रक्ताची नाती

सुदर्शन महाबळ

(पृष्ठ २)

"पप्पाजी"
बाबांच्या अपघाताचा सविस्तर तपशील लवकरच मिळाला. त्यांना जीवनदान देणार्‍या देवमाणसांच्या भाषेत सांगायचं झालं तर.... "मै (मेहुलकुमारजी), अंबालालजी, विमलजी, राजेशकुमारजी और बिरजूभाई, अमावसके दिन मंदिर जा रहे थे, मारुती वॅन मे। रास्तेमें भीड देखी तो समझा ऍक्सिडंट हो गया है। पप्पा का बहोत खून बह रहा था। बेहोश थे। कोई हाथ लगाने को तैयार नहीं था। हमने सोचा भगवान ने हमें मंदिर के बजाय यहां उन्हे बचाने के लिये भेजा है। खून को हाथ से रोक कर हमने पप्पा को उठा के वॅन मे डाला और ले गये गव्हर्न्मेंट हॉस्पिटल। कंपाउंडर बोला एफ.आय.आर के सिवा हात नहीं लगा सकते तो बिरजूभाईने उसके कान के नीचे एक थप्पड लगाई। डॉक्टरसे, नेता का नाम लेके ऍडमिट करवाया। सर पे दबाया हुआ हाथ निकाला तो खून की पिचकारीसे बगलवाली वॉल रंग गई। बाद में पप्पाजी के पॉकेटसे बँक का कार्ड मिला और किसीने मम्मीजी को फोन लगाया।"...

या चाळीशी-पन्नाशीच्या सर्वसामान्य दिसणार्‍या गुजराथी बांधवांनी असामान्य काम केलं होतं. त्या गडबडीत त्यांचा हरवलेला मोबाईल, रक्ताने माखलेली गाडी... ह्याची त्यांना पर्वा नव्हती. आम्ही त्यांना हरवलेल्या मोबाईलचे पैसे, येनकेनप्रकारेण देण्याचा प्रयत्न केला. पण हे असामान्य लोक आम्हां सामान्यांची पैशाची भाषा बोलायला तयारच नव्हते.

त्यांना हवी असलेली गोष्ट पैशाने विकत घेण्याजोगी नव्हती.... "हमे तो बस्स, पप्पाजी को उन के पैरों पे हम निकले थे वो मंदिर ले जाना है... तो हम को सब कुछ मिल जायेगा।"

त्यांनी आमच्या आईला "मम्मीजी" तर बाबांना "पप्पाजी" ही पदवी प्रेमाने बहाल केली होती!

मदतीचे हात
आमचं नवीन कुटुंब आता हॉस्पिटलच्या एका खोलीत वसलं होतं. ६x६ ची खोली, एक खिडकी, एक दार, एक बेसीन, एक फॅन... बस्स. त्यात आम्ही किमान सात लोक - आई, तीन मुलं, दोन होणार्‍या सुना, दूरवरून प्रवास करून येणारे नातलग आणि गोडबोलेकाका. ते मूळचे मराठी, पण अहमदाबादला स्थायिक झालेले. त्यांच्या मराठीला एक गोड गुजराथी हेल होता. आमचा त्यांच्याशी आधीचा काहीच परिचय नव्हता. ते बाबांच्या बँकेत नोकरीला होते. तिथूनच त्यांची बाबांशी थोडीफार ओळख झालेली. आपल्या गावी, आपला एक सहकर्मचारी मृत्यूशी झगडतो आहे आणि त्याचं कुटुंब नवीन गावी एकटं पडलंय ह्याच कल्पनेनं त्यांना 'व्यापलं' होतं. आम्ही आळीपाळीने २४ तास बाबांसोबत असायचो. ड्यूटीवरील डॉक्टर आणि नर्स नीट काळजी घेत आहेत ह्याची खात्री करायला, बेडसोअर्स होत नाहीयेत आणि ते खाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायला. दिवसभर बँकेतलं काम संपवून गोडबोलेकाका रात्री आठाच्या ठोक्याला हजर असायचे, फ्रेश! अधूनमधून सोबत आईला आधार द्यायला काकूही असत. "अहो, तुम्हा सगळ्यांना दिवसभर आहेच की... मला काय बँकेतच जायचं आहे." असा ते विनोद करत. "मी जागतो सकाळी २ ते ६. तुम्ही जरा झोप काढा", असं म्हणत सगळ्यात कठीण वेळ ते मागून घ्यायचे.

याआधी मला कॉलेजात सबमिशन्सच्या आदल्या रात्री नाईटस मारायचा अनुभव होता, पण ही जबाबदारी फारच मोठी होती. काही रात्री बाबांच्या उशाशी जागल्यानंतर, मी अनेक रात्री झोपेतून ओरडत भेदरून उठायचो. कायम एकच स्वप्न... ऑन माय वॉच, मला नकळत डोळा लागलाय आणि त्यात बाबा पलंगावरून खाली पडलेत आणि मी काहीच करू शकत नाहीये. मेंटल ट्रॉमा झालेल्या लोकांना असली नाईटमेअर्स पडतात म्हणे. युद्धातून परत येणार्‍या सैनिकांना किती मानसिक तणावातून जावं लागत असेल, नाही? त्यांचे अनुभव तर अजून कितीतरी जोखमीचे आणि भयावह असतील.

आत्या, काका, मामा, त्यांची मुलं, सुना, फॅमिली फ्रेंडस... सगळे कामातून वेळ काढत भेटीला, मदतीला, आधाराला येऊन जायचे. त्यांनी नवस बोलले, उपास केले, पारायणं केली, अंगारा पाठवला. प्रत्येक जण आपापल्यापरीने जमेल तशी मदत करत होता.

अहमदाबादच्या मराठी व अमराठी लोकांनी सर्वतोपरी मदत केली. रोज सकाळी चहा आणि आंघोळीचं गरम पाणी तयार असायचं. रात्री दादाचा मित्र आईसाठी पथ्याचं जेवण घेऊन यायचा.

बाबांच्यात आता मराठी, गुजराथी, पंजाबी आणि बंगाली रक्त वाहत होतं. प्रथम, काही भेटीस येणार्‍या नातेवाईकांनी रक्त दिलं. अनेकांचे ब्लडग्रूप मॅच व्हायचे नाहीतं. अजून रक्ताची गरज पडली तेव्हा मेव्हण्याने त्याच्या ऑफिसच्या अहमदाबाद शाखेत आवाहन केले. आवाहनानंतर तासाभरात अनेकांनी बाह्या वर करत, काहीही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, आनंदाने रक्त दिलं. आपण एक जीव वाचवतो आहे ह्याच भावनेने ते उत्साही दिसत होते.

ह्या सगळ्यांच्या आधारावर आम्ही सगळे नवीन गावी तग धरून होतो आणि रोज उगवत्या सूर्याबरोबर परत mission "increasingly" impossible च्या मागे लागायचो.

दोन इंची ब्रेक-थ्रू

आता बाबांना कोमात जाऊन एक महिना उलटून गेला होता. आलेली दिवाळी फुसक्याबारसारखी अपेक्षा उंचावून निघून गेली. कोमा, इन्फेक्शन, तापाशी लढताना अनेक औषधं झाली, सीटी स्कॅन झाले, अंगारे, पोथ्या, पारयणं, नवस झाले. प्रत्येकाने आपापल्यापरीने प्रयत्न केले. पण यश मात्र हाती लागत नव्हतं. एवढे उपाय करूनसुद्धा रिकवरी दिसत नव्हती आणि टेन्शन वाढत होतं. माझं मन आता वैभवीच्या "बाबा नक्की बरे होणार" या मंत्रावर शंका घ्यायला लागलं होतं. "हे बघ, स्टॅटिस्टिकली, कोमात पाच दिवसांनंतर वाचणार्‍यांचं प्रमाण..." माझं गणिती वाक्य अर्धवट तोडत ती म्हणायची "ते काहीही असो. मला खात्री आहे बाबा नक्कीच, शंभर टक्के शुद्धीवर येणार. " शेवटी एंडोस्कोपी स्पेशालिस्ट कडे गेलो असताना 'युरेका' क्षण आला. तोंडातली फीडिंग ट्यूब २ इंचांनी भलत्याच ठिकाणी औषधं पोहोचवत होती. दोन इंची ट्यूबचं महत्त्व त्या दिवशी कळालं. आमच्या आशा परत पुलकित झाल्या. प्रयत्न नव्या जोमाने सुरू झाले.

एके दिवशी आईच्या नकळत, तिला बाबांच्या उशाशी बसून त्यांचा हात हातात घेत हळुवारपणे कोमातून बाहेर बोलावतांना पाहिलं. बाबा आपलं बोलणं ऐकत आहेत असा तिचा विश्वास होता. याआधी माझ्या नवतरुण खुळचट फिरंगी विचारांच्या भरात मी त्यांना चिडवायचो "अरे काय तुम्ही... फक्त ऑफिस, घरकाम, मुलं... हेच का तुमचं आयुष्य? जरा हातात हात घेऊन पिक्चरला का जात नाहीत? एवढं काय ते लाजायचं." आईपण कमाल करायची. पूजा समारंभाला बाबांसोबत "मम आत्मनः" करत, पळीने उदक सोडताना नव्या नवरीसारखी लाजायची. नंतर मला उपदेशाचे पाठ मिळायचे... "अरे प्रेम असायला हातात हात घालून, नट-नट्यांसारखं गावभर गाणी म्हणत हिंडावं लागत नाही". तो उपदेश माझ्या 'मॉडर्न' डोक्याच्या आरपार निघून जायचा. आईचं ते हळुवार बोलावणं ऐकून असं वाटायचं की अचानक बाबांच्या हातांना परत संवेदना यावी आणि आईच्या हातांना त्यांनी अलगद धरून घ्यावं.

ट्यूब योग्य जागी बसल्यानंतर, आधी निरुपयोगी ठरणारी औषधं आता आपली किमया दाखवू लागली होती. चार पाच दिवसांनी हाताचं ते अनियंत्रित हलणं बंद झालं. हळूहळू त्यांच्यात संवेदना येऊ लागली, डोळ्यांच्या पापण्या हलायला लागल्या, ओठ थरथरायला लागले. अखेरीस एक दिवस बाबा त्यांच्या आवडीचं स्तोत्र, विष्णुसहस्रनाम पुटपुटत हळूहळू कोमातून बाहेर आले. त्यांची आतल्याआत चाललेली स्ट्रगल तेव्हा दिसली. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. बाहेरच्या नुकत्याच संपलेल्या दिवाळीच्या फटाक्यांचे आवाज आमच्या मनात परत जागे झाले.

त्या नंतर आमची रोज ओळखपरेड चाले. बाबांच्या नशिबाने त्यांना बायकोचं नाव नीट आठवलं! मुलांची नावं एकदम आठवली नाहीत मात्र त्यांनी एकेका वाक्यात तीनही मुलांची व्यक्तिचित्रं त्यांच्या मिष्किल शैलीतून इतकी बेमिसाल मांडली की आम्ही सर्वांनी तोंडात बोटं घातली. बाबांच्या स्मृतीत आम्ही पोरं नावांनी नाही तर आमच्या 'करतुतीं'नी घर करून होतो!

ते हळूहळू चालायला फिरायला लागले आणि घरी जायची परवानगी मिळाली तोवर अहमदाबादेतल्या आमच्या वास्तव्याचा दीड महिना उलटून गेला होता. त्यांना पूर्णपणे पूर्ववत व्हायला एका वर्षाहून जास्त वेळ लागला.

अहमदाबादहून निघायच्या आदल्या दिवशी बाबांना वाचवणारे गुजराथी बांधव आवर्जून वॅन घेऊन आले होते, त्यांच्या पप्पाजींना आणि आम्हां सगळ्यांना त्यांच्या श्रद्धेच्या मंदिरात व आपल्या घरी जेवायला घेऊन जायला. त्या दिवशीच्या खाकर्‍याची आणि उंधियोची चव काही औरच होती.

देव + माणसं = देवमाणसं !!

माझा चमत्कारांवर, अंधश्रद्धांवर विश्वास नाही. माझ्यामते बाबांचा सर्वपित्री अमावस्येला झालेला अपघात हा केवळ को-इन्सिडन्स होता. कदाचित त्या रात्री जरा जास्त अंधार असावा. पण 'देव' ह्या संकल्पनेने आम्हां सगळ्यांना आशा दिली हे मात्र खरं. हतबल क्षणी, मनुष्याच्या ताकदीच्या बाहेरही अनेक गोष्टी आहेत ह्याची जाणीव होते. "आसमान में रहनेवाला जादूगर" काही किमया करून जाईल ह्या पुसटशा आशेवर आम्हाला संकटातल्या दिवसांना सामोर जाण्याचं बळ मिळालं.

आभार मानायचे ते कोणाकोणाचे? रस्त्यावर निपचित पडलेल्या अपरिचित व्यक्तीला मदतीचा हात देणार्‍या जीवनदात्यांचे? की बाबांच्या रिकवरी फेज मध्ये त्यांचा आत्मविश्वास परत द्यायला एक बिनकामी पोस्ट तयार करणार्‍या स्टेटबँकेतल्या स्नेह्यांचे? की सामजिक भोचकपणा झुगारून देत, फुलटाईम घरचे डॉक्टर्स देणार्‍या आमच्या सासुरवाड्यांचे? की दुखाःच्या क्षणी आपापल्यापरीने आधार देणार्‍या सगळ्या आप्तस्वकीयांचे? हे सगळे लोक तर आभारप्रदर्शनाच्या फॉर्म्यालिटी पलिकडे गेलेले आहेत. माणुसकीने आपलंसं करणारे हे लोक भेटल्यावर माझा देवावरचा विश्वास वाढला नसला तरी देवमाणसांवरचा विश्वास नक्कीच दृढ झाला आहे.

बायकांच्या भावनिकतेवर पुरुषदृष्टीने कितीही विनोद केले तरी, रात्री रडणार्‍या बाळाचा आवाज ऐकून फुटणारा पान्हा आणि आयुष्याशी झगडत असलेल्या नवर्‍याची काळजी घेणारी बायको बघितल्याशिवाय त्या भावनिकतेची आणि संवेदनक्षमतेची खरी किंमत कळत नाही.

देश, वेष, भाषा, जात ह्यांच्यापलीकडे गेलेली माणुसकी पाहिली की माणसाचं खरं 'नेचर' कळतं. भावनेच्या आधारावर, संवेदनक्षम मनं मोकळी करत जाणारी ही चालती बोलती देवमाणसं भेटली की त्यांच्या पावलावर आपली छोटी पावलं टाकण्याची प्रेरणा मिळते.

जीवनदान देणारी उदात्त मनुष्यवृत्ती पाहिल्यावर, जेव्हा जीव घ्यायला निघालेले, लोकांना एकमेकांपासून दूर करणारे, संकुचित वृत्तीचे मराठी-बिहारी, रशियन-जॉर्जियन, हिंदू-मुस्लिम जातीयवाद ऐकले की वाटतं, "वि कॅन डू बेटर दॅन धिस". बाबांच्या एका जुन्या वहीत लिहिलेला शेर आठवतो - "अष्कों को जो शबनम समझे, दर्दों को जो सरगम समझे, इन्सां है वो इन्सां बडा, जो दुश्मन को भी हमदम समझे|" 

रक्ताची नाती
कधीकधी जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, उंधियो खाताना घास घशात रेंगाळतो, डोळे पाणावतात आणि आमच्या आयुष्याला नवीन वळण देणारी १९९९ची ती अहमदाबादमधली दिवाळी आठवते. आम्ही सगळे त्या अनुभवातून खूप शिकलो. हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला, मनाला जाणवलेला फक्त चार महिन्यांचा आढावा. बाकी लोकांचे अनुभव बरेच वेगळेही असतील. पण ते मी इथे सांगणं योग्य ठरणार नाही.

"झाडांमधून जंगल पाहायचं असेल तर जरा दूर जावं लागतं" असं म्हणतात. आज या गोष्टीला बरीच वर्षं झाली आहेत. आता दुरून माणुसकीचं जंगल कसं स्वच्छ दिसतंय!

आम्हां दोघा भावांची लग्नं ठरल्याप्रमाणे दोन महिन्यांतच धूमधडाक्यात साजरी झाली. सासरकडच्या मंडळींनी जय्यत तयारी केली होती. अंगावर पांढरा कोट आणि गळ्यात स्टेथस्कोप घालून अहमदाबादमध्ये डॉक्टरच्या रुबाबात वावरणार्‍या सुना, आता नऊवारीत आणि दागिन्यात लाजल्या सवरल्या होत्या. त्यांच्या सौंदर्यावर सजलेला तो आत्मविश्वासाचा, अमाप जिव्हाळयाचा, आणि माणुसकीचा अदृश्य दागिना त्यांचं रूप अजूनच खुलवत होता. लग्नाला सगळ्या नातेवाईकांत, शुभचिंतकांत अहमदाबादच्या खास नातलगांचा पण समावेश होता. अंबालालजी, मेहुलकुमारजी, विमलजी, राजेशकुमारजी, बिरजूभाई आणि गोडबोलेकाका आवर्जून आले होते.

आमच्या रक्ताच्या नात्यांत आता अनेकांची भर पडली होती. 'बहनेवाला खून' थांबवणारी, पिशव्या भरभरून रक्त देणारी, आणी एका तान्हुल्यागत काळजी घेत बाबांना नवजीवन देणारी... "रक्ताची नाती".