सुन मेरे बंधू रे...
बिनसाखरेचा चहा प्यायलात तुम्ही कधी? किंवा बिनसाखरेची बासुंदी खाऊन बघीतलीत? एक वेगळीच पण चांगली चव लागते. हिंदी चित्रपटसंगीताचा कार्यक्रम, तोही लताबाईंच्या गाण्यांना वगळून, अशीच एका नव्या चवीची अनुभूती देऊन गेला. प्रयोजन होते सन्माननीय संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या जन्मशताब्दीचे. एक ऑक्टोबरला झालेल्या या संगीतजलशाचा कालावधी होता तब्बल पाच तासांचा. अर्थात लताबाई आणि सचिनदा या द्वयीचा एक स्वतंत्र कार्यक्रम दोन-तीन दिवसांपूर्वीच होऊन गेला होता. पण लता मंगेशकर या रत्नाला वगळून इतर गायकांना वापरून सचिनदांनी ज्या अजरामर कलाकृती जन्माला घातल्या त्यातल्या पंचेचाळीस निवडक रचनांचा हा कार्यक्रम. खरे तर या कार्यक्रमाविषयी समीक्षात्मक काही लिहिण्याची गरजच नाही. दोन मध्यंतरासह सादर झालेल्या या कार्यक्रमातील गाण्यांची यादी जरी नजरेखालून घातली तरी आठवणीतल्या या गाण्यांचे स्वर्गीय सूर आपल्या आसपास रूंजी घालू लागतात.
'मनोगत' वरील संगीताचे एक जाणकार मला सचिनदांच्या संगीताविषयी लिहितात :
बर्मनदांचे संगीत छान असते. पण अनिल बिस्वास - रोशन - जयदेव यांच्यासारखी खोली त्यात नसते असे माझे मत आहे. याचे कारण बाकी तिघांना काव्यविषयक जाण जास्त होती, त्यामानाने बर्मनदांना तितकी नव्हती असे वाटते. अर्थात देव आनंद साठी मुद्दाम हलकी फुलकी गाणी द्यावी लागली असेही असेल.
त्यांच्या या मताशी सगळेच लोक सहमत असतील असे नाही, पण एक बाकी खरे, या कार्यक्रमाच्या निवेदिकेने म्हटल्याप्रमाणे सचिनदांचे संगीत हे 'तरुणांचे' संगीत आहे. नौशाद यांच्या संगीतासारखे ते कधी शास्त्रीय बोज्याखाली दबून गेले नाही, की मदनमोहन यांच्या सुरावटींसारखे रानावनातून अनवट वाटा धुंडाळत फिरले नाही. सचिनदांचे संगीत हे हातगाडीवाल्याचे, पानवाल्याचे, रिक्षावाल्याचे आहे, सर्वसामान्यांचे आहे. तरीही ते कुलीन, जातीवंत आहे. लोकप्रिय होण्यासाठी सचिनदांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल सारखे उथळ व्हावे लागले नाही. अर्थात मला स्वतःला सचिनदांची 'शर्मिली' नंतरची गाणी फारशी आवडत नाहीत, पण ही माझी वैयक्तिक आवड झाली. त्याआधीचा काळ बाकी जी.एं. चा भाषेत बोलायचे तर सचिनदांच्या सुरांच्या सुगंधी निळ्या धुक्याने भरून गेला आहे.
इतर गायक - संगीतकारांच्या तुलनेत यश मिळवण्यासाठी सचिनदांना कमी संघर्ष करावा लागला असावा, असा माझा समज आहे. राजघराण्यात जन्माला आलेल्या सचिनदांना आपले पिताजी नवद्वीपचंद्र बर्मन यांच्याकडून संगीताचे पहिले धडे मिळाले.एक गायक म्हणून त्यांचे नाव प्रसिद्धीला आले. हिंदी चित्रपटसृष्टीतला त्यांचा प्रवेश ही पुढची नैसर्गिक पायरी होती.
सुन मेरे बंधू रे...
मेरा सुंदर सपना बीत गया...
न तुम हमे जानो...
जानू जानू री..
जाये तो जाये कहां...
उपर गगन विशाल...
गा मेरे मन गा...
आजा पंछी अकेला है...
ढलती जाये चुनरिया हमारी ओ राम...
दुखी मन मेरे...
तू कहां ये बता...
गुपचुप गुपचुप प्यार करे...
सच हुए सपने तेरे...
अच्छा जी मैं हारी...
ख्वाब हो तुम या...