असाच व्हायचा. केवळ ते त्यांचं आडनाव होतं म्हणून नव्हे तर त्यांच्यातील स्थितप्रज्ञताही त्याला कारणीभूत होती. मुरलेले राजकारणी असल्यानं त्यांनी आपल्या कामकाजात व्यावसायिक स्तरही जपलेला होता. ते अर्थ मंत्री होते तेव्हा त्यांचा आणि माधवेंद्रांचा संबंध आला. तो पुढं दृढ होत गेला. माधवेंद्र नोकरशहा. पण त्यांची कामकाजाची ब्युरोक्रॅटिक न होणारी, व्यावसायिक पद्धत आचार्यांना आवडली आणि ते त्यांच्या आस्थापनेचा एक भाग होऊन गेले. देशाचं नेतृत्त्व करण्याची संधी समोर आली तेव्हा आचार्यांना मुत्सद्दी सल्लागार म्हणून आधी आठवण झाली ती माधवेंद्रांचीच.
परराष्ट्र आणि वाणिज्य या दोन खात्यांसाठी माधवेंद्रांना फारसं काही करावं लागलं नाही. आचार्यांच्या डोक्यात होती तीच नावं माधवेंद्रांनीही ठरवली होती. परराष्ट्र खातं स्वतः आचार्यांकडंच आणि वाणिज्य खातं दिग्वीजय चव्हाण यांच्याकडं जाणार हे निश्चित झालं. प्रश्न होता अर्थ खात्याचाच. माधवेंद्रांनी त्यांच्या मनातली नावं मांडली.
"लुक माधवेंद्र, पटेल, ठाकूर आणि सेन या तिन्ही नावांना माझा तसा आक्षेप नाही. पण..."
त्यांना मध्येच थांबवत माधवेंद्र म्हणाले, "तिघांनाही पॉलिटकल बॅकग्राऊंड नाही. एक तर नोकरशाही किंवा अभ्यासक. त्यामुळं..."
आता त्यांना तोडण्याची वेळ आचार्यांची होती.
"लॅक ऑफ पॉलिटिकल स्किल वुईल नॉट बी अ हॅंडिकॅप. इन फॅक्ट, मला तसंच कोणी तरी हवंय. हाऊएव्हर, ती व्यक्ती आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांपुढं न झुकणारी हवी. कारण आपण जी पावलं उचलू त्यातून निर्माण होणारी ताकद ही त्या व्यक्तीमागं असेल. त्या जोरावर त्या संस्थांनाही काही गोष्टी ठणकावून सांगण्याची धमक त्या व्यक्तीमध्ये हवी. तिनं तसं न करणं हे आपल्याला पॉलिटिकली महाग ठरू शकतं. तेव्हा अशा प्रसंगी तिच्यामध्ये नसलेल्या राजकीय कौशल्यांचा भाग आपण सांभाळून घेऊ. द फेलो शुड हॅव थ्रू अँड थ्रू अंडरस्टॅंडिंग ऑफ व्हॉट ईज हॅपनिंग हिअर, आऊटसाईड अँड व्हॉट वी नीड टू डू. ही शुड बी स्ट्रॉंग ऑन द फण्डामेण्टल्स ऑफ व्हॉट वी आर डुईंग."
"इन दॅट केस, सेन इज आऊट ऑफ क्वेश्चन. ही लॅक्स गट्स. ही इज अ मॅन ऑफ अॅक्शन, बट फाल्टर्स व्हेन द नीड ऑफ स्पिकींग आऊट अरायझेस. वी नीड अ मॅन हू इज मास्टर इन बोथ द एरियाज. पटेल अँड ठाकूर फिट द बील." माधवेंद्र म्हणाले.
"ठाकूर... नो. नॉट अॅट ऑल. रिझर्व्ह बॅंकेतील डोसियर अजून कुठं तरी असेल. नको. टॉक टू पटेल. हाऊएव्हर, हीज हँडिकॅप इज दॅट ही समटाईम्स टेण्ड्स टू बी टू ब्यूरोक्रॅटिक. असो, आपण पाहून घेऊ"
---
"मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःस्पृहपणे, तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन."
"मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, संघराज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीजकरून एरव्ही मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही."
---
ईश्वरदास पटेलांनी अर्थ खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतरच्या दुसऱया वर्षात भविष्यातील महासत्ता असा देशाचा उल्लेख प्रथमच झाला . त्याचदिवशी संध्याकाळी राधाकृष्ण कर्णिक यांचा साठीनिमित्त पुण्यात सत्कार झाला. वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या चतुरस्र साहित्यिकाची साठी झोकातच झाली. बालगंधर्व रंगमंदीर ओसंडून वहात होतं. अनपेक्षितपणे आलेला हा श्रोतृसमुदाय संयोजकांना चकीत करून गेला. कर्णिकांचं कर्तृत्त्व मोठं होतं; मात्र गेल्या काही काळात एकूणच वाचन, ग्रंथव्यवहार याविषयी आलेल्या औदासिन्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला झालेली गर्दी विलक्षण ठरली होती. ऐनवेळी बालगंधर्वच्या पटांगणात क्लोज सर्किट टीव्हीची सोय करावी लागावी आणि कार्यक्रमानंतर तिथं होणाऱ्या नाटकाचा प्रयोग पाऊण तासानं लांबणीवर टाकावा लागावा यातच सारं काही यावं.
"भरून पावलो आज," कर्णिकांनी श्रोतृसमुदायाच्या काळजाला हात घालायला सुरवात केली. बदलता समाज, साहित्यात त्याच्या प्रतिबिंबांचा अभाव, एकीकडे समृद्धी आणि दुसऱ्या बाजूला विपन्नता, आर्थिक-राजकीय धोरणांचा अटळ परिणाम अशा मुद्यांचे विवेचन करता करता त्यांनी 'विकास, विकास म्हणतोय तो नेमका कोणता' असा सवाल केला तेव्हा समोरच्या रांगातील उजव्या कोपऱ्यात अनेकांनी एकमेकांकडं अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं होतं. एका आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेमध्ये प्रदीर्घ काळ विश्लेषक म्हणूनही कर्णिकांची कारकीर्द गाजलेली होती. देशातील मिश्र अर्थव्यवस्था आणि या संस्थेच्या भूमिकेतीलच खुलेपणाचा आग्रह या वातावरणात त्यांनी मांडलेल्या काही भूमिका चर्चिल्याही गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा सवाल त्या कोपऱ्यामध्ये हालचाल माजवून गेला यात नवल नव्हतं.
कर्णिक सत्काराच्या मुद्यावर आले. "खरं तर मी अशा कार्यक्रमांच्या विरोधात आहे. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद वगैरेंच्या फंदातही मी पडलो नाही. कारण अशावेळी माणूस आधी बोलतो, मग बडबडतो आणि नंतर बरळतो, असंच मला वाटत आलंय. पण आज नाईलाज झाला."
"साहित्य अकादमीचा पुरस्कार घेतला तेव्हाही भावना इतक्या उचंबळून आल्या नव्हत्या. कदाचित, तेव्हाच्या तारूण्याचा तो जोश असावा. माझ्या नाटकांनी शतकांवर शतकं मारली तेव्हाही इतकं भरून आलं नव्हतं. त्यातही आपण हातखंडा नाटककार आहोत या 'अहं'चा भाग असावा. महाराष्ट्रभूषण घेतला तेव्हा मी या राज्यापुढं नतमस्तक झालो होतो, पण तुमच्या या भरभरून प्रतिसादानं आज त्याहीपलीकडे विनयाची भावना निर्माण झाली आहे," त्यांनी टेबलावर मांडलेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या रांगांकडं आणि त्यापुढं खाली ठेवलेल्या हारांच्या राशीकडं हात केला. "यामागचं कारण उमजत नाहीये. माणसं आयुष्याच्या अखेरीला अधिक हळवी होतात असं म्हणतात. त्याचाच हा भाग आहे का?" कर्णिक क्षणभर थांबले. उजवीकडे कोपऱ्यात पहिल्या तीन-चार रांगांवर थोडी चुळबूळ झाली. हाती टिपणवह्या घेतलेले दोघं-तिघं तिथून उठून लगबगीनं दाराकडं निघाले.
कर्णिक बोलू लागले, "सांगता येणार नाही. पण हळवा झालोय खरा. मघा बरंच काही बोललो. काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या. निरोप घेतो." आणि कुणालाही काही कळण्याच्या आधीच ते माईकपासून दूर होऊन खुर्च्यांकडं वळले.
---
कर्णिकांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांनी 'जागतिक' या शीर्षकाच्या कादंबरीचा पहिला मसुदा हातावेगळा केला होता. कादंबरीचं बीज केव्हाचं डोक्यात रुजून बसलं होतं. पण निवृत्तीआधीच्या धावपळीत त्यांना तशी निवांत बैठक मिळाली नव्हती. निवृत्तीनंतर मात्र त्या बीजानं पुन्हा उसळी खाल्ली आणि त्यांनी हा विषय हातावेगळा करायचं ठरवलं. धोरणांमधील स्थित्यंतर, समाजजीवनात घडलेले बदल आणि त्याचे एकमेकांना कवेत घेऊ पाहणारे पण एकमेकांपासून निसटणारेही तरंग या कादंबरीतून टिपण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला होता. या कादंबरीसंदर्भात आणखी एक वेगळेपण होतं. प्रथमच कर्णीक एखाद्या साहित्यकृतीसाठी अभ्यास करावयास म्हणून बाहेर पडले होते. देशाच्या निवडक वेगवेगळ्या भागांतील समाजजीवन जवळून पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. याआधी नोकरीनिमित्तानं त्यांनी केलेलं देशाटन एका विशिष्ट वर्तुळातलंच असल्यासारखं होतं. ती खंत त्यांनीही अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळं त्यांच्या या ताज्या देशाटनाला कादंबरीच्या संदर्भासह महत्त्व होतं.
या सगळ्या सायासांमध्ये पोटदुखीकडं थोडं दुर्लक्षच झालं होतं. आणि अगदीच असह्य झालं तेव्हा त्यांनी डॉ. गोडबोल्यांचं हॉस्पिटल गाठलं. त्यालाही कमलताईंचा आग्रहच कारणीभूत होता.
"डायलिसीस करावंच लागेल. त्याला पर्याय नाही." डॉ. गोडबोल्यांनी उपचारांची योजना सांगितली तेव्हा कर्णिकांपुढं दुसरी काही निवड करण्याची संधी नव्हतीच. मूत्रपिंडं निकामी होत चालली होती. कमलताई सोबत होत्या. विश्वनाथ देसाईही होते. या दोघांनीही मान डोलावली आणि पुढं सरकण्याचा निर्णय झाला.
"इट इज नथिंग. किडनी शरिरात जे काम करेल ते आपण बाहेरून करून घेतो. टेक्नॉलॉजी हॅज अॅड्व्हान्स्ड सो मच दॅट धिस प्रोसिजर इज व्हेरी कॉमन अॅण्ड सेफ नाऊ. त्यामुळं काळजीचं कारण नाही."
"किती वेळेस करावं लागेल?" देसायांनी विचारलं.
"आय थिंक, गिव्हन द कंडिशन अॅज ऑफ नाऊ, महिन्यात एकदा पुरेसं आहे." गोडबोल्यांनी सांगितलं.
"खर्चाचं काय?" कमलताईंचा काळजीनं भरलेला सूर आला.
"अक्का, त्याची काळजी तुम्ही करायची नाही. ती आम्ही करू." देसाई म्हणाले. स्वतः कर्णिकांनीही मान डोलावून पत्नीच्या खांद्यावर थोपटत त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.