चार दिवस सासुरवाडीचे

दशमग्रह बनून सासरेबुवांच्या राशीला लागायचा विचारही कधी माझ्या मनात आला नाही. पाठीवरून मायेने फिरणारा त्यांचा प्रेमळ हात आता राहिला नाही. पण त्यांनी जन्मभर केलेल्या वास्तव्याने पुनीत झालेली माझ्या सासुरवाडीची वास्तू माझ्यासाठी तीर्थस्थानासारखीच आहे. आदरयुक्त प्रेमाचा निर्मळ झरा त्या जागी अखंड वाहतो आहे. त्यात डुंबून घेण्यासाठी तिकडे जायचे निमित्त मी अत्यंत उत्सुकतेने शोधत असतो.

चक्रावणारे प्रश्न.

एका संकेतस्थळाला भेट देण्याचा योग आला. त्यात अनेक गमतीदार प्रश्न विचारण्यात आले आणि त्याला हो अथवा नाही अशी उत्तरे देण्यात यावी अशी विभागणी करण्यात आली.

http://www.brainbashers.com/qowall.asp

काही प्रश्न खरेच मजेशीर वाटली.

  1. तुम्ही झाडावर चढला आहेत काय?
  2. जगामध्ये एकाच प्रकारची राजवट असावी?
  3. तुम्हाला एखाद्या लक्षाधीशाची माहिती आहे काय?
  4. २९/०२ ला जन्म झालेल्या कोणा व्यक्तीची माहिती आहे काय?
  5. तुम्ही इंद्रधनुष्य पाहिलेले आहे काय?
  6. तुम्ही झाडावरून पडला आहात काय?
  7. तुम्ही नवीन वर्षाचा ठराव केला आहात काय?
  8. तुम्हाला पुस्तके वाचायला आवडते काय?
  9. तुम्ही ( चुकून) कधी चोरी केली आहे काय?
  10. तुम्ही २० पेक्षा जास्त दूरध्वनी क्र. लक्षात ठेवू शकता काय?
  11. तुम्ही पटगृहात झोपला आहात काय?
  12. तुम्हाला भाऊ अथवा बहीण आहे काय?
  13. तुम्हाला जन्मखुण आहे काय?
  14. तुम्ही कधी प्रेतयात्रेत सहभागी झाला आहात काय?
  15. तुमच्याच तारखेला जन्म झालेल्या कोणा व्यक्तीची ओळख आहे काय?

ज्या कोणी अश्या कल्पनेला जन्म दिला आणि त्याचा नियमित पाठपुरावा करत आहे त्याचे कौतुक करावेसे वाटते.

मारिच-४

महासत्संगाच्या पहिल्या दिवशी राजपाठकांना बापूंशी काहीच बोलता आलं नाही. दुसऱ्या दिवशी कैवल्य त्यांना भेटला. अंगात ताप असूनही ते आले. त्याही दिवशी बापूंची भेट अशक्य होती. त्यांच्या तब्येतीची काळजी वाटून, प्रसाद घेऊन कैवल्य पाचव्या दिवशी त्यांच्या ऑफिसवर गेला. अत्यंत आश्चर्य वाटून त्यानं आसपास पाहिलं. ऑफिसची जागा पूर्ण रिकामी होती. ना कुठला बोर्ड, ना कॉंप्युटर्स, ना एसी. आसपास कुणालाच काही माहिती नव्हतं. काहीतरी विचित्र वाटून परत आल्यावर बापूंना त्यानं ही बातमी सांगितली, तेंव्हा त्यात राजपाठकांबद्दलच्या काळजीचा भाग जास्त होता. फक्त हे ऐकून बापूंच्या डोळ्यांत सेकंदभर जी क्रूर विखारी चमक होती, ती त्याला फार विसंगत वाटली. बापूंनी त्याला सांगितलं, की त्यांना अर्धा तास एकांत हवा होता.

आजवरची संपूर्ण साधना विसरायला लावणाऱ्या अपरिमित क्रोध आणि संतापानं बापूंना काही काळ ग्रासलं. आपली पूर्ण अध्यात्मिक ताकद पणाला लावून ते काही काळ एका जागी बसले. केवळ अकरा लाख रुपयांत कैवल्यचा, बापूंचा विश्वास संपादून, हा महाकपटी माणूस त्यांना साठ लाख रुपयांना गंडा घालून फरार झाला होता. अक्षरशः उचलून घेऊन गेला होता.

काय ते सद्गदित होणं, डोळ्यातले अश्रू, साधनेचं नाटक..... पूर्ण छलकपट. आणि मुख्य म्हणजे अशा अध्यात्मिक संस्थांकडं इतपत आर्थिक, बेहिशेबी संपन्नता असणार, ही त्याला पूर्ण खात्री होती. तिच्याच जिवावर, आपला डाव तो एखाद्या कुशल जुगाऱ्यासारखा खेळला होता. हा मायावी राक्षस, बापूंना भुलवत भुलवत मोहाच्या त्या टोकापर्यंत घेऊन आला होता. बरं काही कायदा, पोलीस किंवा बाहेरुन मदत घ्यावी तर साठ लाख रुपये आणले कुठून, हे सांगावं लागणार, षटकर्णी होणार.

परिस्थिती मान्य करुन बापू उठले. त्या दिवशीच्या सत्संगात त्यांनी मारिच, त्यानं घेतलेलं कांचन मृगाचं रुप आणि त्या मोहानं प्रत्यक्ष प्रभूंचं झालेलं नुकसान याचं रसाळ विवेचन श्रोत्यांसमोर केलं. विषयातली त्यांची तल्लीनता श्रोत्यांना विशेष सुखावून गेली.

मारिच -३

"आईये श्रीमान, आईये.... बसा आपण" बापूंनी प्रेमभरानं त्यांना आपल्या जवळ बसवून घेतलं. "साधना तो चल रही है ना? निरंतर चलनी चाहिये. साधना हीच प्रक्रिया माणसाचं जीवन उजळवते."
राजपाठकांनी बापूंना नम्रपणे नमस्कार केला. "फर्स्ट आय हर्ड यू इन मुंबई बापू... आजचा दिवस केंव्हा येईल हीच आस होती. सब आपकी दुवा बापू, सब आपकी कृपा."
बापूंनी त्यांच्या डोक्यावर प्रेमभरानं हात ठेवला. "कृपा आमची नव्हे साधक. परमात्म्याची. आमच्या फक्त सदिच्छा. रामकृष्ण हरी! पण साधक, आश्रमासाठी तुम्ही इतकं सगळं करताय. आप व्यावसायिक हो. व्हॉट डू यू डू फॉर अर्निंग?"

राजपाठक गंभीर झाले. खूपच गंभीर. त्यांनी खिशातून कार्ड काढताना एक प्रदीर्घ सुस्कारा टाकला. " तुमच्यापासून लपवून काय ठेऊ बापू..... इटस अ रादर पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी.... फार बाहेर बोलताही येत नाही"
बापू हसले. त्यांच्याही भक्तांमध्ये सगळ्या प्रकारचे लोक असत, हे त्यांना माहिती होतं. "इतनी गुप्तता, साधक.... आपण अपवित्र तर काही नाही ना करत?"

"बापू... पवित्र, अपवित्र तुम्हीच ठरवा. खूप टेन्शन्स असणारा व्यवसाय आहे माझा. मोठेमोठे राजाकारणी, त्यांचे ट्रस्टस, इंडस्ट्रियल टायकून्स यांचे नं २ चे बेहिशेबी पैसे मी परदेशात सुरक्षित फायद्यात गुंतवून देतो. त्यांचे तिकडचे प्रॉफिटस भारतात; पण जास्त करुन फॉरेन कंट्रीमध्ये मॅनेज करतो. आयल ऑफ मान, पनामा, स्वित्झर्लंड या देशामध्ये. खेळ मोठा आहे, पण दोन्हीकडून धोका. सततची टेन्शन्स... इसिलिये मन:शांती की उम्मीद रखके यहाँ आता हूं. मी आहे इन्व्हेसटमेंट एक्सपर्ट आणि चार्टर्ड अकाउंटंट.... तरी टेन्शन रहातंच." एका दमात राजपाठकांनी आपली व्यथा ऐकवली. क्षणभर बापूंनी डोळे मिटले. अशाच तर अनेक मंडळींना अंतर्गत शांततेची आस, सहानुभूती, वात्सल्याची आस जास्त असते, हे आत्तापर्यंत त्यांना चांगलं ज्ञात होतं.

"राम कृष्ण हरी!" ते म्हणाले. "पण साधक, तुम्ही यात आहात, याला आपल्या देशातले आर्थिक कायदेकानू जबाबदार आहेत, जे अशा इन्व्हेस्टमेंटस मजबूर होऊन या लोकांना करायला भाग पाडतात. सारा दोष अपने सरपर क्यूं लेते हो?" राजपाठक काहीसे सावरत होते. डोळे मिटून बापू पुन्हा चिंतनात गेले.

खरंतर त्यांच्या मनात एक वेगळा विचार चमकून जात होता. गोशाळेपासून ते मिशनच्या कॉलेज पर्यंत आणि श्रीलंकेपासून नॉर्वेपर्यंत पसरलेलं त्यांच्या आश्रम - मिशनचं अवाढव्य विश्वही याच, अशाच प्रश्नात अडकलं होतं. त्यांच्या विविध संस्थांच्या एकमेकांमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये सुमारे साठ लाख रुपये असे काही निर्माण झाले होते, जे कुठंच दाखवता येत नव्हते. प्राप्तिकर काय, चॅरिटीवाले काय, आजवर शांत राहिले.... उद्याची काय शाश्वती? आता निदान हे कळू शकणारा, त्यांच्याच पंथाचा माणूस त्यांच्यासमोर होता. खुणेनंच त्यांनी राजपाठकांना बाहेर एक पाच मिनिटं थांबायला सांगितलं.

हीच तर सुविधा, सोय आश्रमालाही हवी होती. बापूंच्या मनात विचारांचं मोहोळ उठलं. हे काम या साधकाला सांगण्यात तो गुरुस्थानी मानतो, अशा बापूंवरची त्याची श्रद्धा डळमळीत होण्याचाही संभव होता. पण त्याच वेळी ही अडचण समजून घेऊन सोडवू शकणारीही हीच व्यक्ती होती. याच शहरातून त्याचं कार्यालयीन कामकाजही चाललं होतं. ही पण एक जमेची बाजू होतीच. याच माणसानं आश्रमासाठी पूर्ण ताकदीनिशी निधीही लावला होता. बापू उठून बाहेर आले. राजपाठक बसले होतेच. "कुछ देर के लिये अंदर आओगे, साधक?" बापूंनी त्यांना आत बोलावून दरवाजा बंद केला. "आपल्या आश्रमाचीही अशीच एक मुश्किल आहे, साधक. आप कुछ करोगे?"

राजपाठक काहीसे संभ्रमित होऊन ऐकत होते. "घबराओ नही...." बापूंनी शांत, पण खंबीर आवाजात सुरुवात केली. "इथं अशीच काहीशी स्थिती आहे. ऍज यू सेड, आश्रमसंस्थांच्या व्यवहारात कुल साठ लाख रुपये, ऐसे कुछ जम गये हैं.... न कुछ हिसाब दे सकते हैं चॅरिटीवालोंको, ना किसी बँक में जमा कर सकते हैं. आपकी जो भी गतिविधियाँ, मोडस ऑपरेंडी है, ती वापरा. द्रव्य आहे, चांगल्या जागी जाऊ दे." आता प्रश्नचिन्ह बापूंच्या डोळ्यात होतं.

राजपाठकांनी थोडा विचार केला. "हां बापू, करता तर येईल. मागं सुरेश योगी फाऊन्डेशनच्या स्विस ब्रँचसाठी मी काम केलंय. दे हॅड अ सिमिलर प्रॉब्लेम. करन्सीज कैसी है बापू?" त्यांनी विचारलं.
बापूंनी उठून आपली अलमारी उघडली. बरेचसे भारतीय रुपयेच होते; पण डॉलर्स आणि युरो अगदीच कमी नव्हते. त्यांनी हा अंदाज घेईपर्यंत राजपाठकांनी आपली आपली अगदी उंची कातडी ब्रीफकेस उघडली. "मी हे करणार ते मोस्टली स्विस आणि ऑस्ट्रीयन कॉर्पोरेट कंपनीज... बापू, एनी ऑफ अवर ऍक्टिव्हिटी इन स्वित्झर्लंड?" बापूंनी मान हलवली, "अभी तक नही, नेक्स्ट इयर मे बी."
"ठीक आहे. बापू, या कॅशची तर रिसीट आताच माझ्या सहीनं मी तुम्हाला देतो. सिर्फ आप किसी को नही दिखाना!" राजपाठक सांगत होते. "अनादर थ्री - फोर डेज, उन कंपनियोंके नाम और फिक्स डिपॉझिट रिसीटस आय विल गेट फॉर यू. किसी और जगह रखना. नॉट हिअर."

बापूंना आश्चर्य वाटलं. "इतनी जल्दी? सिर्फ चार दिन?"
"हां बापू. हे मी घेऊन गेल्यावर दुपारीच वर्क आऊट करुन माझे बाहेरचे फंडस उद्याच फोननं तिथं इन्व्हेस्ट करणार. अनफॉरच्युनेटली इंडिया में इसे हवाला बोलते है... पण बापू," ते अजिजीनें म्हणाले, "हीच सिस्टिम सर्वात फास्ट आणि एफिशियंट आहे." त्यांनी आर. पी. फिनान्स कार्पोरेशनचं रिसीट बुक काढलं. "कुछ साठ लाख लिख दूं, बापू?"
"हां, साधक." राजपाठकांना बॅग कॅशसह देऊन बापूंनी त्यांनि दिलेली रिसीट कुलूपबंद केली. राजपाठकांनी बापूंना पदस्पर्श केला. "बापू, तुमचा फार वेळ घेतला का?"
बापूंनी त्यांना आशीर्वाद दिला. "नाही पंथिक.... आपनेही हमारी बडी चिंता मिटाई है. चार दिवसांनी महासत्संग सप्ताह आहे.... आप आईये जरूर."
"जी हाँ, बापू. सब आपकी कृपा है, बापू" राजपाठक निघाले.

मारिच -२

महिन्याभरात राजपाठक पुन्हा आलेले कैवल्यला दिसले. त्यांची सकाळची साधना झाल्यावर कैवल्य मुद्दाम त्यांना भेटायला आला. "मंगल प्रभात, राजपाठक साहेब. काय म्हणताय?"
थोड्याशा नाराज सुरात ते म्हणाले " धंद्याची धावपळ. महिनाभर परदेशात होतो. आश्रमाचं दर्शन नाही त्यामुळं बेचैनी आली. बापू इथंच आहेत की परदेशदौरा?"
"इथंच आहेत.... बसा, दूध घ्या."
"कैवल्य, तुम्हाला सांगतो. खूप  अस्वस्थ झालं. तशी रोजची साधना तर होती चालू, पण या जागेचं म्हणून जे मार्दव, जी ऊब आहे, ती वेगळीच. मी तर शेवटी ठरवलं... याच शहरात माझं ऑफिस उघडतोय."
"काय सांगताय? कुठं?"
"मेहेर पार्क एरिया. एक-दोन दिवसांत कामं संपवून उद्घाटन. उद्घाटनाला नक्की या."
कैवल्यच्या मनात आलं, हा इतक्या वरच्या दर्जाचा माणूस आहे.... ऐरागैरा मनुष्य इतक्या उच्चभ्रू वस्तीत ऑफिसचं स्वप्नही पाहू शकला नसता.
"चौबळ... आहेत का?" राजपाठकांनी विचारलं
"येतीलच... बापूंबरोबरच बसलेत. तुम्हाला भेटायचंय का?"
"हां... बापूंच्या कृपेनं त्यांच्या वास्तव्याच्या - आश्रमाच्या गावात ऑफिस झालंय. त्यानिमित्त आश्रमाला फूल ना फुलाची पाकळी देण्याचं डोक्यात आलं." राजपाठक खरोखर सद्गदित झाले होते. कैवल्य काही न बोलता त्यांच्याजवळ बसून राहिला.

दहा मिनिटात चौबळ आलेच. कैवल्यला काही अंदाजच लागेना. कारण या वेळी राजपाठक  मिशनच्या कॉलेजसाठी दोन लाख घेऊन आले होते. काही मॉडर्न सॉफ्टवेअर आणि बरेचसे संगणक लागणार होतेच. त्यासाठी हे पैसे पुष्कळच कामाला येणार होते.
पावती घेऊन राजपाठक उठले, तेंव्हा कैवल्य दारापर्यंत त्यांना सोडायला आला.दारावर अचानक राजपाठकांनी कैवल्यच्या खांद्यावर हात ठेवला.
"कैवल्य, बापूंबरोबर सत्संगासाठी त्यांचा व्यक्तिगत वेळ मिळेल का... एक पंधरा मिनिटं फक्त."
कैवल्यला खरंच वाईट वाटलं; पण बापूंनीच सांगितलेली शिस्तही पाळणं आवश्यक होतं "राग मानू नका, सर.... पण साधकांशी व्यक्तिगत संपर्क अलीकडे बापूंनी खूप कमी केलाय. खूप म्हणजे खूप. माझी-त्यांचीही गाठभेट नाही दोन महिन्यात. तरी एक काम करु. तुम्ही आश्रमकार्याला एवढी आपुलकी दाखवता... मी निदान विचारुन पहातो. या लवकर परत."  

राजपाठकांचं ऑफिस सुरुही झालं. बरंचसं काम ते तिथूनच बघत. त्यामुळे आपसूकच त्यांची आश्रमसाधना वाढली. पुढच्या दोन महिन्यात राजपाठकांची पुढची देणगी पुन्हा आली. चार लाख. न रहावून कैवल्यनं त्यांना तेंव्हा विचारलं.... "सर, मला तुमची ऍक्टिव्हिटी एकदा समजावून सांगा ना... मला कळेल, मीही इंजिनिअरिंगचा डिग्री होल्डर आहे." कारण त्यांची ओळख आतापर्यंत चांगली वाढली होती. पण कुठलीच व्यावसायिक चर्चा त्यांना आश्रमात नको असायची. त्याला अडवून ते म्हणाले, "तो प्रश्न नाही. नॉट हिअर इन द डिव्हाईन प्रिमाईस.... यंग मॅन, तू ऑफिसवरही आला नाहियेस.... तिकडे ये. मग बोलू."

पुढच्या महिन्यात राजपाठकांनी कमालच केली. त्यांना कुठलंसं आंतरराष्ट्रीय इंफ्रास्ट्रक्चरल कॉंट्रॅक्ट मिळाल्याप्रित्यर्थ आणखिन चार लाखाची देणगी त्यांनी आश्रमाकडे सुपूर्त केली. कैवल्यला तेंव्हा मात्र वाटलं, की बापूंची आणि यांची भेट आता व्हायलाच हवी. नाही म्हटलं तरी राजपाठक, बापूंचे या शहरातले, कदाचित राज्यातलेही सर्वात मोठे देणगीदार ठरत होते.
सगळी हकीकत ऐकल्यावर बापूंचे हात आपसूक जोडले गेले. "हरी की क्रिपा... कैवल्य! कुठले आहेत हे साधक मूळ?" कैवल्यनं मग त्यांना सगळंच सांगितलं. आश्रमाला जवळ राहून साधनेची त्यांची खटपट, काही प्रमाणात त्यांच्या धंद्याचं थोडंसं गूढ राहिलेलं तांत्रिक स्वरुप, सगळंच.

"खूप दिवस झाले, बापू.... आपसे मिलने की बिनती कर रहे हैं. बापू, मलाही वाटतं, तुमची कृपा त्यांच्यावर व्हावी. द्याल का त्यांन एक दहा मिनिटं?"
बापू मृदू हसले. "ठीक आहे, कैवल्य. इतकं केलेल्या साधकाचा तेवढा अधिकार निश्चितच आहे, बुला लो!"
"आज्ञा प्रमाण, बापू!"

दुसऱ्या दिवशीच तो राजपाठकांच्या मेहेरपार्क ऑफिसला पोचला. ऑफिसच्या रचनेत त्यातली समृद्धी कळत होती. भपका कुठंही नव्हता. प्रथमदर्शनी बापूंची एक मोठी तसबीर. चार पाच केबिन्स.... पूर्ण ऑफिस सेंट्रली एअरकंडिशंड, पाचसहा स्टाफ.... प्रत्येकाला  संगणक. राजपाठकांचा बातमी ऐकल्यानंतरचा आनंद कैवल्यला अपेक्षित होताच. दुपारी चारची वेळ ठरली होती. बातमी ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.

(क्रमश:)  

मारिच -१

माझे एक जवळचे मित्र (आणि एक 'वाचनमात्र धाटणी'तले मनोगती) संतोष शिंत्रे यांची ' साप्ताहिक सकाळ' कथास्पर्धा २००३ मधिल पारितोषिकपात्र कथा 'मारिच' इथे त्यांच्या संमतीने देत आहे. 'मनोगत' वर हल्ली रंगलेल्या काही चर्चा आणि त्यांत व्यक्त झालेली मते यांच्या पार्श्वभूमीवर ही कथा वाचकांना अधिक मनोरंजक वाटेल अशी आशा आहे.

कचऱ्याची करामत

महाराष्ट्र टाईम्स मधला लेख : तात्कालिक फायद्यासाठी किंवा ठार अज्ञानातून पर्यावरणीय प्रदूषणाकडे काणाडोळा करणे किती महागात पडू शकते,याचा अनुभव मालाडच्या चिंचोलीबंदर भागात उभारलेल्या 'माईंडस्पेस संकुला' तील व्यावसायिक आणि रहिवासी घेत आहेत. मालाडच्या डंपिग ग्राउंडवरील कचऱ्याची भर दलदलिच्या जमनिवर घालून त्यावर हे संकुल उभे राहिले आहे.या संकुलात नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच बिपीओ त्यांच्याबरोबर निवासी वसाहती हि आहेत. मात्र गेल्या पाच वर्षात या संकुलात संगणक, वातानुकूलन यंत्रणा बंद पडण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे प्रमाण एवढे आहे की अनेक कपन्यांनी या संकुलातील संगणक वा अन्य यंत्रणांच्या नियमित देखभालीची कंत्राटे घेणे बंद केले आहे. महागड्या यंत्रणा अकाली निकालात निघत असल्यामुळे प्रचंड नुकसान येथील कंपन्यांना सोसावे लागत आहे. बिगरसरकारी तज्ज्ञ संस्थेने केलेल्या अभ्यासातून असे आढळले की कोणती ही रासायनिक प्रक्रिया न करता दलदलिच्या जमिनीवर टाकलेला कचऱ्याचा भराव हे या समस्येचे मूळ कारण आहे. हा कचरा जमिनीखाली सडत असून त्या प्रक्रियेत सल्फर डायॉक्साईड , नायट्रोजन ऑक्साइड , हायड्रोजन सल्फ़ाईड , मिथेन , कार्बन मोनॉक्साईड यासारखे रासायनिक वायू तयार होतात. जमिनीला असलेल्या भेगांतून ते हवेत मिसळतात.त्यांच्या संपर्कात येणाऱ्या धातूवर रासायनिक प्रक्रिया होते. याचाच परिणाम संगणक , वातानुकूल यंत्रणा तसेच अन्य उपकरणे यांतील धातूचे भाग निकामी होण्यात होतो. कोट्यवधी रुपयांची गुंतुवणुक या संकुलात आहे. बांधकाम चालू असताना , कचऱ्याच्या भरावर रासायनिक प्रक्रिया करायला हवी होती.याची जाणीव कोणालाही होऊ नये , हे अज्ञान की गुन्हेगारी स्वरूपाची बेपर्वाई ? ज्यांनी ही संकुले बांधली ते पैसे घेऊन नामानिराळी झाले आहेत आणि कोट्यवधी ज्यांनी गुंतवले, त्यांची प्रदूषणामुळे कोंडी झाली आहे. या जागीचे प्रदूषण रोखण्याचा मार्ग आहे की नाही ते अजून स्पष्ट झाले नाही आणि असला तरी प्रचंड खर्चीक असणार हे उघड आहे. धातूवर जे रासायनिक प्रक्रिया करतात ते मानवी शरीरासाठी सुरक्षित असणे शक्यच नाही. मानवी आरोग्याचे रूपाने येथील कर्मचारी आणि रहिवासी किती किंमत मोजत आहेत , याचेही हिशोब मांडले गेले पाहिजेत.

वाचनालयासाठी पुस्तकरूपी मदत

सर्व पुस्तकप्रेमीना.

सुवर्णगणेश मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या दिवेआगर गावातील "सार्वजनिक मुक्त वाचनालयासाठी" पुस्तक प्रेमींकडून पुस्तकरूपी देणग्यांची आवश्यकता आहे.

खालील पत्यावर कृपया संपर्क साधावा.

श्रीकृष्ण जोशी

एका हलवायाचे दुकान

व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवन यात तफावत असणे यात काही नवीन नाही. जो पेशा तसे वर्तन अशी अपेक्षा करणे म्हणजे एखाद्या सुरेल गवयाने पोटात जबरदस्त कळ आली तरी सुरेलपणानेच ओरडावे अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. पण गोड साखरेची चित्रे विकणार्‍या या हलवायाच्या खाजगी आयुष्यातली भाषा जरा पहा. त्यातून एकीकडे त्याचे गिर्‍हाईकाशी आर्जवाचे बोलणे सुरु आहे, आणि दुसरीकडे त्याची पोरे त्याला छळताहेत. तो परिस्थितीने गांजला आहे हे खरेच, पण त्याबरोबर बोलताबोलता आपल्या वागण्यातली विसंगती काही त्याच्या ध्यानात आलेली नाही. ' देवाची शपथ' वगैरे तो घेतो आहे, पण त्याबरोबर आपल्या पोरांवर डाफरतोही आहे! त्यातून गिर्‍हाईकाला मालाचा नमुना म्हणून साखरेच्या कावळ्याच्या पंखाचा तुकडा ही मजेदार वक्रोक्ति दिवाकरांनी येथे साधली आहे. साखरेची चित्रे इतकी जिवंत की आता ती नाचायला उडायला लागतील ही कवीकल्पना आणि पोरांना चुलीत घालून भाजून काढण्याची धमकी हा हलवाई एकाच श्वासात देतो आहे! लोकांच्या बोलण्यातली आणि वागण्यातली विसंगती हा दिवाकरांचा आवडता विषय. त्यातूनच साकारले ते हे 'हलवायाचे दुकान'

"... काय कारट्यांची कटकट आहे पहा! मरत नाहीत एकदाची! - हं, काय म्हणालेत रावसाहेब! आपल्याला पुष्कळशी साखरेची चित्रे पाहिजे आहेत? घ्या; आपल्याला लागतील तितकी घ्या. छे! छे! भावामध्ये आपल्याशी बिलकुल लबाडी होणार नाही! अगदी देवाची शपथ घेऊन सांगतो की, माझ्याजवळ फसवाफसवीचा असा व्यवहारच नाही! - अगं ए! कोठे मरायला गेली आहे कोणास ठाऊक! गप्प बसा रे! काय, काय म्हणालात आता आपण? ही साखरेची चित्रे फार चांगली साधली आहेत? अहो, आपणच काय, पण या दुकानावरून जाणारा प्रत्येकजण असेच म्हणतो की, ही साखरेची केलेली पाखरे - झालेच तर ही माणसेसुद्धा! - अगदी हुबेहूब साधली आहेत म्हणून!- काय? मी दिलेले हे पाखरांवरचे रंग कदाचित् विषारी असतील? छे हो! भलतेच एखादे! हा घ्या. कावळ्याच्या पंखाचा एक तुकडा आहे, खाऊन पहा! अहो, निव्वळ साखर आहे साखर! फार कशाला? ही सगळी चित्रे जरी आपल्याच सारखी जिवंत होऊन नाचायला उडायला लागली - तरी देखील यांच्यात असलेला साखरेचा कण - एक कणसुद्धा कमी होणार नाही! रावसाहेब, माझे कामच असे गोड आहे! - अरेच्चा! काय त्रास आहे पहा! अरे पोरट्यानो, तुम्ही गप्प बसता की नाही? का या चुलीत घालून तुम्हा सगळ्यांना भाजून काढू? तुमची आई कोठे जळाली वाटते? - का हो रावसाहेब, असे गप्प का बसलात? बोला की मग किती चित्रे घ्यायचे ठरले ते...."

आखाती मुशाफिरी (१९)

काळी जादू (black magic)  असा एक जादूचा प्रकार असतो हे मी ऐकून होतो. आता स्टुअर्ट कोणती ’गोरी जादू’ करतो तें पहायचे होते.

क्रमश:
--------------------------------------------------------------------

           स्टुअर्ट आज काय शक्कल वापरून संयंत्र करागृहाच्या आवारात आणतो हे पहायची उत्कंठा जशी सगळ्यांना होते तशी ती मलाही होती. पण ’प्रतिकूल तेंच घडेल’ या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाक्याचा अनुभव मला अनेकवेळा आलेला होता. मी नेहमी नकारात्मक विचार करणारा, निराशावादी (specimistic) आहे अशी माझ्यावर अनेकदा टीकाही होत आली. त्यामुळे या माझ्या स्वभावाप्रमाणे स्टुअर्टची तथाकथित जादू चाललीच नाही तर काय करायचे हा विचार मनात घोळवीत मी बाकी चौकडीला कामाला लावले आणि कंटेनरजवळ जाऊन उभा राहिलो. कंटेनरचा चालक तिकडे इदी आणि कंपनीशी निवांत गप्पा मारीत बसला होता. जरा वेळाने इदी माझ्या दिशेने येतांना दिसला. स्वारी बसक्या आवाजांत कांही तरी, बहुदा स्वाहिली भाषेत, गात होती आणि हातवारेंही करीत होती. जवळ येतांच त्याने संभाषण सुरू केले,
 "हेय्‌ हरून, शुभप्रभात!"
 " शुभप्रभात इदी! कसा आहेस तू?"
 " मी छान आहे. तू कसा आहेस? पण जरा थांब. खूप छान आहेस  असं म्हणू नकोस. तुझासाठी माझ्याकडें दोन बातम्या आहेत. एक  चांगली आणि एक वाईट. कोणती आधी सांगू?"
 " तू मला कांहीही सांगू शकतोस. ठीक आहे. आधी वाईट सांग."
 " तुझा स्टुअर्ट पळाला"
 " म्हणजे?"  यावर इदी खांदे उडवत हसूं लागला.
 " पळाला म्हणजे इंग्लंडला गेला"
 " अरे, असा कसा पळू शकतो तो? काल तर तो इथे आपल्या बरोबर होता."
   " काय अशक्य आहे या गोर्‍यांना. यांना जायला-यायला आपल्या सारखा परतीचा परवाना (exit   visa) थोडाच लागतो. विमानात  बसले की चालले मायदेशाला"
 " बरं ते मरो. आता चांगली बातमी सांग."
  " चांगली बातमी म्हणजे, तू एक मठ्ठ माणूस आहेस."
 " हां, ही चांगली बातमी आहे खरी. पण त्याने काय फरक पडणार  आहे?"
 " तूं मठ्ठ अशाकरिता आहेस की कंटेनरमधे काय आहे हे तू नीट पाहिले नाहीस, त्या मूर्ख स्टुअर्टने नीट पाहिले नाही आणि सगळ्यात मोठा मूर्ख म्हणजे तो कंटेनरचा चालक, त्याने आणलेले ते यंत्र या    कारागृहासठी नाहीच. तें दुसर्‍याच कोणासाठी आलेले आहे. मी त्याच्या  जवळील चलान पाहिले   तेंव्हा मला कळले."