प्रांतांनी भारती व्हावे

साने गुरूजींनी मांडलेले हे विचार आजच्या स्थितीलाही लागू पडणारे आहेत. म्हणजे हा प्रश्न तेव्हाही होता नि आताही आहे. योगायोगाने हा लेख सापडला म्हणून इथे देतो आहे.

प्रचंड इमारत उभारण्यात येत असते, तेव्हा आपल्याला काय दिसते ? गवंडी दगडांना इकडेतिकडे कापीत, छाटीत असतो, मगच त्यांना त्या भव्य इमारतीत जागा मिळते. ज्याप्रमाणे दगड-विटा सारख्या करून , त्यांची पुढे आलेली टोके काढून छाटून घ्यावी लागतात. त्याच प्रमाणे दगडादगडांच्यामध्ये, विटाविटामध्ये सिमेंटही भरावे लागते. चुना लागतो. प्राचीन इमारती अजून भक्कम आढळतात. म्हणतात की, चुन्यात गूळही घालीत असत.

आज स्वतंत्र भारताची टोलेजंग इमारत उभारायची आहे. भाषावर प्रांतरचना पूर्वीच मंजूर झालेली आहे, परंतु अशी रचना केली जात असता द्वेषमत्सर न फैलावोत. परस्पर प्रेम राहो, सहकार्य राहो, भारताचे एक ह्दय आहे ही जाणीव सर्वाना असो, परमेश्वराला सहस्त्रशीर्ष, सहस्त्राक्ष अशी विशेषणे आपण देतो, परंतु सहस्त्र-ह्दय असे विशेषण कधीच नाही आढळत. परमेश्वराला ह्दय एकच, त्याचप्रमाणे भारताचे प्रांत अनेक झाले तरी अंतःकरण एक असो.

भारताची एक संस्कृती आहे. प्रत्येक प्रांताची विशिष्ट अशी संस्कृती कोठे आहे ? थोडेफार फरक असतील, परंतु तेवढयाने ती भिन्न नाही होत. भारतातील प्रत्येक प्रांताची का भिन्न संस्कृती आहे ? भारतीय संस्कृतीची ध्येये आपल्या संस्कृत ग्रंथांतून आहेत. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, स्मृति पुराणे, दर्शने, यातूनच आपणा ध्येये मिळाली. संस्कृतातील हे ध्येयघोष प्रांतीय भाषांतून जनतेचे कैवारी जे संतकवी त्यांनी दुमदुमवले. कृत्तिदासांचे रामायण बंगालीत श्रीधरांचा रामविजय मराठीत, कंबनचे रामायण तामिळमध्ये, परंतु त्या त्या प्रांतातील जनतेला त्यांच्या भाषेतून रामसीता, भरत-लक्ष्मण, हनुमान यांचे जे आदर्श मिळाले ते का निरनिराळे आहेत.

भगवान शंकराचार्य जन्मले केरळात, परंतु तो ज्ञानसूर्य हिंदुस्थानभर गेला. द्वारका, जगन्नाथपुरी , बदरीकेदार, शृंगेरी चारी दिशांना चार पीठे स्थापून संस्कृतीचे ऐक्य निर्माण करता झाला. शंकराचार्यच्या अद्वैताचा सुगंधच सर्व भारतीय भाषा साहित्याला येत आहे. तुकारामाच्या अभंगात, नरसी मेहताच्या भजनात, रवीद्रनाथांच्या गीतांजलीत, श्री बसवांच्या वचनात, एकाच संस्कृतीची ध्येये दिसून येतील. भारतीय संतांनी आणि आचार्यानी भारतीय संस्कृती एकरूप केली. नामदेवांनी अभंग शीखांच्या ग्रंथसाहेबात जातात. कबीराची गाणी नि दोहे, मीराबाईची उचंबळवणारी गीते. गोपीचंदाची गाणी सर्व हिंदूस्थानभर गेली आहेत. दक्षिणेकडील यात्रेला उत्तरेकडील लोक येत. उत्तरेकडील यात्रेला दक्षिणेकडील. संस्कृतातून चर्चा चाले. तीच प्रातीय भाषांतून मग जाई. अशाप्रकारे अखिल भारतीय संस्कृती जोपासली गेली. कमलाच्या अनेक पाकळ्या म्हणजे या प्रातीय संस्कृती त्या अलग नाहीत.

कलकत्त्याला डॉ. कटजू गेले तेव्हा त्यांचे स्वागत करताना बंगाली पुढारी म्हणाले, ' बंगाली संस्कृती निराळी आहे. तिच्या विकासात अडथळे नका आणू.' बंगाली संस्कृती , निराळी म्हणजे काय ? तुमचे विवेकानंद, रामकृष्ण, विद्यासागर, बंकीम, रवींद्र, शरदबाबू यांनी का असे काही दिले जे इतर प्रांतात नाही ? जे इतर प्रांताच्या परंपराहून फार निराळे आहे. आज प्रत्येक प्रांताला असे वाटू लागले आहे की, आपण इतरांहून वेगळे निराळे, बाबांनो, भाषा जरी निराळी बोलत असाल. परंतु आईच्या दुधाबरोबर एकच संस्कृती भारतीय मुलांना पाजली जात आहे हे विसरू नका.

1930 मध्ये आम्ही मुंबई प्रांतातले राजबंदी त्रिचनापल्लीला पाठवले गेलो. सायंकाळी प्रार्थना झाल्यावर कोणी काही लिहून वाची व्यंकटाचलम म्हणून दक्षिणेतला एक राजबंदी माझा मित्र झाला होता. तो इंग्रजीत काही लिही. मी मराठीत अनुवादून वाची. त्याची भाषा मल्याळी, ' त्याने मलबारकडचा एक दिवस ' म्हणून एक लेख लिहिला मी त्याचे भाषांतर करून वाचले. 'सकाळी बायका उठतात. चूल सारवतात. सडा-समार्जन करतात. मग कॉफी होते. आजीबाई भाजी चिरते. आजोबा पूजेला बसतात. सुना तळ्यावर धुणी घेऊन जातात.' असे ते वर्णन होते. ते ऐकल्यावर महाराष्ट्रीय मित्र म्हणाले, ' आपल्या कडच्यासारखेच आहे.' मी म्हटले, ' भारताचे ह्दय एकच आहे. तेच प्रश्न , त्याच सामाजिक समस्या, हुंडे, स्पृशा-स्पृश्ये- तेच प्रकार. म्हणून मी म्हणतो की भारतीय संस्कृती एक आहे. प्रांताप्रांताच्या संस्कृती विशेष अलग अशा नाहीत.परंतु एकदा कोठे शुद्धीच्या नावावर हकालपट्टी सुरू झाली म्हणजे ती कोठे थांबेल ते सांगता येणार नाही.

मराठीतून उर्दू शब्द हाकला चळवळ सुरू झाली. नाना शब्दांच्या नाना छटा असतात. आकाश शब्द नि अस्मान शब्द पण एकत्र नाही घालवणार, परंतु विवक्षित छटा दाखवायला अस्मान शब्द सुंदर वाटतो. साऱ्या जगांतून घ्यावे, पचवावे नि बलवान व्हावे, इंग्रजी कोशात राजा, सरदार , जंगल इत्यादि शब्द आढळतील. शेकडो ठिकाणचे त्यांनी शब्द घेतले. भाषा शुद्धीची चळवळ आणि प्रांतशुद्धीची चळवळ ! हिंदूंनी मुसलमानांना हाकलावे, मुसलमानांनी हिंदू-शिखांना हाकलावे . एकमेकांची घाण जणू दूर काढावी, असे प्रकार सुरू झाले ! परंतु मुसलमानांनी हिंदूशिखांना आणि हिंदूशीखांनी मुसलमानांना हाकल्यावर पुढे काय ? हाकलायची तर गोडी वाटू लागली.मग बंगाल्याने बिहारीला 'चले जाव' म्हणावे, बिहारीने बंगाल्याला तामीळ बंधूने तेलगू बंधूस, तेलगू बंधूने तामीळबंधूस, कानडी बंधूनी महाराष्ट्रीयास, महाराष्ट्रीयांनी गुजरात्यास, असे का एकमेकांना खो देत रहायचे ? आज हे प्रकार होत आहेत.

श्री. जयप्रकाश मद्रासच्या बाजूला दौऱ्यावर असता, आम्हाला स्वतंत्र द्रविडीस्थान द्या. आर्यांनी आमचा नाश केला, आर्य भाषेतील शब्द काढून टाकले अशा चाललेल्या चळवळी त्यांनी पाहिल्या. त्यांना दुःख झाले. कोठे आहे भारत ? प्रत्येक प्रांत का सर्वतंत्र स्वतंत्र होणार ? हे असहिष्णू प्रकार कोण थांबवणार ? आपणच याला आळा घालू या. आळा कशाने घालता येईल ? परस्परांची भाषा अभ्यासून. एखादी तरी द्रविडी भाषा आपल्याला आली पाहिजे. मातृभाषा नि हिंदुस्थानी याशिवाय जयप्रकाश मद्रासकडे हिंडताना आधी चार वाक्ये तामीळमध्ये बोलत लोकांना आनंद होई. भाषा अहंकारासाठी नसून ह्दयाला पोचण्यासाठी आहे.

सेनापती नि मी अस्पृशता निवारणार्थ हिंडत असता गडहिंग्लजला गेलो. मला चिठ्ठी आली, ' गुरूजी , कानडीत बोला.'
मी म्हटले, ' तुरुंगात वाचायला शिकलो, परंतु बोलायला नाही.' सेनापतीना वाईट वाटले. आमची मोटार लॉरीसारखी जात होती. बरोबर सेवादल पथकात कुतुब होता. त्याला कानडी येई, सेनापती म्हणाले , ' बंधू भगिनीनो वगैरे मला कानडीत शिकव.' सेनापतींनी चार वाक्ये पाठ केली. पुढच्या सभेत, ' बांधब रे मत्तु भगिनी रे ' त्यांनी म्हटले टाळ्यांचा कडकडाट झाला ! ह्दयला ते शब्द भेटले. विवेकानंद शिकागोला सर्वधर्म परिषदेसाठी गेले. सारे प्रतिनिधी ' सभ्य नरनारींनो असा आरंभ करीत विवेकानंद ' बंधू-भगिनींनो' म्हणाले आणि टाळ्या थांबत ना ! त्या दोन शब्दांनी त्यांनी सारी ह्दये जिंकली अशी ही मौज आहे. कानडी भाषा बोलत असले म्हणजे काय ' उंडु गुंडु' चालवले आङे म्हणू नये. गुजरातीला ' अमळो' असे हिणवू नये. ती ती भाषा कानावर पडली तर भावाची भाषा भेटली म्हणून नाचावे थोडेथोडे शब्द येत असावेत. गाणी येत असावीत. आनंद वाटावा.

मी मुबंईस मांटुग्याला उडपी श्रीकृष्ण भुवन खानावळीत जातो. तेथे कानडी, तमीळ, तेलगू, मल्याळी सारे येतात. मला अपार आनंद होतो. भारतीय बंधूंचे दर्शन होते. मी देशभर कधी हिंडू फिरू ? मला मित्र म्हणतात. ' इतक्या लांब कशाला जाता ?' तेथे मला माझा सारा प्यारा भारत भेटतो. हा आनंद त्यांना काय कळे ? विनोबाजी एकदा म्हणाले, ' आकाशातील सप्तर्षी पाहून मला नकाशातील काश्मिर नि युक्तप्रांत आठवतात । ' जेथे जातो तेथे भारताचे भव्य दर्शन, असे भारतमय आपण होऊ या. हिमालय माझे डोके , विध्याद्रि माझा कंबर पट्टा, पूर्व पश्चिम तीरे माझे पाय. सर्व भारताच्या रुपाने मला नटू दे साऱ्या भाषा माझ्या, सारे भाऊ माझे. माझे मोठे कुटुंब आहे. लाखांचे हे तुटपुंजे राष्ट्र नाही. या कोटयावधींचे ते आहे. मग मोठया कुटुंबावर जबाबदारी अधिक. शिका दोनचार भाषा. प्रांताच्या सीमेवरचे भाग तर संगमाप्रमाणे तीर्थक्षेत्रे माना. ते इकडे का तिकडे भांडू नका.

प्रांतांनी भारती व्हावे आणि भारताने अति भारती व्हावे. महात्माजी उर्दू लिपी शिका म्हणत. अरे त्या महापुरुषांची दूरदृष्ठी आहे. तुमच्याजवळ ? एकीकडे आशियाचा संघ करा म्हणता. ईजिप्तपासून तमाम मुस्लीम राष्ट्रींची जी अरबी लिपी. फक्त र्कांनी रोमन लिपी घेतली. या सर्व देशांचे विचार कळायला त्यांची लिपी नको यायला ? त्या भाषा नको कळायला. ? या सर्व मुस्लिम देशांचे राजकारण वा अर्थकारण अमेरिकेच्या वृत्तपत्रांवरून का आपण वाचणार. समजून घेणार ? हिंदी मुस्लीम कोटयावधी आहेतच. त्यांच्यासाठी शेजारधर्म म्हणून आणि आशियांतील मुस्लिम राष्ट्रांचे ह्दयगत कळावे म्हणून अरबी लिपी शिकणे आवश्यक आहे. युरोपातील लोक अनेक भाषा शिकतात. झेक राष्ट्रात हिंदीचे वर्ग चालतात. काय त्यांना जरूर ? म्हणून आपण क्षुद्र कुंपणे घालून बसता कामा नये. व्याप वाढवाल तर वैभव वाढेल. संकुचितता सोडा. सारे प्रांत प्रेमस्नेहाने एकमेकांजवळ वागोत. भारताचे एक ह्दय असो. प्रांत एकजीवी असोत. आंतरभारती आणि विश्वभारती अशी आमची दोन ध्येये आहेत. ते थोर पूर्वज म्हणाले , ' कृण्वन्तो विश्वमार्यम्' आपण सर्व विश्वाला आर्य म्हणजे उदार सुसंस्कृत करू. म्हणून चिनी भाषा शिकून त्या भाषेत आपल्या प्राचीन पंडितांनी ग्रंथ लिहिले. विनोबाजी अरबी शिकून मुसलमानांना कुराणाचा महिमा आज सांगत आहे. प्रांतांचा परस्परांशी आणि भारताशी प्राणमय संबंध, याला आपण आन्तरभारती ध्येय म्हणू. दुसरे रवींद्र नाथांनी उद्घोषिलेले विश्वभारतीचे. भारताचा सर्व जगाशी संबंध ठेवणे. असे हे संबंध संयम नि सहानूभुती, विशाल व थोर दृष्टी ही असतील तरच निर्माण होतील.

( पूज्य साने गुरूजी यांच्या पुस्तकातून)