मी चौथीत होते तेव्हा पहिल्यांदा आईने मला एक दिवस दुपारीच घरी परत बोलावले. आपल्याला काय? सुट्टी मिळाल्याशी मतलब. :-) तर त्यादिवशी गौरी घरी आणायच्या होत्या. आईने मला आज उपवासच कर असं सांगितलं होतं, त्यामुळे जोरदार भूक लागली होती. पूजेची तयारी चालूच होती. आईने मग वेगवेगळ्या पाच प्रकारची फुले की पाने काहीतरी आणली होती, एका तांब्याला सजवून त्यात ती व्यवस्थित लावूनही ठेवली. मग सामानाच्या खोलीतून चार पत्र्याचे डबे काढले आणि त्यातल्या एकातून त्या दोघी बाहेर आल्या. अगदी अलगद आईने दोन मुखवटे एका ताटात ठेवले आणि त्यासोबत तो तांब्या पण.माझ्या हातात ते ताट देऊन आई म्हणाली,'हां आता आत ये, आधी उजवं पाऊल टाक. मग देवघर, स्वयंपाकघर, मग ओसरी असं करत मी जाईन तशी पाऊलं टाकत पुढे ये. ते ताट तसं बरंच जड होतं आणि त्यात ते नाजूक मुखवटे, त्यामुळे कसं बसं सांभाळत मी पहिलं पाऊल टाकलं. त्यावेळी पहिल्यांदा त्या गौरी माझ्यासोबत घरात आल्या. आईने मला सांगितलं होतं की पुढे काय करायचं आहे.
मी पहिलं पाऊल टाकल्यावर आईने प्रश्न विचारला,"आलीस का गौराई?"
मी,"आले गं वाई".
आई,"कशाच्या पावलाने?"
मी,"सुखसमृद्धीच्या पावलाने".
आई,"आलीस का गौराई?"