॥
श्रीसद्गुरुनाथाय नमः ॥
अभंग # ५.
योगयागविधी येणे नोहें सिद्धी । वायाची उपाधि दंभधर्म ॥
भावेविण देव न कळे निःसंदेह । गुरूविण अनुभव कैसा कळे ॥
तपेंविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥
पाठभेदः कळे निःसंदेह=तुटे संदेह ,सांगात
ज्ञानदेवांनी हरिपाठ लिहिला आहे तो संसारात राहून भगवतप्राप्तीची इच्छा असलेल्या संसारी माणसांसाठीच. "असोनी संसारी जिव्हे वेगु करी" नामस्मरण केल्याने "समाधी संजीवन"
प्राप्त करून घेता येते हे त्यांना सांगायचे आहे. ते स्वतः योगमार्गात
प्रवीण असावेत हे ज्ञानेश्वरीतील ६व्या अध्यायातून कळतेच. नव्हे! ते तर
"योगिराज"होते असे इतर संतांनी त्यांच्याबद्दल लिहिले आहे. योगमार्गातील
अडचणी त्यांना ठाऊक होत्या. संसारी माणसांना हा मार्ग सोयीचा नाही हे
त्यांना कळत होते. ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात ते लिहितात,
"नाहीतरी योग । साधन जे होय ॥
सर्वही ते काय । अप्रमाण ॥
परी अभ्यासाची । गाठावया तड ॥
आपणासी जड । ऐसे म्हण ॥"
मनाच्या सामर्थ्याची त्यांना जाणही आहेच. म्हणून ते त्याच अध्यायात लिहितात,
"पार्था जरी होय । अंगी योगबळ ॥
त्यापुढे चपळ । मन किती ॥"
इतर संतांनीही सर्वसामान्य साधकाला बजाविले आहेच,
"योग मार्ग धरू नका ।कष्ट उरतील जे का ॥
कर्मधर्म नव्हती सांग । उण्या अंगे पतन ॥
अष्टांगयोगसाधनेत जी बाह्य अंगे आहेत ती म्हणजे यम ( अहिंसा,सत्य,अस्तेय,ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह),नियम(अंतर्बाह्य शुचिता,संतोष,तप,अभ्यास आणि परमेशपूजन), आसन ( सहज आणि स्थिर अशी बैठक),प्राणायाम ( प्राणवायूच्या गतीचे नियमन). हीच सर्वसामान्य संसारीजणांना करण्यास कठीण असतात. खरी आंतरिक साधना सुरू होते ती प्रत्याहार( इंद्रियांना त्यांच्या विषयातून परतवून चित्तरूपात त्यांची स्थापना करणे) पासून. हळूहळू धारणा,ध्यान आणि मग समाधि असा
हा प्रवास आहे.समाधीतून योग्याला काही शक्ती प्राप्त होतात. त्यांचा मोह
टाळणे अतिशय कठीण असते.त्यामुळे जगांत मोठेपणा येतो. पण ह्यापायी असे साधक
योगभ्रष्ट होतात. प्रसिद्धीचा परिणाम दंभधर्मात होऊन साधक शेवटी अधोगतीला
जातात. याग म्हणजे यज्ञ. प्राचीन वेदग्रंथ आणि धर्मशास्त्रांत अनेक
यज्ञ सांगितले आहेत. त्यामधील कर्मकांड अतिशय गुंतागुंतीचे आणि खर्चिक
असते. बहुतेक यज्ञांचे ध्येय हे स्वर्गप्राप्ती हेच असते. पण पुण्यसंचय
संपला की त्याला परत यावेच लागते.ज्ञानेश्वरीत ज्ञानदेव लिहितात,
"स्वर्गात पुण्यात्मके पापे येईजे । पापात्मके पापे नरकात जाईजे ॥
मग माते जेणे पाविजे । ते शुद्ध पुण्य ॥"