फार फार पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माळव्यांत राजा भोज राज्य करीत होता. त्याची राजधानी 'धारा' येथें होती. राजा रसिक, विद्वान व शूर असल्यानें त्याचे पदरी अनेक विद्वान लोक होते. कलावंत होते. प्रजेच्या हितासाठी राजा खूप पैसा खर्च करीत असे. न्यायदानाच्या बाबतीत तर त्याचें कौशल्य वाखाणण्यासारखे होते. कुणावर थोडाही अन्याय होऊ नये यासाठी तो जागरुक राही.
एक दिवस काय झाले? दरबारांत एक फिर्याद दाखल झाली. वारा नगरीत एक श्रीमंत सावकार मरण पावला होता. त्याला दोन मुलगे होते. मृत्युपत्रांत सावकारानें एक विचित्र अट घातली होती, त्याच्या मुलांचे दोन सुंदर घोडे होते, त्या घोड्यांवर दोघांचेहि प्राणापलीकडे प्रेम होते. घोडेही मालकाच्या आज्ञेंत वागत असत.
मृत्युपत्रांत अशी अट होती की, 'या दोन घोड्यांची शर्यत लावावी. जो घोडा मागे राहील त्याच्या मालकाला संपत्तीतला सर्वात मोठा अमूल्य असणारा नीलकंठ हिरा मिळावा. उरलेल्या संपत्तीचे सारखे तीन भाग करावेत. दोन दोन्ही भावांनी घ्यावेत व तिसरा धर्मकार्यासाठी खर्च व्हावा.'
भोजराजाने दोन्ही घोड्यांची शर्यत लावण्याचा हुकुम दिला, पण काय आश्चर्य ! घोडे जागचे हालेचनात. बरं एखादे पाऊल टाकलं तरी तें अगदी बरोबर ! आतां काय करावं ! नीलकंठ हिरा सरकारी खजिन्यात जमा करावा असाहि सल्ला कांहींनी दिला. पण राजाला तो पटला नाही. संपत्तीची वाटणी करणें सोपे होते. हिरा राजाच्याच ताब्यांत होता.
एक दिवस राजा शिकारीला बाहेर पडला. मनांतले विचार नाहींसे व्हावेत म्हणून तो एकटाच खूप दूर निघून आला. अवंती नगरीजवळच्या रानांत आल्यानंतर त्यानें आपला घोडा चरायला सोडून दिला व आपण एका विशाल वटवृक्षाखाली आरामांत बसला.
थोडा वेळ गेला. शेजारीच त्याला गडबड ऎकूं आली म्हणुन त्यानें सहज मागे वळून पाहिले. कांबळी पांघरलेली, हातांत काठ्या घेतलेल्या गुराख्यांची पोरे एका झाडाखाली खेळ खेळत होती, त्याचा न्यायदानाचा खेळ चालला होता. शेजारच्या वृक्षाच्या घनदाट छायेखाली एक छोटासा मुलगा बसला होता.
आतां राजा उत्सुकतेनें त्यांच खेळ बघूं लागला. कांही सटरफटर तक्रारी विचारल्या गेल्या. न्यायदान करणारा मुलगा मात्र गंभीरपणें व अस्खलीत भाषेंत बोलत होता. शेवटी एका मुलानें विचारले, 'राजा भोज यांच्या दरबारी खटला चालू आहे. त्याचा निकाल कसा काय लावावा हे अजून कोणाला समजले नाही तरी तो नीलकंठ हीरा कुणाला द्यावा ते आपण सांगावे ---'