नमस्कार,
अमेरिकेतील रविवारच्या संध्याकाळी म्हणजे सप्टेंबर १०, २००६ ला मनात आले ते लिहीत आहे. कारण अर्थातच सप्टेंबर ११ हे आहे.
याच दिवशी १८९३ साली स्वामी विवेकानंदांनी शिकागोला झालेल्या पाहिल्याच सर्वधर्मपरीषदेत "उपकार" म्हणून दिल्या गेलेल्या काही क्षणांचा बोलायला वापर करून तमाम श्रोत्यांची मने जिंकली. इतकी की याच धर्मपरीषदेत त्यांची नंतर वेळापत्रकात नसूनही अजून व्याख्याने झाली. ज्या अवस्थेत ते पैसा गोळा करून आले, इथे येऊनही संन्यासी असल्यामुळे अथवा व्यवहारात राहण्याची जाण नसल्यामुळे चुका करूनही आणि सर्व फासे विरुद्ध जाऊनही दृढ निश्चयापासून न ढळता एखादा चमत्कार वाटावा अथवा अदृश्य शक्तीची इच्छा, या पद्धतीने ते शिकागोला पोचले आणि स्वतःच्या गुरुला स्वामी रामकृष्णांना त्यांच्या पश्चात दिलेल्या मानसवचनाची परिपूर्ती केली आणि अमेरिकेत हिंदुत्वाची अथवा हिंदू धर्माची म्हणून नव्हे किंवा धर्मांतर करण्याच्या कोत्या हेतूने म्हणून नव्हे, तर खऱ्या अर्थाने वैश्विक आणि कालातित तत्वज्ञानाची ओळख करून मुहूर्तमेढ रचली. आज अमेरीकेतला एक विशिष्ट अमेरिकन - अ-हिंदू समाज पाहताना देखील लक्षात येते की ते रूढार्थाने नव्हे, पण तत्त्वज्ञान आचरण्याच्या दृष्टीने हिंदू धर्माच्या जवळ आले आहेत. मला याचे एक चांगले उदाहरण देयचे आहे पण ते नंतर लिहीन...विवेकानंद स्वतः संन्यस्त होते पण कर्मठ हिंदू नव्हते, म्हणूनच एकदा ते म्हणाले की पुढच्या (भारतीय) पिढीला गीतेचे तत्त्वज्ञान समजावून देयचे असेल तर त्यांना मैदानात जाऊन फुटबॉल खेळूदेत... (कदाचित हे बंगाली लोकांनी नंतर फारच मनावर घेतले!)