एका आत्म्याचे मनोगत - १

तसा मी देवाघरी बराच काळ पडून होतो. तिथे जाण्यापूर्वी मी एका सधन घरांत सुखासमाधानाने रहात होतो. लहानपणापासून घरीदारी नोकरचाकर, वडिलांचा मोठा व्यवसाय व गडगंज पैसा! अगदी जन्मल्यापासून सुखात लोळत होतो. लाडाकोडांत बालपण गेले, मस्तीमधे तारुण्य उपभोगलं. तब्येत अगदी ठणठणीत राहिली. म्हातारपण तर आलंच नाही. एकदा गोडाचं भरपूर जेवून जो झोपलो तो उठलोच नाही. म्हणजे जागा झालो तो देवाघरीच!
            मला देवापुढे नेण्यात आले. देवाशी संवाद हा शब्देविणच होता. मी कांही बोलण्यापूर्वीच देव बोलू लागला. तू तिथे काय केलंस हे सगळं माहितीच आहे, तेंव्हा त्याविषयी कांही स्पष्टीकरणाची गरज नाही. तुझे भोग तर फिटले नाहीयेत. तेंव्हा परत तिथे जावेच लागेल. तुला सुधारण्याची इच्छा असेल तर एक संधी देतो. तुला कशा प्रकारचा नवीन अनुभव हवा आहे ते विचार करुन सांग. नुसती कल्पना पुरे, बाकीचा तपशील आम्ही भरु. घाई नाही. कितीही काळ इथे पडून राहिलास तरी माझी ना नाही.
          मी बराच विचार केला. देवाला म्हणालो, " मागचे आयुष्य फार सुखांत जगलो. दु:ख म्हणजे काय ते पहायलाच मिळाले नाही. तेंव्हा तो अनुभव घेऊन पहावा म्हणतो. तसेच मागच्या जन्मी मला प्रसिद्धी काही मिळाली नाही. आता ती पण मिळावी अशी इच्छा आहे. बाकी तू करशील ते, मला सत्तेची हांव नाही." देव म्हणाला, " थोडे थांबावे लागेल, योग्य वेळी पाठवतो."
मी म्हणालो," देवा, एक शंका आहे, परत जाईपर्यंत इथे काय? म्हणजे मला स्वर्गांत ठेवणार की नरकांत ?" माझ्या या मूढ प्रश्नावर कोणीतरी हंसल्याचा भास झाला. देव म्हणाला, " असं काही नसतं. या तुमच्या मनाच्या कल्पना आहेत. मला खुश करायला सगळे धडपडता, मी निर्गुण निराकार आहे. तुम्ही तिथे काय करता त्याचे कुठलेच चांगलेवाईट फळ इथे मिळत नाही. परत जावं लागणं हीच शिक्षा! आणि आणखी एक. हे सर्व ऐकलंस ते इथेच रहाणार. तिथे गेल्यावर इथलं कांहीच आठवणार नाही."
तथास्तु म्हणून एके दिवशी मला खाली पाठवण्यात आले.

मदत

शेवटचा पेपर दिला आणि मी आणि मैत्रिणीबरोबर गप्पा मारत पोर्चात उभी होते. तेवढ्यात एक गोड हाक ऐकू आली. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर दोन अंध मुली मलाच विचारत होत्या, ताई तुमच्याकडे थोडा वेळ आहे? दोघी बिचाऱ्या संकोचून उभ्या होत्या. चेहऱ्यावर केविलवाणा भाव.
का कुणास ठाऊक वाईट वाटलं. पटकन म्हणाले,
हो आहे की. त्यांच्या चेहऱ्यावरचा केविलवाणा भाव आपण मदत करून पुसून टाकू असं वाटलं.
दोघींपैकी एक बोलली.
आम्हाला रस्ता ओलांडून समोरच्या सुधा स्टोअर्समध्ये न्याल? मोबाईल रिचार्ज करायचाय.
हो चला की त्यात काय एवढं. मी त्यांना म्हटलं.
दोघींचा हात मी हातात पकडला. सावधगिरीने रस्ता ओलांडला. आजूबाजूला बरीच गर्दी होती. दोन अंध मुलींना घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या मला सर्वजण पहात होते. मनातल्या मनात सुखावले. आपल्यात किती संवेदनशीलता आहे नाही?
रस्ता ओलांडल्यानंतरच सुधा स्टोअर्स होतं. दुकानात गेलो. दोघींपैकी एकीनं मोबाईलचा नंबर सांगितला आणि मला दाखवून मगच दुकानदाराला पैसे दिले. मला खूप समाधान वाटलं. पुन्हा एकदा सुखावले. माझ्यावर केवढा विश्वास. मी किती त्यांच्या मदतीला येतेय.
मग मीच त्यांना म्हणाले, बघू मोबाईल. रिचार्ज मेसेज आला का पहाते.
तेवढ्यात त्यातली एक म्हणाली,
नाही ताई. माझा मोबाईल रिचार्ज करायचा नाहीये. हा नंबर माझ्या मैत्रिणीचा आहे. खरं तर तिलाच रिचार्ज करायचंय. पण ती कॉलेजमध्ये आहे ना.
अगं पण ती तरी कॉलेजमध्ये मेसेज कसा पाहील. आपण तिच्याकडे गेल्यानंतरच मेसेज आला की नाही ते कळेल ना? मी माझी शंका मांडली.
नाही ताई, ती आमच्यासारखी नाही. ती पाहू शकते. खरं तर तिच्या पायाला जखम झालीय. चालताना पाय खूप दुखतो. म्हणून मग आम्हीच तिला सांगितलं, की तू बस आम्ही मोबाईल रिचार्ज करून आणतो.
आतापर्यंत मोठा मोठा होत चाललेल्या माझ्या अभिमानाचा फुगा फटकन फुटला. एवढीशी मदत करताना माझ्या मनात उपकाराच्या एवढ्या भावना. आणि त्या....

बाप

मी ऑम्लेट खात होतो, दुपारची वेळ होती. होटेलमध्ये ठीक-ठाक गर्दी होती. मला कामावर जायची घाई होती. आधीच भूक लागलेली, त्यात आमची थाळी यायला उशीर लागत होता. माझ्या सोबत्याच जेवण चालू झालेल होत, त्यामुळे मला अजूनच घाई लागलेली.
मी थाळी घेण्याच्या ठीकाणी असलेल्या गर्दीत आतला (स्वयंपाकघर्नामक पदार्थाचा) पसारा पहात होतो. काही काम्गार मजूर लोकही तिथे आले होते. त्यतला एक जरा भडकलेला वाटला. दाढी वाढलेली,केस अस्ताव्यस्त. तोही घाईत असावा. आल्या आल्या त्याने हॉटेलवाल्याला "लवकर मिळेल का" अशी खास माझ्यासारखी उतावळी माणस विचारतात तशी विचारणा केली. त्याला मिसळ सोबत जास्त पाव हवे होते, आणि  बहुतेक हॉटेल्वाला देत न्व्हता.(अस मला वाटल नक्की काय भानगड होती ते माहीत नाही- मी "संगणक तत्रद्यान व्यवसायिकातला"ना! एका  हॉटेल्वाल्याच काम्गाराशी चाललेल भांडण फ़क्त गम्मत म्हणूनच ऐकणार!) कामावरचा पोर्या म्हणत होता "आता आमच्याकडले पाव संपलेत"-- हा कामगार म्हणाला "बेकरीतले पाव संपले का?" 

माझा पहिला परदेश प्रवास : ९ (ऑर्किड्सचा उत्सव.)

ऑर्किड्सचा उत्सव.

घरी रोज सकाळी कानाशी किमान अर्धा तास गजर वाजल्याशिवाय झोपेतून न उठणारी मी, गेले ७-८ दिवस मात्र फ़ोनवरून गजर वाजायच्या आत जागी होत होते.
त्यादिवशीपण अशीच सहा वाजताच जाग आली. बाहेर चांगलं उजाडलं होतं. जाग आल्यावर पहिलं काम काय तर खिडकीतून बाहेरचं दृश्य पहायचं. मी पडदे सारले आणि सिंगापूरनं पहिला सुखद आश्चर्याचा धक्का दिला. सकाळी सहा-सव्वासहालासुध्दा रस्त्यांवरचे सिग्नल्स सुरु होते आणि मुख्य म्हणजे ज्या काही एक-दोन तुरळक गाड्या येत-जात होत्या त्या ते इमानदारीत पाळत होत्या - अगदी दुचाकीवालेसुध्दा लाल दिव्याचा मान राखत होते. सक्काळी-सक्काळी, रस्ता रिकामा असताना, वाहतूक पोलीस आसपास दिसत नसताना मनावर एवढा ताबा ठेवायचा म्हणजे खायचं काम नाहीये!!! अशी महान कामं सहजासहजी जमत नाहीत - त्यासाठी अंगी शिस्त बाळगावी लागते!! सिंगापूरच्या प्रगतीचं तेच तर पहिलं मुख्य कारण आहे - वैयक्तिक पातळीवरची शिस्त!! त्याबाबत असलेल्या कडक नियमांची झलक आम्हाला आदल्या दिवशी ऐकायला मिळालीच होती. त्यांची अंमलबजावणी पण तितक्याच तत्परतेने आणि ताबडतोब होत असणार त्याशिवाय तो दुचाकीवाला तसा तिथे लाल दिवा पाहून थांबला नसता.
पण, 'परदेशात गेल्यावर तिथल्या प्रत्येक गोष्टीची आपल्या देशाशी तुलना करावी का?' असाही प्रश्न पडतो. दुसऱ्या देशात गेल्यावर आपल्याला मूठभर त्याच गोष्टी दाखवल्या जातात ज्या पाहून आपण यजमान देशाचे कौतुक करू. आपल्याकडे चार दिवस मुंबई बघायला आलेल्या परदेशी पाहुण्याला आपण दक्षिण मुंबईतच फिरवून आणणार ना!! धारावीला नाही नेणार ......
हे सगळे विचार तिथे उभ्याउभ्या एक-दोन मिनिटांत माझ्या मनात झळकून गेले......
सगळं आवरून, नाश्ता वगैरे करून हॉटेलच्या बाहेर आलो. लॉबीतून रस्त्यावर येण्यासाठी ८-१० पायऱ्या उतराव्या लागायच्या. त्या पायऱ्यांच्या एका बाजूला सामानासाठी एक छोटासा सरकता पट्टा होता. गरज असेल त्याप्रमाणे त्याची दिशा वर किंवा खाली अशी बदलता यायची. त्या पट्ट्यावरून घसरगुंडीसारखं किमान एकदातरी वरखाली करण्याची आदित्यची फार इच्छा होती.
नऊ-साडेनऊला निघालो. मुख्य रस्त्याला लागल्यावर गाईडच्या बडबडीपेक्षा आपसूकच बाहेरच्या दृश्याने जास्त लक्ष वेधून घेतलं. दिवसा सिंगापूर फारच देखणं आहे. टोलेजंग, आकर्षक इमारती, स्वच्छ आणि रुंद रस्ते, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडं, कुठेही तुंबलेली वाहतूक नाही की भकाभक धूर ओकणाऱ्या गाड्या नाहीत. वाहतूक पोलीस कुठेही दिसला नाही आणि तरी सकाळच्या गर्दीची वेळ असूनही सगळं सुरळीत चाललेलं होतं. पायी चालणारा एकही माणूस दिसला नाही. एकंदरच तिथे माणसं कमी आणि झाडं जास्त दिसली दोन दिवसांत!! ते सुंदर रस्ते बघावेत की माना उंचावून त्या छानछान इमारती बघाव्यात ते कळेना.
त्यादिवशी आम्हाला 'बोटॅनिकल गार्डन' आणि तिथली ऑर्किड्स पहायला जायचं होतं. 'ऑर्किड्स' आपल्याला तशी फारशी परिचयाची नाहीत. मी तर नैसर्गिक ऑर्किड्सपेक्षा कृत्रिमच जास्त पाहिली होती. पण तिथे त्यादिवशी डोळ्यांचं अक्षरशः पारणं फिटलं. 'बोटॅनिकल गार्डन' अश्या साध्यासुध्या नावाच्या त्या बागेत फुलांचा एक नितांत सुंदर उत्सवच होता. किती रंग आणि किती प्रकार .... काय पाहू, किती फ़ोटो काढू असं झालं होतं. तिथे 'सेलेब्रिटी ऑर्किड्स' असा एक विभाग होता. जेव्हा कुठलीही सुप्रसिध्द व्यक्ती सिंगापूरला आणि त्या बागेला भेट देते तेव्हा त्या-त्या व्यक्तीच्या हस्ते तिथे एक ऑर्किडचं रोप लावलं जातं, त्या व्यक्तीच्या नावाची पाटी तिथे रोवली जाते आणि त्या रोपाला त्याच नावाने पुढे ओळखलं जातं. जगातली अनेक सुपरिचित नावं तिथे निरनिराळ्या पाट्यांवर लिहिलेली दिसली. त्यांत एक 'इंदिरा गांधी ऑर्किड' अशीपण पाटी होती.
सुकलेल्या पाना-फुलांचा कुठेही कचरा नव्हता. पायवाटेवर एखाद्‍दुसरं वाळकं पान दिसलं रे दिसलं की कुठूनतरी झाडलोट करणारी एखादी बाई यायची आणि ते उचलायची.
त्या बागेत एक हरितगृह पण होतं जिथलं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा थोडं कमी ठेवलेलं होतं. खास पर्जन्यवृक्षांच्या अनेक दुर्मिळ जाती तिथे लावलेल्या होत्या. तिथेच Venus Fly Trap आणि Pitcher Plant ही दोन झाडं पहायला मिळाली. ते पाहून आदित्य तर आनंदाने ओरडलाच. या कीटकभक्षक झाडांबद्दल नुकताच तो शाळेत शिकला होता ना!! त्याने मला मुद्दाम त्या दोन झाडांचे फ़ोटो काढायला लावले. त्याला ते शाळेत नेऊन त्याच्या 'सायन्स टीचर'ला दाखवायचे होते. मला म्हणाला - "माझ्या वर्गात आता मी एकटाच आहे की ज्याने ही झाडं प्रत्यक्ष पाहिलीयेत." कुणाला कुठल्या गोष्टीत आणि कसा आनंद गवसेल काही सांगता येत नाही!!!
त्या हरितगृहातून बाहेर पडलो. मग गाईडनं आम्हाला सिंगापूरचं राष्ट्रीय फूल दाखवलं. मात्र आधीची सगळी फुलं पाहिल्यावर ते फूल अगदीच साधं वाटलं. त्याला राष्ट्रीय फुलाचा दर्जा का द्यावासा वाटला असेल काही कळलं नाही....
ऑर्किड गार्डन मधून निघायची वेळ झाली होती. एका तासात लगेच जायचं? तो आख्खा दिवस तिथेच घालवता आला असता तर किती बरं झालं असतं!!
तिथून आम्हाला अजून एक 'सिंगापूर स्पेश्यल' गोष्ट पहायला जायचं होतं ती म्हणजे Merlion - मासा आणि सिंह यांचं मिश्रण असलेलं एक शिल्प जे सिंगापूरच्या अनेक जाहिरातींत आपण पाहतो.

बोटॅनिकल गार्डनमधून बाहेर पडलो तेव्हा ढग दाटून आले होते आणि खूप उकडत होतं. पावसाची शक्यता वाटत होती. मनात म्हटलं - 'पावसापायी पुन्हा कोलंबोसारखी कुठली चुटपूट नको लागायला.' 'ऑर्चर्ड रोड' वरून आमची बस निघाली. हा म्हणजे सिंगापूरचा अगदी खास भाग. अनेक मोठ्यामोठ्या कंपन्यांची, बॅंकांची कार्यालयं तिथे आहेत. हल्ली अनेक हिंदी चित्रपटांतून सिंगापूरचं जे दर्शन घडतं ते याच भागातलं असतं. एका मोठ्या चौकाला फेरी मारून बस जात होती. त्या चौकात एक मोठं, वर्तुळाकार, दुमजली उंचीचं कारंजं संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सुरू होतं आणि त्याचं दृश्य खूपच सुंदर असतं असं कळलं..... आम्ही फक्त ७-८ तास लवकर पोचलो होतो तिथे ... !!! आदित्यला अचानक शोध लागला की 'क्रिश' चित्रपटात ह्रितिक रोशन 'क्रिश'च्या वेशात तिथूनच उंच आकाशात झेप घेतो. चला...म्हणजे ऑर्चर्ड रोडवर त्यालाही लक्षात ठेवण्यासारखं काहीतरी सापडलं!! नाहीतर त्या छानछान इमारती आणि रस्ते पाहण्यात त्याला बिलकुल रस नव्हता.
.... दरम्यान पावसाची एक सर पडून गेली होती. ऑर्चर्ड रोडवरून बस 'सीन' नदीच्या काठी आली. तिथे आम्ही उतरलो. Merlion चा कुठे मागमूसही नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे तरी ते एक बऱ्यापैकी मोठ्या आकाराचं शिल्प होतं. बरं, इतकावेळ बसमधून लांबूनपण एकही झलक दिसली नव्हती.
नदीकाठी खाली जायला पायऱ्या होत्या...म्हणजे Merlion पहायला नदीकाठच्या सिंगापूरी घाटावर उतरायचं होतं तर!! पाऊस पडून गेल्यावर आपण आपल्या रस्त्यांवरून सहज चालूही शकत नाही. पण तिथे आम्हाला काहीही फरक पडला नाही. कुठेही पाणी साचलेलं नव्हतं, चिखलाचा तर प्रश्नच नव्हता. 'चिखल' हा शब्द तरी तिथे लोकांना माहीत असेल की नाही कोण जाणे! बागकामाच्या अभ्यासक्रमात शिकायला आलेल्या माळ्यांना आधी 'चिखल' म्हणजे काय तेच शिकवत असतील!!
खाली उतरून शंभरएक पावलं चालून गेलो, रस्ता उजवीकडे वळला आणि अचानक Merlion समोर उभा ठाकला. सुमारे २५-३० फ़ूट उंचीचं ते पांढरं शिल्प म्हणजे 'सिंगापूरची शान' समजलं जातं. त्याच्या सिंहाच्या आकाराच्या तोंडातून सतत पाण्याचा एक मोठा फवारा बाहेर उडत असतो. पाण्याचा सतत संपर्क असूनही कसलीही घाण नाही की शेवाळं नाही ... एकदम स्वच्छ!! उंच, आधुनिक इमारतींच्या पार्श्वभूमीवर छान वाटत होता पहायला. थोड्या वेळाने जाणवलं की माझ्या डोळ्यांसमोर हा Merlion नव्हता, थोडा मोठा होता .... मग तो कुठला?? गाईडला विचारलं तर ती म्हणाली की सिंगापूरला तसे दोन आहेत पण पाणी उडवणारा हाच. त्याक्षणी तरी तो आकार पाहून माझा थोडा विरसच झाला.
समोर 'सीन' नदीचं रुंद पात्र होतं. लोकांना उभं राहून निरीक्षण करायला लोखंडी कठडा होता. पलिकडच्या काठावरपण गगनचुंबी इमारती दिसत होत्या. त्यातल्या एका इमारतीकडे बोट दाखवून आदित्यनं मला सांगितलं की मगाचच्या त्या कारंज्यापासून उडलेला क्रिश त्या इमारतीवर उतरतो. चला, म्हणजे हे ही बरं झालं ... त्याचा मगाशी अर्धवट राहिलेला शोधही पूर्ण झाला.
तिथे २-३ फ़ोटो-बिटो काढले आणि निघालो. आदित्य भूकभूक करायला लागला होता ... पायऱ्या चढून पुन्हा रस्त्यावर येण्यापूर्वी वाटेत खाण्यापिण्याची दुकानं होती, ती त्याने जातानाच हेरून ठेवली होती!! पण मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. रस्त्यात फार वेळ बस उभी करायला परवानगी नव्हती. त्यामुळे गाईडने चलायची घाई केली.

तिथून मग जायचं होतं 'चायना टाऊन' आणि 'लिट्ल इंडिया' पहायला ... व्यापारासाठी म्हणून १९व्या शतकात तिथे येऊन राहिलेल्या अनुक्रमे चिनी आणि भारतीय लोकांच्या 'सिंगापूरचा जुना गावभाग' वाटतील अश्या त्या वसाहती होत्या. तिथे पोचेपर्यंत पुन्हा पावसाची एक सर येऊन गेली. 'लिट्ल इंडिया'त एक देऊळ पहायचं होतं. बाह्य रूपावरून ते देऊळ दक्षिण भारतीय धाटणीचं वाटलं. आदित्यला फारच भूक लागली होती त्यामुळे मी आणि अजय देवळात जाण्याऐवजी त्याच्यासाठी काही खायला मिळतंय का ते पाहायला लागलो. दरम्यान आदित्यला एक cold drinks चं दुकान दिसलं होतं. मग त्याने आपला 'काहीतरी खाण्या'ऐवजी 'काहीतरी पिण्या'चा मनसुबा जाहीर केला. एखाद्या टोपलीत उरलेसुरले कांदे-बटाटे ठेवावेत तसे त्या दुकानात cold coffee चे कॅन्स ठेवले होते विकायला. किंमत अपेक्षेपेक्षा खूपच कमी होती - १.२५ सिं. डॉलर्स फक्त. त्यामुळे मला शंका आली. म्हणून मी तिथल्या विक्रेतीला "माल ताजा आहे ना?" असं विचारलं, तर तिला त्या प्रश्नाचा रागच आला. कदाचित ’जुना माल विकणे’ हा सुध्दा एक गुन्हाच असेल तिथे, कुणी विकताना सापडला तर काही शे किंवा काही हजार दंड असेल, पण ते मला कसं कळणार ना!! मी माझं शंकानिरसन नको का करून घ्यायला?? जरा घुश्श्यातच तिने सुटे पैसे (की डॉलर्स) परत केले. त्या सगळ्या अनोळखी नाण्यांच्या किमती शोधून हिशोब बरोबर आहे की नाही याची खात्री करून घे‍ईपर्यंत आदित्यची cold coffee पिऊन झाली सुध्दा!! त्या आघाडीवर आता थोडा वेळ शांतता राहणार होती.

दासबोध व मनाचे श्लोक

समर्थ रामदासस्वामींचा दासबोध व मनाचे श्लोक येथे पहा.

दासबोध हा ग्रंथ काही लोक आध्यात्मिक भावनेने वाचतात, काही साहित्य म्हणूनही वाचतात.  माणसाने कसे असावे, कसे असू नये, कसा विचार करावा, कसे वागावे, कसे वागू नये, शारीरिक-वैचारिक-भावनिक सक्षमता, समाजात कसे रहावे, यांसारख्या अनेक गोष्टींचा उहापोह या ग्रंथात केला आहे. तो ज्या काळात लिहिला गेला त्या काळाचा संदर्भ आणि आध्यात्मिक संदर्भ जरी वजा केला तरी आजच्या काळात सुद्धा तो उपयुक्त वाटतो.

माणसे: अरभाट आणि चिल्लर - ११

माणसे: अरभाट आणि चिल्लर - १०  पासून पुढे.

खुद्द दातार मास्तरांशी देखील त्याचा एक समरप्रसंग घडला होता, पण त्यावेळी त्याला वर्गाबाहेर जाण्याची पाळी आली नाही. त्याने दातार मास्तरांना म्हटले, “सर, विठोबा भेटायला आला, त्या वेळी पुंडलिक काय करत होता?”

माझा पहिला परदेश प्रवास : ८ (वलयांकित शहरात प्रवेश ...)

वलयांकित शहरात प्रवेश ...


विमान-प्रवास असूनसुध्दा त्यादिवशी सकाळी फारसं लवकर उठायचं नव्हतं. ११ वाजता 'चेक-आऊट' होतं. सगळं आवरून 'डिस्कव्हरी' वरचा एक कार्यक्रम पण पाहून झाला तरी निघायला अजून अवकाश होता. मग खोलीतून बाहेर आले.

माझा पहिला परदेश प्रवास : ७ (द गोल्डन बुध्द आणि द रिक्लायनिंग बुध्द.)

द गोल्डन बुध्द आणि द रिक्लायनिंग बुध्द.

रोज आम्ही तयार व्हायच्या आत ऍना हजर असायची. त्यादिवशी मात्र सकाळी सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला तरी तिचा पत्ता नव्हता. थोड्याच वेळात तिचा फ़ोन आला की तिच्या यायच्या रस्त्यावर एक अपघात झाला होता आणि ती रहदारीत अडकली होती. मग काय, आमच्याजवळ वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण एव्हाना सगळ्यांच्या एकमेकांशी अर्धा-पाऊण तास गप्पा मारण्याइतपत ओळखी झालेल्या होत्या. कुणी 'फ़ोटो सेशन्स' सुरू केली, कुणी गटागटाने गप्पा मारत बसले.

बाजार

कालचा अख्खा दिवस सततच्या पावसाने भिजून गेला. घरी असताना छान छान वाटणारा पाऊस बाहेरगावी फिरायला गेल्यावर मात्र नकोसा होतो.

पण आज तसा नव्हताच. सकाळी सकाळी सूर्यनारायणानं दर्शन दिलं आणि आज त्याचंच राज्य असल्याची ग्वाही दिली. चला, म्हंटलं आल्या ऊनाचं सोनं करून घेऊया, म्हणून सकाळी लवकरच घराबाहेर पडलो.

माझा पहिला परदेश प्रवास : ६ (दाती हू मे, दल्दी हे क्या ...)

दाती हू मे, दल्दी हे क्या ...


आधी ठरलेल्या कार्यक्रमानुसार त्यादिवशी आमची 'बॅंकॉक सिटी टूर' होती. पण त्याऐवजी आम्ही 'सफ़ारी वर्ल्ड'ला भेट देणार होतो. तसा आमच्या दृष्टीने काही फ़रक पडत नव्हता म्हणा! आधी तिथे मजा करायची त्याऐवजी ती इथे ... शिवाय दुसऱ्या दिवशी तिथे जायचंच होतं ना!!
त्यामुळे त्यादिवशीच्या दिल्या गेलेल्या पहिल्या वेळेला उठलो, दुसऱ्या वेळेला नाश्ता केला आणि तिसऱ्या वेळेच्या आधीच बसमध्ये जाऊन बसलो.

रोज सकाळी हॉटेल वरून निघताना किंवा एकूणच कुठूनही निघताना मंडळी बसमधे चढली की ऍनाची मोजदाद सुरू व्हायची - मनातल्या मनातच. आम्ही ४९ जण आणि ती ५० वी - आकडा जुळला की ती सुटकेचा निःश्वास टाकायची. माझी फार इच्छा होती की एकदा तरी तिला मोठया आवाजात मोजायला सांगायचं. १ ते ५० ला थाई भाषेत काय म्हणतात ते तरी कळलं असतं.
आमच्या गृपमध्ये बरेच गायक होते - हौशी पण, रीतसर शिकलेले पण. बस निघाली की रोज कुणीतरी एखादं स्तोत्र किंवा श्लोक असं काहीतरी म्हणायचं. ते झालं की मग इतर काहीजण भावगीत, भजन, अभंग म्हणायचे. मी ऍनाला ती पण विनंती करून पाहिली. तिला म्हटलं - बाकी काही नाही तर निदान थायलंडचं राष्ट्रगीत तरी म्हण. त्यामागे केवळ 'एक वेगळी भाषा ऐकणे' हाच उद्देश्य होता. पण तिने नकार दिला. (नंतर वाटलं - तिनं नाही म्हटलं तेच बरं झालं. त्या राष्ट्रगीताला बस मध्येच उभे राहून सर्वांनी मान दिला असता का?)
सहज गप्पा मारता-मारता तिनं सांगितलं की तिला २ हिंदी गाणी माहीत होती - 'तू चीज़ बडी है मस्त मस्त' आणि 'जाती हूँ मैं, जल्दी है क्या' आणि ते कसं - 'तू तीद बदी हे मत्त मत्त' आणि 'दाती हू मे दल्दी हे क्या'!!! काही वर्षांपूर्वी अश्याच कुठल्यातरी भारतीय गृपमधल्या एका लहान मुलीनं तिला ती शिकवली होती. तिच्या तोंडून त्या ओळी ऐकायला फार मजा यायची.
तो संपूर्ण दिवस आम्ही सफ़ारी वर्ल्ड मध्येच घालवणार होतो. त्या दिवशी विशेषकरून आदित्यच्या आकर्षणाच्या जास्त गोष्टी पहायच्या होत्या. सर्वात पहिलं आकर्षण होतं - सफ़ारी ड्राईव्ह. नैसर्गिक वातावरणात वावरणारे जंगली प्राणी आम्ही बंद गाडीत बसून पाहिले. त्या वनातल्या छोट्या रस्त्यावरून १०-१५ च्या वेगाने बस चालवत ड्रायव्हरने आम्हाला सगळीकडे फिरवून आणले. आपल्याला प्राणी नेहेमीच पिंजऱ्यात पहायची सवय, त्यामुळे तो अनुभव खरंच छान होता. वाघ-सिंह आठ-आठ, दहा-दहाच्या कळपानं बसलेले होते. तेव्हा ती त्यांची न्याहारीची वेळ होती. थोड्याच वेळात त्यांच्या रोजच्या परिचयाची एक 'ट्रेलर व्हॅन' तिथे आली. त्या ट्रेलरवर एका बंदिस्त पिंजऱ्यात एक विशीची मुलगी उभी होती. तिच्या शेजारीच एका मोठ्या बादलीत मांसाचे मोठे-मोठे तुकडे ठेवलेले होते. पिंजऱ्यातून ती नुसता एक तुकडा बाहेर काढायची की एखादा सिंह झडप घालून तो पकडायचा. बघता-बघता ७-८ सिंह चहूबाजूंनी त्या पिंजऱ्यावर चढले. 'सगळ्यांना मिळणार आहे, घाई करू नका' अश्या थाटात ती त्या हिंस्त्र श्वापदांना शांतपणे भरवत होती. आम्ही बंद बसमध्ये बसलेलो असूनसुध्दा ते पाहून अंगावर अक्षरश: काटा आला.
अर्ध्या तासाच्या त्या फेरीत जिराफ, झेब्रा, एमू पक्षी यांसारख्या आपल्याकडे न दिसणाऱ्या मंडळींनी जास्त लक्ष वेधून घेतले आणि तेवढ्या वेळातच आदित्य तुडुंब खूष झालेला होता.

त्यानंतर, प्राण्यांचे काही खेळ पहायचे होते - 'द सी-लायन शो' आणि 'द डॉल्फिन शो'. आदल्या दिवशी 'नॉंग-नूच व्हिलेज' मध्ये आणि त्यादिवशी तिथेपण आत शिरल्यावर सगळ्यांच्या कपड्यांवर एक-एक छोटा प्रवेश-परवाना चिकटवला गेला. एकाच तिकीटावर अनेक गोष्टी पहायच्या असतील तेव्हा तिथे ही पद्धत पहायला मिळाली. याच्यामुळे खूपच वेळ वाचायचा. एक म्हणजे - दिवसभर तिकीट सांभाळून ठेवायची कटकट नाही आणि प्रत्येकवेळी प्रवेशद्वारापाशी तिकीट दाखवा, परत घ्या ही भानगड नाही.
प्रत्येक शो पाऊण तासाचा आणि मध्ये एक-एक तासाचा वेळ. त्या मधल्या वेळात एका प्रेक्षागृहापासून पासून दुसऱ्या प्रेक्षागृहापर्यंत चालत जायचं. 'या चालत जायच्या वेळेला उन्हाचा थोडा त्रास होईल' असं ऍनाने सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलो होतो - म्हणजे टोप्या, रूमाल, गॉगल, पाण्याच्या भरपूर बाटल्या ... पण तसा विशेष त्रास झाला नाही .... (उलट त्या बाटल्यांचं ओझंच झालं जास्त. पण त्याची चिंता नव्हती कारण आता ते वजन उचलायला आमचा खंदा वीर एकदम 'फ़िट ऍन्ड फ़ाईन' होता !!!)
तो रस्ता झाडांनी आणि हिरवाईने इतका नटलेला होता की आजूबाजूला पाहूनच गाऽऽर वाटायचं. वाटेत पक्ष्यांचे मोठे-मोठे पिंजरे होते. असंख्य रंगांचे आणि आकाराचे पक्षी त्यांत होते. प्रत्येक पिंजऱ्याच्या डोक्यावर पाण्याचा छोटासा फवारा उडत होता. पक्षी वाटेल तितक्या वेळेला ते पाणी प्यायचे, त्यात आंघोळ करायचे. कुठेही घाण नव्हती की अश्याठिकाणी जो एक विशिष्ट डोक्यात जाणारा वास असतो तो नव्हता. मग कसला त्रास आणि काय!! ते सगळे खेळ पाहताना आदित्यला जितकी मजा आली तितकीच मजा मला त्या पायवाटांवरून चालताना आली.
पहिला शो होता - 'द सी लायन शो'. तीन-चारशे माणसं बसू शकतील असं एक अर्धवर्तुळाकार छोटं खुलं प्रेक्षागृह आणि समोर रंगमंच. तिथेसुध्दा अर्ध्या भागात मोठा पाण्याचा तलाव होता. सी-लायन हा प्राणी त्याआधी केवळ टी.व्ही. वरच पाहिलेला होता. त्यामुळे प्रत्यक्ष पहायला मजा आली. खेळ करवून घेणाऱ्या प्रत्येक माणसाच्या कमरेला सी-लायनच्या खाद्याची एक पिशवी लटकवलेली होती. एखादी करामत दाखवून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या की लगेच सगळे सी-लायन्स त्या माणसांजवळ 'आ' करून उभे रहायचे. मग ती माणसं त्यातलं खाद्य त्यांना भरवायची. हे म्हणजे 'गाणं म्हणून दाखव, मग बिस्कीट देणारे हं' अश्यातलाच प्रकार होता. पण एकंदर शो मस्त होता. तमाम बच्चेकंपनी उड्या मारत होती, खुषीने टाळ्या पिटत होती.
त्यानंतर होता - 'द डॉल्फिन शो'. स्वरूप साधारण तसंच; ती 'गाणं म्हटलं तरच बिस्किट' ची अट पण तशीच. डॉल्फिन हा प्राणी पण आधी कधी प्रत्यक्ष पाहिलेला नसल्यामुळे मजा आली.
त्यानंतर होता - 'द काऊबॉय स्टंट शो'. रंगमंचाच्या जागी एखाद्या काऊबॉयच्या सिनेमात शोभेल असा सेट उभा केलेला होता. काऊबॉयच्या वेषातले कलाकार 'स्टंट' च्या नावाखाली एकमेकांना नुसते धोपटत होते. हा शो मात्र खरंच 'केवळ लहान मुलांसाठी' होता. कारण मला तरी ५ मिनिटांतच त्या हाणामारीचा कंटाळा आला. आदित्यचा खिदळणारा चेहेरा त्यापेक्षा जास्त प्रेक्षणीय होता. हा शो संपेपर्यंत जेवणाची वेळ झाली.

एका मोठ्या हॉलमध्ये सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. तिथे एकाच वेळी हजार-दीड हजार माणसं जेवू शकत होती. तो आकडा आणि तिथली प्रत्यक्ष गर्दी पाहून जेवणाचं जे चित्रं डोळ्यासमोर आलं त्याच्या एकदम उलटं दृश्य तिथे होतं. अतिशय उत्तम व्यवस्था, कुठेही गडबड-गोंधळ नाही; खोळंबलेली, जागेअभावी उभ्याने जेवणारी माणसं नाहीत की काही नाही. तिथे थाई, जपानी, चिनी पदार्थांचे वेगवेगळे स्टॉल्स होते. आधी व्यवस्थित पोट भरून जेवल्यावर मग मी त्या दिशेला मोहरा वळवला. चिनी पदार्थांचं विशेष आकर्षण नव्हतं, जपानी पदार्थांचा कसातरीच वास येत होता आणि नावावरून काय पदार्थ आहे ते पण कळत नव्हतं. राहता राहिले थाई पदार्थ .... त्यातल्यात्यात दोन पदार्थ जरा बरे वाटले म्हणून चाखून पहायचं ठरवलं. नावं आता विसरले - त्यातला एक छान होता चवीला पण दुसरा जो खाल्ला त्याची चव मात्र 'अशक्य भयंकर' होती. तो तोंडात घातल्याक्षणी माझा इतका विचित्र चेहेरा झाला की मी लगेच चपापून आपल्याकडे आपल्या गृपमधलं कुणी पाहत नाहीये ना याची खात्री करून घेतली. तर माझी ती फजिती नेमकी आईनंच पाहिली होती!!! आता पुन्हा म्हणून असल्या कुठल्याही पदार्थांच्या वाटेला जायचं नाही असं मी ठरवून टाकलं.

जेवणानंतर होता चौथा शो - 'द स्पाय वॉर शो'. जेम्स बॉन्डच्या सिनेमातला एक सेट उभा केलेला होता. पाऊण तासात वेगवेगळे स्पेश्यल इफ़ेक्ट्स आणि निरनिराळ्या इलेक्ट्रॉनिक करामती वापरून एक जेम्स बॉन्डची गोष्टच सादर केली गेली. अगदी रोप-वे वरची साहसदृष्यं आणि मिसाईल्सचा स्फोट सुध्दा!!! हा शो मात्र त्यातल्या नाविन्यामुळे मला आवडला.

चार खेळ आणि सोबतची भटकंती यांत दिवस कसा संपला ते कळलंही नाही. परतायची वेळ झाली. ऍनाचं 'तला-तला' कानावर पडलं आणि आम्ही बसच्या दिशेनं चालायला सुरूवात केली.
परतताना एका मोठ्या 'ड्यूटी-फ़्री शॉप' ला भेट द्यायची होती. (शुध्द मराठीत - एक अत्यंत महागडं दुकान !!) 'विंडो शॉपिंग' ला पैसे पडत नाहीत ते बरंय! तिथे तासभर वेळ घालवला. थाई चॉकोलेट्स विकत घेतली. बाहेर पडता-पडता कुठूनतरी कॉफ़ीचा वास दरवळत आला. नकळत पावलं तिकडे वळली. मी आणि अजय तिथली ८०-८० बाथ ची कॉफ़ी प्यायलो. आपल्या देशात 'एका कपाला ८० रुपये घेतात' म्हणून मी 'बरिस्ता कॉफ़ी' ला नेहेमी नावं ठेवते याचा मला तिथे चक्क विसर पडला!!

सात-साडेसातला हॉटेलवर परत आलो. जेवायला पुन्हा (ऍनाच्या भाषेत) 'कली पॉत' ला जायचं होतं. थाई भाषेत लहानग्यांचे बोबडे बोल आणि मोठ्यांचे साधे बोल असा फरकच नसावा बहुतेक!

थायलंडमधला चौथा दिवस संपत आला होता. 'चार दिवस झाले या देशात येऊन ??' खरं वाटेना ... तसंही, स्वप्नवतच चाल्लेलं होतं सगळं म्हणा!!!