कविता कशी हवी

 कविता कशी हवी हे माझ्या इतकं तुम्हीही जाणत असता
पण तरी सुद्धा...
घिश्यापिट्या शब्दांची भेळ तुम्ही बनवत असता
नवी क्षितिजे, नव्या वाटांपासून दूर पळत असता
तेच शब्द, तीच रुपकं, यमकं फक्त बदलत असता

तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात
एक अबोल चोर असतो
भावनांनी नटलेला पिसाऱ्याचा
एक छुपा मोर असतो
तुम्हालाही कळत असतं...
प्रतिभेची एक सर मनामध्ये पडली पाहिजे
पिसारा फुलवायची मोराला सवय जडली पाहिजे
पण तरी सुद्धा...
 

तुम्ही आपल्या वहिवाटेच्या प्रेमात पडत असता
नवी क्षितिजे, नव्या वाटांपासून दूर पळत असता
तेच शब्द, तीच रुपकं, यमकं फक्त बदलत असता

 

 
   

तुमच्यामध्ये जसा घोंघावणारा
बेफाम वारा असतो
तसाच संथपणे वाहणारा
अनुभवाचा झरा असतो
तुम्हालाही कळत असतं...
सारे शब्द आपले ह्या पाण्यात भिजले पाहिजे
कवितेच बीज हे मनामध्ये रुजलं पाहिजे
पण तरी सुद्धा...
तुम्ही आपले शब्दांसाठी शब्द जुळवत असता
नवी क्षितिजे, नव्या वाटांपासून दूर पळत असता
तेच शब्द, तीच रुपकं, यमक फक्त बदलत असता

तुमच्या मनात शीतल
चंदनाचा दर्प असतो
भावनांनी परिपक्व
शब्दांचा गर्भ असतो
तुम्हालाही कळत असतं...
मूल जसं जन्म घेतं तशी कविता सुचली पाहिजे
सगळ्यांना नाही पण आपली आपल्यालाच रुचली पाहिजे
पण तरी सुद्धा...
तुम्ही तुमच्या भावनांना यमकांमध्ये दळत असता
नवी क्षितिजे, नव्या वाटांपासून दूर पळत असता
तेच शब्द, तीच रुपकं, यमक फक्त बदलत असता

 

अनिरुद्ध१९६९
 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.