तरुण रूडयार्ड किपलिंग
साधारण २०-२२ वर्षापूर्वी दूरदर्शनवर 'जंगलबुक' या मूळ कथेवर आधारित अतिशय लोकप्रिय मालिका सुरू होती. त्या मालिकेचे शीर्षकगीत प्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे होते. या मूळ कथेचा जनक रूडयार्ड किप्लिंग -हा जन्माने भारतीय होता. रूडयार्ड किप्लिंग यांना १९०७ साली साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.ज्या वर्षी त्यांना पुरस्कार मिळाला त्या वर्षी इंग्लंडमधील अन्य लेखकांना तो पुरस्कार मिळेल अशीच शक्यता वाटत होती. स्विनबर्न, टॉमस हार्डी, रॉबर्ट ब्रिज इत्यादी लेखकांची नावे स्विडिश अकॅडमीला पाठवण्यात आली होती. किप्लिंग यांचे नाव पाठवावे अशी विचारणा पत्रातून झाली तेव्हा कुठे त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला. योगायोगाने त्यांना पुरस्कार मिळाला. त्यानंतर 'किप्लिंग यांच्या साहित्यात आदर्शवादाचा मागमूस तरी आहे का?' अशी ओरड त्यांच्या विरोधकांनी केली. पण त्यात किती तथ्य होते ते पाहण्याकरता किप्लिंगचे सर्व लेखन वाचायला हवे, त्याचा परिचय करून घ्यायला हवा.
किप्लिंग यांचा जन्म मुंबईत ३० डिसेंबर १८६५ रोजी झाला. त्यांचे वडील जॉन लॉकवुड किल्पिंग हे उत्तम कथा सांगणारे आणि शिल्पकार होते. ते एक चांगले चित्रकारसुद्धा होते. १८११ साली रुडयार्ड किप्लिंग यांचे 'बीस्ट ऍंड मॅन ऑफ इंडिया' हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामधील चित्रे त्यांच्या वडिलांनी काढली होती. रुडयार्ड यांच्या आईचे नाव एलिस मॅकडॉनल्ड होते. ती अतिशय उत्साही आणि हसतमुख अशी स्त्री होती. रूडयार्ड यांच्या स्वभावात याचे प्रतिबिंब बघावयास मिळते. किप्लिंग यांचे मूळ नाव जोजफ रूडयार्ड असे होते. रूडयार्ड या तलावाजवळ त्यांचे मातापिता प्रथम एकमेकांना भेटले होते व त्याची आठवण म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव रुडयार्ड ठेवले होते. किप्लिंग यांचे बालपण आणि तारूण्य भारतातच गेले. उच्चशिक्षणाकरता डिवानशायर येथे गेल्यावर किप्लिंग यांना आईची आठवत येत असे. घरापासून दूर असतांना हा सुरुवातीचा काळ त्यांना खूप त्रासदायक वाटला होता.
१८८० साली ते भारतात परत आले आणि पत्रकारितेत काम करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यादरम्यान त्यांनी अनेक लघुकथा आणि कविता लिहिल्या. भारतातील सैनिकांची स्थिती जाणून घेण्यास किप्लिंग उत्सुक होते म्हणून 'ड्यूक ऑफ कॅनॉट' भारतात आले असतांना किप्लिंग यांनी त्यांना सीमाप्रांतात राहून लेखन करण्याची परवानगी मागितली. १८८२-१८८९ या काळात किप्लिंग लाहोर, मुंबई अशा शहरात राहिले आणि त्यांनी विपुल लेखन केले. भारतातील वृत्तपत्रातून त्यांचे सर्व लेख, कथा आणि कविता प्रकाशित होत असत. किप्लिंग यांचे पहिले पुस्तक 'ए. एच. व्हीलर ऍंड कंपनी'ने काढले होते. ते किप्लिंग यांनी आपल्या आईवडिलांना अर्पण केले आहे. किप्लिंग यांनी 'हिल्स, टु आईज ऑव्ह एशिया' हे पुस्तक लिहिले. त्यात 'डिपार्टमेंटल डिट्टीज', 'सोल्जर्स', 'थ्री' आणि 'अंडर द देवदार' अशा कितीतरी सुंदर कथा आहेत. ब्रिटिश राजवटीदरम्यानच्या भारतीय वसाहतीचे चित्रण त्यात आहे.
किप्लिंग यांनी भारताच्या संदर्भात विशेषतः सैनिकांच्या आणि त्यांच्या बायकांच्या संदर्भात जे काही लिहिले ते वाचून इंग्रजी वाचकांमध्ये खूप चर्चा होत असे. हे सगळे अतिशयोक्तीपूर्ण लेखन आहे असा त्या चर्चांचा सूर असे. ज्यांनी भारताला भेट दिली होती त्यांना त्यामधील सत्याचा पडताळा आला होता. पण इतरांच्या मनात मात्र संदेह कायमच होता. त्याकाळात राजाश्रयाविना आपण राहू शकणार नाही अशा विचारसरणीचे आणि परिणामी गुलामगिरीला मान्यता देणारे अनेक लोक भारतात होते. अशांची वर्णने किप्लिंगने केलेली आहेत. किप्लिंग यांचे लेखन त्यांच्या सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनावर आधारित असून ते त्यापासून वेगळे करता येत नाही, अशी टीका त्यांच्यावर नेहमी होत आली. त्याचमुळे त्यांच्यावर वर्णद्वेषाचा आरोप झाला. असे असले तरी त्यांच्या लेखनात युरोपियांव्यतिरिक्त इतरांविषयी काही चांगले संदर्भ आणि उद्गार आढळतात हे विशेष म्हणायला हवे!
१८८९ मध्ये किप्लिंग इंग्लंडला परत गेले. त्यांनी भारतातील इंग्रजी साम्राज्याच्या काळातली वर्णने अतिशय मार्मिक आणि सजीवपणे केली, म्हणून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. टीकेची पर्वा न करता किप्लिंग यांचे लेखन सुरुच राहिले. भारतीय नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या त्यांच्या ८० लघुकथा पुन्हा इंग्लंडमध्ये प्रकाशित करण्यात आल्या. एक काळ असा होता की दर महिन्याला त्यांचे कोणते ना कोणते पुस्तक प्रकाशित होत असे. त्यांच्या कविताही प्रकाशित होत राहिल्या. तीस वर्षे हा क्रम सुरू होता. त्यामुळे साहित्यजगतात किप्लिंग यांच्या पुस्तकांचा जणू पूरच आला होता. किप्लिंग यांना जे यश मिळाले तेवढे यश त्या काळात इतर कोणत्याही इंग्रजी लेखकाच्या वाट्याला आले नव्हते. भारतीय पार्श्वभूमी असलेल्या त्यांच्या साहित्यामधून अनेक हिंदी शब्दांचा वापर केलेला आढळतो. त्यामुळे भारताबाहेरच्या वाचकांना अनेक हिंदी शब्दांचा परिचय झाला. पंडित, हुक्का, बंदर, आया इत्यादी शब्द त्यांच्या लेखनात आढळतात. नंतर हे सर्व शब्द इंग्रजीत रूळले आहेत.
१८९२ च्या जानेवारीत किप्लिंग यांचा विवाह कॅरोलिनशी झाला. ती एका अमेरिकन पत्रकार; पुढे प्रकाशक झालेल्या व्यक्तीची बहीण होती. लग्नानंतर किप्लिंग सपत्नीक जपानच्या दौऱ्यावर गेले. तिथे असतांना त्यांनी ज्या बँकेत पैसे ठेवले ती बँक बुडाल्याची खबर मिळाली. त्यामुळे ते दोघे तडक इंग्लंडला परत आले. तेथे त्यांनी ४ वर्षे अतिशय सुखात काढली. त्यांना पुढील चार वर्षाच्या कालखंडात एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. 'दि डेज वर्क', 'दि सेव्हन सीज' ह्या रचना त्यांनी त्या काळात पूर्ण केल्या. जंगल बुक या अजरामर साहित्यकृतीचे लेखन त्याचवेळी केले. या सर्व पुस्तकांची युरोप आणि अमेरिकेत खूप विक्री झाली. जगातील अनेक भाषांत त्याचे अनुवादही झाले.
त्यांची 'द नौलाख- अ स्टोरी ऑफ इस्ट ऍंड वेस्ट' (१८९२), 'द जंगल बुक' (१८९४), 'द सेकंड जंगल बुक' (१९९५) आणि 'कॅप्टन्स करेजियस' (१८९६) ही सर्व पुस्तक खूप गाजली. किप्लिंगच्या साहित्यातल्या व्यक्तिरेखांनी त्यांची सामाजिक आणि राजकीय भूमिका लोकांसमोर मांडली. 'किम' असो, 'द व्हाईट मॅन्स बर्डन' असो की गंगादिन कवितेमधला 'गंगादिन' अथवा जंगलबुक मधला 'अकेला', कल्पिंगच्या व्यक्तिरेखा ब्रिटिश, जर्मन सत्ताधारी व्यक्तीं आणि हुकुमशाहीचे, दडपशाहीचे चित्रण करतात. ह्या व्यक्तीरेखा म्हणजे काल्पनिक पात्रे आहेत असा युक्तिवाद किप्लिंगचे समर्थक करतात; पण त्यातच किप्लिंगची खरी भूमिका दिसून येते. त्यामुळे किप्लिंगवर जे आरोप झाले त्यातले तथ्य सुद्धा ध्यानात येते.
१८९८च्या हिवाळ्यात किप्लिंग परिवार दक्षिण आफ्रिकेत सुटीनिमित्ताने गेला. मुलांना तेथील रहिवासी, हवामान आणि एकंदर वातावरण खूप आवडले होते आणि ते कित्येक वर्षे त्यांच्या मनात होते, अशी नोंद किप्लिंगने त्यांच्या 'समथिंग अबाऊट मायसेल्फ- फॉऱ माय फ्रेंडस, नोन ऍंड अननोन' या आत्मचरित्रात केला आहे. पुढे एक वर्षानंतर अमेरिकेत असतांना निमोनियाने किप्लिंगच्या मुलीचा मृत्यू झाला. स्वतः किप्लिंगसुद्धा निमोनियाने बराच काळ आजारी होता. बॉयर युद्धादरम्यान किप्लिंगने सैन्याला आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. त्याने सैन्याकरता पत्रकार म्हणूनही काम केले. त्या दोन आठवड्यात त्याने युद्धाचे भयभीत करणारे अनुभव घेतले. टायफाईड, डिसेंट्री, आणि बराक्समधील घटनांचा तो साक्षीदार होता. मृत्यूला सामोरे जातांनाही ती मुले अतिशय आनंदी आणि उत्साही होती अशी नोंद त्याने आत्मचरित्रात केली आहे. पण त्या युद्धाने आलेल्या अनुभवाने किप्लिंग व्यथित झाला होता. त्याने काही काळ एकांतवासात घालवला. पण किप्लिंगच्या पुढील लेखनात या युद्धाचे, रशिया, ब्रिटन आणि आशियातील परस्पर संबंधांचे चित्रण अधिक ठळकपणे जाणवत राहाते.
१९०१ साली प्रथम प्रकाशित झालेल्या 'किम'मध्ये किप्लिंगने एका प्रवासवर्णनात अपेक्षित असणारी कष्टकरी समाजाची सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय अशी ऐतिहासिक स्थित्यंतरे अतिशय प्रभावीपणे रेखाटली आहेत. उत्साही, बहुरंगी व्यक्तिमत्त्व असलेली पात्रे आणि वैविध्यपूर्ण प्रसंगानी किप्लिंग वाचकाला खिळवून ठेवतो. या पुस्तकात असणाऱ्या प्रमुख व्यक्तिरेखा आत्मशोध, धार्मिक ओढ , शांतता , हेरगिरी, रहस्याचा मागोवा, हिंसा आणि अध्यात्मात अपेक्षित ज्ञानप्राप्ती यात गुंफलेल्या आहेत. किम लाहोरसारख्या शहरात अनाथ म्हणून लहानाचा मोठा होतो. त्याची श्रद्धा एका तिबेटी लामावर असली तरी प्रत्यक्षात तो ब्रिटिशांचा गुप्तहेर आहे.